ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Thursday, March 4, 2010

शिकारी की सावज?

(डॉ. वाय. एल. आर. मूर्ती यांच्या संदेशावर आधारीत. डॉ. वाय. एल. आर. मूर्ती, इंडीयन इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बेंगलोर इथं प्राध्यापक आहेत. त्यांनी आय. आय. टी., मद्रास येथून एम. टेक. तसेच आय. आय. एम., बेंगलोर येथून व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी मिळवली आहे.)

शिकारी की सावज?

भारतामध्ये आजमितीला सर्वाधिक कॅमेरा विक्री कोण करतं?
तुम्ही म्हणाल – सोनी, कॅनॉन अथवा निकॉन. अंहं, यापैकी कुणीही नाही. बरोबर उत्तर आहे - नोकीया ! होय, नोकीया, जिचं भारतातील मुख्य उद्योग-क्षेत्र कॅमेरा नसून मोबाईल फोन आहे.
याचं कारण म्हणजे, फक्त कॅमेर्‍याऐवजी कॅमेरा असलेल्या मोबाईल फोन्सची वाढती विक्री होय. मग हे मोबाईल फोन पूर्णपणे कॅमेर्‍याची जागा घेऊ शकतील काय? अर्थातच! सोनी आणि कॅनॉन यांना या गोष्टीची जाणीव असावी, अशी आपण आशा करु.

आता हेच पहा. भारतीय संगीत क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी कोणती आहे? तुम्हाला काय वाटतं, एचएमव्ही-सारेगामा? चूक. ती कंपनी आहे - एअरटेल! तासन्‌तास चालणारे म्युझिक अल्बम्स विकून म्युझिक कंपन्या जेवढं कमवत असतील त्यापेक्षा कितीतरी जास्त एअरटेल कमवतं, तेही ३० सेकंद वाजणार्‍या कॉलर ट्यून्स विकून.
वास्तविक, एअरटेल काही संगीत उद्योगात नाही. ती भारतातील सर्वाधिक ग्राहकवर्गाला मोबाईल सेवा पुरविणारी कंपनी आहे. अशा प्रकारचा प्रतिस्पर्धी ओळखणं महाकठीण काम आहे, आणि त्याला मागं टाकणं तर त्याहून कठीण (तुम्ही त्याला ओळखेपर्यंत तो तुम्हाला मागं टाकून बराच पुढं गेलेला असतो). पण म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की नोकीया आणि भारती (एअरटेल ची मूळ कंपनी) अगदी निवांत असतील, तर तुमचा अंदाज पुन्हा चुकीचा ठरण्याची शक्यता आहे.
आपण स्मार्टफोनच्या बाबतीत पूर्ण गाफील राहीलो, हे नोकीयानं कबूल केलं आहे. ऍपलचा आयफोन आणि गुगलचे ऍन्ड्रॉईड, नोकीयासाठी भविष्यातील मोठी डोकेदुखी ठरु शकतात, हे त्यांना कळून चुकलं आहे. पण गुगल ही तर मोबाईल कंपनी नाहीच मुळी? याचाच अर्थ, ही उदाहरणं एका अजून मोठ्या कोड्याकडं अंगुलीनिर्देश करत आहेत. हे फक्त मोबाईल, संगीत, कॅमेरा किंवा ईमेल पुरतं मर्यादीत नाही.

"भविष्यातील सर्वात लोकप्रिय व्यक्तिगत डिजिटल उपकरण (पर्सनल डिजिटल डिव्हाईस) कोणतं?" यासाठी हे महाभारत चालू आहे. काय असेल ते - टेलिफोनसहित अधिक वेगवान मोबाईल किंवा पामटॉप? या छोट्या-छोट्या लढाया मिळून एका महायुद्धाकडं संक्रमित होत आहेत. या सर्व लढायांमागं एक यक्षप्रश्न आहे - “कोण आहे माझा प्रतिस्पर्धी?”

माझ्या विद्यार्थ्यांना डिवचण्यासाठी मी अधून-मधून एक प्रश्न विचारत असतो - “ऍपलनी जे सोनीबरोबर केलं, तेच सोनीनं कोडॅकबरोबर केलं, कसं ते स्पष्ट करा?” काही हुशार विद्यार्थी लगेच उत्तर देतात. सोनीनं आपलं कार्यक्षेत्र श्राव्य माध्यमाभोवती (ऑडीयो) आखून घेतलं (वॉकमन मधून संगीत ऐका). ऍपलसारखी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी आपल्या कार्यक्षेत्रात शिरकाव करु शकेल, याची त्यांनी कल्पनाही केली नसेल. जरा विचार करुन पहा, हे खरंच इतकं अशक्य होतं का? संगणक बनविणार्‍या ऍपलकडं दोन्ही दृक्‌-श्राव्य माध्यमांची क्षमता आहे. मग केवळ श्राव्य माध्यमात ऍपल आपल्याशी स्पर्धा करु शकणार नाही, असं सोनीला का वाटलं? सोप्पं आहे - कोडॅकनं जेव्हा आपलं कार्यक्षेत्र फिल्म कॅमेर्‍यापुरतं मर्यादीत ठेवलं, तेव्हा सोनी 'डिजिटल' म्हणून विस्तारत गेले. डिजिटल कॅमेर्‍याच्या कक्षेत ही दोन्ही क्षेत्रं मिसळून गेली. डिजिटल मध्ये प्रवेश करुन कॅमेरा फिल्मवर गुंतवलेल्या पैशावर पाणी सोडायचं, की फिल्म मध्येच राहून डिजिटल च्या स्पर्धेतून बाहेर पडायचं, या द्विधेत कोडॅक अडकून पडलं. निर्णयाअभावी त्याची दोन्हीकडं पीछेहाट झाली. साहजिकच आहे. "उद्या माझा प्रतिस्पर्धी कोण असणार आहे?” हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारलाच नाही. हीच गत आयबीएम ची झाली, ज्यांनी मेनफ्रेम कॉम्प्युटरच्या उत्पन्नापुढं पीसीच्या (पर्सनल कॉम्प्युटर) उदयाकडं दुर्लक्ष केलं. हीच गत बिल गेट्सची झाली, ज्यांनी आधी इंटरनेट ला एक 'फॅड' ठरवलं, आणि मागाहून नेटस्केपला संपविण्यासाठी विंडोजमध्ये इंटरनेट ब्राउजर गुंडाळून विकलं. आजचा प्रतिस्पर्धी कोण, हा मुद्दाच गौण आहे. आजचा प्रतिस्पर्धी कोण हे उघड आहे, तर उद्याचा कोण हे गुपित!

२००८ मध्ये ब्रिटिश एअरवेजचा भारतातील सर्वात मोठा प्रतिस्पर्धी कोण होता? सिंगापूर एअरलाईन्स? की इंडीयन एअरलाईन्स? असतीलही, परंतु या प्रश्नाचं अचूक उत्तर वेगळंच काहीतरी आहे. वर उल्लेख केलेल्या व न केलेल्याही सर्व एअरलाईन्ससाठी धोकादायक प्रतिस्पर्धी आहेत – एचपी आणि सिस्को च्या व्हिडिओ-कॉन्फरन्सिंग व टेलिप्रेझेन्स सुविधा! जागतिक मंदीमुळं व्यावसायिक वाहतूक घटली. प्रवास खर्चात कपात करण्यासाठी, भारतातील व बाहेरील वरीष्ठ आयटी अधिकार्‍यांना व्हिडिओ-कॉन्फरन्सिंग वापरण्याच्या सूचना त्यांच्या मुख्य कार्यालयांकडून देण्यात आल्या. इतकंच नव्हे तर, अमेरीकन व्हिसासाठी भारतीय तंत्रज्ञांची उडणारी झुंबड २००८ मध्ये बिल्कुल दिसली नाही. (भारतासाठी ६५,००० युएस व्हिसांचा कोटा उपलब्ध आहे. युएसकडूनच उलट विनंत्या येऊ लागल्या, हा मंदीचाच महिमा!) इथंपर्यंत ठीक आहे. पण मंदीनंतर विमान वाहतूक कंपन्या पुन्हा जोरात येतील, यात मला तरी तथ्य वाटत नाही. थोड्या कालावधीसाठी येतीलही; परंतु दीर्घकाळासाठी नक्कीच नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, भौतिकशास्त्राबाहेर न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कुठं लागू होत असेल तर तो इलेक्ट्रॉनिक उपकरणांना. १९७७ आणि १९९१ दरम्यान (आता हद्दपार झालेल्या) व्हीसीआर च्या किमती त्याच्या मूळ किमतीच्या एक तृतीयांशपर्यंत घसरल्या होत्या. पीसीच्या किंमती काही लाख रुपयांवरुन काही हजार रुपयांपर्यंत उतरल्या. असाच कल राहिला तर टेलिप्रेझेन्सच्या किंमती देखील कोसळतील. मग उपरोल्लेखित विमान वाहतूक कंपन्यांची काय अवस्था होईल? तसंही त्यांच्यापैकी बहुतेक कंपन्या पिछाडीसच आहेत. असं काही झालं तर त्या भूतकाळात जमा व्हायला वेळ लागणार नाही.

भारतीयांना दोन गोष्टींचं प्रचंड वेड आहे. चित्रपट आणि क्रिकेट. ही दोन्ही पूर्णतः भिन्न क्षेत्रं होती. तशीच त्यातील श्रद्धास्थानंही निराळी होती. सचिन आणि सेहवाग हे क्रिकेटचे देव होते. (आमीर खान, शाह रुख खान आणि त्यांच्या मागोमाग इतर) खान हे चित्रपटांचे नियंते होते. क्रिकेट म्हणजे कसोटी क्रिकेट किंवा फार तर ५० षटकांचे क्रिकेट होते. मग आयपीएल चा उदय झाला आणि ही दोन्ही क्षेत्रं एकजीव झाली. आयपीएलनं क्रिकेटला २० षटकांपर्यंत खाली ओढलं. एकाएकी आयपीएलचा सामना ३ तासांच्या चित्रपटांइतका छोटा वाटू लागला. क्रिकेट चित्रपटाचं प्रतिस्पर्धी बनलं. आयपीएल सामन्यांच्या दिवशी चित्रपटगृहं ओस पडू लागली. आपला प्रेक्षकवर्ग टिकवून ठेवण्यासाठी मल्टीप्लेक्सच्या मालकांनी चित्रपटगृहांमध्ये आयपीएल सामने प्रदर्शित करण्याचे हक्क मागून घेतले. जर आयपीएल हाच क्रिकेटचा मुख्य प्रवाह बनणार असेल, आणि तशीच शक्यता दिसत आहे, तर चित्रपटांना आयपीएल सामन्यांच्या सोयीनुसार आपल्या प्रदर्शन तारखा जुळवून घ्याव्या लागतील. प्रेक्षकांच्या दृष्टीनं दोन्हीही ३ तासांचे तमाशेच आहेत. क्रिकेटचा हंगाम चित्रपटांना भारतीय बाजारपेठेतून हद्दपारही करु शकेल.

गेल्या २० वर्षांमध्ये भारतातून गायब झालेली उत्पादनं आठवून बघा. तुम्ही शेवटचा कृष्ण-धवल (ब्लॅक-एंड-व्हाईट) चित्रपट केव्हा बघितला होता? तुम्ही शाईचं पेन अखेरचं केव्हा वापरलं होतं? तुम्ही टाईपरायटर वर अखेरचं टायपिंग केव्हा केलं होतं? या सर्व प्रश्नांचं एकच उत्तर आहे, “आठवत नाही!” थोड्या कालावधीसाठी नेहमीच्या टाईपरायटरला नाममात्र पर्याय म्हणून थोडीफार संग्रहक्षमता (मेमरी) असणारा एक इलेक्ट्रॉनिक टाईपरायटर उपलब्ध होता. त्यानंतर आला संगणक, आणि ही सर्व उत्पादनं हद्दपार झाली. आज माझ्यासारखी सराईत तंत्रज्ञ नसणारी माणसं देखील संगणकाचाच सुधारीत टाईपरायटर म्हणून वापर करतात. टाईपरायटर मात्र कुठंच दिसत नाही.

एक शेवटचं उदाहरण. २० वर्षांपूर्वी, सकाळी उठण्यासाठी भारतीय जनता काय वापरत होती? उत्तर आहे, “गजराचं घड्याळ”. हे गजराचं घड्याळ म्हणजे छोट्या छोट्या यांत्रिक अवयवांचा एक अवाढव्य राक्षस होता. चालू राहण्यासाठी त्याला रोज चावी द्यावी लागे. गजर देताना त्याचा एवढा आवाज होई की, तुमच्याबरोबर अख्ख्या कॉलनीची झोपमोड होई. त्यानंतर अजून छोटी आणि सुंदर घड्याळं आली. ही बर्‍यापैकी नाजूक असूनदेखील त्यांना सवयीनं "गजराचं घड्याळ"च म्हटलं जायचं. आज आपण सकाळी उठण्यासाठी काय वापरतो? मोबाईल फोन! या मोबाईल फोनच्या कृपेनं अख्खा घड्याळ उद्योग अवकाळी झोपला. टायटन सारख्या बड्या कंपन्यांनाही याचा फटका बसला. तुमचा प्रतिस्पर्धी कुठल्या कोपर्‍यात दडून बसलाय याची तुम्हाला कल्पनाच नाही!

गंमत म्हणून विचारतो, लेखकांचा प्रतिस्पर्धी कोण असू शकतो? विनोद सांगणारी यंत्रं? (ऍपलचा सह-संस्थापक स्टीव्ह वोझ्नीक यानं टेलीफोनलाच, पोलीश भाषेत विनोद सांगणारं एक यंत्र जोडून टाकलं.) की त्यांची स्पर्धा गोष्टी सांगणार्‍या यंत्रमानवांशी असेल? भविष्य भयंकर दिसतंय! एका आयटी कंपनीच्या अधिकार्‍यानी या स्पर्धेबद्दल सूचकपणे म्हटलं आहे, “शिकारी बना...नाहीतर...सावज बनाल!” हेच या गोष्टीचं समर्पक तात्पर्य आहे.

भावानुवाद - मंदार शिंदे ९८२२४०१२४६


Share/Bookmark

Ballpoint Pen Sketches





These sketches are made with regular ballpoint 'pens'.







Share/Bookmark

Wednesday, March 3, 2010

एक महात्मा

एक महात्मा होऊनी गेला, आयुष्य अपुले देऊनी गेला..
स्वतंत्रतेच्या वेशीवरती, बलिदान प्राणाचे देऊनी गेला.
आक्रंदीते ती भारतमाता - सुपुत्र माझा हरवुनी गेला,
आठवा त्याला, जागवा स्मृती - 'कोहिनूर' तो हरपुनी गेला.
रस्ता होता त्याचा दूरचा, आणि अगदी उंचावरचा,
आमच्या मानेवर मात्र पापांचे ओझे...
मान वर करुन पाहूही नाही शकलो, सन्मार्ग तयाचा.
नेणार होता तो स्वर्गाकडे आम्हांला - आपल्याबरोबर घेऊन,
आम्ही मात्र पाताळातच गेलो - मोहाच्या पाशात अडकून.
एक युधिष्ठिर होऊनी गेला - 'कुत्र्या'साठी स्वर्गही नाकारला,
देवांचा राजा रथ घेऊनी उभा - त्यालाही अट्टाहास हा न उमगला !
त्या 'धर्मा'चाच अवतार हा, 'बापू' बनुनी आला पुण्यात्मा..
'गोडसे'च काय - आम्हालाही नाही समजला तो महात्मा, तो पुण्यात्मा !!


Share/Bookmark

Tuesday, February 16, 2010

जेव्हा सूर्य विसावतो...

अंधार साचू लागतो आसमंतात,
दुनियेला करीत भयभीत
जेव्हा सूर्य विसावतो, धरणीच्या कुशीत ॥

आली खोट्याची दुनिया, गेला सत्याचा जमाना,
सावरण्या तोल जगाचा, सारे शोधतात महात्मा.
तूच तो महात्मा बन, असत्याशी युद्ध करीत,
जेव्हा सूर्य विसावतो धरणीच्या कुशीत ।

इमानदारीला मोल नाही, पैशाचा आहे वचक,
मारणारेच सारे जमलेत, कोण आहे तारक?
तूच तो तारक बन, मृत्युवर मात करीत,
जेव्हा सूर्य विसावतो धरणीच्या कुशीत ।

सत्य, शिव आणि सुंदरातले काहीच नाही शिल्लक,
कलियुगाच्या प्रभावामध्ये, झालेत देवही कफल्लक.
तूच एक श्रीमंत बन, त्यागाचे मूल्य वाढवीत,
जेव्हा सूर्य विसावतो धरणीच्या कुशीत ।

समर्थाच्या आधाराशिवाय, झालेत सारे लाचार,
आता तर वाटतोय सार्‍यांना, लाचारी हाच आधार.
खरा आधार होऊन दाखव, सार्‍यांचा तोल सावरीत,
जेव्हा सूर्य विसावतो, धरणीच्या कुशीत ॥

Share/Bookmark

Monday, February 1, 2010

नटरंग















मनात आलं डोक्यात घुसलं - खूळ तमाशाचं,
कला ह्याची बावनकशी - भय कसलं मग समाजाचं.

पैसा सोडंल घरदार सोडंल - सोडंल की हो कुणी लाज,
मर्दानगीच्या गोष्टी करणारं - होईल का पर कुणी नाचं?

नावच ज्याचं गुणा - अंगी गुणांची खाण,
पुरषाच्या शरीरामधी - वागवतो बाईचा प्राण.

बाईचं घेतलं रुप स्वतः - देवानं भक्तांसाठी,
पैलवानाचा होई नाच्या - इथंच रसिकांसाठी.

ऐशी ज्याची किर्ती - देह झिजवी कलेसाठी,
मानाचा मुजरा रसिकांचा - 'अतुल' नटरंगासाठी...

Share/Bookmark

Saturday, January 16, 2010

तुझी आठवण

थंडीतल्या पहाटे
धुक्यात हरवलेल्या वाटेवर
नजर काहीतरी शोधते,
तू कुठे दिसतेस का
हळूच चाहूल घेते..

वैशाखातल्या दुपारी
उन्हाने तापलेल्या रस्त्यावर
तुझीच सावली दिसते,
मृगजळामागे धावतो म्हणून
जग मलाच हसते..

हुरहुरणार्‍या कातरवेळी
वार्‍याच्या झुळकेबरोबर
तुझे हसणे ऐकू येते,
माझ्या डोळ्यांतील अश्रूदेखील
गालावरच सुकवून जाते..

रात्रीच्या एकांतामध्ये
चांदण्यांनी भरलेल्या नभातून
नाजूक चंद्रकोर खुणावते,
अशी कशी क्षणोक्षणी
तुझी आठवण मला सतावते?

Share/Bookmark

बंधन

आसमाँ ने कहा जमीं से,
तू मेरे आगे कुछ भी नही,
मैं कभी नही मिलूँगा तुझसे
मुझे तेरी जरुरत नही।
जमीं से रुठकर आसमाँ ने
उठा लिये अपने पर
और फैला दिये हवाओं में
ढूँढने कोई नया हमसफर।
सारे जहाँ में कोई न मिला
तो थक गया आसमाँ भी,
सिमट गया फिर वो विशाल
दूर कहीं जमीं पर ही।
मन ही मन मुस्काई धरती
उसके दिल को भी चैन आया,
चाहे जो कहे सुबह का भूला
शुक्र है शाम को लौट आया॥

Share/Bookmark