गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांची ओळख जन-गण-मन, शांतिनिकेतन, आणि नोबेल पुरस्कार एवढीच नाही, तर दीडेकशे वर्षांपूर्वी आधुनिक , काळाच्या पुढची काव्यं, नाटकं, कथा रचणारे साहित्यिक टागोर, मृत्यू आणि आत्मा-परमात्मा संबंधांवर सुंदर भाष्य करणारे तत्वज्ञ टागोर, लयबद्ध आणि कर्णमधूर रविंद्र संगीताचे निर्माते टागोर, वयाच्या साठीनंतर चित्रकलेच्या क्षेत्रात मुक्त मुशाफिरी करणारे चित्रकार टागोर, शिक्षणाला चार भिंती आणि छापील शब्दांच्या बाहेर आणून शिकण्याची प्रक्रिया आनंददायी बनवणारे टागोर, अशा गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांच्या अनेक ओळखी आहेत. आणि रविंद्र संगीताच्या साथीनं टागोरांचं जीवन-दर्शन घडवणारा राधा मंगेशकर यांचा 'रविंद्र संगीत' हा कार्यक्रम तितकाच जिवंत आणि रोमांचकारी बनतो तो केवळ त्यांच्या सुमधूर आवाजानं नव्हे तर मनापासून केलेल्या निवेदनानं. रविंद्र संगीतातली दहा उत्तम गाणी त्या रविंद्र संगीताचे सर्व नियम पाळून आणि प्रत्येक बंगाली गाण्याचा शब्दार्थ व भावार्थ मराठीत समजावून सांगत सादर करतात. मग ते 'आये तो बे सोहोचरी, हाते हाते धोरी धोरी, नाचीबी घिरी घिरी गाहीबी गान' हे आनंदगान असो, की कदंब वृक्षाभोवती घिरट्या घालणा-या कृष्णछायेचं गूढगीत असो, राधा मंगेशकरांच्या अर्थपूर्ण निवेदनातून या बंगाली गीतांचा अर्थही कळतो आणि त्यांच्या मूळ लयबद्ध रचनेचा आनंदही घेता येतो. 'तोमार होलो शुरु, आमार होलो शारा' हे तत्वज्ञानाच्या वाटेनं जाणारं गीत आणि 'हे खोनिकेर ओतिथी' हे सुख आणि दुःखाच्या पलिकडची भावना व्यक्त करणारं गीत अर्थाइतक्याच ताकदीनं राधा मंगेशकर गातात. दोन गाण्यांच्या मधे टागोरांचा जीवन-प्रवास, 'गीतांजली' आणि नोबेल पुरस्काराचे किस्से, टागोरांच्या घरांचे, वस्तूंचे फोटो, या सगळ्यातून वातावरण रविंद्रमय होऊन जातं आणि मानवी जीवनाचं अंतिम सत्य सांगत कार्यक्रमाचा शेवट होतो - 'जोडी तोर दाक सुने केऊ ना असे, तोबे एकला चालो रे... एकला चालो एकला चालो एकला चालो रे...'
ऐसी अक्षरे
Showing posts with label रविंद्र संगीत. Show all posts
Showing posts with label रविंद्र संगीत. Show all posts
Saturday, December 5, 2015
Subscribe to:
Comments (Atom)