ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Thursday, November 22, 2012

भारतीय चिकित्सा पद्धती


    इतर अनेक प्रस्थापित व नवनवीन उपचार पद्धतींबरोबरच, आजही बर्‍याच ठिकाणी भारतीय चिकित्सा पद्धती व होमिओपॅथीचा वापर केला जातो. याचं कारण म्हणजे, या पद्धतीच्या उपचारांची आणि औषधांची सर्वत्र उपलब्धता. तसंच, सर्वसामान्यांना शारीरिक व आर्थिकदृष्ट्या परवडणार्‍या उपचार पद्धती म्हणूनही यांच्याकडं पाहिलं जातं.

    पूरक आणि पर्यायी औषधं, तसंच पारंपारिक चिकित्सा पद्धती यांचं महत्त्व एकंदर जगभरात वाढू लागलंय. त्यामुळं, भारतीय चिकित्सा पद्धतींकडं देखील लोकांचा ओढा वाढतोय. रासायनिक औषधांचे विपरीत परिणाम आणि प्रस्थापित आरोग्य सेवांचे वाढते दरही याला कारणीभूत आहेत. दीर्घायुष्याची कामना आणि बदलत्या जीवनशैलीनं निर्माण केलेल्या शारीरिक/मानसिक समस्या, या दोन्हींसाठी नवनवीन उपचार व तंत्रज्ञान विकसित होत असलं तरी, लोकांना साध्या-सोप्या उपचार पद्धतींमध्ये जास्त रस आहे. अशा पद्धती, ज्यानं आरोग्यविषयक समस्यांचं निराकरण तर होईलच पण त्याचबरोबर जीवनमानाचा दर्जाही उंचावेल.

    सुदैवानं, भारताच्या प्राचीन चिकित्सा पद्धतींमध्ये रोगप्रतिबंधक (प्रिव्हेन्टीव्ह) आणि रोगनिवारक (क्युरेटीव्ह) उपचार पद्धतींचा अनमोल खजिना उपलब्ध आहे. भारतीय चिकित्सा पद्धतींमध्ये आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, सिद्ध, युनानी, तसंच होमिओपॅथी आदींचा समावेश होतो. यांची काही खास वैशिष्ट्यं आहेत. उदाहरणार्थ, या पद्धतींमधील उपचारांची विविधता व लवचिकता, जी एकाच रोगावर वेगवेगळ्या रुग्णांच्या वैद्यकीय स्थितींनुसार निरनिराळ्या पद्धतीचे उपचार सुचवते. यामुळं व्यक्तिगत उपचारांतून दीर्घकाळ टिकणारे उपाय योजणं शक्य होतं. या पद्धतीच्या औषधींची व अन्य सामग्रीची उपलब्धता हेही एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणता येईल. आपल्या आजूबाजूला आढळणार्‍या वनस्पती व पदार्थांमधून ही औषधं बनवली जातात. रसायनांचा वापर नसल्यानं यांच्यापासून साईड-इफेक्टचा धोका नाही. तसंच, औषध निर्मितीसाठी सर्वसाधारण तंत्रज्ञान व त्यामुळं तुलनेनं कमी खर्चात उपचार शक्य होतात. या पद्धती परंपरेशी व संस्कृतीशी निगडीत असल्यानं त्यांना वर्षानुवर्षं समाजमान्यता मिळत आलेली आहे. या बाबींचा विचार केल्यास असं लक्षात येईल की, भारतासारख्या देशात व्यापक प्रमाणावर प्रभावी आरोग्य सेवा पुरवण्याची क्षमता या चिकित्सा पद्धतींमध्ये आहे.

    आयुर्वेद, होमिओपॅथी, सिद्ध, युनानी, योग व निसर्गोपचार, यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अशा रोगप्रतिबंधक आणि रोगनिवारक उपचार पद्धती उपलब्ध आहेत, ज्या इतर पद्धतींच्या तुलनेत अधिक स्वस्त आणि गुणकारक ठरल्या आहेत. या उपचार पद्धतींकडं शासकीय पातळीवरुन दीर्घकाळ दुर्लक्ष झालं असलं तरी, १९८३च्या राष्ट्रीय आरोग्य धोरणामध्ये, संबंधित चिकित्सा पद्धतींचा पुरेपूर वापर होण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज असल्याचं नमूद करण्यात आलं. १९९५ मध्ये भारतीय चिकित्सा पद्धती व होमिओपॅथी (ISM&H) विभागाची स्थापना करण्यात आली.

    आरोग्य व कुटुंबकल्याण विभागाच्या केंद्रीय समितीनं १९९९ मध्ये सादर केलेल्या शिफारशींपैकी काही मुद्दे या क्षेत्रात भरपूर नव्या संधी निर्माण करणारे होते. जसे की -
    - प्रत्येक प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रावर किमान एक, भारतीय चिकित्सा पद्धतीचा (ISM&H) डॉक्टर असावा.
    - अ‍ॅलोपॅथिक डॉक्टरांच्या अनुपलब्धतेमुळं रिकाम्या राहिलेल्या जागा, भारतीय चिकित्सा पद्धतीच्या डॉक्टरांनी भरुन काढाव्यात.
    - ग्रामीण रुग्णालयांमध्ये भारतीय चिकित्सा पद्धतींची उपचार केंद्रं सुरु करावीत. तसंच, या उपचार पद्धतींचा जनतेला फायदा मिळवून देण्यासाठी, राज्य व जिल्हा पातळीवरील सरकारी इस्पितळांत स्वतंत्र विभाग उघडावेत.

    भारतीय चिकित्सा पद्धती व होमिओपॅथी (ISM&H) या विभागाचं नोव्हेंबर २००३ मध्ये, 'आयुष' (AYUSH म्हणजे आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, आणि होमिओपॅथी) असं नामकरण करण्यात आलं. देशातील, वरील भारतीय चिकित्सा पद्धतींच्या शिक्षणाचा दर्जा उंचावणं, हे या विभागाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाशी संलग्न असणार्‍या 'आयुष' विभागाकडून मान्यता प्राप्त केलेल्या आयुर्वेदीक मेडीकल कॉलेजांमध्ये देशपातळीवर पुढील अभ्यासक्रम चालवले जातात -

    १. पदवी अभ्यासक्रम - साडेपाच वर्षांचा 'आयुर्वेदाचार्य' (म्हणजे बॅचलर ऑफ आयुर्वेदीक मेडिसीन अ‍ॅण्ड सर्जरी - BAMS) हा पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. साडेचार वर्षं मुख्य अभ्यासक्रम आणि एक वर्ष इंटर्नशिप असं याचं स्वरुप आहे.
    २. पदव्युत्तर अभ्यासक्रम - आयुर्वेद वाचस्पती (MD) किंवा आयुर्वेद धन्वंतरी (MS) असा तीन वर्षांचा विशिष्ट विषयांचा पदव्युत्तर (PG) अभ्यासक्रम आहे. सर्वसाधारणपणे २२ विषयांमध्ये एम.डी. किंवा एम.एस. करता येतं.
    ३. पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम - सर्वसाधारणपणे १६ विषयांमध्ये पदव्युत्तर पदविका (PG Diploma) अभ्यासक्रम उपलब्ध आहे. याचा कालावधी आहे दोन वर्षं.

    आयएमसीसी अ‍ॅक्ट १९७० नुसार, भारतातील आयुर्वेद, युनानी इ. चिकित्सा पद्धतींचं पदवी व पदव्युत्तर शिक्षण, तसंच आयुर्वेदीक उपचार पद्धतीचा वापर (प्रॅक्टीस) यांचं नियंत्रण, भारतीय चिकित्सा केन्द्रीय परिषद (सीसीआयएम) या नियामक मंडळाकडं आहे. भारतीय चिकित्सा पद्धतींचे अभ्यासक्रम व महाविद्यालयांची सर्व माहिती परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे - www.ccimindia.org.

Share/Bookmark

Tuesday, November 20, 2012

फ्लॅट खरेदीः- रेडी पझेशन की अंडर-कन्स्ट्रक्शन?

फ्लॅट खरेदी करणार्‍यांची पहिली पसंती बहुदा 'रेडी पझेशन' अर्थात् तयार घराला असते. तयार घरात ते ताबडतोब रहायला जाऊ शकतात, आपल्या सोयीनुसार त्यात पटकन् बदल करून घेऊ शकतात, आणि त्या ठिकाणी लगेच मॅच होऊन जातात. असं असलं तरी, रेडी फ्लॅट विकत घेण्यात काही समस्यादेखील आहेत.

  • वाढलेली किंमतः तयार फ्लॅट्सना असणार्‍या जास्त मागणीमुळं या फ्लॅट्सच्या किंमतीदेखील अंडर-कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्सपेक्षा जास्त असतात. याचाच अर्थ, जास्त किंमतीला खरेदी केल्यामुळं रेडी फ्लॅटमधील गुंतवणूक तुलनेने कमी फायदेशीर ठरते.
  • जास्त रकमेचा मासिक हप्‍ताः बँक व इतर वित्तसंस्था, बांधकामाच्या टप्प्यांनुसार कर्जाची रक्कम वितरीत करतात. त्यामुळं होम लोन घेताना, कन्स्ट्रक्शनमधील फ्लॅटवर मिळणारी छोट्या हप्‍त्याची सुविधा रेडी फ्लॅट घेणार्‍या ग्राहकांना मिळत नाही.
  • अंतर्गत बदलांवर मर्यादाः तयार फ्लॅटमध्ये व्यक्‍तिगत आवडी-निवडीनुसार बदल करायला खूप कमी संधी असते. तयार फ्लॅटमध्ये बदल किंवा पुनर्रचना करणं जास्त महाग तर पडतंच, शिवाय राहत्या जागी काम करून घेताना दैनंदिन गोष्टींवर परीणामही होतो.
  • निवडीला कमी वावः रेडी फ्लॅट्सना असलेल्या प्रचंड मागणीमुळं ग्राहकांना घाईगडबडीत निर्णय घ्यावे लागतात, त्यामुळं त्यांच्या निवडीला खूप कमी वाव मिळतो. बरेचदा अशा निर्णयांवर पश्चात्ताप करण्याचीही वेळ त्यांच्यावर येते. याउलट, आजूबाजूला शोध घेतल्यास कित्येक ठिकाणी रेडी पझेशन फ्लॅट्सपेक्षा चांगले अंडर-कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्स मिळू शकतात.
  • रोखठोक व्यवहारः थेट रेडी पझेशन फ्लॅट घेण्यासाठी आलेल्या ग्राहकाशी व्यवहार करताना बिल्डरला पेमेंट टर्म्सवर सूट देण्याची गरजच नसते.

या गोष्टींचा विचार करता, अंडर-कन्स्ट्रक्शन फ्लॅटमध्ये गुंतवणूक करणं हेच शहाणपणाचं ठरेल. अशा फ्लॅटची कमी किंमत आणि जास्त रिटर्न्सची शक्यता ही तर मुख्य दोन कारणं आहेतच, शिवाय तुम्हाला फ्लॅटच्या डिझाईनमध्ये तुमच्या पसंतीनुसार किंवा वास्तुशास्त्रानुसार बदलही करुन घेता येऊ शकतो. बिल्डींग अजून बांधकामाच्या टप्प्यात असल्यामुळं, बिल्डर (संपूर्ण बिल्डींगच्या रचनेला धक्का बसणार नसेल किंवा त्याला अवास्तव खर्च करावा लागणार नसेल तर) मूळ डिझाईनमध्ये तुम्हाला हवे ते बदल करुन द्यायला तयारही होतो. अलीकडं 'सामूहीक खरेदी'चा पर्याय निवडणार्‍यांनाही अंडर-कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीमधून जास्त फायदा मिळवता येऊ शकतो. यामध्ये, काही ग्राहक एकत्र येऊन बिल्डरला एकापेक्षा जास्त फ्लॅट्स एकावेळी विकत घेण्याची ऑफर देऊन त्या सर्वांच्या किंमतीवर घसघशीत सूट मिळवू शकतात. या पद्धतीमुळं घर-खरेदीच्या व्यवहारात लक्षणीय बचत होऊ शकते.

अर्थात अंडर-कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी विकत घेण्यामध्ये काही संभाव्य धोकेही आहेत. उदाहरणार्थ, बांधकाम सुरू करण्यापूर्वी बिल्डरनं आवश्यक त्या सर्व परवान्यांची व कागदपत्रांची पूर्तता केलेली नसणं किंवा प्रोजेक्ट पूर्ण करण्याइतकी बिल्डरची आर्थिक क्षमता नसणं, वगैरे. अशा गोष्टी टाळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे, त्याच शहरात इतर प्रोजेक्ट यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या नामवंत व प्रस्थापित बिल्डर-डेव्हलपरशीच व्यवहार करणं!


http://www.fairdealsangli.com/in-the-news/phletakharedih-redipajhesanakiandara-kanstraksana

Share/Bookmark

Sunday, November 18, 2012

भारतीय सिंह


गुजरातमध्ये एक मोठ्ठं जंगल आहे - डांगचं जंगल. खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं-झुडपं आणि प्राणी इथं दिसतात. शेकडो वर्षांपासून काही आदिवासी जमाती तिथं राहतात. त्यापैकी एक आहे - मालधारी जमात, 'सासन गीर' जंगलात राहणारी. या जमातीतले लोक गाई-म्हशी पाळून त्यांचं दूध विकतात. जनावरांना चारा, चुलीसाठी लाकडं, आणि इतर गोष्टी त्यांना जंगलातून मिळतात. पण त्याबरोबरच त्यांचा सामना होतो एका बलवान रहिवाशाशी...


आशियाई सिंह! सासन गीरच्या जंगलातला प्रमुख प्राणी. सबंध जगात 'आशियाई सिंह' फक्‍त गीरच्या जंगलातच सापडतो. फार पूर्वी, इंग्लंड, ग्रीस, रोम, आफ्रिका, अरबस्तान, आणि आशियात खूप सिंह होते. पण आता ते फक्‍त आशिया आणि आफ्रिका खंडातच उरलेत.

आफ्रिकन सिंह मोकळ्या पठारांवर राहतात. त्यामुळं ते चपळ आणि कुशल शिकारी बनतात. आशियाई सिंहाला मात्र दाट जंगलात रहायला आवडतं. सिंह कळपात राहणारा प्राणी आहे. त्याच्या सोनेरी केसांमुळं पिवळ्या पडलेल्या झाडा-झुडपांतून तो दिसून येत नाही. त्यामुळं त्याचं सावज बेसावध राहतं. मानेवरच्या भरगच्च आयाळीमुळं त्याचे शत्रू मानेचा लचका तोडू शकत नाहीत.

सिंह हा मांसाहारी गटातला मांजर-वर्गीय प्राणी आहे. त्यामुळं त्याच्याकडं तीक्ष्ण दात आणि धारदार नख्या असतात. लपतछपत, हलक्या पावलांनी पाठलाग करून, जवळ आल्यावर झडप घालून तो शिकार करतो. सिंहाची नजर, कान, आणि नाक तीक्ष्ण असतात. तो वास घेत-घेत शिकार शोधतो. त्याच्या डोळ्यांवर ऊन किंवा प्रखर प्रकाश पडला की, डोळ्यांची बाहुली लहान होते. उलट अंधारात बाहुली मोठी होऊन जास्तीत जास्त प्रकाश डोळ्यात जातो. त्यामुळं रात्री अंधारातसुद्धा सिंहाला व्यवस्थित दिसतं - मांजरासारखंच!

शिकारीचं काम सिंहिणींचा कळप करतो. सावजाच्या चारही बाजूंनी सिंहिणी हळूहळू पुढे सरकतात. एका सिंहिणीनं झडप घातली की, सावज उधळतं. पण सगळीकडून वेढलं गेल्यामुळं लवकरच ताब्यात येतं. सिंहिणींनी त्याला ठार मारलं की मग सिंहराज येतात, आणि शिकारीतला मोठा वाटा स्वतःसाठी घेतात.

सिंहांच्या कळपात एक अनुभवी नेता नर असतो. शिवाय पाच-सहा सिंहिणी आणि दोन-तीन लहान सिंह असतात. भरपूर खाद्य मिळणार्‍या जंगलात ते राहतात. मांजर गटातल्या इतर प्राण्यांपेक्षा सिंहांचं स्वरयंत्र जास्त कार्यक्षम असतं. त्यामुळं ते मोठमोठ्यानं आवाज काढून गोंगाट करत फिरतात.

गीरच्या जंगलात खूप हरिण आणि चितळ आहेत. पण सिंह पूर्वीसारखी त्यांची शिकारच करत नाहीत. उलट, भूक लागली की मालधारी लोकांच्या गुरांची शिकार करतात. यासाठी त्यांना फार कष्ट पडत नाहीत. दिवसभर सावलीत आराम करायचा, आणि रात्री गाई-म्हशींचा फडशा पाडायचा. एक म्हैस सिंहांच्या पूर्ण कळपाला पुरते. शिवाय नंतरचे सहा दिवस शिकार करावी लागत नाही. अंगात शिकारीचं कसब असूनसुद्धा आशियाई सिंह गुराढोरांची सोपी शिकार करू लागलेत. म्हणून गीरचे वन अधिकारी आणि सरकारनं मालधारींना जंगलापासून थोडं दूर हलवलं आहे. शिवाय इथल्या काही सिंहांना दुसर्‍या अभयारण्यात हलवण्याचा प्रयत्‍नही केला आहे.

सिंहांसाठी योग्य हवामान आणि जागा शोधणं, हा अभ्यासाचा मोठा विषय आहे. यात खूप अडचणीदेखील आहेत. म्हणून सरकारबरोबरच संस्था आणि नागरिकांनी या कामात स्वतः रस घेतला पाहिजे. सरकारनं गीर जंगलाचं अभयारण्य केलं आहे. त्यामुळं तीनशेहून अधिक सिंह तिथं मुक्‍तपणे राहतायत. असं होत राहिलं तर, हा जंगलाचा राजा पुन्हा एकदा भारताच्या मातीत स्थिरावेल, आणि पूर्वीसारखंच आपलं शिकारीचं कौशल्यसुद्धा दाखवू लागेल.



Share/Bookmark

Wednesday, November 14, 2012

तुझको जो पाया...

तुझको जो पाया तो सुकून आया
अब मुझसे क्या छीनेगी दुनिया

तूने किया है जो मुझपर भरोसा
परवाह नहीं अब क्या सोचेगी दुनिया

आंखोंने तेरी जो बातें कही हैं
उनको भला क्या समझेगी दुनिया

तूने किया साथ देने का वादा
अब कैसे मुझसे जीतेगी दुनिया

Share/Bookmark

Monday, November 12, 2012

गुँचा कोई मेरे नाम कर दिया...

गुँचा कोई मेरे नाम कर दिया
साकी ने फिर से मेरा जाम भर दिया

तुम जैसा कोई नहीं इस जहाँ में
सुबह को तेरी जुल्फ ने शाम कर दिया

मेहफिल में बार-बार इधर देखा किये
आँखों के जझीरों को मेरे नाम कर दिया

होश बेखबर से हुये उनके बगैर
वो जो हमसे केह ना सके, दिलने केह दिया

(गुँचा = कळी; जझीरा = बेट)

- रॉकी खन्ना / मोहित चौहान

Share/Bookmark

Sunday, November 11, 2012

सर्व शिक्षा अभियान


 "आजची मुले हे उद्याचे निर्माते आणि भविष्यातील नेते आहेत, असे म्हटले जाते, ते योग्यच आहे. महाराष्ट्रात १८ वर्षांखालील मुलांची संख्या ४ कोटी पेक्षा जास्त आहे. हे प्रमाण राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या १/३, इतके जास्त आहे.

‘सर्व शिक्षा अभियान’ – २०१२-१३ साली केंद्र सरकारच्या व्यापक आणि एकात्म पथदर्शी विकास योजनेने बाराव्या वर्षात पदार्पण केले. मुलांच्या शिक्षण हक्कांसंदर्भातील मोफत आणि सक्तीचे शिक्षण अधिनियम (आर.टी.ई.)-२००९, मंजूर होणे, हा या प्रक्रियेतील महत्वाचा भाग होय. 'महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद' हा महाराष्ट्र शासनाचा एक उपक्रम असून राज्यात एस.एस.ए. अर्थात 'सर्व शिक्षा अभियाना'च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा उपक्रम प्रयत्‍नशील आहे.
या एस.एस.ए. उपक्रमाची अवाढव्य व्याप्‍ती आणि वित्तीय गुंतवणूक लक्षात घेता, काटेकोर नियोजन आणि सक्‍त मूल्यमापन गरजेचे ठरते. वार्षिक कामाचा आराखडा आणि २०१२-१३ साठीच्या अर्थसंकल्पाच्या प्रस्तावात १४ जिल्ह्यांवर विशेष लक्ष पुरवण्यासह सार्वत्रिक उपलब्धतता आणि धारकता, दर्जा वृध्दी, सामाजिक गटांमधील तसेच लिंगाधारित विषमता यातील दरी कमी करणे, सामाजिक सहभाग, शालेय पायाभूत सुविधा, व्यवस्थापन आणि देखरेख या बाबींचा समावेश आहे. शालेय विकास आराखड्याअंतर्गत 'शालेय व्यवस्थापन समिती'मार्फत ग्रामीण स्तरावरील शाळांकडून योग्य माहिती आणि नियोजनपूर्व तयारीसाठी काटेकोर तपशील मागवण्यात आले.

प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याचे स्वप्‍न वास्तवात आणणे, राज्याचा साक्षरता दर नव्या उंचीवर नेणे आणि राज्यासह देशातील जनतेला सक्षम करण्याची ध्येये आम्हाला प्रत्येक सरत्या वर्षाबरोबर गाठता येतील, अशी आशा आहे."

- महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद (एम.पी.एस.पी.)
http://mpsp.maharashtra.gov.in

Share/Bookmark

Happy Diwali




Share/Bookmark

Friday, November 9, 2012

खारीचा वाटा

रामाच्या मंदीरात प्रवचन सुरू होतं. कीर्तनकार बुवा सत्तरी उलटलेले. मोठ्या आत्मीयतेनं आणि रसाळ वाणीत श्रीरामाची कथा सांगत होते. प्रवचन-सप्‍ताहातला आज पाचवा दिवस होता. प्रवचन ऐकायला रोज लोक गर्दी करत होते. मन लावून प्रवचन ऐकायचे, माना डोलवायचे, आणि 'जय श्रीराम' म्हणत जाताना दक्षिणा-पेटीत पैसे टाकायचे. कुणी पन्‍नासची नोट टाकायचे, तर कुणी शंभराची. कुणी कीर्तनकार बुवांसाठी फुलांचा मोठ्ठा हारही घेऊन यायचे. मंदीराशेजारी राहणारी एक म्हातारी प्रवचनाला रोज येत होती. दिवसभर चार घरची कामं करून स्वतःचं पोट भरायची. घर जवळच असल्यानं प्रवचनाला सगळ्यात आधी हजर असायची. येताना घरातून एक तांब्या भरून पाणी आणायची आणि कीर्तनकार बुवांच्या समोर ठेवायची. मग कीर्तन करता-करता बुवा त्यातलं पाणी प्यायचे. असं रोज चाललं होतं.

आजच्या प्रवचनात बुवांनी श्रीरामाला सेतू बांधण्यात मदत करणार्‍या खारीची गोष्ट घेतली होती. लोक तल्लीन होऊन ऐकत होते. म्हातारीच्या मनात मात्र आज चलबिचल होती. प्रवचन संपताना लोक रोज दक्षिणा-पेटीत पैसे टाकतात हे ती बघत होती. आपण गरीब आहोत, आपण दक्षिणा टाकू शकत नाही, याचं तिला वाईट वाटत होतं. बुवांसाठी इतरांसारखा हार आणू शकत नाही, याची तिला लाजही वाटत होती. प्रभू श्रीरामाची सेवा करण्यात आपण कमी पडतोय, याचं तिला खूप दुःख होत होतं. याच विचारात मग्न असल्यानं आज तिचं कथेकडंही लक्ष नव्हतं. आजूबाजूचे सगळे लोक दानाचं पुण्य कमावून समाधानी दिसतायत, आपण मात्र कमनशीबी, असं तिला वाटत होतं. इतक्यात...

कथा सांगता-सांगता अचानक कीर्तनकार बुवांना मोठ्ठा ठसका लागला. समोर बसलेल्या श्रोत्यांमध्ये चुळबूळ झाली. तीन-चार जण उठून बुवांकडं धावले. म्हातारीलाही काहीतरी करावंसं वाटलं. पण ती जागेवरून उठेपर्यंत बुवांनी शेजारी ठेवलेला पाण्याचा तांब्या उचलला आणि पाण्याचे तीन-चार घोट घेतले. ठसका थांबला. बुवांच्या चेहर्‍यावर स्मितहास्य तरळलं. श्रोत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. आणि सगळ्यात मागं बसलेली म्हातारी पदर तोंडाला लावून खुदकन्‌ हसली. तिनं भरून ठेवलेल्या पाण्याच्या तांब्याची किंमत या प्रसंगी लाखमोलाची होती. हीच तिची सेवा होती. हीच तिची खरी दक्षिणा होती. म्हातारीच्या चेहर्‍यावर समाधान पसरलं. आणि कीर्तनकार बुवा 'खारीच्या वाट्या'ची गोष्ट पुढं सांगू लागले...

Share/Bookmark