निवडणूक प्रचाराच्या नावाखाली आगखाऊ आणि भडकाऊ भाषणं ठोकत सुटलेल्या नेत्यांना मिळणारा प्रतिसाद हा फक्त त्या नेत्यांच्या वक्तृत्वकलेचा चमत्कार नसून, जन्तेच्या वैचारीक दिवाळखोरीचा आविष्कार आहे, असं वाटू लागलंय. विकास, योजना, लोकशाही, अधिकार आणि कर्तव्य, अशा शब्दांना टाळ्या पडतच नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आम्ही शाळेत असताना एक पाहुणे सामाजिक विषयावर बोलायला आले होते. समोरच्या श्रोत्यांचा कंटाळा नि दुर्लक्ष ओळखून त्यांनी भाषण आटोपतं घेतलं, पण ते 'हिट' करण्यासाठी (त्यांच्या भाषणाशी पूर्ण विसंगत असूनही) शेवटी जोरदार घोषणा दिली, जय भवानी... आणि इतका वेळ मरगळून बसलेली मुलं उत्स्फूर्तपणे ओरडली, जय शिवाजी! त्यानंतर कित्येक दिवस त्या वक्त्यांनी कसं इंटरॅक्टीव्ह भाषण दिलं, मुलांना कसं 'जिंकून घेतलं' वगैरे चर्चा झाल्या. मुद्दा असा आहे की, सध्या जन्तेचा सामूहिक आयक्यू वय वर्षे आठ ते दहा वगैरे असल्यानं त्या वयाला साजेसे विषय, घोषणा, वक्ते इत्यादी(च) हिट होणार. ज्यांना हे पटत नाही किंवा बदलायचं आहे त्यांनी जन्तेचं बौद्धिक घेत प्रयत्न चालू ठेवावेत किंवा जन्ता 'सज्ञान' होईस्तोवर वाट पहावी!

No comments:
Post a Comment