ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Tuesday, June 13, 2017

वयानुरुप शिक्षणाच्या प्रवाहात...

हनुमान वस्ती, वाल्हे ता. पुरंदर, जि. पुणे इथल्या जि.प. शाळेमधे मुख्याध्यापक म्हणून काम करताना श्री. अनिल चाचर सरांनी अनेक शालाबाह्य मुलं शाळेत दाखल केली. यामधे आजूबाजूच्या वस्त्या आणि पाड्यांवर राहणार्‍या पारधी, डोंबारी समाजाच्या मुलांचा समावेश होता. चौथीपर्यंत ह्या हनुमान वस्ती, वाल्हेच्या शाळेत वर्गशिक्षिका वैशाली पवार आणि मुख्याध्यापक अनिल चाचर यांच्याकडं शिकलेल्या पारधी कुटुंबातल्या दोन विद्यार्थिनी, तेजस्वी सुनिल शिंदे आणि सोनाली लखन शिंदे आज दहावीची परीक्षा पास झाल्या. तेजस्वीला ४२.६०% आणि सोनालीला ४४.००% मार्क्स मिळाले. घरातून आणि समाजातून कुठलीही शैक्षणिक पार्श्वभूमी नव्हतीच, पण दोघीही जिद्दीनं शिकत राहिल्या.

वय जास्त असल्यानं चौथीनंतर या मुली शाळेत जात नव्हत्या. नंतर वयानुरूप त्यांना आठव्या इयत्तेत प्रवेश मिळवून दिला आणि मुली शाळेत जाऊ लागल्या. मुलींच्या शैक्षणिक गरजा पूर्ण केल्या. आठवी, नववी, दहावीपर्यंत मुली शाळेत जात राहिल्या. आज दहावीचा निकाल लागला. खरं तर टक्केवारीची अपेक्षा नव्हतीच. सरांनी मुलींचं अभिनंदन केलं. पुढच्या शिक्षणासाठी आई वडिलांना समजावून सांगितलं, होणाऱ्या पतिराजांनाही समजावून सांगितलं. (होय, या मुलींची आधीच लग्नं ठरली आहेत.) या बालविवाह जमलेल्या मुलींचं शिक्षण कसं होणार, हा खरा चिंतेचा विषय होता. पण मुली आता दहावीतून अकरावीत गेल्या. बारावीनंतर दोघीही पोलिस व्हायचं म्हणतायत. शाळेच्या फीपासून सामाजिक विरोधापर्यंत असंख्य अडचणी आहेत, पण मुली शिकल्या पाहिजेत, हीच चाचर सरांची प्रामाणिक इच्छा आहे.

शिक्षण हक्क कायद्यानुसार शालाबाह्य मुलांना त्यांच्या वयानुसार योग्य इयत्तेत दाखल करण्यात यावं, असा नियम आहे. म्हणजे दहा वर्षांच्या मुलाला थेट चौथीत किंवा चौदा वर्षांच्या मुलाला थेट आठवीत प्रवेश दिला जातो. अशी वयानुरूप दाखल केलेली मुलं कशी शिकतील याबद्दल बर्‍याच लोकांच्या मनात शंका असते. तेजस्वी आणि सोनालीनं चौथीनंतर वयानुरुप थेट आठवीत शिक्षण सुरु केलं आणि आज दहावी पास होऊन दाखवलंय. मुलांना एकदा शिक्षणाची गोडी लागली की ती शिकत जातात, आपण फक्त त्यांना योग्य वातावरण आणि साधनं पुरवत रहायचं, हेच खरं.

- मंदार शिंदे
९८२२४०१२४६


Share/Bookmark

Saturday, June 10, 2017

श्रीमंत होण्याचा खात्रीशीर मार्ग

नुकताच 'लोकसत्ता लोकरंग'मधे मंदार भारदे यांचा 'मल्टिलेव्हल मर्कटलीला!' हा चेन मार्केटींग / 'एमएलएम'बद्दलचा लेख वाचला आणि गेल्या काही वर्षांतले माझे स्वतःचे अनुभव आठवले.

माझ्या माहितीत अनेक लोकांनी ह्या वेडापायी लाखाचे बारा हजार करुन घेतले आहेत. माझा एक मित्र तर 'एमएलएम चॅम्पियन'च होता. त्याच्याकडं तीन हजारांच्या डिजिटल डायरीपासून दीड लाखाच्या जपानी गादीपर्यंत काय वाट्टेल ती वस्तू विकायला असायची. हे सगळे उद्योग टिकून करत राहिला असता तर सध्याच्या 'डी-मार्ट'ला त्यानं नक्कीच टफ कॉम्पिटीशन दिली असती.

माझे पूर्वीचे काही रुम पार्टनर अशा एका स्कीमचे प्रणेते होते. ते रस्त्यानं जाणार्‍या कुणालाही पकडून रुमवर घेऊन यायचे. अशा 'लाईफ चेन्जिंग' स्कीम्स रस्त्यात उभ्या-उभ्या सांगितल्यानं त्यांची किंमत कमी होते, असं त्यांचं म्हणणं होतं. रुमवरसुद्धा नुसतं तोंडी स्कीम सांगत नसत. एक पिवळा कार्डशीट पेपर पसरायचा आणि त्यावर निळ्या आणि तांबड्या मार्करनं खूप सारे चौकोन, गोल, आणि रेषा काढून स्कीम सांगायची, असा काहीतरी सायकोलॉजिकल फंडा होता त्यांचा.

काही ओळखीच्या मित्रांकडं गेलं की ते दीडशे रुपयांची टूथपेस्ट आणि पाचशे रुपयांचं टॉयलेट क्लीनर घ्यायचा आग्रह करायचे. गॅस गीझरपासून गॅस लायटरपर्यंत आणि ट्यूबलाईटपासून लिपस्टिकपर्यंत कुठलीही गोष्ट हे लोक विकत असतात. मागे एक मित्र तर सोन्याच्या नाण्यांवर चालणारी एमएलएम स्कीम घेऊन आला होता. त्याची माहिती घेण्यासाठी ज्या बाईंकडं गेलो होतो, त्यांनी एक अतिशय सीक्रेट माहिती उघड करुन माझ्या ज्ञानात भर घातली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, 'क्रिकेट-बिकेट खेळून पैसे मिळतात, हा सर्वसामान्य लोकांच्या मनातला खूप मोठा भ्रम आहे. खुद्द सचिन तेंडुलकर ह्या सोन्याच्या नाण्याच्या स्कीमचा पायोनियर मेम्बर असल्यानं, पैशाची चिंता न करता तो क्रिकेटचा छंद जोपासू शकतो. पैसे मात्र त्याला ह्या स्कीममधूनच मिळतात.' ह्या बाईंचा कॉन्फीडन्स इतका जबरदस्त होता की मला अजूनही सचिन तेंडुलकरला बघितलं की त्याच्या खिशात 'ती' सोन्याची नाणी खुळखुळत असल्याचा आणि आपला सचिन परदेशी खेळाडूंना स्कीमचे फायदे समजावून सांगत असल्याचा भास होतो. ह्याच स्कीममुळं धीरुभाईंच्या निधनानंतर तोट्यात गेलेली रिलायन्स कंपनी पुन्हा वर आणण्यात मुकेश अंबानीला यश मिळालं, असंही बाईंनी ठासून सांगितलं होतं. यथावकाश ही 'सोन्याची नाणी' बनवणार्‍या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकली आणि स्कीम आपोआपच बंद पडली.

ही स्कीम मला विकायचा प्रयत्न करणारा माझा मित्र कुठली-कुठली इंग्लीश पुस्तकं आणून द्यायचा. बिझनेस कसा करावा, श्रीमंत कसं बनावं, नेटवर्कींगशिवाय पैसे कमावणं भविष्यात अशक्य असणार, वगैरे विषयांवरची नामवंत लेखकांची ही पुस्तकं असायची. ही पुस्तकं आणखी इतर मित्रांना देऊन त्यानं त्यांनाही ह्या जाळ्यात ओढू नये, म्हणून मी त्याच्याकडून आलेली पुस्तकं परतच द्यायची नाहीत, असा गनिमी कावा करुन बघितला. अजून वाचून व्हायचंय, दुसर्‍याला वाचायला दिलंय, सापडतच नाही, वगैरे काहीही कारणं देऊन मी अप्रत्यक्षपणे अनेकांचं संभाव्य नुकसान वाचवू शकलो ह्याचा मला आनंद वाटतो. पण त्यामुळं माझा मित्र मात्र दुरावला गेला हीदेखील वस्तुस्थितीच आहे.

बिझनेस मिटींगच्या नावाखाली सेमिनारला बोलवायचं किंवा आरोग्याविषयी लेक्चरला बोलवून हेल्थ चेक-अपची स्कीम विकायची, असल्या प्रकारात लोक स्वतःची किंमत कमी करुन घेतात. माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीनं तर पोलिस आणि मिडीयाचा शेअर आधीच ठरवून स्कीम लाँच करायची असा प्लॅनच मला सांगितला होता. कितव्या टप्प्यातल्या लोकांपर्यंत पे-बॅक द्यायचा आणि चेन कुठं तोडायची हेदेखील त्याच्या प्लॅनिंगमधे ठरलं होतं.

असो. वर सांगितलेल्या लेखामुळं ह्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या आणि पुन्हा अंगावर काटा आला. सध्या असं कुणी स्कीम वगैरे घेऊन आलं तर त्याला हेच काटे फेकून मारावेत, असं खरोखर मनापासून वाटतं.

- मंदार शिंदे
९८२२४०१२४६


Share/Bookmark

Thursday, May 25, 2017

Astronight

Astronight! A wonderful experience of watching the sky and beyond... Was introduced to many of the stars, the planets, the constellations, the milky way, and satellites, too. Great insights on the history of telescopes, branches of astronomy, and happenings in the universe. Got a closer view of surface of the moon, crescent of the venus, rings of the saturn, storms on the jupiter, colours of the double stars, and many more interesting features in the sky. Thank you, Shweta KulkarniNimish Aage, and team Astron for all the arrangements and informative sessions! And special mention for choice of the location, away from the city, with almost no light pollution.




Share/Bookmark

रिटायरमेंट

काम करायची इच्छा आणि क्षमता असणार्‍यांना जबरदस्ती ५०/५८/६० व्या वर्षी रिटायर करून २५/३५/४५ वयाच्या अकार्यक्षम आणि अनिच्छेने काम करणार्‍या लोकांना फुकट संधी देणारा सेवानिवृत्तीचा नियम मला चुकीचा वाटतो. दरवर्षी परफॉरमन्स रिव्ह्यू करायचा आणि काम सुरु ठेवायचं की बंद करायचं ह्याचा निर्णय घ्यायचा. मग वय ६० वर्षं झालं की ७०, ह्याचा काय संबंध?

An interested and capable person is forcefully retired from work at 50/58/60 years of age, while inefficient and disinterested persons of 25/35/45 years age are given more opportunities to work. I feel this rule is based on totally wrong assumptions. Decision of continuing to work or not can be based on a periodic performance review, not on whether the person turns 60 years old or 70.


Share/Bookmark

Thursday, May 18, 2017

लावणी अखेरच्या विनवणीची

लावणी अखेरच्या विनवणीची

मैतर हो! खातरजमा करु मी कशी
आम्ही जाणारच की कवा तरी पट्‌दिशी

काय तरुणपणाची एकेक येडी घडी
काय धुंदफुंद रंगात रंगला गडी
काय खट्याळ खोड्या येक येकावर कडी
मस्तीत मिजाशित रमलो रातंदिशी
आता जायाचंच की कवा तरी पट्‌दिशी

आम्ही साधू नव्हतो, नव्हतो योगी कुणी
आम्ही छंदीफंदी नादी नाना गुणी
इश्काच्या पायी कैक जणींचे ऋणी
केली फसवाफसवी अन्‌ कितिदा पडलो फशी
आता जायाचंच की कवा तरी पट्‌दिशी

किणकिणता कंकण कणकण नाचायचा
रुमझुमता पैंजण जीव येडा व्हायचा
कधी मैनेसंगे वनभर उधळायचा
दो हाती लुटली आणि लुटवली खुशी
आता जायाचंच की कवा तरी पट्‌दिशी

तुम्ही जीव लावला, मैत्र आपुले जुने
केलेत माफ तुम्ही शंभर माझे गुन्हे
हे एकच आता अखेरचे मागणे
ही मैफल तुमची अखंड चालो अशी
आम्ही जाणारच की कवा तरी पट्‌दिशी

- वसंत बापट


Share/Bookmark

Thursday, May 4, 2017

Centralized or Decentralized?

Centralized or Decentralized?

Mahatma Gandhi promoted ideal concept of decentralization of production and administration for independent India. Dr. Ambedkar highlighted practical problems of prejudice and discrimination at local levels. Mahatma Gandhi warned against rise in corruption, unequal distribution, and biased development due to concentration of power. Dr. Ambedkar expressed concern about communal, biased, and traditional rulers influencing local governance.

Decentralization is the ultimate solution for effective and successful administration of a country with size and diversity like India. However, centralized administration is initially required to empower and regulate local authorities till they become self-dependent and unprejudiced. So, Centralized administration eventually leading to decentralization is the golden mean for our country.

केंद्रीकरण की विकेंद्रीकरण?

महात्मा गांधींनी स्वतंत्र भारतासाठी उत्पादन व प्रशासनाच्या विकेंद्रीकरणाची आदर्श संकल्पना मांडली. डॉ. आंबेडकरांनी प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर सर्वसामान्यांना पूर्वग्रहदूषित भेदभावपूर्ण वागणूक मिळेल याकडं लक्ष वेधलं. महात्मा गांधींनी सत्तेच्या केंद्रीकरणामुळं भ्रष्टाचारात वाढ, असमान वाटप, आणि भेदभावपूर्ण विकास या धोक्यांची जाणीव करुन दिली. डॉ. आंबेडकरांनी स्थानिक प्रशासनावर जातीयवादी, पक्षपाती, आणि पारंपारिक राज्यकर्त्यांच्या प्रभावाबद्दल चिंता व्यक्त केली.

भारतासारख्या प्रचंड आकाराच्या आणि सगळ्याच गोष्टींत विविधता असणा-या देशाच्या कार्यक्षम आणि यशस्वी प्रशासनासाठी विकेंद्रीकरण हाच अंतिम उपाय आहे. असं असलं तरी, स्थानिक प्रशासन स्वयंपूर्ण आणि निष्पक्षपणे काम करण्यालायक बनेपर्यंत त्यांचं सक्षमीकरण आणि नियमन करणा-या केंद्रीय प्रशासनाचीही गरज आहेच. म्हणजेच, केंद्रीय प्रशासनाचं टप्प्याटप्प्यानं विकेंद्रीत व्यवस्थेत रुपांतर होणं, हा आपल्या देशासाठी सुवर्णमध्य म्हणता येईल.


Share/Bookmark

Tuesday, April 4, 2017

Something Honest and True


"If you wanted to do something absolutely honest, something true,
it always turned out to be a thing that had to be done alone."

- Richard Yates


Share/Bookmark