ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde
Showing posts with label sushma swaraj. Show all posts
Showing posts with label sushma swaraj. Show all posts

Wednesday, August 7, 2019

राजकारणाचं आकर्षण

'पॉलिटीक्स इज अ डर्टी गेम ऑफ स्काऊन्ड्रल्स' असं आमचे एक सर म्हणायचे. लहानपणी या वाक्याचा अर्थ तितकासा कळला नव्हता. पण स्वतःचं आयुष्य राजकारण आणि समाजकारणात घालवलेल्या आमच्या सरांचे ते अनुभवाचे बोल मनावर नकळत कोरले गेले होते.

त्या विचाराला पुष्टी देणाऱ्याच बातम्या, घटना, माणसं, नेते, नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, वगैरे पुढं दिसत गेले. आपला या क्षेत्राशी कधीही संबंध येऊ नये, असं त्यावेळी वाटायचं. तू राजकारण करु शकत नाहीस, कारण तू राजकारण्यांसारखा दिसत नाहीस; यू आर टू सॉफिस्टीकेटेड टू बी अ पॉलिटीशियन, अशी वाक्यं सहज कानांवर पडत होती. राजकारणी म्हणजे, पांढरे कपडे, हातांच्या बोटांत अंगठ्या आणि मागं-पुढं माणसांचा ताफा, बेदरकार वृत्ती, रांगडी आणि बऱ्याचदा गलिच्छ भाषा, गेंड्याची कातडी, कोल्ड ब्लडेड ऐटीट्यूड, वगैरे वगैरे कल्पना मिडीयातून, सिनेमा-नाटकातून आणि पुस्तकांतून डोक्यात फीड झालेल्या होत्या.

आणि अशा वातावरणात काही मोजक्या राजकारणी लोकांनी, नेत्यांनी, या स्टँडर्ड पॉलिटिकल इमेजपेक्षा स्वतःची वेगळीच प्रतिमा निर्माण केली आणि ती यशस्वीरित्या सांभाळली देखील. यामध्ये सर्वांत पहिलं आणि सर्वांत महत्त्वाचं नाव म्हणजे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जी. एक कवी हृदयाचा, कोमल वाणीचा, हळव्या स्वभावाचा, सभ्य सुशिक्षित माणूस एक यशस्वी राजकारणी बनू शकतो, हे वाजपेयींनीच सिद्ध केलं, असं माझं मत आहे. 'यू आर टू सॉफिस्टीकेटेड टू बी अ पॉलिटीशियन' या न्यूनगंडावर मात करुन, जवळपास दोन पिढ्यांमधल्या तरुण कार्यकर्त्यांना वाजपेयींनी राजकारणाकडं बघायची सकारात्मक दृष्टी दिली, प्रेरणा दिली, विश्वास दिला, असं मला वाटतं.

अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या 'टू सॉफिस्टीकेटेड टू बी अ पॉलिटीशियन' नेत्यांना मिळालेल्या राजकीय यशामागंसुद्धा थोड्या प्रमाणात का होईना, पण वाजपेयींसारख्या सभ्य सुसंस्कृत राजकारण्यांची पायाभरणी आहे, हे विसरुन चालणार नाही. त्याच सभ्य, सुसंस्कृत, सॉफिस्टीकेटेड इमेजवाल्या राजकारण्यांच्या यादीत प्रमोद महाजन, सुषमा स्वराज, मनोहर पर्रीकर ही काही नावं अग्रक्रमानं घ्यायला लागतील. राजकीय विचारसरणी, पक्षीय निष्ठा आणि स्थळ-काळ-व्यक्ति तसंच परिस्थिती यानुरुप घेतलेले राजकीय निर्णय, या सगळ्यांच्या पलीकडं जाऊन, या नेत्यांबद्दलचा आदर, आकर्षण, अप्रूप अनेकजण मान्य करतात.

देशाच्या राजकारणात संयमी, आदरणीय, मृदुभाषी, आणि वैचारिक बैठक पक्की असलेल्या नेतृत्वाची नेहमीच गरज असते आणि अशा नेत्यांची उणीव नेहमीच आपल्याला जाणवत राहते. मुळातच अशी माणसं कमी संख्येत उपलब्ध असल्यानं, त्यातल्या महत्त्वाच्या व्यक्तींचं आपल्यातून अकाली निघून जाणं जास्त बोचतं.

प्रमोदजी, मनोहर पर्रीकर, आणि आता सुषमा स्वराज जी... तुम्ही कुठल्या पक्षात होतात, तुम्ही किती निवडणुका जिंकलात, तुम्हाला कुठली पदं मिळाली आणि कुठली मिळायला हवी होती, हे सगळं मिथ्या आहे. आमच्या पिढीला राजकारणाकडं आकर्षित करणारे तुम्हीच होतात, हे सत्य आहे. त्याबद्दल आम्ही नेहमीच तुमचे ऋणी राहू. आम्हाला, देशाला तुमची अजून खूप गरज होती. तुमची प्रतिमा आमच्या मनात ठसलेली आहे, जी तुमच्या ध्यासातून, जिद्दीतून, अभ्यासातून, विचारांतून, कामातून तुम्ही निर्माण केलीत आणि शेवटपर्यंत टिकवलीत. तीच प्रतिमा आम्हाला भविष्यात मार्गदर्शन करीत राहील, प्रेरणा देत राहील, असा आम्हाला विश्वास वाटतो.

- मंदार शिंदे 9822401246
(०७/०८/२०१९)


Share/Bookmark