ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde
Showing posts with label Chetan Bhagat. Show all posts
Showing posts with label Chetan Bhagat. Show all posts

Saturday, January 18, 2020

एनआरसी गुंडाळण्याची गरज का आहेः चेतन भगत

एनआरसी गुंडाळण्याची गरज का आहेः चेतन भगत
१८/०१/२०२० । टाईम्स ऑफ इंडिया

एनआरसीनं मोठी खळबळ माजवलीय, परस्परविरोधी टोकाची मतं निर्माण केलीत, प्रचंड अस्वस्थता पसरवलीय आणि लोकांना रस्त्यावर उतरायला भाग पाडलंय. सरकार आता दोन पावलं मागं गेलंय. पण अजूनही त्यांनी जे करायला पाहिजे ते केलेलं नाही - ते म्हणजे, अधिकृतरित्या एनआरसी गुंडाळणं किंवा दीर्घकाळासाठी हा मुद्दा बाजूला ठेवून देणं.

हा ‘इगो’चा मुद्दा नाहीये आणि नसलाही पाहिजे. खरं तर एनआरसीची संकल्पना काही वाईट नाही, पण अंमलबजावणीमध्ये मार खाणार हे नक्की. आणि भारतातली वस्तुस्थिती लक्षात घेतली तर एनआरसीमुळं मिळणाऱ्या फायद्यांपुढं प्रश्नचिन्हच उभं राहतं. आजच्या घडीला भारतात एनआरसी लागू केल्यास, ते निष्फळ ठरण्यापासून त्याचे भयंकर परिणाम होण्यापर्यंत काहीही घडू शकतं. चांगल्यात चांगला परिणाम म्हणजे, प्रचंड खर्च करुन निरर्थक आणि गोंधळ निर्माण करणारं काम घडेल. वाईटातला वाईट परिणाम म्हणजे, या निमित्तानं देशात यादवीसुद्धा माजू शकेल.

आता कुणी म्हणेल की, एनआरसीचे तपशील बाहेर आलेले नसताना त्यावर कशाला टिप्पणी करायची? विशेषतः, नागरिकत्व सिद्ध करण्यासाठीचे निकष आणि पद्धत जाहीर केलेली नसताना. पण मुद्दा हाच आहे की, निकष काहीही असले तरी सध्या एनआरसी यशस्वी होऊ शकणार नाही.

जर निकष खूपच सोपे असतील, तर जवळपास सगळेच एनआरसीच्या चाळणीतून सहीसलामत पार पडतील. तीन साक्षीदार किंवा सध्याचं कुठलंही ओळखपत्र एवढाच निकष असेल, तर भारतातली प्रत्येक व्यक्ती एनआरसीमध्ये नोंदवली जाईल. तरीसुद्धा या कामासाठी रांगा लागतील, फायलींचे ढीग उभे राहतील, लोकांना त्रास सहन करावा लागेल, चुका होतील आणि भारतीय बाबूगिरीचा नेहमीचा विक्षिप्तपणा झेलावा लागेल. स्पष्टच बोलायचं तर, पुन्हा एकदा ‘आधार’सारखा सावळागोंधळ अनुभवायला मिळेल. आणि प्रत्येक व्यक्ती त्यामधे नोंदवली जाणार असल्यानं, शेवटी त्याला काहीच अर्थ उरणार नाही. प्रचंड पैसा ओतून, वेळेची आणि कष्टाची नासाडी करुन, आपल्या हाती उरेल फक्त भरपूर चुकांनी भरलेलं नागरिकांच्या माहितीचं एक जाडजूड रजिस्टर.

दुसरी शक्यता म्हणजे, एनआरसीचे निकष खूप कडक ठेवल्यास होणारा अजूनच मोठा गोंधळ. आपलं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी खरोखर ऐतिहासिक कागदपत्रं लागणार असली तर? पिढ्यानपिढ्या जुने जन्माचे दाखले उकरुन काढावे लागतील. तुमचा जन्म जिथं झाला ते हॉस्पिटल कदाचित केव्हाच बंद झालं असेल. जन्माचे दाखले देणारा खेडेगावातला अधिकारी केव्हाच वारला असेल. ज्यांची घरीच बाळंतपणं झालीत अशांना काय करावं ते सुचणारसुद्धा नाही. सध्याची सगळी ओळखपत्रं निरुपयोगी ठरतील. असं झालं तर, नागरिकत्व सिद्ध होईपर्यंत सर्व भारतीय परकीयच समजावे लागतील.

श्रीमंत आणि वजनदार माणसं शेवटी यातून सुटतीलच. गरीब लोक इतस्ततः धावपळ करत, रडत नागरिकत्वाची भीक मागत राहतील. सरकारी बाबू लोकांना हा अधिकारांचा अतिरिक्त डोस मिळून ते आणखी खूष होतील. आणि हो, या सगळ्याचा काहीतरी दर ठरेलच. नागरिकत्वाचे निकष जेवढे कडक, तेवढाच त्यातून पार पडण्याचा दर जास्त राहील.

आणि मग खोट्या कागदपत्रांचं संकट आपल्यावर कोसळेल. जुन्या जन्म दाखल्यावर फोटोशॉप वापरुन बदल करणं फार अवघड आहे काय? आणि तुम्ही ठरलेल्या दरानं पैसे खायला घातले नाहीत, तर तुमचा खराखुरा जन्माचा दाखला फेटाळून लावणं सरकारी बाबूंना फार अवघड आहे काय? (मग तो दाखला खरंच खरा आहे हे कोर्टात सिद्ध करायला तुम्हाला पुढची २० वर्षं लागतील, त्यासाठी शुभेच्छा.)

हे काही बरोबर नाही. फारच जबरदस्ती केली तर लोक निदर्शनं करतील. काही निदर्शनांचं रुपांतर दंगलींमधे होऊ शकेल. हे सगळं झाल्यावर शेवटी एखादं रजिस्टर तयार होईलही, पण त्यातली माहिती, देशातल्या शांततेसारखीच, दूषित झालेली असेल.

त्यामुळं निकष काहीही असले तरी, भारतासारख्या देशातली परिस्थिती लक्षात घेता, इथं एनआरसी राबवणं सध्या तरी शक्य नाही. कदाचित २०२० नंतर भारतात जन्माला आलेल्या सर्व मुलांची अशी काहीतरी नोंद ठेवता येईल. येत्या काही दशकांमध्ये, यामधूनच एखादं चांगलं रजिस्टर तयार होऊही शकेल. पण सध्यातरी हे शक्य दिसत नाही.

पण मुळात आपण एनआरसी करायला घेतलंच कशासाठी? तर, हे सगळं करण्यामागं एक गृहीतक असं आहे की, भारताच्या लोकसंख्येतले काही टक्के लोक घुसखोर असून, आपल्या राष्ट्रीय संपत्तीवर त्यांचा भार पडतोय. सर्वप्रथम, हे गृहीतक खरं असू शकत नाही, कारण असे घुसखोरदेखील आपल्या जीडीपी (राष्ट्रीय उत्पन्न) मध्ये भर घालतच असतात.

बरं ते जाऊ दे, विस्थापितांचं राष्ट्रीय उत्पन्नातलं योगदान आपण बाजूला ठेवू. असं समजू की आपण चांगल्या पद्धतीनं एनआरसीची अंमलबजावणी केली. असंही समजू की, सर्व भारतीय प्रामाणिक बनले, प्रत्येक भारतीय नागरिकाकडं सगळी कागदपत्रं नीट लावून ठेवलेली आपापली एक फाईल आहे आणि असंही समजू की सर्व अधिकाऱ्यांनी हसतमुखानं लांडी-लबाडी न करता काम केलं. असं समजू की आपल्याकडं एक स्वच्छ नीटनेटकं एनआरसी तयार झालं, आणि हा सगळा उद्योग करुन झाल्यावर समजा ५% नागरिकांना अ-भारतीय घोषित करण्यात आलं. ही संख्यासुद्धा ६ कोटींच्या पुढं जाते, म्हणजे इंग्लंडच्या एकूण लोकसंख्येएवढी! मग एवढ्या लोकांचं काय करणार आपण? या सगळ्यांना कुठल्या विमानात बसवून कुठं पाठवून देणार?

आता असाही विचार करुया. दोन्हीपैकी सोपी गोष्ट कुठली आहे? या ६ कोटी लोकांना बरोब्बर वेचून काढून सगळ्यांना बाहेर पाठवून देणं? की आपली अर्थव्यवस्था वेगानं वाढवून आपल्या राष्ट्रीय उत्पन्नात ५% भर घालणं? जरी कुणी घुसखोर आपल्या राष्ट्रीय संपत्तीवर भार टाकत असतील, तरी ही ५% गळती थोपवण्यापेक्षा आपलं उत्पन्न वाढवणं जास्त सोपी गोष्ट आहे. आंब्याची चार नवीन झाडं लावणं सोपं असताना, तुम्ही गावातल्या दोन-चार आंबे चोरणाऱ्या पोरांना शोधायला एक आख्खं वर्ष घालवाल का?

एनआरसी म्हणजे हजेरी घेण्याचं काम आहे. पण तुम्ही भारतासारख्या गजबजलेल्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर हजेरी नाही घेऊ शकत. यातून निष्पन्न होईल फक्त गोंधळ, चुका, वाद, आणि मग काही लोकांची गाडी चुकेल, तर आणखी वाईट गोष्ट म्हणजे काही लोक रुळांवर पडून चिरडले जातील.

पण फक्त अंमलबजावणी नीट होणार नाही एवढंच सध्या एनआरसी गुंडाळायला सांगण्यामागचं कारण नाहीये. अल्पसंख्याकांच्या बाबतीत भाजपची विश्वासार्हता प्रचंड खालावलेली आहे. भाजप नेतृत्वाची प्रतिमा दडपशाहीची, भीती निर्माण करणारी आहे. चूक की बरोबर जाऊद्या, पण अमित शहांनी तुमच्याकडं कागदपत्रं मागणं आणि मनमोहन सिंगांनी ती मागणं यामध्ये फरक आहे की नाही?

याशिवाय, एनआरसी आणण्याची वेळसुद्धा बरोबर नाहीये. ३७० कलम रद्द करणं आणि अयोध्या प्रकरणातला निकाल हे भारतातल्या विशिष्ट भागांमध्ये हिंदूंचे विजय मानले जातायत. याच भागांमध्ये एनआरसी हिंदूंच्या हिताचं असल्याचं मानलं जातंय (खरं तर तसं काही नसून एनआरसी धर्मनिरपेक्ष गोष्ट आहे. एनआरसीमुळे सर्वांचा धर्मनिरपेक्ष छळ होणार आहे). त्यामुळं असे मुद्दे एकामागून एक रेटत राहिल्यास एक विशिष्ट समाज दडपला जाईल, विरोधकांना भाजपवर टीका करण्याची संधी मिळेल आणि आपल्याला आजूबाजूला दिसतायत तशी निदर्शनं केली जातील. एनआरसी आणण्याची वेळ यासाठीही बरोबर नाहीये, कारण आपल्या अर्थव्यवस्थेवरसुद्धा खूप काम करण्याची आत्ता गरज आहे. अशा परिस्थितीत देशात अशांतता पसरणं भारताला परवडणार नाही.

आपल्याला अर्थव्यवस्थेवर खूप काम करायची गरज आहे, तेवढं काम आपल्या सगळ्यांसाठी पुरेसं आहे आणि सगळ्यात आधी तिकडंच लक्ष दिलं गेलं पाहिजे. एनआरसीला सध्या तरी विश्रांतीची गरज आहे, तीसुद्धा अधिकृतपणे.

- चेतन भगत
(मराठी अनुवादः मंदार शिंदे 9822401246)

मूळ लेखः https://timesofindia.indiatimes.com/blogs/toi-edit-page/why-nrc-must-be-shelved-it-will-be-an-expensive-gargantuan-pointless-exercise-that-could-trigger-civil-war-in-the-worst-case/



Share/Bookmark

Saturday, April 20, 2013

एका पोळ्याची गोष्ट

(चेतन भगत यांच्या १९ एप्रिल २०१३च्या 'टाइम्स ऑफ इंडीया'मधील लेखाचा मी केलेला मराठी अनुवाद)

फार वर्षांपूर्वी, एका मोठ्ठ्या जुन्या झाडावर एक प्रचंड मोठं मधमाश्यांचं पोळं होतं. आजूबाजूला रंगीबेरंगी टवटवीत फुलांनी बहरलेले बाग-बगिचेही होते.

त्या पोळ्याचा कारभार चालवण्यासाठी काही ज्येष्ठ मधमाश्यांसोबत एका राणी माशीची नेमणूक करण्यात आली होती. त्या सगळ्यांना 'सरकारी माश्या' असं म्हटलं जाई. 'कष्टकरी माश्या' त्यांचं मध सुरक्षितपणे साठवून ठेवण्याचं काम या 'सरकारी माश्यां'वर सोपवून निर्धास्त होत्या. याबाबतीत कष्टकरी माश्यांचा सरकारी माश्यांवर पूर्ण विश्वास होता. शिवाय, नवीन बगिच्यांचा शोध घेणं, पुढच्या पिढीतील तरुण माश्यांसाठी मधाचे नवनविन स्रोत शोधून काढणं, अशी कामंदेखील सरकारी माश्यांकडून अपेक्षित होती.

पोळ्याचा कारभार कुठलाही गडबड-घोटाळा न होता सुरळीतपणे चालावा, यासाठी सरकारी माश्यांनी काही नियम बनवले होते आणि कायदेही संमत करून घेतले होते. कष्टकरी माश्यांना त्यांचं पालन करावंच लागे, अन्यथा त्या शिक्षेस पात्र ठरत. पोळ्यात राहणार्‍या विविध जातीच्या मधमाश्या आपापसात भांडून पोळ्यासाठी समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी अशा नियम व कायद्यांची गरज होती. उदाहरणार्थ, काळ्या माश्या आणि लाल माश्या असे दोन मुख्य प्रकार होते. त्यांचं काम एकाच प्रकारचं होतं. फक्त, त्या दिसायला थोड्या वेगळ्या होत्या आणि त्यांच्या प्रार्थनेच्या आपापल्या वेगळ्या पद्धती होत्या.

अशा या परिपूर्ण पोळ्यामधे सर्व काही आलबेल होतं. पण काळानुसार काही बदल घडत गेले. सरकारी माश्यांची स्वतःची मुलं, नातेवाईक, आणि मित्रमंडळी होती. त्यापैकी बहुतेकांना 'सरकारी माश्या' बनता आलं नाही. त्यांना इतरांसारखं 'कष्टकरी माश्या' बनूनच जगावं लागलं. पण एके दिवशी, एका ज्येष्ठ सरकारी माशीच्या मुलानं आपल्या जन्मदात्याकडं तक्रार केली की, कष्टकरी माशी म्हणून जगणं फारच कष्टाचं काम आहे. "आपल्या सरकारी मधाच्या साठ्यांमधून मी थोडंसं मध घ्यायला काय हरकत आहे?" त्यानं विचारलं. "नाही, हे अयोग्य आणि अनैतिक आहे," सरकारी माशीनं म्हटलं.

"कुणाला काऽही कळणार नाही. सरकारी गोष्ट आहे, सरकारपुरतीच राहील," सरकारी माशीच्या मुलानं उपाय काढला. बरोबरच होतं त्याचं. कष्टकरी माश्यांचा स्वतःपेक्षा जास्त सरकारी माश्यांवर विश्वास होता. थोडंसं मध गायब झालं तर कुणाच्या लक्षातही येणार नव्हतं.

आणि मग झाली की सुरुवात. हळूहळू, सगळ्या सरकारी माश्यांच्या मुलांनी, भावंडांनी, नातलगांनी, मित्रांनी, आणि हितचिंतकांनी रोज सरकारी साठ्यातलं थोडं-थोडं मध चोरायला सुरुवात केली. आता त्यांना दिवसभर बाग-बगिच्यात मजुरी करायची गरज नव्हती. अपेक्षेनुसार मधाची पातळी वाढत नाहीये, हे कष्टकरी माश्यांच्या लक्षात येऊ लागलं. काही कष्टकरी माश्यांनी हा मुद्दा उचलताच सरकारी माश्यांनी फर्मान सोडलं, "आळस झटका आणि कामाला लागा".

मधाचा साठा वाढवण्यासाठी कष्टकरी माश्या अजून कष्ट करू लागल्या. तरीसुद्धा, मधाची पातळी काही वाढेचना. उलट, दिवसेंदिवस मध कमीच होऊ लागला.

लवकरच, सरकारी माश्यांनी आणखी एक धोरण आखलं. एखाद्या नव्या बागेचा शोध लागला की सर्वप्रथम त्यांच्या मुलांना, नातेवाईकांना, आणि मित्रांना तिचा लाभ दिला जाऊ लागला. "जे कष्टकरी माश्यांना ठाऊकच नाही, ते त्यांच्याकडून हिरावून कसं घेणार," अशी कुजबूज सरकारी वर्तुळात सुरू झाली.

पुढेपुढे, मधाची पातळी तर घटत गेलीच, शिवाय कष्टकरी माश्यांच्या मुलांसाठी नव्या बागाही सापडेनाशा झाल्या. आता ते रिकामटेकडे आणि उपाशी राहू लागले. कधीकधी, राणी माशी या कष्टकरी माश्यांपुढं थोडं मध शिंपडे, आणि मग सगळीकडं राणीची वाहवा होई. तरीसुद्धा, हे शिंपडलेलं मध पुरेसं नव्हतंच.

"कोण चोरतंय आपलं मध?" शेवटी एके दिवशी, एका प्रभावशाली कष्टकरी माशीनं प्रश्न विचारलाच. ही प्रभावशाली बंडखोर माशी काळ्या माश्यांच्या गटातली असल्याचं सरकारी माश्यांच्या लक्षात आलं. म्हणून, सरकारी माश्या म्हणाल्या, "लाल माश्या चोरताहेत तुमचं मध." त्यानंतर, सरकारी माश्यांनी लाल माश्यांना बोलावून घेतलं, आणि त्यांना सांगितलं, "काळ्या माश्या तुमच्या कष्टाच्या कमाईवर डल्ला मारतायत असं आम्हाला वाटतंय."

उपासमार आणि कष्टानं वैतागलेल्या काळ्या आणि लाल माश्यांना संताप अनावर झाला. त्यांची एकमेकांशी तुफान भांडणं झाली. आपल्यावरची पीडा टळल्यानं या भांडणांची मजा लुटत सरकारी माश्यांनी मधचोरी सुरूच ठेवली. जसजशा लाल आणि काळ्या माश्या मरू लागल्या आणि जखमी होऊ लागल्या, तसतशा सरकारी माश्या अजून थोडं-थोडं मध शिंपडत राहिल्या. कष्टकरी माश्यांनी पुन्हा राणी माशीचा जयजयकार केला.

थोड्याच दिवसांत, त्या भागात दुष्काळ पडला. फुलांची संख्या कमीकमी होत गेली, आणि इतकी वर्षं साठवलेल्या मधाचा उपयोग करण्याची वेळ आली. पण, सर्वांसाठी धक्कादायक गोष्ट म्हणजे, सरकारी साठ्यांमध्ये मधाचा थेंबही शिल्लक नव्हता. पूर्णपणे सरकारी माश्यांवर विश्वास ठेवून राहिलेल्या कष्टकरी माश्या सरकारी माश्या आणि त्यांच्या संबंधितांच्या घराकडं वळल्या. ते सर्वजण गलेलठ्ठ होऊन आपापल्या 'खाजगी' मधाच्या साठ्यांवर आरामात बसलेले दिसले. हे कमी म्हणून की काय, त्यांना शेकडो नव्या बाग-बगिच्यांचे नकाशेदेखील सापडले, ज्यांचा कष्टकरी माश्यांना थांगपत्ता लागू दिला नव्हता.

या सर्व प्रकारानं अचंबित झालेल्या कष्टकरी माश्या हा धक्का पचवत आपापल्या घरी परतल्या. लाल आणि काळ्या माश्यांची नजरानजर झाली. आपल्याला मूर्ख बनवण्यात आलं, हे दोघांच्याही लक्षात आलं. त्यांनी एकमेकांच्या गळ्यात पडून, एकमेकांना इजा पोहोचवल्याबद्दल माफी मागितली.

"आपण त्यांना चांगला धडा शिकवू," काळ्या आणि लाल माश्या एकमुखानं म्हणाल्या. कष्टकरी माश्यांना कळून चुकलं की, आपल्या नांग्या एकमेकांविरुद्ध नव्हे तर आपल्याला फसवणार्‍यांविरुद्ध वापरण्याची वेळ आलेली आहे.

दरम्यान, राणी माशीला तणावपूर्ण परिस्थितीचा अंदाज आला. तिनं आपल्या सुंदर तरुण मुलाला समोर आणलं, "हाच आता तुम्हाला वाचवेल. जसं इतकी वर्षं मी वाचवलं."

पण, लाल आणि काळ्या माश्या यावेळी सावध होत्या. त्या सगळ्या एकत्र आल्या आणि सरकारी माश्या व त्यांच्या बगलबच्च्यांवर त्यांनी आपल्या नांग्या उगारल्या. सरकारी माश्यांना आपली संपत्ती गोळा करायलासुद्धा वेळ मिळाला नाही. सगळं जागेवर टाकून त्यांना पोळं सोडून पळून जावं लागलं. लवकरच, त्यांच्यापैकी कुणीही त्या पोळ्यात उरलं नाही.

लाल आणि काळ्या माश्यांनी आपल्यापैकी सर्वोत्तम लोकांच्या हाती सत्ता द्यायचं ठरवलं. तसंच, यापुढं कोणावरही आंधळा विश्वास टाकायचा नाही, सर्वांवर लक्ष ठेवायचं, असंही ठरवलं. हळूहळू पोळ्याची स्थिती सुधारत गेली, आणि मधाचा साठा पूर्ववत भरण्यासाठी नवी पिढी अजून कष्ट उपसू लागली. नव्या बाग-बगिच्यांनी नवी संपन्नता आणली, आणि ते पोळं जगातलं सर्वात यशस्वी पोळं समजलं जाऊ लागलं.

काही वर्षांनंतर, एका रात्री एक वृद्ध माशी आपल्या नातवाशी बोलताना म्हणाली, "तुला माहित्येय का, एके काळी आमच्यावर एका राणी माशीचं राज्य होतं?" "हो. पण आमच्यावर नाही. कारण आम्हाला माहित्येय की, एक छोऽटासा राजा आमच्यापैकी प्रत्येकाच्या आत लपलेला आहे," छोट्या माशीनं उत्तर दिलं.

- मंदार शिंदे
shindemandar@yahoo.com

(मूळ लेखः http://blogs.timesofindia.indiatimes.com/The-underage-optimist/entry/once-upon-a-beehive)

Share/Bookmark