ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Sunday, August 4, 2013

निश्चित

एक विचार
एक कृती
यश निश्चित.

अनेक विचार
शून्य कृती
गोंधळ निश्चित.

अनेक विचार
अनेक कृती
निश्चित फळ अज्ञात,
पण फळ निश्चित.

(कृपया यावर फार विचार करु नये,
निश्चित गोंधळ निर्माण होऊ शकतो!)


Share/Bookmark

Friday, August 2, 2013

रहस्य

हजारो वर्षांपासून या जगात अब्जावधी माणसं जन्माला येत आहेत आणि मरुनही जात आहेत. पण आजही एका नव्या जीवाच्या येण्याची उत्सुकता आणि कौतुक कायम आहे. हेच तर या जगाच्या टिकून राहण्यामागचं खरं रहस्य आहे.


Share/Bookmark

Thursday, August 1, 2013

स्वयंभू

माणूस कितीही स्वयंभू, स्व-कर्तृत्ववान असला तरी, कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रेम, मदत, विश्वास, साथ देणारी माणसं सोबत असल्याशिवाय फार मोठं कर्तृत्व गाजवू शकत नाही.


Share/Bookmark

Friday, July 12, 2013

झोपलेल्या नशीबाची गोष्ट

...सिंधुकाठी एक गरीब कोळी राहत होता. घरात चूहेसुद्धा यायचे नाहीत इतकं वाईट चाललेलं. ना बायकोला दागिना ना पोरांना कपडा. रोज रात्री मतलई वारे सुटले की जमिनीवरच उघड्यानागड्या चिल्ल्यापिल्ल्यांच्या अंगावर आपलं नेसूचं धोतर पांघरून नुसत्या लंगोटीवर नदीकाठच्या तराफ्यावर बसायचं, बांबू खुपसत नदी नेईल तितकं आत जायचं. भोवर्‍यांमध्ये टोपली बुडवून बुडवून जे आत येईल ते - मासे, खेकडे, सुंगटे, शिंपले, कालवे मडक्यात टाकायचे, वारा पडला की पहाटे परत बांबू खुपसत खुपसत उघडं घरी. उघडीनागडी पोरं बापाला पाहताच दुडूदुडू पळत किनार्‍यावर येऊन मडक्यातले नुस्ते घेऊन परत पळत पळत जाऊन आईला ताजं ताजं तेच रांधायला लावायचे. कारण घरात दुसरं काहीच दिवसभर नसायचं. बायको मिळालेल्यातलाच थोडासा वाटा वाण्याला देऊन भात, मीठ, मसाला, तेल रोज लागेल तेवढं आणायची. इकडे चुलीवर स्वैंपाक होईपर्यंत कोळी चिलीम फुंकत ताटं मांडून रांगेनं समोर बसलेल्या पिल्लांकडे अपूर्व मायेनं पाहत बसायचा. मग तोही जेवून झोपी जायचा. असं रोज. अर्धं आयुष्य हेच चाललं. हेच कष्ट, हाच विरंगुळा, हीच करमणूक. निजसुख, आनंद. मग एकदा झोपेत स्वप्‍नात आपलं झोपलेलं नशीबच त्याला अचानक दिसलं. वा रे वा. काय डाराडूर झोपलं आहे. या अल्ला, हे इथे असं झोपलेलं असल्यानंच माझ्या घरात धनसंपदा येत नाही. कधी घरात इतरांकडे असतात तशा वस्तू येतील? निदान घर तरी इतरांसारखं कधी ह्या जागेत होईल? या अल्ला, मला मार्ग दाखव. असा खूप कल्ला केल्यावर मग अल्लानं त्याला असा सल्ला दिला की, त्याला झोपू दे, उठवू नकोस. ते एकदा उठलं, की पुन्हा झोपत नाही. तुला ते चालेल का? बघ, तुझा तू ठरव आणि कर तुला वाटेल तसं.

मग बायकोचा विचार घेऊन कोळीमहाशय स्वप्‍नात झोपलेलं नशीब जिकडे दिसलं होतं त्या अंदाजानं वाट काढत घराबाहेर पडले. सापडलं. एका मोडक्या तोडक्या खळ्यात पालापाचोळ्यावर झोपलेलं स्वप्‍नात पाहिलं होतं तसंच... संतापून त्याला लाथ घालून उठवत कोळी म्हणाला, माँके लौडे, ऊठ. मेरा ये हाल और तू सालोसाल सोया पडा अँ? ऊठ. त्यानंतर त्याचं नशीब त्याला तरातरा दूर, एका सतत गजबजलेल्या मोठ्या शहरात घेऊन गेलं. श्रीमंतीचा झगझगाट. कामधंदा काय तोटा? खाणं पिणं कपडे चंगळ. पण राहण्याची सोय कामधंद्याच्या पन्‍नास मैल दूर, वर खोप्यासारखी, कारण तिथपर्यंत ज्यांची नशीबं आधीच जागी झाली होती त्यांची घरंच घरं वर ७-७ मजली हसताहेत. रोज पहाटे अंधारात उठून कामावर जायचं, मिळेल ते खात काम करून रात्री घरी येताबरोबर जोडे काढण्याचीही सोय नसे, इतकी झोप. पुन्हा पहाटे तेच. हळूहळू तो तिथे श्रीमंत झाला. सगळ्या वस्तू खरेदी केल्या. बायको मुलं आली. पण त्यांना तो दिवसा कधीच घरी सापडायचा नाही. दिवसेंदिवस अनेक भानगडींमध्ये अडकून पडलेला तो घरी उशिरा परततांना नेहमी म्हणायचा, सालं हे नशीब पुन्हा झोपणार नाही का? ते सुखाचे दिवस पुन्हा येणारच नाहीत का?

यावर शेवटून अवलियासाहेब मोहमदराम म्हणायचे, एकदा लाथ मारलेलं नशीब पूर्ण सूड उगवूनच तुमच्याबरोबर कबरीत झोपी जाईल.

('हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ' - भालचंद्र नेमाडे)

Share/Bookmark

Friday, May 24, 2013

तुला भेटल्यावर...




ओळख पटली माझी मला, तुला भेटल्यावर
मी म्हणजे 'मी' नाही, कळले तुला भेटल्यावर

पाऊस-पाणी म्हटली गाणी, भिजलो अन् सुकलो
पाणी आभाळातील नव्हते, कळले सुकल्यावर

गुण आवडले - दोषही प्यारे, प्रीती जडताना
वाटे सगळे बदलावेसे, नाते ठरल्यावर

नशा नकोशी वाटू लागते, चढू लागताना
जरा घेऊनी झिंगू, वाटे पुन्हा उतरल्यावर

पैसा आला, घेऊन झाली गाडी अन्‌ माडी
जगायचे पण राहून गेले, कळले खपल्यावर

... मंदार
२४.०५.२०१३


Share/Bookmark

Thursday, May 23, 2013

भीती घालावी लागते...?

सोसायटीच्या पार्किंगमधून गाडी काढत होतो. एक पाच-सहा वर्षांचा मुलगा पार्किंगमधे, गाड्यांच्या मधून, गेटपर्यंत पळत-पळत चालला होता. मागून त्याची आजी ओरडत होती, "शुभम, थांब पळू नको, इकडं ये." शुभम काही ऐकत नव्हता. पळता-पळता माझ्यासमोर येऊन उभा राहिला. मागून आजी ओरडली, "शुभम, थांब नाही तर ते दाढीवाले तुला घेऊन जातील..." शुभम थोडा घाबरला, पण तिथंच थांबून माझ्याकडं बघू लागला. मग आजी मला म्हणाल्या, "तुम्ही जरा भीती दाखवा हो त्याला. अजिबात ऐकत नाही माझं." मी एकदा आजीकडं बघितलं आणि मग शुभमकडं बघून हसलो. शुभम पण हसला. आजी पुन्हा म्हणाल्या, "शुभम, ते दाढीवाले रागावतील हं तुला." पण शुभमनं आता स्वतःचं मत बनवलं होतं. तो माझ्याकडं बघून गोड हसला आणि पुन्हा गाड्यांमधून पळू लागला. मी आजीबाईंना विचारलं, "का उगाच भीती घालता हो पोराला?" त्या म्हणाल्या, "काय करणार? माझं ऐकतच नाही तो. म्हणून अशी कुणाची तरी भीती घालावी लागते..." "अहो पण अशानं माझ्याबद्दल किंवा माझ्यासारखं दिसणार्‍यांबद्दल त्याच्या मनात कायमची भीती किंवा संशय निर्माण होईल ना!" "होऊ दे की मग. त्यानं माझं ऐकलं म्हणजे झालं. तुमच्याबद्दल काय मत होईल त्याचं मला काय..." असं म्हणून त्या शुभमच्या मागे पुन्हा ओरडत निघून गेल्या.

'आपलं' ऐकलं जावं यासाठी 'इतरां'बद्दल भीती दाखवण्याचं हे एकमेव उदाहरण नाही. वडीलधारी माणसं, समाजातले विचारवंत, आणि खास करुन मीडीया, असंच काहीतरी करताना दिसतात. सरकार युसलेस, राजकारण गलिच्छ, नेतेमंडळी गुंड, भांडवलदार पिळवणूक करणारे, श्रीमंत निर्दयी, गरीब विध्वंसक, वगैरे वगैरे... या सर्व 'इतरां'वर शिक्के मारले की सर्वसामान्य माणूस घाबरतो आणि त्यांच्यापासून लांब राहतो, त्यांच्यापासून स्वतःला 'वाचवण्याचा' प्रयत्न करतो. आणि अशा वेळी, ही भीती आणि संशय निर्माण करणार्‍यांवर त्याचा विश्वास बसू लागतो.

शुभमचं संरक्षण किंवा त्याचा विकास यापेक्षा त्यानं 'आपलं' ऐकणं त्याच्या आजीला महत्त्वाचं वाटलं. त्यासाठी विनाकारण एखाद्याबद्दल शुभमच्या मनात संशय आणि भीती निर्माण करण्यात तिला काही चुकीचं वाटलं नाही. स्वतःचं महत्त्व टिकवण्या किंवा वाढवण्यासाठी कळत-नकळत तुम्हीही असं काही करताय का? माणसा-माणसातली दरी वाढत चाललीय असं आपण म्हणतो खरं, पण आपणही ती दरी वाढवण्यात हातभार लावतोय का, याचा विचार केला पाहिजे...

Share/Bookmark

Sunday, May 19, 2013

इतिहास आणि नागरिकशास्त्र

जोपर्यंत आपल्या शाळांमधून 'इतिहास' शिकवला जातोय, तोपर्यंत आपलं 'नागरिकशास्त्र' सुधारण्याची काही शक्यता नाही. स्वातंत्र्यलढा, असहकार चळवळ, राज्यक्रांती, या गोष्टींपासून बरोब्बर उलटी आणि लोकशाहीला हानीकारक प्रेरणा घेतली जातीय...


Share/Bookmark