ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde
Showing posts with label ngo. Show all posts
Showing posts with label ngo. Show all posts

Saturday, August 8, 2020

National Education Policy Review (Chapters 1-2-3)

 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०


प्रकरण १. बाल संगोपन व शिक्षण - शिक्षणाचा पाया


सर्वात प्रथम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये २००९ सालच्या ‘शिक्षण हक्क कायद्या’ची व्याप्ती वाढवण्याबद्दल कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. (मूळ ४८४ पानांच्या ड्राफ्टमध्ये तशी शिफारस करण्यात आली होती.) हे संपूर्ण देशातील जनतेसाठी ठरवलेले शैक्षणिक धोरण असल्याने, शून्य वर्षांपासून पुढे सर्व वयोगटांसाठी शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या पद्धती, योजना, तरतुदी यांचा उल्लेख करणे अपेक्षितच आहे. त्यामुळे पूर्व-प्राथमिक ते उच्च-माध्यमिक (३ ते १८ वर्षे) या वयोगटाचा उल्लेख केला म्हणून ‘शिक्षण हक्क कायद्या’त या सर्वांचा समावेश झाला, असे समजणे चूक ठरेल. RTE ऐक्टनुसार, ६ ते १४ वयोगटासाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार देण्यात आलेला आहे. त्यामध्ये बदल करण्यासाठी कायद्यात सुधारणा करावी लागेल. धोरणामध्ये ढोबळ उल्लेख करून कायदा बदलता येत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.


१.१.    बालकांच्या एकूण मेंदू विकासापैकी ८५ टक्क्यांपेक्षा जास्त विकास वयाच्या सहाव्या वर्षापूर्वीच होतो, असा उल्लेख करून बाल संगोपन आणि शिक्षण (ECCE) कसे महत्त्वाचे आहे, याबद्दल इथे मांडणी केली आहे. परंतु, या मुद्याच्या शेवटी, “२०३० पर्यंत पहिल्या इयत्तेत प्रवेश करणारी सर्व मुले ‘स्कूल-रेडी’ असतील याची खात्री केली जाईल” असे म्हटले आहे.

२०१७ मध्ये ‘युनिसेफ’कडून ‘दी इंडिया अर्ली चाइल्डहूड एज्युकेशन इम्पॅक्ट स्टडी’ (IECEI) या नावाने एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला, ज्यामध्ये मुलांना ‘स्कूल-रेडी’ करण्याऐवजी वयानुरुप शिक्षण दिले जावे, अशी शिफारस करण्यात आली आहे. मुलांना ‘स्कूल-रेडी’ करण्यासाठी ‘पाच ते तीन’ वयोगट लक्षात घेऊन अभ्यासक्रम तयार केला जातो, त्याऐवजी ‘तीन ते पाच’ असा विचार केला जावा, असे त्यामध्ये म्हटले आहे. या धोरणाची अंमलबजावणी करताना ही गोष्ट लक्षात घ्यावी, असे वाटते.


१.२. बाल संगोपन आणि शिक्षणामध्ये मुळाक्षरे, भाषा, संख्या, रंग, आकार, बैठे आणि मैदानी खेळ, चित्रकला, हस्तकला, नाट्य, संगीत, अशा गोष्टींचा इथे उल्लेख करण्यात आला आहे. कोणती कौशल्ये विकसित होणे अपेक्षित आहे, त्यांची यादी दिली आहे.


१.३. आठ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी NCERT कडून एक नवीन ‘फ्रेमवर्क’ तयार करण्यात येईल असे इथे म्हटले आहे - ‘नॅशनल करिक्युलर ऐन्ड पेडॅगॉजिकल फ्रेमवर्क फॉर ईसीसीई (NCPFECCE) यामध्ये ‘शून्य ते ३’ आणि ‘३ ते ८’ अशा दोन वयोगटांचा उल्लेख केला आहे.

सध्याच्या व्यवस्थेनुसार, ६ ते ८ वयोगटासाठी म्हणजे पहिली ते तिसरीचा अभ्यासक्रम राज्य पातळीवर तयार केला जातो. नवीन रचनेनुसार NCERT चे फ्रेमवर्क आणि राज्याचा अभ्यासक्रम यांचा मेळ कसा घातला जाणार आहे; तसेच, पूर्व-प्राथमिक शिक्षणासाठी साधारण २०१२ पासून ज्यावर काम करण्यात आले, त्या ‘आकार’ अभ्यासक्रमाचे यामध्ये काय स्थान राहील, असे काही प्रश्न निर्माण होतात.


१.४. पूर्व-प्राथमिक शिक्षणाच्या अंमलबजावणीसंदर्भात चार प्रकारच्या बाल शिक्षण यंत्रणांचा उल्लेख करण्यात आलेला आहे -

१) स्वतंत्र अंगणवाडी;

२) प्राथमिक शाळेच्या आवारातील अंगणवाडी;

३) प्राथमिक शाळांच्या आवारातील पूर्व-प्राथमिक शाळा किंवा विभाग (बालवाडी);

४) स्वतंत्र पूर्व-प्राथमिक शाळा.


१.५. अंगणवाडी केंद्रांचे सक्षमीकरण केले जाईल, उच्च दर्जाच्या भौतिक सुविधा व खेळणी उपलब्ध केली जातील, आणि प्रशिक्षित अंगणवाडी सेविका किंवा शिक्षिकांची नेमणूक केली जाईल, असे इथे म्हटले आहे. अंगणवाडीच्या ‘इमारती’ उत्तम दर्जाच्या बांधल्या जातील, चाइल्ड-फ्रेन्डली बनवल्या जातील, असा उल्लेख केला आहे. (सध्याच्या अंगणवाड्या ज्यांनी बघितल्या आहेत, त्यांना हा उल्लेख स्वप्नील वाटण्याची शक्यता आहे. मुळात ‘अंगणवाडीची इमारत’ या संकल्पनेपासून आपल्याला सुरुवात करावी लागेल, असे वाटते.)

पुढे असेही म्हटले आहे की, अंगणवाडी केंद्रातील मुले स्थानिक प्राथमिक शाळेमध्ये जाऊन तिथल्या शिक्षकांना व मुलांना भेटतील, तसेच अंगणवाड्यांना ‘शाळा संकुल किंवा शाळा समूह’ (याबद्दल प्रकरण ७ मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे) यांच्यामध्ये पूर्णपणे सहभागी करून घेतले जाईल. (संकल्पना चांगली असली तरी, प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना, अंगणवाडी ते शाळा संकुलातील इतर शाळा यांच्यामधील अंतर, वाहतुकीची व्यवस्था, वेळ, खर्च, सुरक्षितता, यांच्या संदर्भाने अनेक प्रश्न निर्माण होतील.)


१.६. मूल पाच वर्षांचे होण्याआधी ‘पूर्वतयारी वर्ग’ किंवा ‘बालवाटिका’ वर्गामध्ये जाईल, असे इथे म्हटले आहे. अंगणवाडीत किंवा बालवाडीत शिकवल्या जाणाऱ्या काही गोष्टी इथेही शिकवल्या जातील आणि माध्यान्ह भोजन (मिड-डे मील) सुविधादेखील या वर्गांना दिली जाईल, असा उल्लेख केला आहे.

अंगणवाडी, बालवाडी, ज्युनियर-सिनियर केजी, प्ले-ग्रुप, नर्सरी, आणि बालवाटिका, या सगळ्या यंत्रणा एकाच वेळी कशा राबवल्या जाणार आहेत? यामध्ये पुन्हा पालकांच्या आर्थिक क्षमतेनुसार असमान विभागणी होईल का? शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये यांची अंमलबजावणी कशी होणार? हे सगळे गोंधळात टाकणारे मुद्दे निर्माण होतात. मुळात, ३ ते ६ वयोगटासाठी पूर्व-प्राथमिक वर्गांचा उल्लेख केल्यावर ‘बालवाटिका’ नक्की कशासाठी, याचे उत्तर या पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये मिळत नाही.


१.७. सध्याच्या अंगणवाडी सेविका आणि शिक्षिकांसाठी 'बाल संगोपन व शिक्षण' यासंबंधी दोन प्रकारचे कोर्सेस इथे नमूद केले आहेत. बारावी किंवा त्याहून अधिक शिकलेल्यांसाठी सहा महिन्यांचा सर्टीफिकेट कोर्स आणि त्याहून कमी शिक्षण घेतलेल्यांसाठी एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स देण्याचा उल्लेख केला आहे. त्यांच्या सध्याच्या कामामध्ये फारसा अडथळा न येऊ देता, डिजिटल किंवा दूरस्थ शिक्षण पद्धतीने हे कोर्स चालवता येतील, असाही यामध्ये उल्लेख केला आहे.

अंगणवाड्यांची सद्यस्थिती, त्यांच्याकडील साधनांची उपलब्धता, आणि अंगणवाडी सेविकांना व शिक्षिकांना मिळणारे (किंवा न मिळणारे) वेतन, या बाबींकडे दुर्लक्ष करून, पुन्हा त्यांच्यावरच अतिरिक्त प्रशिक्षणाचा भार कशासाठी? हे नवीन कोर्सेस कोण घेणार, कसे घेणार, त्यासाठी खर्च किती आणि कशातून केला जाणार, आणि त्यातून नक्की काय बदल किंवा सुधारणा अपेक्षित आहे? बारावीपेक्षा कमी शिकलेल्या आणि अल्प वेतनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका स्मार्टफोनद्वारे एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स डिजिटल पद्धतीने पूर्ण करू शकतील का? अशा डिजिटल कोर्समधून त्यांना मुलांना शिकवण्याच्या आणि सांभाळण्याच्या पद्धती शिकता येतील का? असे बरेच प्रश्न निर्माण होतात.


१.८. आदिवासी-बहुल क्षेत्रामधील आश्रमशाळा आणि पर्यायी शालेय शिक्षणाच्या सर्व प्रकारांमध्ये या बाल संगोपन आणि शिक्षण पद्धतीचा समावेश केला जाईल, असे म्हटले आहे. आश्रमशाळांसोबत ईसीसीईची जोडणी करण्यासाठी वरीलप्रमाणे (म्हणजे इतर क्षेत्रांमधील प्राथमिक शाळा व शाळा संकुलांप्रमाणे) अंमलबजावणी केली जाईल, असाही उल्लेख केला आहे.

मुळात आश्रमशाळा प्रत्येक गावात नसतात. सहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना दूरच्या आश्रमशाळेत ठेवायला पालक तयार होतील का? ते तयार झाले तरी इतक्या लहान वयाच्या मुलांसाठी योग्य त्या सुविधा आणि सुरक्षितता, शिवाय पुरेसा आणि प्रशिक्षित स्टाफ प्रत्येक आश्रमशाळेत उपलब्ध होऊ शकेल का? असे काही प्रश्न निर्माण होतात.


१.९. ईसीसीईचा अभ्यासक्रम आणि शिक्षण पद्धती यासाठी केंद्र सरकारचे शिक्षण मंत्रालय जबाबदार राहील, असे इथे म्हटले आहे. याच्या नियोजन आणि अंमलबजावणीसाठी शिक्षण मंत्रालय, महिला व बालविकास मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, आणि आदिवासी व्यवहार मंत्रालय, या सर्व यंत्रणा एकत्रितपणे काम करतील, असा उल्लेख केला आहे.

प्रत्यक्ष अंमलबजावणी राज्याच्या पातळीवर होणार असली तरी, सर्व अधिकार व जबाबदाऱ्या केंद्रीय मंत्रालये आणि केंद्रीय संस्थांकडे राखून ठेवण्याचा प्रयत्न इथे केलेला दिसून येतो. राज्य सरकारांनी तयार केलेले अभ्यासक्रम किंवा स्थानिक अनुभव आणि अभ्यासानुसार ठरवलेल्या शिक्षण पद्धतींचा उल्लेखदेखील या धोरणामध्ये केलेला नाही.


अशाप्रकारे, बाल संगोपन आणि शिक्षणासाठी बरीच स्वप्ने या धोरणात दाखवण्यात आलेली असली तरी, अंमलबजावणी आणि उद्देशांच्या बाबतीत बऱ्याच ठिकाणी गफलत झालेली दिसून येते. शिक्षण क्षेत्रातील अनेक संस्था आणि कार्यकर्त्यांकडून केली जाणारी मागणी म्हणजे ‘शिक्षण हक्क कायद्या’मध्ये पूर्व-प्राथमिक शिक्षणाचा समावेश करावा, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. जाणीवपूर्वक म्हणण्याचे कारण म्हणजे, या धोरणाच्या मूळ ड्राफ्टमध्ये ‘शिक्षण हक्क कायद्या’ची व्याप्ती वाढवावी, असा स्पष्टपणे केलेला उल्लेख या अंतिम धोरणातून पूर्णपणे काढून टाकण्यात आलेला आहे.



प्रकरण २. पायाभूत साक्षरता आणि अंकज्ञान (लिटरसी ऐन्ड न्यूमरसी) - शिक्षणासाठी तातडीची आणि आवश्यक पूर्वपात्रता


    २.१. सध्या प्राथमिक शिक्षण घेत असलेल्या मुलांपैकी अंदाजे ५ कोटीपेक्षा जास्त मुलांना साधा-सोपा मजकूर वाचता येत नाही, वाचून समजत नाही, आणि साधी बेरीज - वजाबाकीदेखील करता येत नाही, असा उल्लेख इथे करण्यात आला आहे.

   

    २.२. पायाभूत साक्षरता आणि अंकज्ञान प्राप्त करणे, हे तातडीचे राष्ट्रीय उद्दीष्ट बनले आहे आणि तिसऱ्या इयत्तेपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये या क्षमता निर्माण झाल्याच पाहिजेत, यासाठी ताबडतोब उपाययोजना कराव्यात, असे इथे म्हटले आहे. हे उद्दीष्ट २०२५ सालापर्यंत साध्य करण्याचा मानस व्यक्त केला गेला आहे. आपल्या विद्यार्थ्यांना जर लिहिता, वाचता, आणि आकडेमोड करता येत नसेल, तर या धोरणामध्ये लिहिलेल्या बाकी सर्व गोष्टी निष्फळ ठरतील, असेही कबूल केले आहे. यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालय एका राष्ट्रीय मिशनची स्थापना करेल आणि सर्व राज्य सरकारे तातडीने अंमलबजावणीचे नियोजन करतील, असे पुढे नमूद केले आहे.


२.३. शक्य तितक्या लवकर कालबद्ध रीतीने शिक्षकांच्या रिक्त जागा भरल्या जातील, असा उल्लेख इथे करण्यात आला आहे. (कदाचित यावरूनच शिक्षक, पात्र उमेदवार, कंत्राटी शिक्षक, शिक्षण सेवक, आणि माध्यमांनी आपापल्या आकलनाप्रमाणे अर्थ काढून, शिक्षक भरतीसंबंधी पोस्ट आणि बातम्या बनवल्या असाव्यात. परंतु, ‘शिक्षकांच्या रिक्त जागा भरल्या जातील’ हे खूपच ढोबळ विधान असून, प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत कोणतीही स्पष्टता धोरणात दिसत नाही.)

स्थानिक शिक्षकांना अथवा स्थानिक भाषा येणाऱ्यांना त्याच भौगोलिक क्षेत्रात नियुक्ती देण्याचा उल्लेख केला आहे. (स्थानिक विद्यार्थ्यांसाठी ही व्यवस्था फायद्याची दिसत असली तरी, यामुळे आदिवासी भागातील शिक्षकांची इतर ठिकाणी काम करण्याची संधी डावलली जाईल का, हा प्रश्नदेखील निर्माण होतो.)

सर्वसाधारणपणे ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आणि सामाजिक व आर्थिकदृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांची संख्या जास्त असेल अशा ठिकाणी २५ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असा ‘पीटीआर रेशो’ पाळला जाईल, असा उल्लेख इथे केला आहे. (वास्तविक, ‘शिक्षण हक्क कायद्या’मध्ये पीटीआर रेशोबाबत स्पष्ट सूचना असताना, धोरणामध्ये या गोष्टीचा उल्लेख कशासाठी केला हे समजत नाही. ‘शिक्षण हक्क कायद्या’नुसार पीटीआर रेशो पाळला जाईल, असे विधान पुरेसे ठरले असते.)

सध्याची लॉकडाऊन परिस्थिती आणि डिजिटल शिक्षणावरील वाढता भर लक्षात घेतल्यास हा पीटीआर रेशो कसा पाळला जाईल? शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये नव्याने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे भेदभाव निर्माण होईल का? शिक्षक नियुक्तीबाबत राज्य सरकारांची भूमिका काय राहील? असे अनेक प्रश्न यावरून निर्माण होतात.


२.४. पायाभूत साक्षरता आणि अंकज्ञानाचे महत्त्व, आणि त्यासाठी दैनंदिन ते वार्षिक नियोजनामध्ये समाविष्ट करायच्या काही घटकांबाबत इथे सूचना केलेल्या आहेत. सातत्यपूर्ण मूल्यमापनाद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीचा आढावा घेत राहण्याबद्दल उल्लेख केला आहे. (मात्र ‘शिक्षण हक्क कायदा’ आणि त्यातील सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीचा उल्लेख टाळण्यात आलेला आहे.)


२.५. सध्या सर्व मुलांना बाल संगोपन व शिक्षण सुविधा मिळत नसल्याने पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतल्यावर सुरुवातीपासूनच अनेक मुले मागे पडत जातात, असे इथे म्हटले आहे. यावर उपाय म्हणून ३ महिन्यांचे एक मध्यावधी ‘स्कूल प्रिपरेशन मोड्यूल’ NCERT आणि SCERT यांच्या माध्यमातून तयार केले जाईल, असा उल्लेख केला आहे.

तीन महिन्यांच्या मर्यादित कालावधीमध्ये मुलांना साक्षरता आणि अंकज्ञानाची पातळी कशी गाठता येईल? या विशेष वर्गांसाठी जागा, साधने, प्रशिक्षित शिक्षक, आणि निधी कुठून उपलब्ध होणार? शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांमध्ये असे शिक्षक आणि सुविधा उपलब्ध होणार का? असे काही प्रश्न यावरून निर्माण होतात. प्रथमदर्शनी उपयुक्त दिसत असली, तरी ही योजना सध्याच्या परिस्थितीत तरी खूपच स्वप्नील वाटते.


२.६. ‘डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग’ (DIKSHA) या प्लॅटफॉर्मवर पायाभूत साक्षरता आणि अंकज्ञान या संदर्भातील उच्च दर्जाच्या संसाधनांची एक राष्ट्रीय पातळीवरील ‘रिपॉझिटरी’ उपलब्ध करून देण्यात येईल, असे इथे म्हटले आहे. शिक्षकांना तंत्रज्ञानाची मदत मिळवून देण्याबाबत उल्लेख करण्यात आला आहे.


२.७. वर उल्लेख केल्यानुसार, पुढच्या पाचच वर्षांमध्ये पायाभूत साक्षरता आणि अंकज्ञान यासंबंधीचे उद्दीष्ट साध्य करायचे असल्याने, शक्य त्या सर्व उपाययोजना करून बघितल्या जातील, असा या मुद्याचा रोख आहे. यामध्ये दोन ‘स्वप्नील’ पद्धतींचा उल्लेख करण्यात आलेला आहे - पीयर ट्युटरिंग आणि व्हॉलंटीयरच्या मदतीने मुलांचे शिक्षण.

‘पीयर ट्युटरिंग’ अर्थात ‘सह-अध्ययन’ हा प्रकार आपल्याकडे अजूनही प्रयोगात्मक पातळीवरच असून, एकमेकांच्या मदतीने शिकत जाण्याइतकी पायाभूत साक्षरता आणि अंकज्ञान नसलेल्या प्राथमिक शाळेतील मुलांसाठी ही पद्धत कशी उपयोगी ठरेल, हा मोठा प्रश्न आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबवण्यासाठी शिक्षकांचे विशेष प्रशिक्षण इतक्या कमी काळात आणि इतक्या मोठ्या संख्येने करणे शक्य आहे का, असादेखील प्रश्न पडतो.

वस्तीमधील प्रत्येक साक्षर व्यक्तीने एका विद्यार्थ्याला वाचायला शिकवण्याची जबाबदारी घेतल्यास राष्ट्रीय पातळीवरील हे मिशन चटकन पूर्ण होईल, असा उल्लेख इथे करण्यात आला आहे. शिक्षण देण्याची जबाबदारी शाळेकडून काढून वस्तीमधील स्वयंसेवकांकडे देणे, हे ‘शिक्षण हक्क कायद्या’चे थेट उल्लंघन आहे. शिवाय, अशा प्रकारचे स्वयंसेवक संपूर्ण देशात कसे उपलब्ध होतील? त्यांचे प्रशिक्षण कोण, कुठे, कधी, आणि कसे करेल? शहरी आणि ग्रामीण शिक्षणामधली दरी यामुळे अजून वाढणार नाही का? लहान वयाची मुले अशा स्वयंसेवकांच्या संपर्कात आल्यामुळे सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण होणार नाहीत का? याबाबत कसलाही विचार केलेला इथे दिसून येत नाही.

अशा ‘पीयर ट्युटरिंग’ आणि व्हॉलंटीयर संबंधी अभिनव उपक्रमांच्या अंमलबजावणीची जबाबदारी मात्र राज्य सरकारांकडे दिलेली इथे दिसते. वरच्या मुद्यात, अभ्यासक्रम, नियोजन आणि एकूण प्राथमिक शिक्षणाच्या अंमलबजावणीबाबत सर्व अधिकार केंद्रीय मंत्रालय व संस्थांकडे राखून ठेवलेले असताना, ‘डिझाईन्ड टू फेल’ म्हणता येतील असे उपक्रम मात्र राज्य सरकारकडे देऊन टाकलेले दिसतात.


२.८. मुलांसाठी मनोरंजक आणि प्रेरणादायी पुस्तके शाळेच्या ग्रंथालयात आणि सार्वजनिक वाचनालयात उपलब्ध करून देण्याबद्दल इथे उल्लेख केला आहे. खेडेगावांमध्ये शाळेतील लायब्ररी इतरांसाठी उपलब्ध करून देण्याबद्दल आणि देशभरात वाचन संस्कृती निर्माण करण्याबद्दल उल्लेख केला आहे. यासंदर्भात एक ‘नॅशनल बुक प्रमोशन पॉलिसी’ आखण्यात येईल, असेही म्हटले आहे.

वाचन संस्कृती रुजवण्याबद्दल सकारात्मक सूचना केलेल्या असल्या तरी, सध्या शाळांमधील व सार्वजनिक ग्रंथालयांची परिस्थिती कशी आहे, याबद्दल कोणताही उल्लेख केलेला नाही. डिजिटल लायब्ररी स्थापन केल्या जातील असेही म्हटले आहे, परंतु डिजिटल लायब्ररी प्रत्येक विद्यार्थ्याला कशी वापरता येईल, याबद्दल भाष्य केलेले नाही. या धोरणाच्या सातव्या प्रकरणात, शाळा संकुलांच्या अंतर्गत छोट्या शाळांनी दुसऱ्या शाळेतील लायब्ररी शेअर करावी असा उल्लेख केलेला आहे, तो या वाचन संस्कृती रुजवण्याच्या स्वप्नाशी विसंगत वाटतो.


२.९. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या पोषण आणि आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज लक्षात घेऊन, शाळेमध्ये माध्यान्ह भोजनासोबतच सकाळच्या वेळेत नाष्टा दिला जावा, असे इथे सुचवण्यात आले आहे. उदाहरणार्थ, गूळ आणि शेंगदाणे किंवा चणे, तसेच स्थानिक फळे, असा साधा परंतु पौष्टिक आहार द्यावा, असेही सुचवले आहे.

‘माध्यान्ह भोजन योजने’तील अनुभव लक्षात घेता, विशेषतः ग्रामीण भागातील शिक्षकांवर या ‘नाष्टा योजने’चा अतिरिक्त भार पडणार नाही, यासाठी मार्गदर्शक सूचना या ठिकाणी अपेक्षित होत्या. नाष्ट्यामध्ये कोणते पदार्थ द्यावेत याबद्दल भाष्य करणाऱ्या धोरणामध्ये, शिक्षकांवरील या वाढीव जबाबदारीबद्दल कोणताही उल्लेख नसणे हा विरोधाभास ठळकपणे जाणवतो.



प्रकरण ३. शाळांमधून गळती रोखणे आणि सर्व स्तरांवर सर्वांसाठी शिक्षण उपलब्ध होईल याची खात्री करणे


३.१. सर्व शिक्षा अभियान (आता ‘समग्र शिक्षा अभियान’) आणि ‘शिक्षण हक्क कायदा’ यांच्या माध्यमातून आपण प्राथमिक स्तरावर सर्व मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे उद्दीष्ट जवळपास साध्य केले आहे, असा उल्लेख या मुद्यामध्ये करण्यात आला आहे. परंतु, पहिल्या इयत्तेत प्रवेश घेणाऱ्या १०० मुलांपैकी ९० मुले सहावी ते आठवीत, ७९ मुले नववी-दहावीत, तर फक्त ५६ टक्के मुले अकरावी-बारावीत प्रवेश घेतात, असेही नमूद केले आहे. यावरून, पाचवी आणि आठवीनंतर शाळेतून गळती होणाऱ्या मुलांचे लक्षणीय प्रमाण दिसून येते. २०१७-१८ मध्ये NSSO संस्थेने केलेल्या सर्व्हेनुसार, ६ ते १७ वयोगटातील शाळाबाह्य मुलांची संख्या ३.२२ कोटी असल्याचे म्हटले आहे. या सर्व मुलांना लवकरात लवकर पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणून, भविष्यात मुलांना शाळेतून गळती होण्यापासून रोखण्याचे, आणि २०३० पर्यंत पूर्व-प्राथमिक ते माध्यमिक पातळीवर १०० टक्के ‘ग्रॉस एनरोलमेंट रेशो’चे उद्दीष्ट साध्य करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. पूर्व-प्राथमिक ते बारावीपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण देशातील सर्व मुलांना उपलब्ध करून देण्याचा उल्लेख इथे करण्यात आला आहे.

२००९ सालच्या ‘शिक्षण हक्क कायद्यां’तर्गत ६ ते १४ वयोगटातील सर्व मुलांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार देण्यात आलेला आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये शाळाबाह्य मुले, वरच्या इयत्तांमध्ये गळती होणारी मुले, आणि १०० टक्के ‘ग्रॉस एनरोलमेंट रेशो’बद्दल उल्लेख करूनही, ‘शिक्षण हक्क कायदा’, त्यातील तरतुदी, गेल्या दहा वर्षांमधील अंमलबजावणीत राहिलेल्या त्रुटी, अशा गोष्टींचा उल्लेख करणे जाणीवपूर्वक टाळल्याचे दिसते. यामुळे एकूणच वर सांगितलेल्या उद्दीष्टांबद्दल संदिग्धता आणि संशय निर्माण होतो.

तसेच, शाळाबाह्य मुलांची संख्या हा नेहमीच वादाचा मुद्दा राहिलेला आहे. अशा मुलांची जबाबदारी स्थानिक प्रशासन व राज्य सरकारने नेहमीच टाळलेली असून, या संदर्भात ‘शिक्षण हक्क कायद्या’तील तरतुदींचे पालनदेखील केले जात नाही. याबाबत नवीन धोरणामध्ये जबाबदार यंत्रणा व ठोस कार्यक्रम यांच्याबद्दल उल्लेख करणे अपेक्षित होते. उदाहरणादाखल, इथेच उल्लेख केलेल्या ३.२२ कोटी शाळाबाह्य मुलांना खरोखर पुन्हा शाळेत आणायचे झाले तर, किती शाळा वाढवाव्या लागतील, किती शिक्षकांची नियुक्ती करावी लागेल, किती निधी उपलब्ध करावा लागेल, याबद्दल देखील हे धोरण अजिबात भाष्य करत नाही.


३.२. शाळेतून गळती झालेल्या मुलांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी आणि भविष्यातील गळती रोखण्यासाठी सर्वात महत्त्वाची उपाययोजना म्हणजे, पूर्व-प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये पुरेशा भौतिक सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर) उपलब्ध करून देणे, असा इथे उल्लेख करण्यात आला आहे. सध्याच्या सरकारी शाळांचा विस्तार आणि सुधारणा, जिथे शाळा उपलब्ध नसतील तिथे नव्याने दर्जेदार शाळांची बांधणी, आणि सुरक्षित वाहतूक किंवा वसतिगृहांची सुविधा पुरवणे, अशा उपाययोजनांद्वारे सरकारी शाळांची विश्वासार्हता पुनर्प्रस्थापित केली जाईल, असे इथे म्हटले आहे.

या धोरणाच्या प्रकरण ३ व प्रकरण ७ मधील मुद्यांमध्ये परस्परविरोध स्पष्ट दिसून येतो. इथे पुरेशा शाळा आणि भौतिक सुविधांच्या अभावी मुले शाळेतून गळती होतात असे म्हटले आहे, परंतु सातव्या प्रकरणात मात्र, सर्वत्र शाळा उपलब्ध करणे शक्य नसल्याने व कमी पटसंख्येच्या शाळा चालवणे परवडत नसल्याने, शाळा संकुलाच्या स्वरुपात भौतिक सुविधा आणि शिक्षकांचे शेअरिंग करावे असे म्हटले आहे. तसेच, वाहतूक आणि वसतीगृहांच्या सद्यस्थितीबद्दल भाष्य करणेदेखील टाळले आहे.

स्थलांतरित मजुरांच्या व इतर गळती झालेल्या मुलांसाठी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने पर्यायी व अभिनव शिक्षण केंद्रांची उभारणी केली जाईल, असे इथे म्हटले आहे. २००९ सालच्या ‘शिक्षण हक्क कायद्या’नुसार ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक मुला-मुलीस सर्व भौतिक सुविधांनी युक्त, सुरक्षित शालेय वातावरणात प्रशिक्षित शिक्षकांकडून औपचारिक शिक्षण प्राप्त करण्याचा अधिकार मिळालेला आहे. नवीन धोरणातील ‘पर्यायी शिक्षण केंद्रे’ उभारण्याची सूचना म्हणजे ‘शिक्षण हक्क कायद्या’तील या तरतुदींचे थेट उल्लंघन असून, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आपले अपयश झाकण्याचा व जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे, असे दिसते.


३.३. शाळेतून गळती होणाऱ्या मुलांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी व भविष्यातील गळती रोखण्यासाठी सुचवलेली दुसरी उपाययोजना म्हणजे, विद्यार्थ्यांचे त्यांच्या अध्ययन पातळी, म्हणजे ‘लर्निंग लेव्हल’सहीत ट्रॅकींग करणे. १८ वर्षांपर्यंतच्या सर्व मुलांना समान गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी ‘सुटेबल फॅसिलिटेटींग सिस्टीम्स’ अंमलात आणल्या जातील, असे संदिग्ध विधान करण्यात आले आहे. (इथे मूळ ड्राफ्टमध्ये, ‘शिक्षण हक्क कायद्या’ची व्याप्ती १८ वर्षांपर्यंत वाढवण्याबाबत सूचना केलेल्या होत्या, ज्या अंतिम धोरणामध्ये गाळण्यात आलेल्या आहेत.)

विद्यार्थ्यांच्या ट्रॅकींगसाठी व नियमित उपस्थितीसाठी शाळा किंवा शाळा संकुल स्तरावर समुपदेशक अथवा सामाजिक कार्यकर्ते (सोशल वर्कर्स) शिक्षकांसोबत नियमितपणे काम करतील, असे इथे म्हटले आहे. या महत्त्वाच्या कामासाठी स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांची मदत घ्यावी असे सुचवताना, ‘शिक्षण हक्क कायद्या’त नमूद केलेल्या स्थानिक प्रशासनाच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्या यांना पळवाट काढून देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. शाळाबाह्य मुलांच्या समस्येसंदर्भात गेल्या दहा वर्षांमध्ये सरकारी यंत्रणेतील सर्व घटक अपयशी ठरले आहेत, याकडे दुर्लक्ष करून, यंत्रणेबाहेरील संस्था आणि कार्यकर्त्यांवर ही जबाबदारी ढकलण्याचे धोरण वर नमूद केलेल्या उद्दीष्टांशीदेखील विसंगतच आहे.


३.४. भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर, मुलांचा शाळेतील इंटरेस्ट टिकवून ठेवण्यासाठी गुणवत्ता महत्त्वाची ठरेल, असे एक ढोबळ विधान इथे केले आहे. शाळांमधून विद्यार्थी गळती होण्याचे प्रमाण जास्त असेल अशा क्षेत्रांमध्ये, स्थानिक भाषेचे ज्ञान असणारे शिक्षक नेमावेत, तसेच अभ्यासक्रमाची उपयुक्तता वाढवण्यासाठी त्यात आमूलाग्र बदल करावेत, अशा संदिग्ध सूचनाही देण्यात आल्या आहेत.


३.५. सर्व मुलांच्या, विशेषतः सामाजिक व आर्थिकदृष्ट्या वंचित गटातील (SEDG) मुलांच्या शिकण्याची सोय म्हणून, शालेय शिक्षणाची व्याप्ती वाढवली जाईल व औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोन्ही पद्धतींनी शिकण्याचे विविध मार्ग उपलब्ध करून दिले जातील, असे इथे म्हटले आहे. NIOS आणि ‘स्टेट ओपन बोर्डा’कडून चालवल्या जाणाऱ्या ‘ओपन ऐन्ड डिस्टन्स लर्निंग (ODL) प्रोग्रॅम’ची व्याप्ती वाढवून, प्रत्यक्ष शाळेत जाऊन शिकू न शकणाऱ्या मुलांसाठी पर्यायी शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली जाईल, असे म्हटले आहे. औपचारिक शालेय व्यवस्थेतील तिसरी, पाचवी, आठवी, दहावी, आणि बारावी या इयत्तांना पर्यायी अभ्यासक्रम NIOS आणि राज्यातील मुक्त शाळांकडून चालवले जातील, अशी तपशीलवार माहिती इथे देण्यात आली आहे. स्थानिक भाषांमध्ये हे पर्याय उपलब्ध व्हावेत यासाठी राज्य सरकारांनी नव्या मुक्त शिक्षण संस्था (SIOS) स्थापन कराव्यात अथवा सध्याच्या संस्थांचे सक्षमीकरण करावे, यासाठी राज्यांना प्रोत्साहन दिले जाईल, असाही उल्लेख करण्यात आला आहे.

प्रत्यक्ष शाळेत जाऊन शिकू न शकणाऱ्या मुलांच्या समस्या लक्षात घेऊन ‘शिक्षण हक्क कायद्या’मध्ये अनेक तरतुदी करण्यात आल्या होत्या. बालमजुरी ही यापैकी सर्वात मोठी समस्या असल्याचे दिसून येते. याशिवाय, परिसरात शाळा उपलब्ध नसणे, वाहतुकीची सोय नसणे, शारीरिक अक्षमता, बालविवाह व मुलींच्या संदर्भातील इतर सामाजिक बंधने, अशा अनेक समस्यांवर भाष्य करण्याऐवजी, ‘मुक्त शाळे’च्या माध्यमातून मुलांना औपचारिक शिक्षणापासून वंचित ठेवले जात असून, ‘शिक्षण हक्क कायद्या’तील तरतुदींचे उल्लंघन या धोरणाद्वारे केले जात आहे.


३.६. सरकार व गैर-सरकारी फिलांथ्रॉपिक संस्था, या दोघांनाही नवीन शाळा बांधणे सोयीचे जावे, स्थानिक संस्कृती आणि भौगोलिक परिस्थितीतील विविधतेला प्रोत्साहन मिळावे, तसेच शिक्षणाच्या पर्यायी पद्धती अंमलात आणण्यास वाव मिळावा, यासाठी शाळांचे निकष शिथिल केले जातील, असे इथे म्हटले आहे. पब्लिक-फिलांथ्रॉपिक पार्टनरशिपमधून वेगळ्या स्वरुपाच्या शाळांना परवानगी दिली जाईल, असेही म्हटले आहे.

२००९ च्या ‘शिक्षण हक्क कायद्या’नुसार, शाळा सुरु करण्यासाठी विविध निकष बंधनकारक केले गेले. समाजातील सर्व स्तरांमधील मुलांना एकसमान सुविधा व सुरक्षित वातावरण मिळवून देण्यासाठी हे निकष आवश्यक आहेत. सरकारी शाळांमध्ये या निकषांची पूर्तता करण्याची व त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची, तसेच खाजगी शाळांमध्ये हे निकष पाळले जातील याची खात्री करण्याची संपूर्ण जबाबदारी ‘शिक्षण हक्क कायद्या’द्वारे सरकार आणि स्थानिक प्रशासन यांच्यावर सोपवण्यात आली. या कायदेशीर तरतुदींना डावलणारे अनेक मुद्दे नवीन ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा’मध्ये आढळतात, त्यापैकी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.


३.७. शाळांमध्ये शिकवण्याच्या कामात मदत करणे, जादा तास घेणे, शिक्षकांना मार्गदर्शन करणे, विद्यार्थ्यांना करीयर गाइडन्स व मेन्टॉरिंग असे सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी समाजातील व्यक्तींचा आणि माजी विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला जाईल, असे इथे म्हटले आहे. साक्षर स्वयंसेवक, निवृत्त शास्त्रज्ञ व सरकारी कर्मचारी, माजी विद्यार्थी, आणि शिक्षणतज्ज्ञ, अशा व्यक्तींची माहिती गोळा करून त्यांना स्थानिक शाळांसोबत जोडून दिले जाईल, असा उल्लेख केला आहे.

समाजाच्या सहभागातून विद्यार्थ्यांचा विकास साधण्याची संकल्पना चांगली असली तरी, मुलभूत भौतिक सुविधा, शिक्षक, आणि शाळाच उपलब्ध नसलेल्या ठिकाणी अशा स्वप्नील संकल्पनेची अंमलबजावणी कशी करणार, हा मोठा प्रश्न आहे.



मंदार शिंदे

०८/०८/२०२०


Mobile: 9822401246

E-mail: shindemandar@yahoo.com

Blog: http://aisiakshare.blogspot.com

Books on Amazon: http://amazon.com/author/aksharmann




Share/Bookmark

Thursday, August 22, 2019

देणाऱ्याचे हात हजारो...

सांगली-कोल्हापूरच्या पूरग्रस्तांसाठी 'मैत्री'कडून केल्या गेलेल्या कामाचा आढावा घेणं आणि तिथं समजलेल्या-शिकलेल्या गोष्टी सर्वांसमोर मांडणं, या हेतूनं २१/०८/२०१९ रोजी पुण्यात एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं. चर्चेतले महत्त्वाचे मुद्दे नोंदवून ठेवणं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक वाटलं, म्हणून हा रिपोर्ताज. - मंदार शिंदे 9822401246

देणाऱ्याचे हात हजारो…

सांगली-कोल्हापूर परिसरात पूर परिस्थिती निर्माण होत असल्याचा अंदाज येताच 'मैत्री'ची पहिली तुकडी सांगलीत दाखल झाली. मदतीसाठी कुठलाही फिक्स अजेंडा ठरवला नव्हता. परिस्थितीचं नेमकं आकलन करुन मग मदतीचं स्वरुप ठरवायचं होतं.

तन्मय आणि संतोष म्हणाले की, पहिल्या तुकडीनं ०९/०८/२०१९ रोजी थेट सांगली जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं. आम्ही मदतकार्यात सहभागी होऊ इच्छितो, अशी त्यांच्याकडं नोंदणी केली.

संतोषनं सांगितलेल्या अनुभवानुसार, जिल्हाधिकारी कार्यालयातले अधिकारी स्वतःच गडबडून गेलेले होते. कुठल्या गावात कामाची गरज आहे, याची नेमकी माहिती त्यांच्याकडं नव्हती. प्रशासन पोहोचू शकलं नाही अशा गावात जाऊन काम करा, असं त्यांनी सांगितलं. नक्की कशा प्रकारच्या मदतकार्याची गरज आहे, तेही सांगितलं नाही. बाहेरुन आलेल्या वस्तूंची नोंद त्यांनी करुन घेणं अपेक्षित होतं. 'मैत्री'नं आणलेल्या वस्तूंची नोंद केली, इतर सामानाची नोंद केलेली दिसली नाही.

'राहत टीम' (सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ) च्या वैभव पंडीत यांनी, २०१८ च्या केरळ राज्यातल्या पुरावेळी मदतकार्यात सहभाग घेतला होता. तो अनुभव शेअर करताना वैभवनं सांगितलं की, केरळच्या महापुरात टाटा इन्स्टीट्यूटमधून काम केलं. मदतीसाठी बाहेरुन वस्तू आणि स्वयंसेवक यायच्या आधीच केरळ प्रशासनाची चांगली तयारी झालेली होती. नेमक्या गरजा ओळखलेल्या होत्या. केरळ प्रशासनाकडं मदतकार्यात सहभागी होण्याची इच्छा असलेल्या संस्थांची यादी होती. आलेलं सामान नक्की कुठं पाठवायचं, याबद्दल संस्था आणि स्वयंसेवकांना प्रशासनाकडून सूचना दिल्या जात होत्या. त्यानुसार, वैभवच्या टीमनं मदतीसाठी आलेल्या वस्तूंच्या वाटपामध्ये स्वयंसेवक म्हणून काम केलं. महाराष्ट्रात मात्र प्रशासकीय यंत्रणेमध्ये तयारी आणि समन्वयाचा अभाव प्रकर्षानं जाणवला.

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भिलवडीजवळच्या माळवाडी गावात कुठलीच मदत पोहोचली नव्हती. त्यामुळं 'मैत्री'ची टीम, असेल त्या रस्त्यानं आणि मिळेल त्या वाहनानं माळवाडीला जाऊन पोहोचली. तन्मयनं नमूद केलं की, माळवाडी गावामध्ये त्याच दिवशी चोपडेवाडी, सुखवाडी, या शेजारच्या गावांमधून पूरग्रस्त आले होते. त्यांच्यासाठी माळवाडी ग्रामस्थांनी खाण्या-पिण्याची व्यवस्थित सोय केली होती. पण अचानक घर-गाव सोडून आल्यामुळं त्यांच्याकडं इतर कुठल्याही वस्तू नव्हत्या.

अंजली मेहंदळे म्हणाल्या की, सगळे पूरग्रस्त छावणीमध्ये आश्रयाला उतरले नव्हते. बऱ्याच लोकांनी आपापल्या नातेवाईकांकडं आसरा घेतला होता. स्थानिकांनी वाटेतल्या सगळ्या पतसंस्था, शाळा, वगैरे उघडून पूरग्रस्त लोकांची सोय केलेली दिसली. त्याचवेळी, छावणीच्या ठिकाणी समाजातील विविध गटांनुसार पूरग्रस्तांचे गट रहात असलेले दिसले. बायकांचे गटदेखील वेगळे रहात होते, असं अंजलीनं नमूद केलं.

त्या तुलनेत, सांगली शहरात मदतीची फारशी गरज दिसली नाही, असं निरीक्षण तन्मयनं नोंदवलं. एक तर, सांगली शहराच्या मिरज वगैरे बाजूला अजिबात पूर नव्हता. शहरातले एका बाजूचे रस्ते सुरु होते. बाहेरुन मदत येण्यासाठी इस्लामपूर मार्ग बंद असला, तरी कराड-तासगाव मार्ग सुरु होता. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर मदत पोहोचत होती. त्या मानानं ग्रामीण भागात मदतीचे ट्रक कमी पोहोचत होते. चौथ्या दिवसापर्यंत सांगलीमध्ये खूप जास्त मदत पोहोचली होती. पूरग्रस्तांची नेमकी गरज काय आहे, हे न ओळखता बाहेरुन सामान पाठवलं जात होतं.

अशा परिस्थितीत, सांगलीचे अमित शिंदे आणि त्यांच्या टीमनं सांगलीमध्ये आसरा छावण्यांचं काम ताबडतोब सुरु केलं होतं. अमितनं सांगितलं की, कशा प्रकारची मदत अपेक्षित आहे याबद्दल पहिल्या दिवशी व्हॉट्सऐपवर एक मेसेज बनवून पाठवला होता, तो आजही फॉरवर्ड होतोय आणि रोज शेकडो फोन येतायत. शासनाचा इमर्जन्सी नंबर मात्र उपलब्ध नसल्याचं त्यानं नमूद केलं. प्रशासनाकडून धोक्याच्या नेमक्या सूचना मिळत नव्हत्या. त्यामुळं लोक २००५ सालच्या पुराशी तुलना करुन निर्धास्त राहिले. त्यावेळी एवढं पाणी आलं नव्हतं, म्हणून आताही येणार नाही, अशा गैरसमजात लोक राहिल्यानं जास्त नुकसान झाल्याचं आणि रेस्क्यु टीमवरदेखील जास्त ताण आल्याचं अमितचं मत होतं.

तन्मयच्या मते, धोक्याच्या सूचना अधिकृत यंत्रणेकडून नियमित वेळाने मिळत राहणं आवश्यक होतं. त्यामध्ये नक्की किती पाऊस पडणार, पाण्याची पातळी किती वाढणार, याचे तपशील अपेक्षित होते. त्याऐवजी सोशल मिडीयावर, पूरग्रस्त गावातल्या लोकांनी स्वतःच पाठवलेले फोटो आणि व्हिडीओ पुन्हा-पुन्हा फॉरवर्ड होत राहिले, ज्यामुळं बाहेरच्या लोकांना परिस्थितीची नक्की कल्पना करणं अवघड गेलं. माळवाडीतल्या एका तरुणानं पूर परिस्थितीचा व्हिडीओ टिकटॉकवर अपलोड केला होता. तो बघून कुणीतरी कुठून तरी एक टेम्पो भरुन सामान गावात पाठवलं होतं. असे अनियोजित अनियंत्रित प्रकार घडताना दिसत होते.

वैभवच्या अनुभवानुसार, पूर आला की नदीच्या प्रवाह मार्गातली कोणती गावं पाण्याखाली जाणार, हे आधीच ओळखता येतं. केरळच्या भौगोलिक रचनेचा अनुभव नसूनही, गुगल मॅपचा अभ्यास करुन त्यांच्या टीमला मागच्या वर्षी संभाव्य पूरग्रस्त गावं ओळखता आली होती. सांगली-कोल्हापूरच्या पुरात मात्र अशा यंत्रणेचा अभाव ठळकपणे जाणवला. 'राहत टीम'चे (सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ) राजू केंद्रे, ऋषी आंधळकर यांनी सांगलीत जाऊन, नक्की काय मदत लागणार याचा अंदाज घेतला. गावातल्या लोकांशी बोलून मदतीची गरज ठरवली. त्यानुसार नवीन कपडे, भांडी, शालेय साहित्य गोळा करायला सुरुवात केली.

जागृती ग्रुपची मनीषा म्हणाली की, सोशल मिडीयावरुन केलेल्या आवाहनाला पुणेकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. फर्ग्युसन कॉलेज रोडवर मदतीचं सामान गोळा करण्यात आलं. त्यांनी स्वयंसेवकांच्या चार टीम बनवल्या - त्यापैकी एक मेडीकल टीम होती, तर बाकीच्या तीन टीम आलेल्या सामानाचं वर्गीकरण करुन कीट बनवायचं काम करत होत्या. साखर आयुक्त शेखर गायकवाड साहेबांनी या कामासाठी पुण्यातलं 'साखर संकुल' वापरायची परवानगी दिली. आतापर्यंत सुमारे २५,००० किट तयार केले आणि जवळपास २२ ट्रक मदत पाठवली, असं मनीषानं सांगितलं.

आपत्तीनंतर पहिल्या २४ तासात लोकांना अगदी बेसिक गोष्टींची गरज असते. त्यानंतर सुटका (रेस्क्यू), दिलासा (रिलीफ), आणि तत्कालिक व दीर्घकालीन पुनर्वसन (रिहॅबिलिटेशन) या टप्प्यांमध्ये, लागणाऱ्या मदतीचं स्वरुप बदलत जातं. बदलत्या गरजेनुसार मदत पाठवली नाही, तर अतिरिक्त आणि अनावश्यक मदतीचं रुपांतर कचऱ्यात होतं, असं मत विनीता ताटके यांनी नोंदवलं. याबाबतीत स्थानिक प्रशासनाकडून समन्वय साधला गेला, तर जास्त परिणामकारक आणि उपयुक्त मदतकार्य करता येतं, असा केरळच्या पुरावेळचा अनुभवही त्यांनी सांगितला. आपत्ती ओढवल्यापासून कितव्या दिवशी मदत पोहोचणार, यानुसार 'मैत्री'नं लोकांकडून मागवलेल्या वस्तू वेगवेगळ्या होत्या. उदाहरणार्थ, सुरुवातीला धान्य आणि जीवनावश्यक वस्तू, चटया, ब्लँकेट, वगैरे, त्यानंतर कपडे, शैक्षणिक साहित्य, असे बदल करण्यात आले. परंतु, अगदी सुरुवातीला चटया आणि ब्लँकेट मागवल्या असल्या तरी, खूप लोकांकडून जुने कपडेच जास्त संख्येनं आले, असंही त्यांना दिसून आलं.

प्रत्यक्ष पूरग्रस्त गावात जाऊन पहिल्या टीमनं पाहणी केली होती. त्यांच्या फीडबॅकनुसार, कुठल्या वस्तू मागवायच्या हे ठरवल्याचं लीनता वैद्य यांनी सांगितलं. चटया, पांघरुणं, लहान मुलांचे कपडे, मास्क, अशा वस्तूंची मागणी केली. लोकांकडून या वस्तू घेतानाच बघून घेतल्या आणि वस्तूंची विभागणी सुरुवातीलाच केली. याआधीच्या मदतकार्यांच्या अनुभवांवरुन ही सुधारणा केल्याचं लीनता म्हणाल्या. देणगी स्वरुपात मिळालेल्या गोण्यांमध्ये-पोत्यांमध्ये, सुरुवातीलाच वर्गीकरण करुन सामान भरुन ठेवलं होतं. एवढी तयारी असल्यामुळं, पूरग्रस्त भागातून मागणी आल्या-आल्या लगेच मदत पाठवता आली. ट्रकमध्ये लोडींग करताना सुरुवातीला हलकं सामान भरलं, नंतर जड सामान भरलं. यामुळं सामान व्यवस्थित पोहोचलं आणि उतरवताना सोयीचं गेलं. मागच्या अनुभवांनुसार लोकांना मदतकार्याबद्दल व्यवस्थित निरोप गेले होते, त्यामुळं यावेळी बऱ्याच लोकांनी आधी फोन करुन, 'काय सामान पाहिजे' असं विचारुन घेतलं आणि त्यानुसार वस्तू पाठवल्या, काही वस्तू विकतदेखील आणून दिल्या, असं लीनता वैद्य यांनी आवर्जून सांगितलं.

संतोषनं सांगितलं की, सुरुवातीला माळवाडीसाठीच मदतीचं सामान घेऊन ट्रक मागवले होते, पण नेमकी आदल्या दिवशी गावात आलेल्या सामानाची चोरी झाली. शिवाय स्थानिक ग्रामसेविकांवर गावातल्या लोकांचाच विश्वास नव्हता. सामान ठेवायला दुसरी जागा मिळाली, पण त्याच्या कुलुपाच्या किल्ल्या चक्क सहा लोकांकडं असल्याचं समजलं. पुण्यातून लोकांनी विश्वासानं पाठवलेल्या सामानाची चोरी किंवा गैरवापर होऊ नये, असं टीमला वाटत होतं. त्यामुळं पुण्याहून निघालेले मदतीच्या सामानाचे ट्रक वाटेत थांबवले आणि पलूसकडं वळवले.

मदतीचं सामान घेऊन ट्रकसोबत गेलेल्या प्रविण यांनी पलुसच्या डॉ. पवार यांच्या कामाचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले की, पलूसमध्ये जवळपास १२ टन सामान उतरवण्यात आलं. तिथून किट तयार करुन मग गावांमध्ये वाटप करायला नेले. या सगळ्या कामात डॉ. पवार यांचं मोठं योगदान होतं. महाराष्ट्रातल्या विविध भागांतून आलेल्या स्वयंसेवकांच्या जेवणाची सोयदेखील डॉ. पवार यांच्याकडंच केली होती. पुण्यातून मदतीचं सामान घेऊन जाण्यासाठी ट्रक भाड्यानं घेतले होते. ट्रकचे चालक फक्त सांगितलेल्या ठिकाणी ट्रक घेऊन गेले. स्वयंसेवकांनी साखळी करुन १२ टन सामान उतरवल्याचंही प्रविणनी सांगितलं.

तन्मयनं सांगितलं की, पूरग्रस्त भागातली परिस्थिती दर दोन तासांनी बदलत होती. सोशल मिडीयावरुन इतक्या लोकांपर्यंत आवाहन पोहोचलं होतं की, कुठून कधी कसली मदत येईल तेसुद्धा सांगता येत नव्हतं. त्यामुळं छावण्यांमधल्या आणि गावातल्या परिस्थितीचा सतत आढावा घेऊन वाटपाचं नियोजन करावं लागत होतं. जिल्हा पातळीवर समन्वय नसल्यानं काही गावांमध्ये खूप जास्त, तर काही ठिकाणी अगदीच नगण्य प्रमाणात मदत पोहोचत होती.

या संदर्भात, 'राहत टीम' (सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ) तर्फे सामानाच्या २२ ट्रकचं व्यवस्थापन केल्याचा अनुभव वैभवनं शेअर केला. जवळपास १४० स्वयंसेवक क्रीडा संकुलात साठा, वर्गीकरण आणि वाटपाचं काम करत होते.

स्थानिक लोकांच्या सहभागाचं महत्त्व सांगताना, वैभवनं इस्लामपूर जवळच्या नवेखेड गावाचं उदाहरण दिलं. पुराचं पाणी वाढू लागल्यावर स्थानिक तरुणांनी, घरात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी खूप काम केलं. गावातल्या लोकांची गरज लक्षात घेऊन, त्यांनी बाहेरुन आलेल्या मदतीपैकी फक्त दोनच ट्रकमधून सामान उतरवून घेतलं, आणि बाकीचे ट्रक पुढच्या गरजू गावांकडं पाठवून दिले.

वैभवचं म्हणणं होतं की, मदतीचे बरेचसे ट्रक मुख्य रस्त्यांनीच आले आणि गेले. आतल्या गावांपर्यंत मदत गरजेपेक्षा कमी प्रमाणात पोहोचली. तसंच, मदत म्हणून धान्य मिळालं, पण गिरण्या बंद असल्यानं त्याचा उपयोग झाला नाही. पूरग्रस्त गावांमध्ये आणि छावणीच्या ठिकाणी जेवण बनवण्यासाठी सिलिंडरची गरज होती, पण सगळ्याच गावांमध्ये गॅस सिलिंडरचा तुटवडा होता. याबाबतीत थोडं नियोजन करायला पाहिजे होतं, असं वैभवला वाटतं.

आपत्तीनंतर तातडीनं वीज, गिरणी, वगैरे गोष्टी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळं धान्यस्वरुपात मदत करण्याऐवजी, मोठ्या प्रमाणावर फूड कॅम्पमध्ये जेवण बनवून तयार अन्नाचं वाटप करायची गरज आहे, असं राजेशनाही वाटतं.

राजेश आणि त्यांची टीम नृसिंहवाडीजवळ कुरुंदवाडच्या सैनिक शाळेत शिकलगार वस्ती कॅम्पवर काम करत होती. इथं बिस्कीटांचा खूप जास्त पुरवठा झाला होता, त्या मानानं धान्य कमी पोहोचलं होतं, असं राजेशना दिसून आलं. आलेल्या मदतीचं खरोखर गरजू लोकांमध्ये समान वाटप करणं हे खूप मोठं आव्हान होतं, असं ते म्हणाले. या ठिकाणी, एका खोलीत ७-८ पूरग्रस्त कुटुंबं, अशी एकूण १४० कुटुंबं आश्रयाला राहिली होती. या कुटुंबांमधल्या जवळपास ४७० लोकांचा डेटा राजेशच्या टीमनं नोंदवून घेतला. ज्या शाळेत ही छावणी लावली होती, तिथले कागद वापरुन कुपन बनवले आणि प्रत्येक कुटुंबाला दिले. मग एका वेळी एकाच खोलीतल्या कुटुंबांना स्वतंत्रपणे बोलवून मदतीचं वाटप केलं. यामुळं गडबड-गोंधळ न होता, सगळ्यांना गरजेनुसार वस्तू देता आल्या.

मदत साहित्याच्या वाटपाचं एवढं नियोजन करुनही, या छावणीच्या ठिकाणी गोंधळ कसा उडाला, याबद्दलचा अनुभव राजेशनं सांगितला. मराठी नाट्य परिषदेकडून मदतीच्या सामानाचे तीन ट्रक कोल्हापूरला पाठवण्यात आले होते. त्यापैकी एका ट्रकमधलं सामान खिद्रापूरला लोकांनी काढून घेतल्याचं समजलं. दुसरा ट्रक कुरुंदवाडला आला होता, आणि तिसरा ट्रक नरसोबावाडीलाच थांबून राहिला होता. कुरुंदवाडाला आलेल्या ट्रकमध्ये फक्त ६७ किट्स होते, आणि मदत घ्यायला आलेल्या लोकांची संख्या खूप जास्त होती. ट्रकमधले किट घेण्यासाठी लोकांमध्ये मारामारी झाली. मग राजेश आणि टीमनं त्यांना वाटपासाठी मदत करायचं ठरवलं. कॅम्पमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना आधीच मदत मिळाली होती, त्यामुळं त्यांना वगळून बाकीच्या कुटुंबांना हे किट द्यायचं ठरलं. प्रत्येक कुटुंबातल्या फक्त बायकांनाच रांगेत थांबायला सांगितलं, ज्यामुळं गर्दी निम्म्यानं कमी झाली. तरीसुद्धा जवळपास १०० बायका रांगेत थांबल्या होत्या.

नरसोबावाडीला थांबलेल्या ट्रकमध्ये अजून किट होते, पण खिद्रापूर आणि कुरुंदवाडच्या अनुभवामुळं त्यांचं पुढं यायचं धाडस होत नव्हतं. मग राजेश आणि टीमनं कुरुंदवाडमधून एक छोटा हत्ती (टेम्पो) ठरवून, ट्रक थांबलेल्या ठिकाणी पाठवला. मोठ्या ट्रकमधून छोट्या टेम्पोमध्ये सामान हलवलं आणि कॅम्पमध्ये आणलं. त्यांचे किट तयार होतेच. शिवप्रतिष्ठान, नाट्य परिषद, मैत्री, आणि इतरांकडून आलेल्या सामानाचं अनलोडींग आणि सॉर्टींग त्यांनी केलं. पूरग्रस्तांकडून रेशनकार्ड मागवून घेतले आणि त्यावर सामान मिळेल तसं मार्किंग केलं. हे सर्व नियोजन बघितल्यावर, 'ट्रकमधून उघड्यावर सामान वाटणं चुकीचं आहे', अशी प्रतिक्रिया कॅम्प लावलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिली.

मदतीच्या सामानाचे किट बनवूनच पाठवले तर वाटप करणं सोयीचं जातं, असं राजेशना वाटतं. धान्याच्या कट्ट्यातून (पोत्यातून) किलो-किलो धान्य मोजून त्याचं वाटप करणं शक्य होत नाही. तसंच, किट बनवताना ज्यांनी धान्याच्या पिशव्यांना भोकं पाडली नव्हती, त्यात हवा भरुन प्रवासात पॅक फुटले होते, असंही राजेशना दिसून आलं. किट पॅकिंग करताना या गोष्टींची काळजी घ्यायला हवी होती. त्याहून महत्त्वाचं म्हणजे, पूरग्रस्त गावातल्या गिरण्या बंद असल्यानं लोकांना गहू नको होते, पिठाची गरज होती. हा निरोप मदत पाठवणाऱ्यांपर्यंत तातडीनं पोहोचवण्याची गरज होती, असंही राजेशनी सांगितलं.

सांगलीमध्ये अमित शिंदे यांच्या टीमनं १८ ठिकाणच्या कॅम्पमध्ये सुमारे ३,५०० पूरग्रस्तांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची आणि खाण्या-पिण्याची सोय केली. सोशल मिडीयावरच्या आवाहनांना प्रतिसाद देत बाहेरच्या लोकांनी पाठवलेल्या मदतीचं व्यवस्थापन करणं, हेदेखील एक मोठं आव्हान त्यांच्यासमोर होतं. सुरुवातीला खूप जास्त अन्नपदार्थ पाठवले जात होते. उरलेलं अन्न टाकून द्यायला लागलं. म्हणून अन्न पाठवू नका, असं आवाहन केलं. आता कॅम्प बंद झालेत आणि लोक पुन्हा आपल्या घरी परत जातायत. पण घरात लगेच अन्न शिजवता येईल अशी परिस्थिती नाही. आता अन्नाची खरी गरज आहे, पण आता कुणीच अन्न पाठवत नाहीये. नक्की केव्हा कुठल्या प्रकारची मदत पाठवायची, याचा समन्वय फार महत्त्वाचा आहे, असं अमितचं मत आहे. आता पुनर्वसनाच्या कामासाठी देखील मदतीची गरज आहे; पण मदतीचा ओघ कमी होताना दिसतोय, असंही निरीक्षण मांडलं.

अंजली मेहंदळे म्हणाल्या की, चोपडेवाडीमध्ये कॅम्पमधून परत घरी गेल्यावर पहिली गरज स्वच्छतेची होती. बरेच दिवस घर पाण्याखाली राहिलं होतं, सामान कुजलं होतं, जनावरं मेली होती, काही आजारी पडली होती. मदतकार्यामध्ये लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यायला मेडीकल टीम होत्या, पण जनावरांचे डॉक्टर्स फारसे दिसले नाहीत, असंही त्यांनी नमूद केलं.

सुनीलच्या अनुभवानुसार, पलूस भागात भारती विद्यापीठ आणि विश्वजीत कदमांच्या टीमनं उत्तम नियोजन आणि मदतकार्य केलं. पुरात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी आणि तात्पुरत्या निवाऱ्यासाठी तातडीनं सोय केली जात होती. पण आता पुनर्वसनाचं काम प्रचंड अवघड आहे, असं सुनीलना वाटतं. प्रत्यक्ष नुकसान झालेले पूरग्रस्त तर आहेतच, पण अप्रत्यक्ष पूरग्रस्तांची संख्यादेखील खूप आहे. आणि त्यांचं नुकसान ओळखणंदेखील कठीण आहे. अल्पभूधारक शेतकरी आणि भूमीहीन शेतमजुरांसाठी तातडीनं मदत उपलब्ध करुन द्यायची गरज आहे. त्यांच्यासाठी रोजगाराचे पर्याय लवकर उभे करणंही महत्त्वाचं आहे.

पुन्हा अशी आपत्ती आल्यास उपाययोजना म्हणून गावांच्या विस्थापनाचा पर्याय सुचवला जातो, पण लोक सहजासहजी मूळ गाव सोडून जायला तयार होणार नाहीत. त्यामागची भावनिक कारणंदेखील लक्षात घ्यायची गरज आहे, असं सुनीलना वाटतं.

तन्मयनं नोंदवलेलं निरीक्षण असं होतं की, पूर परिस्थितीचा नेमका अंदाज न आल्यानं, काही गावांमधले लोक स्वतःहून पुराच्या पाण्यात थांबले-अडकले होते. सुटकेसाठी आलेली एनडीआरएफ टीम लोकांची समजूत काढून त्यांना बोटींमध्ये बसवून बाहेर काढत होती. यामध्ये एनडीआरएफ टीमचा खूप वेळ वाया जात होता आणि आधीच कमी संख्या असलेल्या बोटीदेखील एकाच गावात अडकून पडत होत्या. बोटींची उपलब्धता आणि वापर याबाबत जिल्हापातळीवर प्रशासनाचा एनडीआरएफशी समन्वय नव्हता किंवा योग्य प्रकारे त्यांना सूचना मिळत नव्हत्या.

याच संदर्भात वैभवचा अनुभव असा होता की, आपत्ती व्यवस्थापनाच्या बाबतीत शासकीय अधिकाऱ्यांचं सेन्सिटायजेशन झालेलं दिसत नाही. कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुप हा बिल्डर लोकांचा ग्रुप असून, त्यांच्याकडं मदतकार्यासाठी लागणारे गम बूट, मास्क वगैरे सामान प्रचंड प्रमाणात उपलब्ध होतं. पण विशिष्ट सोसायटी आणि वस्तीतच हे काम करायचं, असा त्यांचा हट्ट होता. इतर ठिकाणी कामाची गरज जास्त असेल तर शासनानं समन्वय साधून, मदतकार्याची साधनं स्वयंसेवकांना किंवा संस्थांना उपलब्ध करुन द्यायची गरज होती. पण याबाबतीत शासनाकडं पाठपुरावा करुनसुद्धा त्यांनी योग्य प्रतिसाद दिला नाही, याचं वाईट वाटत असल्याचं वैभवनं सांगितलं.

एका शाळेत स्वयंसेवक म्हणून स्वच्छतेचं काम करत असताना, तिथल्या मुख्याध्यापिका स्वयंसेवकांनाच आदेश देऊन काम करुन घेत असल्याचा अनुभव वैभवला आला. तर दुसरीकडं, पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आलेल्या स्वयंसेवकांचं, त्याही परिस्थितीत स्थानिक लोकांनी आदरातिथ्य केल्याचा अनुभव संतोषनी सांगितला.

शासनाकडून मिळणारी मदत सुरुवातीला संथ आणि अपुरी होती; पण ब्रह्मनाळमध्ये बोट उलटल्याच्या प्रसंगाची बातमी पसरल्यानंतर मदतीचा वेग वाढल्याचं निरीक्षण संतोषनी नोंदवलं.

कुरुंदवाडच्या मोमीन मोहल्ला, शिकलगार वस्ती या भागात काम करताना राजेश आणि टीमला मास्कचा खूपच तुटवडा जाणवला. तसंच, मातीच्या घरांच्या संरक्षणासाठी लागणाऱ्या ताडपत्री आणि प्लास्टीक शीट यांचीसुद्धा कमतरता जाणवत होती.

पुराचं पाणी ओसरू लागल्यानंतर, रस्त्यांवर चिखल आणि कचरा साचला होता, असं राजेशनी सांगितलं. ड्रेनेज तुंबले होते आणि दुर्गंधी पसरली होती. कचरा आणि चिखल उचलण्यासाठी जेसीबीचा वापर करत होते. पण छोट्या-छोट्या गल्ल्यांमध्ये जेसीबी जाऊ शकत नव्हता. मग लोक या गल्ल्यांमधला कचरा मुख्य रस्त्यावर आणून टाकत होते आणि नगरपालिकेची गाडी तिथून तो उचलून घेऊन जात होती. काही ठिकाणी डिझेल टाकून कचरा जाळायचे प्रकार सुरु होते. त्यामुळं आणखी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली. याबाबत लोकांमध्ये जागृती करायची गरज राजेशना वाटते.

आपत्ती घडून गेल्यानंतर आपत्तीच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या कचऱ्याचं व्यवस्थापन हे 'सेकंड डिझास्टर' असतं, असं वैभवचं म्हणणं होतं.

पुराच्या पाण्यामुळं घरातल्या फर्निचरपासून अनेक वस्तू टाकाऊ झालेल्या आहेत. असा कचरा वर्गीकरण न करता शहराबाहेर फेकून दिला जातो. हा कचऱ्याचा पूर आहे, याचं व्यवस्थापन कसं करावं, असा प्रश्न विनीतानं उपस्थित केला.

पूरग्रस्तांना मदतीच्या भावनेनं अनेक लोकांनी अनेक प्रकारच्या वस्तू पाठवल्या आहेत. पण त्यामुळं नवीनच प्रश्न निर्माण झाल्याचं अमितनं सांगितलं. उदाहरणार्थ, काही लोकांनी मदत म्हणून आपल्या घरातले जुने कपडे पाठवले आहेत. पूरग्रस्त गावांमध्ये आणि शहरामध्ये या कपड्यांमुळं अडगळ निर्माण झाली आहे. तसंच, मोठ्या प्रमाणावर बाहेरुन धान्य व किराणा मालाचा पुरवठा झाला आहे. पुढचे काही महिने पूरग्रस्तांना या वस्तू विकत घ्याव्या लागणार नाहीत. पण आधीच पुरामुळं नुकसानीत आलेल्या सांगलीतल्या किरकोळ धान्य आणि किराणा माल विक्रेत्यांच्या उत्पन्नावर याचा मोठा विपरित परिणाम होणार आहे, असं अमितला वाटतं.

एका गावातल्या पोल्ट्रीमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं सगळ्या कोंबड्या मेल्या, आणि दुर्गंधी पसरुन शेजारच्या गावातले लोक आजारी पडले आहेत. हे अप्रत्यक्ष पूरग्रस्त म्हणावे लागतील, असं वैभवला वाटतं. शिवाय, नुकसान भरपाईची वेळ येईल तेव्हा स्थलांतरित मजूर, पारधी वस्ती, झोपडपट्टी, वीटभट्टी, अशा ठिकाणी विशेष लक्ष द्यायची गरज आहे, असंही मत व्यक्त केलं. या लोकांना कसलीही मदत मिळाली नाही, त्यांच्याकडं कागदपत्रं नाहीत, ते स्थानिक रहिवासी नाहीत, त्यांच्या नुकसानीचा पंचनामा नाही, की शासनाकडे त्यांचा कसलाही डेटादेखील नाही.

तात्पुरत्या आसऱ्यासाठी उभारलेल्या छावण्यांमधून लोक आता आपापल्या घरी परत जात आहेत. आता त्यांची घरं पुन्हा उभी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदतीची गरज असल्याचं अमितनं आवर्जून सांगितलं.

सोशल मिडीयावर लोकांनी स्वतःच बनवून फॉरवर्ड केलेले खूप मेसेज फिरत राहतात. पण प्रशासनाकडून अधिकृत मेसेज प्रसारित केले जावेत, अशी अपेक्षा अमितनं व्यक्त केली. उदाहरणार्थ, कोणत्या आपत्तीमध्ये कोणते रोग होऊ शकतात, याबद्दल माहिती मिळाली तर, पूरग्रस्त आणि मदतकार्य करणाऱ्यांना योग्य ती खबरदारी घेता येईल.

पुरासारखी आपत्ती घडून गेल्यावर, बाहेरच्या उत्साही आणि उत्सुक लोकांनी 'डिझास्टर टुरिझम' टाळलं पाहिजे, असं तन्मयला वाटतं. पूरग्रस्त परिसराचे आणि लोकांचे फोटो काढून फॉरवर्ड करणं, तसंच स्वतः शहानिशा न करता, येईल तो मेसेज सोशल मिडीयावर फॉरवर्ड करत राहणं, या सगळ्यामध्ये संयम राखला पाहिजे, असं मत तन्मयनं व्यक्त केलं.

यावर उपाय म्हणून, सोशल मिडीयावर आपत्तीबद्दल किंवा मदतीसाठी आवाहन करणारा मेसेज पाठवताना त्यामध्ये तारीख टाकावी, तसंच ही मदत जास्तीत जास्त कधीपर्यंत अपेक्षित आहे हेसुद्धा लिहावं, अशी सूचना अनिकेतनं केली. जेणेकरुन अनिश्चित काळासाठी असे मेसेज फिरत राहणार नाहीत.

मदतीचा पुरवठा होत असताना, पूरग्रस्त भागाचं सातत्यपूर्ण विश्लेषण आवश्यक असल्याचं अनिकेतनं नमूद केलं. उदाहरणार्थ, शुद्ध पिण्याच्या पाण्याचे टँकर बाहेरुन पाठवले जात असताना, प्रत्यक्ष पूरग्रस्त भागातले लोक मात्र हापशातून मिळणारं दूषित पाणी पिण्यासाठी वापरत होते. त्यांच्यापर्यंत तातडीनं पाणी शुद्ध करणारं मेडीक्लोर पोहोचवण्याची गरज होती.

याशिवाय, पूरग्रस्त भागात घरानुसार डेटा कलेक्शन करणं आणि त्याचं अनॅलिसिस करणं, हे पुनर्वसनाच्या दृष्टीनं खूपच महत्त्वाचं आहे असं अनिकेतला वाटतं. कायमस्वरुपी पुनर्वसन होईपर्यंतच्या काळात तात्पुरता निवारा उपलब्ध करणं, गरजेच्या वस्तू पोहोचवणं आवश्यक आहे. या सर्व कामात डॉक्टर स्वयंसेवकांची खूप गरज जाणवत असल्याचंही अनिकेतनं नमूद केलं.

कॅम्पमधल्या आणि कॅम्पमधून पुन्हा आपल्या घरी जात असलेल्या लोकांचं समुपदेशन करणंही महत्त्वाचं आहे, असं वैभवला वाटतं. आपल्या घरांचं, वस्तूंचं, जनावरांचं, आणि माणसांचं नुकसान सहन करायला त्यांना मानसिक आधाराची गरज पडणार आहे.

कुठल्याही आपत्तीच्या वेळी, 'मला मदत करायची आहे', या भावनेपेक्षा 'समोरच्याला काय गरज आहे', हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे असं राजेशला वाटतं. तरच योग्य वेळी योग्य मदत मिळणं शक्य होऊ शकेल.

संतोषच्या मते, आपत्ती व्यवस्थापनाचं काम करु इच्छिणाऱ्या संस्थांचं शासनानं प्रशिक्षण करावं, नियमित काळानं त्यांची तयारी तपासण्यासाठी मॉक ड्रील घ्यावं. आपत्तीच्या वेळी फक्त प्रशिक्षित संस्थाच त्या ठिकाणी काम करतील, याची शासनानं जबाबदारी घ्यावी. बाकीच्या व्यक्ती आणि संस्थांनी या प्रशिक्षित संस्थांच्या कामात सहभाग घ्यावा, जेणेकरुन जिल्हापातळीवर मदतीचं नियोजन आणि व्यवस्थापन करता येईल. आपत्तीच्या वेळी काम करणाऱ्या संस्थांनी आपली एक टीम आपत्तीच्या जागेवर थांबवावी, तर दुसऱ्या टीमनं समन्वयाचं काम करावं, असंही संतोषनं सुचवलं.

एकूणच आपत्ती प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी आपली खूपच कमी तयारी असल्याचं मत विनीतानं व्यक्त केलं. अशा प्रसंगी, समन्वय कसा साधायचा, आपत्ती काळात कुणाकडं कुठली जबाबदारी असते, याबाबत कुणाशी संपर्क साधायचा, या गोष्टींचा सगळ्यांनीच विचार करायची गरज आहे, असं विनीताला वाटतं.

आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण, आणि संस्था व शासन यांच्यात समन्वयाची गरज असल्याचं मत सर्वच सहभागी कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं.

२१/०८/२०१९ पुणे

- मंदार शिंदे ९८२२४०१२४६


Share/Bookmark