ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Tuesday, July 22, 2014

व्हीजन शेअरींग

आपलं ड्रीम, आपलं व्हीजन इतरांसोबत शेअर केलं आणि त्यांना ते कळालं, की फार आनंद होतो. मग आपल्या व्हीजनबद्दल इतरांशी बोलणारी माणसं तयार होतात. याला मी 'माणसं बांधणं' म्हणतो. (हे बांधणं 'टायिंग'च्या नव्हे तर 'कन्स्ट्रक्टिंग'च्या अर्थानं!) मी रोज अशी माणसं बांधतोय, तुम्हीही या. व्हीजन खूप सोप्पंय - कुणाला हरवायचं नाही, कुणाचं ओरबडायचं नाही. फक्त जे आपलं आहे ते पुरेपूर वापरायचं आणि ते अजून छान बनवून पुढं 'पास ऑन' करायचं. येताय ना मग?


Share/Bookmark

Saturday, July 19, 2014

खरा नेता

"राजकारणात वाइटांची गर्दी वाढत असंल, तर याचा अर्थ असाही होतो, की त्यांना निवडून देणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. हे सारं घडत असताना आपण नेत्याची व्याख्याही बदलत असतो. चांगला नेता कोण? जो प्रत्येक लग्नाला जातो आणि ज्याच्यामुळं लग्न दोन-चार तास लांबणीवर पडतं, तो...? जो प्रत्येक मयताला जातो आणि तो गेल्याशिवाय मयताला अग्नी लागत नाही किंवा ज्याच्यावर मातीही पडत नाही, तो?... जो लग्न ठरवायला जातो आणि मोडायलाही जातो, तो?... जो पोलिस ठाण्यात वारंवार जाऊन ट्रॅफिकचे नियम तोडणाऱ्या पोरांना सोडवून आणतो, तो?... लोकप्रतिनिधींची मूलभूत कर्तव्यं बाजूला पडली असून, समाजानंच त्यांच्यावर नवी कर्तव्यं लादली आहेत. दिल्लीत तोंड न उघडणारा, मुंबईत विधानसभेत न जाणारा नेता आपल्याला आता चालतो. तो फक्त लग्नाला आणि मयताला आला तरी भागतं.. जे काम तलाठ्यानं आणि सरकारी दवाखान्यातल्या कंपाउंडरनं करायचं असतं, त्यात हा नेता लक्ष घालतो. लोकप्रिय नेता म्हणून चमकोगिरी करायला लागतो... मी हलवल्याशिवाय समाज हलणार नाही, मी चालवल्याशिवाय समाज चालणार नाही आणि मी बोलतं केल्याशिवाय समाज बोलणार नाही, असं सांगणारा खरा नेता, की लोकांना स्वावलंबी, स्वाभिमानी बनवणारा खरा नेता, याचा फैसला करण्याची वेळ आता आली आहे. आपण नको त्या ठिकाणी निष्ठा टाकून निष्ठावान कार्यकर्ते होणार, की निष्ठावान नागरिक होणार, हेही ठरवण्याची वेळ आली आहे."

- उत्तम कांबळे


Share/Bookmark

Tuesday, July 15, 2014

स्वस्त आणि महाग

हातात घालायचं घड्याळ, अंगावर घालायचे कपडे, खिशात ठेवायचा मोबाईल लोकांना ब्रँडेड आणि स्टँडर्डच लागतो, कितीही महाग असला तरी! पण पोटात जाणारा पदार्थ स्वस्तच लागतो, मग तो सबस्टँडर्ड असला तरी चालतो 'थोडासा'...

Share/Bookmark

Saturday, July 12, 2014

बजेट २०१४ आणि मीडिया

यावेळच्या बजेटबद्दल मीडिया संशयास्पदरीत्या पॉझिटीव्ह दिसतंय. राजकारण आणि अर्थकारण या दोन परस्परावलंबी असल्या तरी वेगवेगळ्या गोष्टी आहेत याची जनतेला जाणीव करुन देण्याऐवजी, निवडणूकपूर्व राजकारणाचाच पुढचा अध्याय म्हणून हे बजेट प्रोजेक्ट केलं जातंय. ज्या महत्त्वाच्या अर्थसंकल्पीय मुद्द्यांवरुन विरोधक आणि मीडिया गेल्या वर्षापर्यंत 'सरकार'ला झोडपत होते, तेच (एफडीआय, पीपीपी, धार्मिक खिरापतीसारखे) मुद्दे याही बजेटमधे आहेतच. आणि इन्कमटॅक्ससाठी उत्पन्नाची मर्यादा तब्बल पन्नास हजारांनी वाढवल्याची हेडलाईन छापण्यापूर्वी मीडियानं या गोष्टीचा अभ्यास करायला हवा होता की, गेल्या वर्षी दोन लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होतंच, शिवाय पाच लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणा-यांना दोन हजारांचा रिबेट मिळत होता इन्कम टॅक्समधून. याचा अर्थ, दोन लाखांपुढील वीस हजार टॅक्सेबल इन्कमदेखील टॅक्स-फ्री होतं. या बजेटमधे हे लिमिट प्रत्यक्षात तीसच हजारांनी वाढवण्यात आलं आहे. देशाचं बजेट तयार करताना, निवडणुकीतल्या घोषणा आणि आश्वासनं बाजूला ठेवून, १९९१ पासून २०१३ पर्यंतच्या बजेटचीच सुधारीत व विस्तारीत आवृत्ती सादर करावी लागते/लागणार हे नव्या सरकारनं देखील मान्य केलेलं असताना, काहीतरी क्रांतिकारी बजेट हाती लागल्याचा मीडियाचा कांगावा हास्यास्पदच नाही का?


Share/Bookmark

Thursday, July 10, 2014

प्रोड्युसर आणि कन्झ्युमर

ओपन मार्केटमधे जितके (छोटे आणि स्थानिक) प्रोड्युसर जास्त तितकी मोठ्या उद्योगसमूहांसाठी स्पर्धा जास्त आणि मार्केटवर ताबा मिळवण्याची, मोनोपॉलीची शक्यता कमी. त्यामुळं छोटे-छोटे उत्पादक संपवणं आणि निर्मात्यांचं उपभोक्त्यांमधे रुपांतर करणं विशिष्ट उद्योगसमूहांच्या भरभराटीसाठी आवश्यक होऊन बसतं. शेतीच्या इंडस्ट्रियलायझेशनचा प्लॅन, शेतजमिनींची झपाट्यानं होत असलेली गुंठेवारी, शेतक-यांना मिळणा-या सवलतींविषयी इतर जनतेच्या मनात पेरली जाणारी असंतोषाची भावना, या सगळ्याकडं समाजातल्या सर्वच घटकांनी डोळे उघडून बघण्याची वेळ आलेली आहे. आज शेतकरी जात्यात असेल तर इतर व्यावसायिक सुपात आणि बाकीची जनता पोत्यात, एवढाच काय तो फरक!


Share/Bookmark

Wednesday, July 9, 2014

घरच्या मिरचीची गोष्ट

मिरजेजवळच्या भोसे गावात शेतक-यांच्या ग्रुपला भेटायला गेलो होतो. चर्चा शेतकरी-अडते-ग्राहक यावर आली तेव्हा एका शेतक-यानं सांगितलेला अनुभव -

"वडलांनी शेतात मिरची लावली होती. मिरची काढून मिरज मार्केटला पोचवायची होती. दीडशे रुपये देऊन तीन बायका लावल्या होत्या मिरची काढायला. मी तेव्हा मिरजेला नोकरी करायचो. जाता-जाता मार्केटला मिरचीचं पोतं पोच करायला वडलांनी सांगितलं. मोटरसायकलवर पोतं टाकून निघालो. गाडी सुरु करताना वडलांनी घरातून एक रिकामी पिशवी आणून दिली आणि सांगितलं, घरची मिर्ची हाय, जाता-जाता मिरजेच्या काकाकडं थोडी दिऊन जा. तिथून निघालो ते थेट मिरज मार्केटला. मोटरसायकलवर पोतं बघून तिथला एकजण पुढं आला. 'काय घिऊन आलाय?' मी सांगितलं - मिरची. म्हणाला, 'कशाला आणलाय? कोण इचारतंय इथं मिर्चीला?' मी निम्मा गार झालो. म्हटलं, घिऊन तर आलोय. किती मिळत्याल बोला. जरा अंदाज घेत बोलला - एका पोत्याचं पन्नास! मी म्हटलं, दीडशे रुप्ये निस्ती मजुरी झाल्या मिर्ची काढायची. मोटरसायकलवर घिऊन आलोय त्ये येगळंच. मिर्ची लावल्यापास्नं किती खरीचल्यात त्ये तर सांगतच न्हाई... मग होय-न्हाय करत शेवटी शंभरला तयार झाला. मला पण कामावर जायला उशिर होत होता. शंभर रुपये घेऊन पोतं टाकलं आणि कामावर गेलो. दुपारी जेवणाच्या सुट्टीत वडलांनी दिलेली रिकामी पिशवी बघितली आणि काकांसाठी मिरच्या काढायच्या राह्यल्या ते आठवलं. घरची मिरची, एवढं सांगून काकांकडं पोचवली नाही तर घरी गेल्यावर शिव्याच पडतील. तसाच पुन्हा निघालो, मार्केटला आलो. तो सकाळचा माणूस कुठं दिसेना, पण त्याच्याकडनं मिरच्या घेऊन विकायला बसलेल्या बायका सापडल्या. त्यांच्याकडं गेलो नि सांगितलं, जरा ह्या पिशवीत मिरच्या भरुन द्या. त्यांनी विचारलं, किती दिऊ? मी म्हटलं, द्या चार-पाच किलो, घरच्याच हैत! असं म्हटल्यावर बाई तागडी ठिऊन माझ्याकडं बघाय लागली. म्हणाली, कुठनं आलायसा? चार रुप्ये पाव हाय मिर्ची. किती भरु सांगा. मी म्हटलं, अवो सकाळी मीच टाकून गेलोय की पोतं तुमच्यासमोर. तवा काडून घ्याची राह्यली म्हून परत आलो. बाई काय ऐकंना. काकांकडं तर मिरची द्यायचीच होती. शेवटी झक मारत साठ रुपये देऊन चार किलो मिरची विकत घेतली आणि काकांकडं पोच केली!"

उत्पादक ग्राहक झाला की काय होतं याचं उत्तम उदाहरण. म्हणून तर मी नेहमी म्हणतो, प्रोड्युस करु शकणा-यांनी कन्झ्युमर होणं ही डेव्हलपमेंट नाहीये भौ! :-)


Share/Bookmark