ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde
Showing posts with label चेतन भगत. Show all posts
Showing posts with label चेतन भगत. Show all posts

Saturday, April 20, 2013

एका पोळ्याची गोष्ट

(चेतन भगत यांच्या १९ एप्रिल २०१३च्या 'टाइम्स ऑफ इंडीया'मधील लेखाचा मी केलेला मराठी अनुवाद)

फार वर्षांपूर्वी, एका मोठ्ठ्या जुन्या झाडावर एक प्रचंड मोठं मधमाश्यांचं पोळं होतं. आजूबाजूला रंगीबेरंगी टवटवीत फुलांनी बहरलेले बाग-बगिचेही होते.

त्या पोळ्याचा कारभार चालवण्यासाठी काही ज्येष्ठ मधमाश्यांसोबत एका राणी माशीची नेमणूक करण्यात आली होती. त्या सगळ्यांना 'सरकारी माश्या' असं म्हटलं जाई. 'कष्टकरी माश्या' त्यांचं मध सुरक्षितपणे साठवून ठेवण्याचं काम या 'सरकारी माश्यां'वर सोपवून निर्धास्त होत्या. याबाबतीत कष्टकरी माश्यांचा सरकारी माश्यांवर पूर्ण विश्वास होता. शिवाय, नवीन बगिच्यांचा शोध घेणं, पुढच्या पिढीतील तरुण माश्यांसाठी मधाचे नवनविन स्रोत शोधून काढणं, अशी कामंदेखील सरकारी माश्यांकडून अपेक्षित होती.

पोळ्याचा कारभार कुठलाही गडबड-घोटाळा न होता सुरळीतपणे चालावा, यासाठी सरकारी माश्यांनी काही नियम बनवले होते आणि कायदेही संमत करून घेतले होते. कष्टकरी माश्यांना त्यांचं पालन करावंच लागे, अन्यथा त्या शिक्षेस पात्र ठरत. पोळ्यात राहणार्‍या विविध जातीच्या मधमाश्या आपापसात भांडून पोळ्यासाठी समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी अशा नियम व कायद्यांची गरज होती. उदाहरणार्थ, काळ्या माश्या आणि लाल माश्या असे दोन मुख्य प्रकार होते. त्यांचं काम एकाच प्रकारचं होतं. फक्त, त्या दिसायला थोड्या वेगळ्या होत्या आणि त्यांच्या प्रार्थनेच्या आपापल्या वेगळ्या पद्धती होत्या.

अशा या परिपूर्ण पोळ्यामधे सर्व काही आलबेल होतं. पण काळानुसार काही बदल घडत गेले. सरकारी माश्यांची स्वतःची मुलं, नातेवाईक, आणि मित्रमंडळी होती. त्यापैकी बहुतेकांना 'सरकारी माश्या' बनता आलं नाही. त्यांना इतरांसारखं 'कष्टकरी माश्या' बनूनच जगावं लागलं. पण एके दिवशी, एका ज्येष्ठ सरकारी माशीच्या मुलानं आपल्या जन्मदात्याकडं तक्रार केली की, कष्टकरी माशी म्हणून जगणं फारच कष्टाचं काम आहे. "आपल्या सरकारी मधाच्या साठ्यांमधून मी थोडंसं मध घ्यायला काय हरकत आहे?" त्यानं विचारलं. "नाही, हे अयोग्य आणि अनैतिक आहे," सरकारी माशीनं म्हटलं.

"कुणाला काऽही कळणार नाही. सरकारी गोष्ट आहे, सरकारपुरतीच राहील," सरकारी माशीच्या मुलानं उपाय काढला. बरोबरच होतं त्याचं. कष्टकरी माश्यांचा स्वतःपेक्षा जास्त सरकारी माश्यांवर विश्वास होता. थोडंसं मध गायब झालं तर कुणाच्या लक्षातही येणार नव्हतं.

आणि मग झाली की सुरुवात. हळूहळू, सगळ्या सरकारी माश्यांच्या मुलांनी, भावंडांनी, नातलगांनी, मित्रांनी, आणि हितचिंतकांनी रोज सरकारी साठ्यातलं थोडं-थोडं मध चोरायला सुरुवात केली. आता त्यांना दिवसभर बाग-बगिच्यात मजुरी करायची गरज नव्हती. अपेक्षेनुसार मधाची पातळी वाढत नाहीये, हे कष्टकरी माश्यांच्या लक्षात येऊ लागलं. काही कष्टकरी माश्यांनी हा मुद्दा उचलताच सरकारी माश्यांनी फर्मान सोडलं, "आळस झटका आणि कामाला लागा".

मधाचा साठा वाढवण्यासाठी कष्टकरी माश्या अजून कष्ट करू लागल्या. तरीसुद्धा, मधाची पातळी काही वाढेचना. उलट, दिवसेंदिवस मध कमीच होऊ लागला.

लवकरच, सरकारी माश्यांनी आणखी एक धोरण आखलं. एखाद्या नव्या बागेचा शोध लागला की सर्वप्रथम त्यांच्या मुलांना, नातेवाईकांना, आणि मित्रांना तिचा लाभ दिला जाऊ लागला. "जे कष्टकरी माश्यांना ठाऊकच नाही, ते त्यांच्याकडून हिरावून कसं घेणार," अशी कुजबूज सरकारी वर्तुळात सुरू झाली.

पुढेपुढे, मधाची पातळी तर घटत गेलीच, शिवाय कष्टकरी माश्यांच्या मुलांसाठी नव्या बागाही सापडेनाशा झाल्या. आता ते रिकामटेकडे आणि उपाशी राहू लागले. कधीकधी, राणी माशी या कष्टकरी माश्यांपुढं थोडं मध शिंपडे, आणि मग सगळीकडं राणीची वाहवा होई. तरीसुद्धा, हे शिंपडलेलं मध पुरेसं नव्हतंच.

"कोण चोरतंय आपलं मध?" शेवटी एके दिवशी, एका प्रभावशाली कष्टकरी माशीनं प्रश्न विचारलाच. ही प्रभावशाली बंडखोर माशी काळ्या माश्यांच्या गटातली असल्याचं सरकारी माश्यांच्या लक्षात आलं. म्हणून, सरकारी माश्या म्हणाल्या, "लाल माश्या चोरताहेत तुमचं मध." त्यानंतर, सरकारी माश्यांनी लाल माश्यांना बोलावून घेतलं, आणि त्यांना सांगितलं, "काळ्या माश्या तुमच्या कष्टाच्या कमाईवर डल्ला मारतायत असं आम्हाला वाटतंय."

उपासमार आणि कष्टानं वैतागलेल्या काळ्या आणि लाल माश्यांना संताप अनावर झाला. त्यांची एकमेकांशी तुफान भांडणं झाली. आपल्यावरची पीडा टळल्यानं या भांडणांची मजा लुटत सरकारी माश्यांनी मधचोरी सुरूच ठेवली. जसजशा लाल आणि काळ्या माश्या मरू लागल्या आणि जखमी होऊ लागल्या, तसतशा सरकारी माश्या अजून थोडं-थोडं मध शिंपडत राहिल्या. कष्टकरी माश्यांनी पुन्हा राणी माशीचा जयजयकार केला.

थोड्याच दिवसांत, त्या भागात दुष्काळ पडला. फुलांची संख्या कमीकमी होत गेली, आणि इतकी वर्षं साठवलेल्या मधाचा उपयोग करण्याची वेळ आली. पण, सर्वांसाठी धक्कादायक गोष्ट म्हणजे, सरकारी साठ्यांमध्ये मधाचा थेंबही शिल्लक नव्हता. पूर्णपणे सरकारी माश्यांवर विश्वास ठेवून राहिलेल्या कष्टकरी माश्या सरकारी माश्या आणि त्यांच्या संबंधितांच्या घराकडं वळल्या. ते सर्वजण गलेलठ्ठ होऊन आपापल्या 'खाजगी' मधाच्या साठ्यांवर आरामात बसलेले दिसले. हे कमी म्हणून की काय, त्यांना शेकडो नव्या बाग-बगिच्यांचे नकाशेदेखील सापडले, ज्यांचा कष्टकरी माश्यांना थांगपत्ता लागू दिला नव्हता.

या सर्व प्रकारानं अचंबित झालेल्या कष्टकरी माश्या हा धक्का पचवत आपापल्या घरी परतल्या. लाल आणि काळ्या माश्यांची नजरानजर झाली. आपल्याला मूर्ख बनवण्यात आलं, हे दोघांच्याही लक्षात आलं. त्यांनी एकमेकांच्या गळ्यात पडून, एकमेकांना इजा पोहोचवल्याबद्दल माफी मागितली.

"आपण त्यांना चांगला धडा शिकवू," काळ्या आणि लाल माश्या एकमुखानं म्हणाल्या. कष्टकरी माश्यांना कळून चुकलं की, आपल्या नांग्या एकमेकांविरुद्ध नव्हे तर आपल्याला फसवणार्‍यांविरुद्ध वापरण्याची वेळ आलेली आहे.

दरम्यान, राणी माशीला तणावपूर्ण परिस्थितीचा अंदाज आला. तिनं आपल्या सुंदर तरुण मुलाला समोर आणलं, "हाच आता तुम्हाला वाचवेल. जसं इतकी वर्षं मी वाचवलं."

पण, लाल आणि काळ्या माश्या यावेळी सावध होत्या. त्या सगळ्या एकत्र आल्या आणि सरकारी माश्या व त्यांच्या बगलबच्च्यांवर त्यांनी आपल्या नांग्या उगारल्या. सरकारी माश्यांना आपली संपत्ती गोळा करायलासुद्धा वेळ मिळाला नाही. सगळं जागेवर टाकून त्यांना पोळं सोडून पळून जावं लागलं. लवकरच, त्यांच्यापैकी कुणीही त्या पोळ्यात उरलं नाही.

लाल आणि काळ्या माश्यांनी आपल्यापैकी सर्वोत्तम लोकांच्या हाती सत्ता द्यायचं ठरवलं. तसंच, यापुढं कोणावरही आंधळा विश्वास टाकायचा नाही, सर्वांवर लक्ष ठेवायचं, असंही ठरवलं. हळूहळू पोळ्याची स्थिती सुधारत गेली, आणि मधाचा साठा पूर्ववत भरण्यासाठी नवी पिढी अजून कष्ट उपसू लागली. नव्या बाग-बगिच्यांनी नवी संपन्नता आणली, आणि ते पोळं जगातलं सर्वात यशस्वी पोळं समजलं जाऊ लागलं.

काही वर्षांनंतर, एका रात्री एक वृद्ध माशी आपल्या नातवाशी बोलताना म्हणाली, "तुला माहित्येय का, एके काळी आमच्यावर एका राणी माशीचं राज्य होतं?" "हो. पण आमच्यावर नाही. कारण आम्हाला माहित्येय की, एक छोऽटासा राजा आमच्यापैकी प्रत्येकाच्या आत लपलेला आहे," छोट्या माशीनं उत्तर दिलं.

- मंदार शिंदे
shindemandar@yahoo.com

(मूळ लेखः http://blogs.timesofindia.indiatimes.com/The-underage-optimist/entry/once-upon-a-beehive)

Share/Bookmark

Wednesday, April 7, 2010

श्रीमंतांच्या तिजोर्‍या कशा उघडायच्या?

(प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांच्या लेखावरुन)

नुकताच पार पडलेला आयपीएल लिलाव म्हणजे जबरदस्त यशस्वीतेचं उदाहरण मानावं लागेल. यामध्ये १० वर्षांसाठीच्या फ्रांचाईजेसना १,७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत मिळाली. शून्यातून सुरुवात करुन, केवळ तीनच वर्षांत भारतातील सर्वांत मोठा शो-बिझ इव्हेंट साकारण्यासाठी तर आयपीएल व्यवस्थापन प्रशंसेस पात्र आहेच. पण त्याबरोबरच त्यांनी आत्ताच्या फ्रांचाईजेस इतक्या जास्त किंमतीला विकल्या आहेत की, त्या खरेदी करणार्‍यांसाठी त्यातून पैसे कमविणं जवळजवळ अशक्यप्राय बनलं आहे.

इंटरनेटच्या माध्यमातून अनेकांनी आयपीएलचे हिशेब मांडले आहेत आणि प्रत्येकाचे अंदाज निरनिराळे येत आहेत. पण ढोबळमानानं पाहता, ताज्या लिलावातील विजेत्याला प्रति मोसम १७० कोटी रुपये नुसती फ्रांचाईज किंमतच मोजावी लागणार आहे. गेल्या हंगामात, खेळाडूंचं मानधन व प्रशासकीय खर्चासाठी साधारण ४५ कोटी रुपये खर्च आला (त्रयस्थ संशोधन केंद्रांच्या अंदाजानुसार). अशाप्रकारे, पैशाचं कालसापेक्ष अवमूल्यन विचारात न घेतादेखील, या फ्रांचाईजेसना नुसता खर्च भरुन काढण्यासाठी प्रति मोसम २१५ कोटी रुपये उत्पन्न मिळवणं भाग आहे. आयपीएलच्या दुसर्‍या मोसमातील कोणताही संघमालक सर्वाधिक ११० कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळवू शकला नाही. म्हणजेच नव्या संघमालकांनी त्यांच्या संघांसाठी अवास्तव किंमत मोजली, हे उघड गुपित आहे. इतर उत्पन्नाच्या स्रोतांद्वारे हळूहळू आयपीएलकडं अधिक पैसा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, त्याबरोबरच अनेक धोकेदेखील संभवतात. नवनवीन संघांच्या समावेशामुळं आयपीएलचं प्रेक्षणमूल्य सौम्य होऊ शकतं. भारताच्या या सर्वांत मोठ्या रिऍलिटी शोची नवलाई उतरणीला लागू शकते. शेवटी, आयपीएल हा शो-बिझनेसचाच एक प्रकार आहे आणि अनिश्चितता हा त्याचा मुलभूत गुणधर्म आहे. एका ताज्या सर्वेक्षणानुसार, आयपीएलची प्रेक्षकसंख्या लोकप्रिय कौटुंबिक मालिकांच्याही खाली घसरु शकते. (तसाही, या मालिकांचा निर्मितीखर्च आयपीएलपेक्षा कितीतरी पटींनी कमी असतो.) या निष्कर्षाचे परिणाम महत्त्वपूर्ण ठरु शकतात.

असं असलं तरी, मोठमोठ्या उद्योगसमूहांनी या शो-बिझचा भाग होण्यासाठी मजबूत पैसा ओतला आहे. त्यांच्याकडं नक्कीच वित्त अधिकारी व सल्लागार असतील, ज्यांनी ही सर्व गणितं जुळवायचा प्रयत्न केला असेल. गुंतवणुकीवरील परतावा हा संघखरेदीमागील मुख्य उद्देश नसेलही कदाचित. पैशाव्यतिरिक्त अजून काहितरी फायदे त्यामागे असले पाहिजेत. आयपीएल संघाच्या मालकीतून मिळणारी झटपट दृश्य प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा इतर कोणत्याही मार्गानं मिळवणं अवघड आहे. तुमच्या बॅँक-खात्यामध्ये लाखो-करोडो रुपये असतील, पण तुम्हाला स्टेडियममध्ये बॉलीवूडच्या तारकांसोबत बसायची संधी मिळते का? तुमच्या संघाच्या प्रत्येक चौकार-षटकारासाठी ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा फलंदाज तुम्हाला टाळी देतो का? सामन्यानंतरच्या पार्टीमध्ये सर्वांदेखत चिअरलीडर्सच्या ग्लासाला ग्लास भिडवण्याची संधी तुमच्या पैशानं मिळू शकते का? सर्वात महत्त्वाचं म्हणजे, असं करताना अख्खा देश तुम्हाला पाहत असतो का? नसेल तर मग नुसत्या गगनचुंबी इमारती आणि तेलसाठ्यांचा काय उपयोग? काही भागधारकांना आणि सतावणार्‍या बॅँकर्सना परतावा मिळवून देण्यासाठी? छे छे, तुमच्याकडं पैसा असेल तर, लोकांना तुमची किंमत कळालीच पाहिजे. आणि जर 'पेट्रोकेमिकल्स बनवायचं रटाळ काम करणारा' ही ओळख बदलून, 'कोची कूलनेस संघाचा मालक' अशी तुमची ओळख बनणार असेल तर, वर्षाला १०० कोटी रुपयांच्या नुकसानीचं काही वाटणारही नाही.

खरंच की. एका आयपीएल संघाची मालकीच तुम्हाला झटपट प्रसिद्धी, उत्साह, ग्लॅमर मिळवून देऊ शकते आणि तुमच्या व्यक्तिमत्वाला अलौकीक झळाळी आणू शकते. तुमच्याकडं विशेष कौशल्य किंवा जन्मजात कलागुण असण्याची काही गरज नाही. फक्त एकच गोष्ट हवी जिची चलती आहे - पैसा.

काहीजणांना हा सर्व प्रकार म्हणजे उथळ व्यावहारिकता वाटेल. मला मात्र यामध्ये, श्रीमंत भारतीयांकडून पैसे कसे उकळायचे याच्या भारी युक्त्या दिसतात. पाश्चिमात्य लक्ष्मीपुत्रांच्या तुलनेत, भारतातील श्रीमंत लोक आपल्या संपत्तीच्या खूपच क्षुल्लक प्रमाणात दानधर्म करतात. हा त्या लोकांचा खाजगी निर्णय असू शकतो, आणि खूपशा सेवाभावी संस्थांना भारतीय उद्योग क्षेत्राकडून निधी मिळवण्यासाठी प्रचंड खटाटोप करावा लागतो. शेवटी, या सेवाभावी चळवळींतून नफा कमविण्याची संधी थोडीच मिळते? पण, आयपीएल लिलावांनी सिद्ध केलं आहे की, नफ्याच्या आशेशिवायही श्रीमंत लोक आपल्या तिजोर्‍या उघडतात आणि प्रचंड पैसा ओततात, फक्त तुम्ही एक गोष्ट सांभाळली पाहिजे - त्यांचा अहंकार. तुम्ही त्यांना जोपर्यंत खूष ठेवाल तोपर्यंत ते पैसा ओतत राहतील.

या श्रीमंत लोकांना आपण कुणीतरी महान व्यक्ती आहोत असं वाटायला लावणार्‍या गोष्टी देऊ करण्यात काहीच गैर नाही. यातून बहुविध संधी निर्माण होतील – उड्डाणपूल, सी लिंक, रस्ते, गल्ल्या, मेट्रो स्टेशन्स, एखाद्या मार्गावरील रेल्वे, यांना अशा श्रीमंत लोकांची नावं देता येतील – जे त्यासाठी बोली लावून अधिकाधिक पैसे मोजतील. एकदा का यासाठी चढाओढ सुरु झाली की, ही साथ वार्‍यासारखी पसरत जाईल आणि उद्याच्या बातम्यांमध्ये झळकण्यासाठी हे लोक एकमेकांच्या वरचढ बोली लावू लागतील. जर यातून चांगल्या कामांसाठी काही हजार कोटी रुपये उभे होणार असतील, तर त्यामध्ये गैर काय?

भरपूर निधी मिळवण्यासाठी, सरकार त्या दानशूर माणसाचं नाव नाणी व नोटांवर छापू शकतं - भले ते मर्यादीत काळासाठी का असेना. सरकारी महाविद्यालयांना श्रीमंत माणसांची नावं देता येतील – यातून फक्त पैसाच उभा राहणार नाही तर, त्यांच्या नावाचा वापर त्यांना संस्थेची गुणवत्ता राखण्यासही उद्युक्त करु शकेल.

नाममात्र अधिकार असणारी काही सरकारी पदं श्रीमंत लोकांना देऊ करता येतील. प्रचंड किंमत मोजून त्यांना एका वर्षासाठी द्वितीय उपाध्यक्ष असं काहितरी बनता येईल, ज्यायोगे त्यांना प्रत्येक परदेशी अधिकारी व पाहुण्यांसोबत फोटोमध्ये झळकायला मिळेल आणि एका साधारण खतनिर्मिती कारखान्याचा मालक यापेक्षा अधिक प्रतिष्ठेनं मिरवता येईल.

यापैकी काही सूचना विचित्रही वाटतील, पण निदान माझ्या बोलण्याचा रोख तरी तुमच्या लक्षात आला असेल. अहंकार हे माणसाच्या अंतरंगात राहणारं, कायम भुकेनं वसवसलेलं जनावर आहे. तो माणूस कितीही यशस्वी वा प्रसिद्ध असला तरी या जनावराला खाऊ घालावंच लागतं. ललित मोदी आणि आयपीएल व्यवस्थापनानं यालाच लक्ष्य करुन, दुप्पट भावानं संघ विकले आणि विशेष म्हणजे विकत घेणारे देखील शेवटी खूषच आहेत. या कामगिरीसाठी ते खरंच कौतुकास पात्र आहेत. निधी उभारणार्‍या संस्थांनी व शासकीय संस्थांनी रोख पैशाच्या मोबदल्यात प्रतिष्ठा व प्रसिद्धी देऊ करण्यावर गांभीर्यानं विचार केला पाहिजे, खास करुन जेव्हा चांगल्या योजनांसाठी निधी अत्यंत आवश्यक असतो.

तोपर्यंत, तुमच्याकडं १,७०० कोटी रुपये पडून नसतील, तर तुम्ही नशीबवान आहात असं समजा. कधीकधी गरजेपेक्षा जास्त पैसा तुम्हाला असे बावळट प्रकार करायला लावतो. त्यापेक्षा टीव्हीवरच्या चीअरलीडर्स पाहणं कितीतरी चांगलं.


(स्रोतः http://timesofindia.indiatimes.com/home/sunday-toi/all-that-matters/How-to-make-the-rich-open-their-wallets/articleshow/5758477.cms)


Share/Bookmark