ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Sunday, November 11, 2012

सर्व शिक्षा अभियान


 "आजची मुले हे उद्याचे निर्माते आणि भविष्यातील नेते आहेत, असे म्हटले जाते, ते योग्यच आहे. महाराष्ट्रात १८ वर्षांखालील मुलांची संख्या ४ कोटी पेक्षा जास्त आहे. हे प्रमाण राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या १/३, इतके जास्त आहे.

‘सर्व शिक्षा अभियान’ – २०१२-१३ साली केंद्र सरकारच्या व्यापक आणि एकात्म पथदर्शी विकास योजनेने बाराव्या वर्षात पदार्पण केले. मुलांच्या शिक्षण हक्कांसंदर्भातील मोफत आणि सक्तीचे शिक्षण अधिनियम (आर.टी.ई.)-२००९, मंजूर होणे, हा या प्रक्रियेतील महत्वाचा भाग होय. 'महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद' हा महाराष्ट्र शासनाचा एक उपक्रम असून राज्यात एस.एस.ए. अर्थात 'सर्व शिक्षा अभियाना'च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा उपक्रम प्रयत्‍नशील आहे.
या एस.एस.ए. उपक्रमाची अवाढव्य व्याप्‍ती आणि वित्तीय गुंतवणूक लक्षात घेता, काटेकोर नियोजन आणि सक्‍त मूल्यमापन गरजेचे ठरते. वार्षिक कामाचा आराखडा आणि २०१२-१३ साठीच्या अर्थसंकल्पाच्या प्रस्तावात १४ जिल्ह्यांवर विशेष लक्ष पुरवण्यासह सार्वत्रिक उपलब्धतता आणि धारकता, दर्जा वृध्दी, सामाजिक गटांमधील तसेच लिंगाधारित विषमता यातील दरी कमी करणे, सामाजिक सहभाग, शालेय पायाभूत सुविधा, व्यवस्थापन आणि देखरेख या बाबींचा समावेश आहे. शालेय विकास आराखड्याअंतर्गत 'शालेय व्यवस्थापन समिती'मार्फत ग्रामीण स्तरावरील शाळांकडून योग्य माहिती आणि नियोजनपूर्व तयारीसाठी काटेकोर तपशील मागवण्यात आले.

प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याचे स्वप्‍न वास्तवात आणणे, राज्याचा साक्षरता दर नव्या उंचीवर नेणे आणि राज्यासह देशातील जनतेला सक्षम करण्याची ध्येये आम्हाला प्रत्येक सरत्या वर्षाबरोबर गाठता येतील, अशी आशा आहे."

- महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद (एम.पी.एस.पी.)
http://mpsp.maharashtra.gov.in

Share/Bookmark

Happy Diwali




Share/Bookmark

Friday, November 9, 2012

खारीचा वाटा

रामाच्या मंदीरात प्रवचन सुरू होतं. कीर्तनकार बुवा सत्तरी उलटलेले. मोठ्या आत्मीयतेनं आणि रसाळ वाणीत श्रीरामाची कथा सांगत होते. प्रवचन-सप्‍ताहातला आज पाचवा दिवस होता. प्रवचन ऐकायला रोज लोक गर्दी करत होते. मन लावून प्रवचन ऐकायचे, माना डोलवायचे, आणि 'जय श्रीराम' म्हणत जाताना दक्षिणा-पेटीत पैसे टाकायचे. कुणी पन्‍नासची नोट टाकायचे, तर कुणी शंभराची. कुणी कीर्तनकार बुवांसाठी फुलांचा मोठ्ठा हारही घेऊन यायचे. मंदीराशेजारी राहणारी एक म्हातारी प्रवचनाला रोज येत होती. दिवसभर चार घरची कामं करून स्वतःचं पोट भरायची. घर जवळच असल्यानं प्रवचनाला सगळ्यात आधी हजर असायची. येताना घरातून एक तांब्या भरून पाणी आणायची आणि कीर्तनकार बुवांच्या समोर ठेवायची. मग कीर्तन करता-करता बुवा त्यातलं पाणी प्यायचे. असं रोज चाललं होतं.

आजच्या प्रवचनात बुवांनी श्रीरामाला सेतू बांधण्यात मदत करणार्‍या खारीची गोष्ट घेतली होती. लोक तल्लीन होऊन ऐकत होते. म्हातारीच्या मनात मात्र आज चलबिचल होती. प्रवचन संपताना लोक रोज दक्षिणा-पेटीत पैसे टाकतात हे ती बघत होती. आपण गरीब आहोत, आपण दक्षिणा टाकू शकत नाही, याचं तिला वाईट वाटत होतं. बुवांसाठी इतरांसारखा हार आणू शकत नाही, याची तिला लाजही वाटत होती. प्रभू श्रीरामाची सेवा करण्यात आपण कमी पडतोय, याचं तिला खूप दुःख होत होतं. याच विचारात मग्न असल्यानं आज तिचं कथेकडंही लक्ष नव्हतं. आजूबाजूचे सगळे लोक दानाचं पुण्य कमावून समाधानी दिसतायत, आपण मात्र कमनशीबी, असं तिला वाटत होतं. इतक्यात...

कथा सांगता-सांगता अचानक कीर्तनकार बुवांना मोठ्ठा ठसका लागला. समोर बसलेल्या श्रोत्यांमध्ये चुळबूळ झाली. तीन-चार जण उठून बुवांकडं धावले. म्हातारीलाही काहीतरी करावंसं वाटलं. पण ती जागेवरून उठेपर्यंत बुवांनी शेजारी ठेवलेला पाण्याचा तांब्या उचलला आणि पाण्याचे तीन-चार घोट घेतले. ठसका थांबला. बुवांच्या चेहर्‍यावर स्मितहास्य तरळलं. श्रोत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. आणि सगळ्यात मागं बसलेली म्हातारी पदर तोंडाला लावून खुदकन्‌ हसली. तिनं भरून ठेवलेल्या पाण्याच्या तांब्याची किंमत या प्रसंगी लाखमोलाची होती. हीच तिची सेवा होती. हीच तिची खरी दक्षिणा होती. म्हातारीच्या चेहर्‍यावर समाधान पसरलं. आणि कीर्तनकार बुवा 'खारीच्या वाट्या'ची गोष्ट पुढं सांगू लागले...

Share/Bookmark

Thursday, October 11, 2012

मृत्युपत्र - काळाची गरज


('रोटरी क्लब ऑफ पुणे धायरी'तर्फे दि.६ ऑक्टोबर २०१२ रोजी 'मृत्युपत्र' या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या अ‍ॅड. डॉ. सुनिल गोखले यांच्या व्याख्यानाचा सारांश)

'मृत्युपत्र' या शब्दाबद्दल सर्वसामान्यांच्या मनात एक प्रकारची भीती तयार झालेली आहे. मृत्युपत्र बनवायचं म्हणजे मृत्यु जवळ आला, असंच समीकरण जणू लोकांच्या मनात तयार झालेलं दिसतं. मृत्युपत्राला इंग्रजीतील 'विल' या शब्दानुसार 'इच्छापत्र' असंही म्हणतात.

आपण आयुष्यभर कष्ट करून पै-पै जोडत असतो. मिळालेल्या पैशातून आपण काही वस्तू खरेदी करत असतो. स्थावर म्हणजे जमिन-जुमला, घर, आणि जंगम म्हणजे सोनं-नाणं, बँकेतल्या ठेवी, वगैरे विविध प्रकारची संपत्ती आपण कमवलेली असते. आपण कमवलेला पैसा किंवा पैशांचं वस्तूंमध्ये केलेलं रुपांतर, ही सगळी आपली स्वतःची संपत्ती असते. आपल्या मृत्युपश्‍चात, आपली ही संपत्ती योग्य व लायक वारसास मिळावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपण हयात असतानाच आपल्या संपत्तीच्या हस्तांतरणाचं योग्य नियोजन करून ठेवल्यास, पुढच्या पिढीसमोरील अनावश्यक गोंधळ आणि आपल्या संपत्तीची संभाव्य वाताहात टाळता येते. म्हणूनच, योग्य पद्धतीनं मृत्युपत्र करून ठेवणं ही एक अत्यावश्यक बाब बनली आहे.

मृत्युपत्र कसं लिहायचं?

(१) आपल्या मृत्युपश्‍चात आपली संपत्ती कोणाला द्यायची हा निर्णय घेण्यापूर्वी, आपली नेमकी किती आणि काय संपत्ती आहे, हे ठरवावं लागेल. त्यासाठी, आपल्या एकूण संपत्तीची सर्वप्रथम यादी तयार केली पाहिजे. आपल्याला आठवणार्‍या सर्व स्थावर, जंगम, बौद्धिक संपत्तीचा तपशील लिहून काढणं ही इच्छापत्र बनवण्याची पहिली पायरी म्हणता येईल.
(२) एकदा सर्व प्रकारच्या संपत्तीची यादी तयार झाली की, त्यातल्या प्रत्येक वस्तूचा "मी कायदेशीर किंवा अधिकृत मालक आहे का?" हे स्वतःला विचारलं पाहिजे. यादीमध्ये कुठल्याही प्रकारची संपत्ती असली तरी, कागदोपत्री तिची मालकी कोणाकडं आहे, हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण, जी गोष्ट आपल्या स्वतःच्या मालकीची आहे, तीच पुढच्या पिढीकडं हस्तांतरीत करण्याचा आपल्याला अधिकार असतो.
(३) आता आपल्या संपत्तीची एकत्रित यादी तयार झाली की सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे तिचं योग्य वाटप. हा मृत्युपत्र बनवण्यातला सर्वात अवघड भाग समजला जातो, कारण इथं आपल्या भावना पूर्णपणे बाजूला ठेवून, अतिशय प्रॅक्टिकल निर्णय घ्यावे लागतात. आपल्या नातेसंबंधांमधले हेवेदावे, भांडणं, प्रासंगिक मानापमान, अशा गोष्टींच्या प्रभावात न अडकता, आपली संपत्ती योग्य रीतीनं सांभाळू शकेल आणि तिचा सदुपयोग करू शकेल, असा वारसदार निवडता आला पाहिजे.

आपलं मृत्युपत्र किंवा इच्छापत्र ही पूर्णपणे व्यक्तिगत, खाजगी बाब आहे. आपण मृत्युपत्र बनवणार आहोत, बनवलं आहे, कुणाच्या नावे बनवलं आहे, कुणाला काय दिलं आहे आणि कुणाला काय दिलं नाही, याबद्दल कुणाशीही चर्चा करू नये. एकदा मृत्युपत्र तयार झालं की, ते सुरक्षित जागी ठेवायचं, आणि पुन्हा त्यावर कुणाशीही कसलीही चर्चा करायची नाही.

मृत्युपत्राच्या संदर्भात वरचेवर विचारला जाणारा प्रश्न म्हणजे - 'वडिलोपार्जित संपत्तीचं हस्तांतरण कसं करायचं?' त्यासाठी आधी संपूर्ण कुटुंबानं एकत्र येऊन वडिलोपार्जित संपत्तीचं रीतसर वाटपपत्र बनवलं पाहिजे. योग्य वाटप झालं असल्यास, आपल्या वाट्याचं हस्तांतरण आपल्या मृत्युपत्रामधून करता येतं. मात्र ज्या वडिलोपार्जित संपत्तीचं वाटप झालेलं नाही, तिचं हस्तांतरण करण्याचा अधिकार आपल्याला नसतो.

मृत्युपत्राबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी -

(१) मृत्युपत्र साध्या कागदावर, स्वतःच्या हस्ताक्षरात किंवा टाईप करून बनवता येतं. ते रजिस्टर/ नोटराईज/ स्टॅंप पेपरवर करणं कायद्यानं बंधनकारक नाही. असं असलं तरी, मृत्युपत्राच्या संदर्भात आजवर उद्भवलेले विवाद आणि खटले पाहता, ते रजिस्टर करून घेणं उपयुक्‍त ठरतं.
(२) मृत्युपत्र बनवण्यासाठी वकीलांची गरज नाही. परंतु, भविष्यातील संभाव्य अडचणी व कायदेशीर त्रुटी टाळण्यासाठी अनुभवी वकीलांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.
(३) मृत्युपत्रासाठी दोन साक्षीदार लागतात. हे फक्त आपल्या सहीचे साक्षीदार असतात, त्यांनी इच्छापत्र वाचायची गरज नसते. तसंच, सदर मृत्युपत्रातून त्यांना कोणताही लाभ झाला पाहिजे असं नाही. मृत्युपत्राची वैधता वाढवण्यासाठी, अलिकडच्या काळात व्हीडीओ शूटींगचा पर्यायही वापरला जातो.
(४) इंडीयन सक्सेशन अॅक्टनुसार, मृत्युपत्रासाठी मेडीकल सर्टीफिकेट आवश्यक नाही; परंतु कोणतेही संभाव्य गैरप्रकार टाळण्यासाठी, मृत्युपत्र बनवण्याच्या दिवशीचं मेडीकल सर्टीफिकेट जरुरी ठरवण्यात आलं आहे.
(५) मृत्युपत्र तयार झालं की त्याची एकच प्रत शिल्लक ठेवावी. कच्चे ड्राफ्ट, झेरॉक्स, इ. फाडून किंवा जाळून नष्ट केले पाहिजेत.
(६) आपल्या मृत्युपश्‍चात आपल्या इच्छापत्राची अंमलबजावणी करण्यासाठी, एक एक्झिक्युटर नेमणं आवश्यक आहे. हा एक्झिक्युटर वारसदार असणं गरजेचं नाही. प्रत्यक्ष हस्तांतरणाची जबाबदारी एक्झिक्युटरची असल्यामुळं, त्याला मृत्युपत्र बनवलं आहे याची कल्पना दिली गेली पाहिजे. त्यामुळं, शक्यतो एक्झिक्युटर हा एखादा तिर्‍हाईतच असलेला बरा.
(७) मृत्युपत्रात शक्य तितक्या विस्तारानं कौटुंबिक पार्श्वभूमी नमूद करणं चांगलं. त्यामुळं, हस्तांतरणाच्या वेळी संदिग्धता राहत नाही. विशेषतः, संपत्तीतला वाटा बायको किंवा मुलांना द्यायचा नसेल तर, त्याची विशिष्ट कारणं नोंदवणं चागलं.
(८) कोर्टाकडून 'विल' चालवण्यासाठी प्रोबेट (आदेश) घ्यावं लागतं; पण कायद्यानुसार ते सक्तीचं नाही. प्रत्यक्ष हस्तांतरणाच्या वेळी, निरनिराळ्या सरकारी किंवा खाजगी कार्यालयांतून अधिकार्‍यांकडून 'प्रोबेट'ची विचारणा केली जाते, त्यामुळं आता त्याची आवश्यकता भासू लागली आहे.
(९) मृत्युपत्राच्या अंमलबजावणीच्या वेळी एक्झिक्युटर हयात नसल्यास कोर्टाकडून अ‍ॅडमिनिस्टर नेमून घेता येतो.

कित्येकदा अपुर्‍या माहितीमुळं किंवा गैरसमजुतीतून मृत्युपत्रात त्रुटी राहून जातात, किंवा मृत्युपत्र बनवलंच जात नाही. याचा त्रास पुढच्या पिढीला तर होतोच, शिवाय आपण कष्टानं कमवलेल्या संपत्तीची आपल्या पश्‍चात लवकरच वाताहात होण्याची शक्यता निर्माण होते. म्हणून, आपण हयात व सक्षम असतानाच आपलं इच्छापत्र तयार करून ठेवणं ही काळाची गरज बनली आहे.


Share/Bookmark

Sunday, October 7, 2012

फिर ले आया दिल मजबूर, क्या कीजे

फिर ले आया दिल मजबूर, क्या कीजे
रास न आया, रहना दूर, क्या कीजे
दिल कह रहा, उसे मकम्मल, कर भी आओ
वो जो अधूरी सी, बात बाकी है
वो जो अधूरी सी, याद बाकी है

करते हैं हम, आज कबूल, क्या कीजे
हो गयी थी, हमसे जो भूल, क्या कीजे
दिल कह रहा, उसे मयस्सर, कर भी आओ
वो जो दबी सी, आस बाकी है
वो जो दबी सी, आंच बाकी है

किस्मत को है, यह मंजूर, क्या कीजे
मिलते रहें हम, बादस्तूर, क्या कीजे
दिल कह रहा, उसे मुसलसल, कर भी आओ
वो जो रुकी सी, राह बाकी है
वो जो रुकी सी, चाह बाकी है

(मकम्मल= पूर्ण; मयस्सर= उपलब्ध; बादस्तूर= बेकायदा; मुसलसल= अविरत/अखंड चालू)

स्वानंद किरकिरे/ सईद कादरी/ नीलेश मिश्रा
बर्फी (२०१२)

Share/Bookmark

Sunday, September 30, 2012

बदलाची तयारी

सांगलीच्या ग्रीन एफएम (९०.४) वर 'आरंभ फाउंडेशन'चं आवाहन ऐकून, कोल्हापूर जिल्ह्यातूनही फोन आले. एका मंडळानं गणपतीची दहा फुटी मूर्ती बसवली होती. एवढ्या मोठ्या मूर्तीचं आणि निर्माल्याचं नदीतच विसर्जन करतात. मूर्तीच्या आकाराबद्दल आणि पीओपी न वापरण्याबद्दल चर्चा करताना मंडळाच्या कार्यकर्त्यानं सांगितलं, "गेल्या दोन-तीन वर्षांपासूनच उत्सवाचं नियोजन आमच्याकडं आलंय. त्याआधी सगळे निर्णय वडीलधारी मंडळी घ्यायची. पेपरमध्ये वाचून आम्हाला पण काहीतरी चांगले बदल करावंसं वाटू लागलंय. मागच्या दोन वर्षांपासून डॉल्बी पूर्ण बंद आहे. यावर्षीच्या विसर्जन मिरवणुकीत दांडपट्ट्याचा खेळ ठेवला होता. आमचं गाव छोटं आहे. गावातल्याच भजनी मंडळाला बोलवून, एखाद्या सामाजिक विषयावर प्रवचन द्या असं सांगितलं. पीओपीच्या मूर्तीमुळं नुकसान होतं असं पेपरमध्ये वाचलं होतं, पण तुमच्याशी प्रत्यक्ष बोलल्यावर नक्की काय करायचं ते कळलं. गावातल्या जुन्या माणसांना समजावणं जरा अवघड आहे, पण गावकर्‍यांच्याच फायद्याची गोष्ट असेल तर आम्ही नक्की प्रयत्‍न करू. निर्माल्याचा तुमचा मुद्दा एकदम पटला. आता आपापल्या अंगणातल्या झाडांनाच निर्माल्य घालायला सांगतो सगळ्यांना. रेडीओवर तुमचं आवाहन ऐकलं.. नुकसान तर काय होणार नाही, झाला तर फायदाच होईल, असं वाटलं, म्हणून फोन लावला बघा."


Share/Bookmark

Friday, September 28, 2012

गणेशोत्सवाचं बदलतं रूप

सांगली गणेशोत्सव (विसर्जन): नवव्या दिवशी विसर्जनात ढोल पथकांचा जोर दिसला. एका-एका मंडळासमोर चार-चार पथकं होती. कालच्या विसर्जनाला मोठ्या मूर्तींची संख्या जास्त होती. एका मंडळाच्या मिरवणुकीत, ट्रॉलीमध्ये छोटी कडुनिंबाची वगैरे रोपं घेऊन कार्यकर्ते बसले होते. रस्त्यावरून जाताना सगळ्यांच्या हातात एक-एक रोप देऊन पुढं जात होते. ढोल आणि मोरयाच्या गजरात गणरायाला निरोप देण्यात आला. डॉल्बी बंदीबरोबरच सिनेमातली गाणी आणि त्यावरचे हिडीस नाच आपोआप बंद झालेत. शिवाय, यंदाच्या उत्सवात दिवसभर सगळ्या मंडळांनी मंडपाबाहेर शांतता राखणं पसंत केलं. रात्री आरती आणि देखाव्याच्या वेळीच काय ते स्पिकर लावले जात होते. कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीनं गणेशोत्सवाचं रूप बदलून दाखवायचं ठरवलंय जणू... मोरया!

Share/Bookmark