ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Monday, June 2, 2014

धर्म आणि जात

धर्म आणि जात या कृत्रिम गोष्टींनी माणसाचं पार माकड करुन टाकलंय. किती शिकण्यासारखं आहे जगात. किती फिरण्यासारखं आहे. केवढी पुस्तकं आहेत वाचलीच पाहिजेत अशी. किती सिनेमे आहेत बघितलेच पाहिजेत असे. किती गाणी आहेत गुणगुणावीतच अशी. केवढी माणसं आहेत भेटलीच पाहिजेत अशी. आणि माणूस काय करतोय तर, माझा धर्म श्रेष्ठ का तुझा, माझी जात वरची का तुझी... कशी संपवायची ही जात? कसं सोडवायचं माणसाला धर्माच्या कचाट्यातून? मला जे सुचतंय ते मी करतोयच. तुम्हीही विचार करा आणि सांगा अजून काय करता येईल...


Share/Bookmark

Sunday, June 1, 2014

दुकान बंद

दुकानासाठी सामान खरेदी करत लक्ष्मी रोडवरुन कोथरुडकडं येत होतो.
दुकानातून फोन आला, कोथरुडला कसलीतरी दंगल झालीय, सगळी दुकानं बंद करायला लावलीत.
कोथरुडात येईपर्यंत तरी काही वेगळं जाणवत नव्हतं.
करिश्मा सोसायटीपासून मात्र  दुकानं बंद-बंद दिसू लागली.
पुढच्या चौकातल्या पुतळ्याकडं लक्ष गेलं. दंगल म्हटलं की पुतळा आठवलाच पाहिजे ना.
नाही नाही, शिवाजी महाराजांचा नव्हता! महर्षी कर्वेंचा पुतळा.
याची कोण काय विटंबना करणार? आणि केलीच तर त्यासाठी कोण दंगा करणार?
पुढच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडं पण नीट बघितलं.
पुतळा ठीक होता, पण खाली खूप माणसं जमली होती.
भगवे झेंडे घेतलेली, भगवे नाम ओढलेली तरुण माणसं.
शिवसेनेच्या कार्यालयाबाहेर गंभीर चेहर्‍यानं गर्दी करुन उभी होती.
पुढं-पुढं सगळीच दुकानं बंद दिसत होती.
दुकानात आलो. शटर उघडलं. काम चालू केलं.
शेजारुन माहिती मिळाली - काल रात्री कुणीतरी कुठंतरी शिवाजी महाराजांची आणि बाळासाहेब ठाकरेंची विटंबना केली म्हणे. त्यामुळं कोथरुडात पण दंगा झाला. मुसलमानांची दुकानं-बिकानं फोडली म्हणे.
आमचं दुकान सोडून बाकी सगळी दुकानं बंद होती. कस्टमर येत होते.
थोड्या वेळानं आठ-दहा बाईक्सवरुन वीस-पंचवीस पोरं आरडाओरडा करत, घोषणा देत निघून गेली.
त्यामागोमाग तीन-चार गाड्यांवरुन काही टगे आले.
बंद कर रे शटर, कळत नाय का सगळं बंद आहे. चल रे, बंद कर दुकान, बंद कर!
फुल्ल आरडाओरडा, दमदाटी.
चेहर्‍यावर भाव काहीतरी महान देशकार्य करतोय असे. इतर वेळी चेहर्‍यावरची माशीपण उडणार नाही, पण आत्ता माज, मग्रूरी अगदी ओसंडून वाहतीय.
बंद केलं शटर... थोड्या वेळासाठी.
आणखी काय करता येईल?


Share/Bookmark

Saturday, May 31, 2014

सत्पात्री दान

दुकानात एक वयस्कर बाई आल्या. आमचं हिंदुराष्ट्राला वाहिलेलं एक पाक्षिक की साप्ताहिक काहीतरी आहे म्हणाल्या. तुमच्या दुकानाची त्यात जाहिरात द्या म्हणाल्या. मी विचारलं, तुम्ही काय छापता त्यात? त्या म्हणाल्या, हिंदु संस्कृतीचं रक्षण, हिंदु बांधवांची जागृती, आपल्या धर्माच्या ख-या परंपरांचा प्रसार, इतर धर्मियांची कारस्थानं, वगैरे वगैरे. मी नम्रपणे म्हणालो, सॉरी! मी तुम्हाला जाहिरात देऊ शकत नाही. यावर बाई म्हणाल्या, ठीक आहे. मग देणगी द्या. समर्थ हिंदुराष्ट्रासाठी हे सत्पात्री दान करा. तुम्हाला हजार पटीत फायदा होईल. एक रुपया दिलात तर तुम्हाला हजार मिळतील. मी पुन्हा म्हटलं, सॉरी! ही आमची व्यवसायाची जागा आहे. इथं आम्ही कसलंही दान, देणगी, वर्गणी देत नाही. बाई ऐकेचनात. म्हणाल्या, ठीक आहे. पैसे नका देऊ. आमच्या पन्नास-शंभर लोकांना चहा-नाष्टा स्वरुपात तरी सत्पात्री दान द्या. मी म्हटलं, हे चालेल. पण आम्ही चहा-नाष्टा नाही बनवत. चिकन-मटण बिर्याणी, पापलेट, सुरमई... माझं बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच बाई अशक्य वेगानं पाय-या उतरून चक्क पळून गेल्या!


Share/Bookmark

Friday, May 30, 2014

संवाद

संवाद कसा साधायचा, हा प्रश्न नसतोच मुळी. प्रश्न असतो - संवाद साधावासा वाटतोय की नाही, हा! एकदा संवाद साधायचा ठरवलाच, तर संवादासाठी खूप माध्यमं सापडतील. पण संवाद साधावासाच वाटत नसेल, तर मात्र खिशात मोबाईल, डेस्कवर कॉम्प्युटर, ड्रॉवरमधे फुलस्केप नि लिफाफा, सगळं असून नसल्यासारखंच. म्हणजे इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी कितीही पुढं गेली तरी कम्युनिकेशनच्या ऊर्मीला ओव्हरराईड करु शकणारच नाही, बरोबर ना?


Share/Bookmark

Tuesday, May 27, 2014

ताण

"...जास्त कामाचा ताण होत नाही. ताण होतो जबाबदारीचा, वेळेच्या अभावाचा. कामाच्या जागी मदतीच्या अभावाचा... प्रत्यक्ष काम माणसाला घातक नाही; पण कामापासून मिळणा-या फळाची आकांक्षा माणसावर जबाबदारीचं व वेळेचं ओझं निर्माण करते... काम माणसाला मारत नाही. आधुनिक औद्योगिक संस्कृतीत काम ज्या प्रकारचं व ज्या परिस्थितीत करावं लागतं, ती परिस्थिती माणसाला मारते."

- डॉ. अभय बंग यांच्या 'माझा साक्षात्कारी हृदयरोग'मधून


Share/Bookmark

Friday, May 23, 2014

वेळ

७६ वर्षांचा माणूस म्हणतोय, अजून खूप काही करायचं बाकी आहे पण वेळ कमी पडतोय. आणि तिशीतला माणूस टाईम 'पास' करण्यासाठी टीव्हीसमोर बसलाय.


Share/Bookmark

Thursday, May 22, 2014

लोकप्रतिनिधी

लोकप्रतिनिधी म्हणून वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या अपेक्षा, अधिकार, आणि जबाबदार्‍या असतात. यांपैकी लोकप्रतिनिधींचे अधिकार आणि जबाबदार्‍या राज्यघटनेत नमूद केल्यानुसार ठरलेल्या असतात. अपेक्षा मात्र स्थल-काल-व्यक्तिपरत्वे बदलत जातात. स्थानिक प्रश्नांवर काम करुन निवडून येणारे, व्यक्तिगत करिष्म्यावर निवडून येणारे, आणि योग्य 'टायमिंग' साधून निवडून येणारे असे काही प्रकार आपल्याला लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, अशा सर्व स्तरांवर दिसतात. पण यांपैकी किती लोकप्रतिनिधी राज्यघटनेतील अधिकार व जबाबदार्‍यांनुसार काम करत असतील? मुळात हे अधिकार नि जबाबदार्‍या काय आहेत, हे तरी निवडून येणारे आणि निवडून देणारे या दोघांना ठाऊक असतील का? शाळेतलं नागरिकशास्त्र, लोकसभेतील खासदारांची संख्या आणि विधानसभेतील आमदारांची संख्या पाठ करण्यापलिकडं खरंच जातं का? की त्याची आता कुणाला गरजच वाटत नाही?


Share/Bookmark