सांगलीच्या ग्रीन एफएम (९०.४) वर 'आरंभ फाउंडेशन'चं आवाहन ऐकून, कोल्हापूर जिल्ह्यातूनही फोन आले. एका मंडळानं गणपतीची दहा फुटी मूर्ती बसवली होती. एवढ्या मोठ्या मूर्तीचं आणि निर्माल्याचं नदीतच विसर्जन करतात. मूर्तीच्या आकाराबद्दल आणि पीओपी न वापरण्याबद्दल चर्चा करताना मंडळाच्या कार्यकर्त्यानं सांगितलं, "गेल्या दोन-तीन वर्षांपासूनच उत्सवाचं नियोजन आमच्याकडं आलंय. त्याआधी सगळे निर्णय वडीलधारी मंडळी घ्यायची. पेपरमध्ये वाचून आम्हाला पण काहीतरी चांगले बदल करावंसं वाटू लागलंय. मागच्या दोन वर्षांपासून डॉल्बी पूर्ण बंद आहे. यावर्षीच्या विसर्जन मिरवणुकीत दांडपट्ट्याचा खेळ ठेवला होता. आमचं गाव छोटं आहे. गावातल्याच भजनी मंडळाला बोलवून, एखाद्या सामाजिक विषयावर प्रवचन द्या असं सांगितलं. पीओपीच्या मूर्तीमुळं नुकसान होतं असं पेपरमध्ये वाचलं होतं, पण तुमच्याशी प्रत्यक्ष बोलल्यावर नक्की काय करायचं ते कळलं. गावातल्या जुन्या माणसांना समजावणं जरा अवघड आहे, पण गावकर्यांच्याच फायद्याची गोष्ट असेल तर आम्ही नक्की प्रयत्न करू. निर्माल्याचा तुमचा मुद्दा एकदम पटला. आता आपापल्या अंगणातल्या झाडांनाच निर्माल्य घालायला सांगतो सगळ्यांना. रेडीओवर तुमचं आवाहन ऐकलं.. नुकसान तर काय होणार नाही, झाला तर फायदाच होईल, असं वाटलं, म्हणून फोन लावला बघा." |
![Share/Bookmark](http://static.addtoany.com/buttons/share_save_171_16.png)
No comments:
Post a Comment