ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Monday, September 21, 2015

जाणीव

आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी लाखो रुपये खर्चून त्यांना शिक्षण देणा-या पालकांनी, विशेषतः मातांनी सर्व मुलांना लहानपणापासूनच स्वयंपाकघरातल्या कामाचीही सवय लावावी. यामुळे मोठेपणी ही 'पुरुष' मंडळी स्वावलंबी तर होतीलच, पण त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातल्या बायकांकडून आयत्या जेवणाची अपेक्षा करताना त्यामागच्या कष्टांची त्यांना किमान जाणीव तरी राहील.


Share/Bookmark

Wednesday, September 9, 2015

इंग्रजीचा उदो उदो...

आम्हाला इंग्रजी शिकवणारे सर म्हणायचे, "इंग्रजी बोलता आली नाही तरी चालेल पण इंग्रजी पूर्ण कळाली पाहिजे." त्यांचं म्हणणं असं होतं की, इंग्रजी शिकायला सुरु करतानाच जर इंग्रजी बोलण्यावर, म्हणजे स्पोकन इंग्लिशवर भर दिला तर भाषेच्या नियमांकडं हमखास दुर्लक्ष होतं. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीशी इंग्रजीतून बोलण्याचा प्रयत्न करता, तेव्हा समोरची व्यक्तीदेखील तुमचं बोलणं समजून घेण्याचा प्रयत्न करत असते. या प्रक्रियेमधे इंग्रजीचं व्याकरण, शब्दप्रयोग, वगैरे गोष्टींपेक्षा संदर्भासहीत मुद्द्यांकडं जास्त लक्ष दिलं जातं. एकदा का तुम्ही चुकीचे शब्दप्रयोग किंवा चुकीची वाक्यरचना करुनही तुमचं म्हणणं समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचवू शकलात, की तुम्ही त्याच चुका नेहमी-नेहमी करत राहता. अशा पद्धतीनं एक भाषा म्हणून तुम्ही इंग्रजीवर प्रभुत्व मिळवू शकत नाही, फक्त कामचलाऊ इंग्रजी बोलू व समजू शकता, जी आपल्या आजूबाजूला सर्रास आढळून येते.

आमचे सर असंही म्हणायचे, "इंग्रजी बोलण्याची तुम्हाला इतकी गडबड का? आधी ती भाषा नीट शिकून तर घ्या. इंग्रजी बोलता आलं नाही म्हणून तुमचं काम अडेल अशी परिस्थिती आपल्या देशात तरी यायची शक्यता नाही. इथं तुम्ही मातृभाषेत किंवा हिंदीत संवाद साधू शकता. अगदी परदेशातच जायचं असेल तर इंग्रजीशिवाय अडण्याची शक्यता मान्य. पण एका मराठी माणसानं दुसर्‍या मराठी माणसाशी मोडक्या-तोडक्या इंग्रजीत संवाद साधणं, यातून ना संवाद घडतो ना भाषेचं ज्ञान मिळतं."

माझा इंग्रजी शिकण्याला किंवा वापरण्याला अजिबात विरोध नाही. पण इंग्रजी भाषा म्हणून न शिकता तिला थेट मातृभाषा बनवण्याच्या प्रयत्नात आपण आपल्या स्वतःचं आणि पुढच्या पिढीचं फार मोठं नुकसान करतोय, असं मला वाटतं. अजूनही आपल्या आजूबाजूला, समाजात वावरताना अथवा कोणत्याही इंडस्ट्रीत काम करताना, इंग्रजीचं महत्त्व 'सादरीकरणाची भाषा' अर्थात 'प्रेझेंटेशन लँग्वेज' म्हणूनच असल्याचं दिसून येतं. या प्रेझेंटेशनसाठी संबंधित विषयाचं ज्ञान, अभ्यास, अनुभव, कल्पनाशक्ती, इत्यादी गोष्टी भाषेपेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत. मात्र या गोष्टी मांडण्यासाठी जी इंग्रजी भाषा वापरायची, तिच्या दडपणाखाली या मुलभूत गोष्टींकडंच दुर्लक्ष केलं जाताना दिसतं. तुमच्यापैकी बर्‍याच जणांनी हा अनुभव घेतला असेल - एखादा तांत्रिक मुद्दा मांडताना किंवा तुमच्या कामाबद्दल चर्चा करताना तुम्ही व्यवस्थित इंग्रजी बोलू शकता. पण हवा-पाण्याच्या गप्पा मारताना मात्र तुम्हाला ना इंग्रजी शब्द आठवतात, ना एक पूर्ण वाक्य इंग्रजीतून बोलता येतं. याच गोष्टीची भीती किंवा लाज वाटून अनेक जण इंग्रजीचं दडपण घेतात. पण असं का होतं, यामागचं कारण शोधण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे?

कोणतीही भाषा शिकण्यातला पहिला टप्पा असतो ऐकण्याचा. लहान मुलांच्या कानावर जी आणि जशी भाषा पडते, तसेच भाषिक संस्कार त्यांच्यावर होतात. तुम्ही 'चांगली' इंग्रजी भाषा ऐकलीच नाहीत, तर तुम्हाला चांगली इंग्रजी बोलता कशी येणार? आपण इंग्रजीच्या नावाखाली जे काही आजूबाजूला ऐकतोय, त्याला भाषा तरी म्हणावं का? हा ऐकण्याचा टप्पा तर आपण सोडूनच देतो आणि मुलांना थेट ए-बी-सी-डी गिरवायला शिकवतो. मुलं या 'ए-बी-सी-डी'चा अर्थ आणि संदर्भ आपापल्या मातृभाषेत शोधण्याचा प्रयत्न करतात, जो त्यांना कधीही सापडत नाही. आणि जी भाषा त्यांना अजून आपली वाटतच नाही, त्या भाषेत त्यांनी बोलावं अशी अपेक्षा त्यांच्याकडून केली जाते. इथूनच इंग्रजीचं दडपण यायला सुरुवात होते. मग काही जण चुकीचं इंग्रजी रेटायचा प्रयत्न करतात आणि त्यात यशस्वी झाले की आयुष्यभर चुकीचीच भाषा रेटत राहतात. राहिलेले, कायम इंग्रजीची भीती आणि न्यूनगंड मनात घेऊन या भाषेला टाळायचा प्रयत्न करत राहतात. इंग्रजी बोलायची वेळ आली की हे रस्ता बदलून दुसरीकडंच जातात आणि समोर आलेली संधी हकनाक गमावून बसतात.

ही परिस्थिती बदलायची असेल तर आपण इंग्रजीकडं वेगळ्या दृष्टीनं बघितलं पाहिजे. इंग्रजी ही एक भाषा म्हणून शिकली आणि शिकवली गेली पाहिजे. पहिल्या दिवसापासून इंग्रजीतून बोलण्याची गडबड न करता, टप्प्याटप्प्यानं मुळाक्षरं, शब्दार्थ, वाक्यरचना, अलंकार शिकत गेलं पाहिजे. त्याच बरोबरीनं 'चांगली' इंग्रजी कानावर पडण्याची सोयदेखील केली पाहिजे. आणि एकदा या भाषेवर प्रभुत्व आलं की, यू कॅन टॉक इंग्लिश, यू कॅन वॉक इंग्लिश, यू कॅन लाफ इंग्लिश, यू कॅन रन इंग्लिश, बिकॉज इंग्लिश इज सच अ फन्नी लँग्वेज!


Share/Bookmark

Monday, September 7, 2015

...पण काळ सोकावता कामा नये!

पुण्यातल्या सातारा रोडवरच्या डी-मार्टमधे काहीतरी खरेदी करायला गेलो होतो. रविवार असल्यामुळं डी-मार्टला सकाळी-सकाळीच नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्याचं स्वरुप आलं होतं. मला पाहिजे असणारी वस्तू पटकन घेऊन सर्वांत छोटी रांग असलेल्या काउंटरवर आलो. बिल केलं. रक्कम होती ३०९. काउंटरवरच्या मुलीला पाचशेची नोट आणि वर दहा रुपये सुट्टे दिले. सुट्टे २०१ परत मिळणं अपेक्षित असताना, अगदी सिन्सियरली त्या मुलीनं शंभराच्या दोन नोटा आणि एक चॉकलेट दिलं.

सुट्ट्या पैशांच्या ऐवजी चॉकलेट मिळण्याची ही काही पहिलीच वेळ किंवा पहिलंच ठिकाण नव्हे. मला चॉकलेट खायला आवडत नाही, असंही नाही. पण म्हणतात ना - म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावता कामा नये!

डी-मार्टच्या वीसही काउंटर्सवर बिलिंगसाठी रांगा वाढत असल्यानं, काउंटरवरच्या मुलींना डिस्टर्ब करण्याऐवजी एक्झिट गेटजवळ बसलेल्या डी-मार्टच्या दुसर्‍या स्टाफ मेंबरकडं गेलो.

मीः नमस्कार, मला तुमच्या बिलिंग पद्धतीबद्दल तक्रार द्यायची आहे. कुणाशी बोलावं लागेल?
डी-मार्ट स्टाफः बोला काय तक्रार आहे?
मीः तुमच्या सगळ्या बिलिंग काउंटर्सवर एक-दोन रुपये सुट्टे देण्याऐवजी सर्रास चॉकलेट दिले जातात.
डी-मार्ट स्टाफः नाही सर, एखाद्या वेळी असं झालं असेल, पण नेहमी नाही होत...
मीः मला स्वतःला आत्ता एक रुपयाऐवजी चॉकलेट मिळालं आहे.
डी-मार्ट स्टाफः कदाचित त्या काउंटरवरची चिल्लर संपली असेल...
मीः काय सांगताय? अजून तुमचं स्टोअर उघडून दोन ताससुद्धा झाले नाहीत आणि काउंटरवरची चिल्लर संपली?
डी-मार्ट स्टाफः होऊ शकतं सर, आज रविवार आहे ना...
मीः पण ही फक्त आजची गोष्ट नाही. मी आजतागायत जितक्या वेळेला डी-मार्टमधे खरेदी केलीय, तितक्या वेळेला मला एक-दोन रुपयांऐवजी चॉकलेटच देण्यात आलेत.
डी-मार्ट स्टाफः नेहमी-नेहमी असं नाही होणार सर. आजच कदाचित झालं असेल. मार्केटमधे सुट्ट्या पैशांचं शॉर्टेजच आहे...
मीः म्हणजे डी-मार्टला मार्केटमधून सुट्टे पैसे मिळत नाहीत असं तुम्हाला म्हणायचं आहे का?
डी-मार्ट स्टाफः तसं नाही, पण कधीतरी सुट्टे पैसे संपल्यावर काउंटरवरुन चॉकलेट दिले जातात.
मीः कधीतरीच द्यायचे असतील तर ते चॉकलेट कुठं ठेवले पाहिजेत? काउंटरशेजारी एखाद्या डब्यात की थेट कॅशबॉक्समधे?
डी-मार्ट स्टाफः कॅशबॉक्समधे चॉकलेट नसतात सर...
मीः चला, तुमच्या वीस काउंटरपैकी कुठल्याही काउंटरवरचा कॅशबॉक्स उघडून बघा आणि मग मला सांगा कधीतरी द्यायचे चॉकलेट कॅशबॉक्समधे का ठेवलेत?
डी-मार्ट स्टाफः तसं नाही सर... आम्ही ठेवतो थोडे चॉकलेट कॅशबॉक्समधे, पण कस्टमरला विचारतो - 'सुट्टे पैसे हवेत की चॉकलेट?' आणि मगच चॉकलेट देतो.
मीः अच्छा? चला, तुमच्या वीसपैकी कुठल्याही एका काउंटरवर मला दाखवा, एका तरी कस्टमरला हा प्रश्न विचारला जातोय का? मला स्वतःला तर कधीही हा प्रश्न विचारण्यात आलेला नाही.
डी-मार्ट स्टाफः तुम्ही कुठल्या काउंटरवर बिल केलंत सर? मी त्या काउंटरवरच्या एक्झिक्युटीव्हशी बोलून तुमचे सुट्टे पैसे परत करायला लावतो...
मीः प्रश्न माझ्या एकट्याच्या किंवा आजच्या सुट्ट्या पैशांचा नाही. प्रॉब्लेम तुमच्या काउंटरवरच्या एक्झिक्युटीव्हचा सुद्धा नाही. प्रॉब्लेम तुमच्या सिस्टीमचा आणि ट्रेनिंगचा आहे. सुट्ट्या पैशांऐवजी कस्टमरला सर्रास चॉकलेट दिलं जाणं, ही तुमची प्रोसिजर झालीय. माझं ऑब्जेक्शन ह्या प्रोसिजरवर आहे.
डी-मार्ट स्टाफः मान्य आहे सर, पण सुट्टे पैसे नसले की आम्हाला असं करावंच लागतं.
मीः ठीक आहे, मग इथं तुम्ही ऑफिशियल बोर्ड का लावत नाही - 'सुट्टे पैसे नसल्यास आम्ही चॉकलेट्स देतो आणि घेतोसुद्धा!' असा?
डी-मार्ट स्टाफः असा बोर्ड आम्हाला नाही लावता येणार सर. पण मी तुमचा प्रॉब्लेम माझ्या सिनियर्सना सांगतो...
मीः तुम्हालाच अजून माझं म्हणणं नीट कळालेलं नाही तर तुम्ही ते दुसर्‍यांना कसं सांगणार? त्यापेक्षा मीच तुमच्या सिनियर्सना समजावून सांगतो. कुठं भेटतील ते?
डी-मार्ट स्टाफः थांबा, मी त्यांनाच इकडं बोलावून घेतो...

यानंतर त्यांनी आपल्या मोबाईलवरुन फोन लावून मॅनेजरना बोलावून घेतलं. मी पुन्हा पहिल्यापासून सगळी कहाणी सांगितली.

डी-मार्ट मॅनेजरः तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल सॉरी सर. मी आत्ताच त्या काउंटरवरच्या मुलीला बोलावून तुमचे सुट्टे पैसे परत करायला सांगतो.
मीः तुम्हाला माझं म्हणणं कळतंच नाहीये का? प्रश्न माझ्या एकट्याच्या किंवा आजच्या सुट्ट्या पैशांचा नाही. प्रॉब्लेम तुमच्या काउंटरवरच्या एक्झिक्युटीव्हचा सुद्धा नाही. प्रॉब्लेम तुमच्या सिस्टीमचा आणि ट्रेनिंगचा आहे. सुट्ट्या पैशांऐवजी कस्टमरला सर्रास चॉकलेट दिलं जाणं, ही तुमची प्रोसिजर झालीय. माझं ऑब्जेक्शन ह्या प्रोसिजरवर आहे. कस्टमरला पैशांऐवजी दिलेल्या चॉकलेटचं अकौंटींग करणं तुम्हाला पण अवघडच जात असेल ना?
डी-मार्ट मॅनेजरः नाही सर, त्यासाठी आम्ही प्रत्येक बिलिंग काउंटरवर मोजून चॉकलेट्स देतो आणि कॅशचा हिशोब करताना शिल्लक चॉकलेट्सचं ऑडीट करतो.
मीः छान! म्हणजे डी-मार्टला रिझर्व्ह बँकेच्या रुपयाबरोबरच चॉकलेटची करन्सीसुद्धा मान्य आहे तर...
डी-मार्ट मॅनेजरः होय, सुट्ट्या पैशांच्या शॉर्टेजमुळंच आम्ही ही पद्धत वापरतो...
मीः ठीक आहे, मग तुम्ही कस्टमरला चॉकलेटच्या करन्सीमधे पेमेंट करता तसं कस्टमरनी तुम्हाला चॉकलेटच्या करन्सीमधे पेमेंट केलेलं चालेल का?
डी-मार्ट मॅनेजरः हो हो, नक्कीच चालेल. मी तुम्हाला पैशांऐवजी चॉकलेट देत असेन तर मला तुमच्याकडून चॉकलेट स्विकारलंच पाहिजे...
मीः मग तुम्ही तसा बोर्ड इथं लावू शकता का? - 'सुट्टे पैसे नसल्यास आम्ही चॉकलेट्स देतो आणि घेतोसुद्धा!'
डी-मार्ट मॅनेजरः बोर्डबद्दल मला माझ्या सिनियर्सना विचारावं लागेल, पण तुम्ही पुढच्या वेळी काउंटरवर सुट्ट्या पैशांऐवजी चॉकलेट्स दिली तर आम्हाला ती घ्यावीच लागतील. फक्त कुठलीही चॉकलेट्स अलाऊ करण्याऐवजी आम्ही ठराविकच चॉकलेट ह्यासाठी वापरतो.
मीः म्हणजे कुठली चॉकलेट्स?
डी-मार्ट मॅनेजरः सध्या तरी आम्ही 'फलेरो'ची चॉकलेट्स वापरतोय... आणि ती सुद्धा कस्टमरला विचारुनच देतो.
मीः ठीक आहे, मग पुढच्या वेळेपासून मी सुट्टे पैसे नसतील तर डी-मार्टच्या काउंटरवर 'फलेरो'ची चॉकलेट्स देत जाईन. आणि तुम्ही तसा अधिकृत बोर्ड इथं लावत नाही तोपर्यंत इतर कस्टमर्सच्या माहितीसाठी मी स्वतः ह्या करन्सीचा प्रचार करेन. पण तुमच्या कुठल्याही काउंटरवर 'सुट्ट्या पैशांऐवजी चॉकलेट्स चालतील का?' असा प्रश्न विचारला जात नाही, त्याचं काय?
डी-मार्ट मॅनेजरः त्याबद्दलच्या सूचना मी ताबडतोब सगळ्या काउंटर्सवर देतो...

तर, यापुढं डी-मार्टमधे (आणि शक्य झाल्यास इतरही ठिकाणी), तुम्हाला न विचारता सुट्ट्या पैशांऐवजी चॉकलेट्स मिळाली तर तुम्ही त्याची तक्रार संबंधित अधिकार्‍यांकडं करुन तुमचे सुट्टे पैसे परत मिळवू शकता.

एनएच-फोरवरच्या सगळ्या टोल नाक्यांवर 'सुट्ट्या पैशांऐवजी चॉकलेट्स देऊ नयेत' असे बोर्ड लावण्यात आले आहेत. डी-मार्टसारख्या स्टोअर्सना ही अल्टरनेट करन्सी वापरायची एवढीच हौस असेल तर, आपणही जागरुक ग्राहक बनून त्यांना मदत केली पाहिजे. यापुढं तुम्हाला मिळालेली चॉकलेट्स साठवून ठेवा आणि पुढच्या वेळी तीच परत देऊन पैसे वाचवा!

हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवून, सर्वसामान्य ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यास मदत करा...


Share/Bookmark

Sunday, July 26, 2015

परप्रांतीय मुलांचा भाषेचा प्रश्न हाताळताना...

आम्ही पुण्यात शिक्षणहक्क कायद्याच्या प्रसारासाठी 'एव्हरी चाइल्ड काउंट्स' हे नागरीक अभियान चालवतो. यामधे ६ ते १४ वयोगटातील शालाबाह्य मुलं शोधून त्यांना जवळच्या म.न.पा. / जि.प. शाळांमधे प्रवेश घेण्यास मदत केली जाते. संपूर्ण पुण्यात हे अभियान राबवण्यासाठी स्वयंसेवक म्हणून विविध क्षेत्रातले नागरीक सहभागी होतात. शालाबाह्य मुलं शोधताना पुण्यातल्या अधिकृत झोपडपट्ट्यांबरोबरच नव्यानं वसवल्या जाणार्‍या वस्त्या आणि बांधकाम साईट्सवरच्या मजूर-वस्त्यांचं सर्वेक्षण केलं जातं. पुण्यातल्या बांधकामांवर काम करणारे बहुतांश मजूर कर्नाटक, राजस्थान, बिहार, आंध्र प्रदेश, अशा परराज्यांतून आलेले आहेत. त्यांची मुलं बर्‍याचदा शालाबाह्यच असतात. या मुलांच्या पालकांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देणं, शाळेत जाण्याचे फायदे समजावणं, इत्यादी गोष्टी स्वयंसेवक पार पाडतात. पण शिक्षणासाठी तयार झालेल्या मुलांना जवळच्या म.न.पा. / जि.प. शाळांमधेच प्रवेश घेऊन दिला जातो आणि या शाळा मराठी माध्यमाच्या आहेत. अशा वेळी, मुलांना मराठी शाळेत दाखल करताना पालकांकडून काही ठराविक प्रश्न विचारले जातात -

- शिक्षकांची मराठी भाषा मुलांना समजणार का?
- आम्ही काम संपल्यावर आमच्या गावीच जाणार आहोत, तर आत्ता मराठी माध्यमात शिकून काय फायदा?
- आमची मातृभाषा तेलगु, तमिळ, कन्नड, बंगाली, हिंदी आहे, तर आमच्या मुलांनी मराठी का शिकायचं?

अशा प्रश्नांना उत्तर देणं स्वयंसेवकांना बर्‍याचदा अवघड जातं. आमच्या अनुभवानुसार आम्ही पुढीलप्रमाणे त्यांची उत्तरं देतो -

- शाळेत गेल्यानं प्रत्येक मूल ‘कसं शिकायचं’ हे शिकू लागतं. त्याच्या मनात शिक्षणाविषयी योग्य वयात गोडी निर्माण होते, मग माध्यम कोणतंही असो. जरी त्यानंतर मूल आपल्या मूळगावी गेलं, तरी तिथल्या शाळेत मातृभाषेतून सहज शिक्षण घेऊ शकतं.
- सहा-सात वर्षांच्या कोणत्याही मुला/मुलीला नवीन भाषा शिकणं अवघड नसतं. वेगळ्या भाषेची भीती लहान मुलांपेक्षा मोठ्यांच्याच मनात जास्त असते. वास्तविक, सहा-सात वर्षांच्या मुलाची मातृभाषा (लिपी) शिकण्याची प्रक्रियादेखील याच वयात सुरु असते. त्या भाषेबरोबरच मराठीदेखील ते पटकन शिकू शकतं.
- जर संपूर्ण कुटुंब कामानिमित्त चार-पाच वर्षांसाठी पुण्यात राहणार असेल, तर दैनंदिन व्यवहारात त्यांना मराठी भाषेचा उपयोगच होईल. स्थानिक भाषा येत असल्यामुळं मुलांचा आणि एकूणच कुटुंबाचा रहिवास सुखकारक होईल.
- मराठी आणि हिंदीची लिपी एकच म्हणजे देवनागरी आहे. त्यामुळं मुलांना मराठीबरोबरच हिंदी वाचन आणि लेखन सुलभ होईल. हिंदी ही संपूर्ण भारतात वापरली जाणारी भाषा असल्यामुळं, मराठी भाषा शिकणं कधीच वाया जाणार नाही.

शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणताना भाषाविषयक प्रश्नांवर आम्ही शोधलेली ही उत्तरं बहुतांश पालकांना पटतात. पुण्याबरोबरच नाशिकमधेही असाच एक अनुभव आला. नाशिकरोडला गेल्या तीन वर्षांपासून एक मोठी कन्स्ट्रक्शन साईट सुरु आहे. बांधकाम करणारे सर्व मजूर मध्य प्रदेशातून आले असून त्यांची मुलं जवळच्या नाशिक म.न.पा. शाळेत जातात. ही शाळा मराठी माध्यमाची आहे. तीन वर्षांपूर्वी पहिलीत प्रवेश घेतलेली मुलं आता चौथीत आहेत, त्यांना शाळेत जायला आवडतं, आणि त्यांची शैक्षणिक प्रगतीदेखील चांगली आहे. आता ही मुलं कधीही आपल्या मूळगावी परतली तरी त्यांचं शिक्षण नक्कीच चालू राहील. भाषा ही शिक्षण घेण्यातली अडचण बनू शकत नाही...


Share/Bookmark

Saturday, June 6, 2015

सिव्हिक सेन्स?

पुण्यातल्या एका मॉलच्या पार्किंगमधला सीन. एक माणूस मॉलमधून खरेदी केलेल्या सामानाची ट्रॉली ढकलत येतो. मागून येणार्‍या बाईंच्या हातात एक तशाच सामानाचं बास्केट, दुसर्‍या हाताशी लहान मुलगी. आपल्या कारची डिकी उघडून माणूस सामान आत भरतो. रिकामी ट्रॉली शेजारी पार्क केलेल्या कारसमोर सरकवतो. मग बाईंच्या हातातलं बास्केट घेऊन सामान डिकीत ओततो. रिकामं बास्केट शेजारच्या दुसर्‍या कारसमोर ठेवतो. डिकी बंद. महाराज, महाराणी, आणि राजकन्या गाडीत बसतात. गाडी पार्किंगमधून बाहेर येते, झूऽऽम्म निघून जाते. गाडीचा नंबर जीजे-१९ असा काहीतरी असतो. (त्यानं काही विशेष फरक पडत नाही म्हणा... म्हणजे मला तरी तसं वाटतं... म्हणजे काही विशेष फरक पडत नाही असं... पण 'द डेव्हिल इज इन द डिटेल्स'... असो, तर) त्या शेजारी पार्क केलेल्या दोन कारच्या मालकांनी काय करायचं? आणि त्या छोट्या राजकन्येनं काय आदर्श घ्यायचा आई-बापाकडून? 'सिव्हिक सेन्स' नावाची गोष्ट कधी शिकणार आपण?


Share/Bookmark

Sunday, May 31, 2015

पल दो पल का साथ हमारा...

नजरों के शोख नजारे, होठों के गर्म पैमाने
है आज अपनी मेहफिल में, कल क्या हो कोई क्या जाने
ये पल खुशी की जन्नत है, इस पल में जी ले दीवाने...
आज की खुशियाँ एक हकीकत, कल की खुशियाँ अफसाने हैं...
पल दो पल का साथ हमारा, पल दो पल के याराने हैं
इस मंजिल पर मिलने वाले, उस मंजिल पर खो जाने हैं...

'पल दो पल का साथ हमारा' हे साहिर लुधियानवी यांच्या गाजलेल्या गीतांपैकी एक. वर्ष होतं १९८०, चित्रपट होता 'द बर्निंग ट्रेन'. याच वर्षी, हे गीत लिहिणारे साहिर आणि हे गीत गाणारे मोहम्मद रफी या दोघांनीही तीन महिन्यांच्या अंतरानं अवेळी एक्झिट घेतली. (मोहम्मद रफी - जुलै १९८० आणि साहिर लुधियानवी - ऑक्टोबर १९८०)

हे गाणं लिहिताना आणि गाताना दोघांना समजलं असेल का की 'इस मंजिल पर मिलने वाले, उस मंजिल पर खो जाने हैं...'

- मंदार शिंदे ९८२२४०१२४६


Share/Bookmark

Saturday, May 23, 2015

मोदी सरकारच्या तथाकथित आंतरराष्ट्रीय यशामागील सत्य

फेसबुक, व्हॉट्सॲप, आणि इतर अनेक वेबसाईट्सवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वारेमाप परदेश दौर्‍यांचं समर्थन करणारा हा मेसेज फिरतोय. 'खोटं बोल, पण रेटून बोल' या न्यायानं काही असंबंध तर काही धादांत खोटे संदर्भ जोडून हे मुद्दे सामान्य जनतेच्या गळी उतरवायचे प्रयत्न सुरु आहेत. काय आहे या मुद्द्यांमागचं सत्य? जाणून घ्यायचंय? मग वाचा खालची मुद्देसूद उत्तरं...

मुद्दा १. कच्च्या तेलावर "ON Time delivery premium charges" न लावण्याचा भारताचा प्रस्ताव सौदी अरेबियाने मान्य केला आहे. साधारणपणे, कपडे इस्त्री करताना धोबी आपल्याला जे urgent म्हणून charges लावतो तोच या  ON Time delivery premium charges चा अर्थ आहे.  यातून काही हजार कोटींची बचत नक्कीच होईल ! आणि पर्यायाने पेट्रोल ,डिझेल चे भाव कमी होतील.
सत्य काय आहे? - 'एशियन प्रिमियम' नावाचा अतिरिक्त भार तेल उत्पादक कंपन्यांनी रद्द करावा यासाठी मोदी सरकार 'प्रयत्नशील' आहे. (http://www.hindustantimes.com/business-news/india-in-talks-to-save-rs-18k-cr-on-oil-imports/article1-1288411.aspx) असे प्रयत्न याआधीचं काँग्रेस सरकारदेखील करत होतं. परंतु, हा अतिरिक्त भार रद्द झाला किंवा 'ऑन टाईम डिलीव्हरी प्रिमियम चार्जेस' लावणार नाही असं सौदी अरेबियानं मान्य केलं अशी कुठलीही बातमी जगातल्या कुठल्याही वृत्तपत्रानं, टीव्ही चॅनेलनं, किंवा वेबसाईटनं अजून तरी दिलेली नाही. उलट, सौदी अरेबियानं दर वाढवल्याचीच बातमी उपलब्ध आहे - (http://www.livemint.com/Politics/lXDInLANFYEFamzTKvQGyH/Saudis-raise-crude-oil-pricing-to-Asia-on-signs-of-demand-gr.html)

मुद्दा २. भूतान मध्ये भारत ४ अजस्त्र धरणे आणि  जलविद्युत प्रकल्प बांधेल. या प्रकल्पातून उत्पादित होणाऱ्या विद्युत उर्जेचा सिंहाचा वाटा भारताला मिळेल.
सत्य काय आहे? - पॉवर-टेक्नॉलॉजी डॉट कॉम या वेबसाईटनुसार, "मांग्डेछू हा रॉयल गव्हर्मेंट ऑफ भूतानच्या २०२० पर्यंत १०,००० मेगावॅट हायड्रोपॉवर उत्पादनासाठी भारत सरकारच्या सहाय्याने आखण्यात आलेल्या दहा जलविद्युत प्रकल्पांपैकी एक आहे. यासंदर्भातील भारत आणि भूतान या देशांदरम्यानच्या करारावर एप्रिल २०१० मधे सह्या करण्यात आल्या." (http://www.power-technology.com/projects/mangdechhu-hydroelectric-project-trongsa-dzongkhag) याच बातमीत असंही म्हटलंय की, "सदर जलविद्युत प्रकल्पातून निर्माण होणारी बहुतांश ऊर्जा भूतानची अंतर्गत गरज भागवण्यासाठी वापरली जाईल आणि शिल्लक ऊर्जा भारताला निर्यात केली जाईल." आता यामधे मोदी सरकारचं कर्तृत्व काय आणि सिंहाचा वाटा म्हणजे नक्की काय? (http://www.thehindu.com/todays-paper/india-bhutan-to-double-target-for-power-projects/article1259938.ece)

मुद्दा ३. नेपाळमध्ये भारत जगातला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प उभारेल. या प्रकल्पातून उत्पादित होणाऱ्या विद्युत उर्जेचा सिंहाचा वाटा भारताला मिळेल.
सत्य काय आहे? - नेपाळ सरकारनं जीएमआर या भारतीय कंपनीला ९०० मेगावॅटचा अप्पर कर्नाली जलविद्युत प्रकल्प उभारण्याची परवानगी २००८ साली दिली होती. नेपाळमधल्या राजकीय उलथापालथीमुळं हा प्रकल्प लांबणीवर पडत गेला आणि मोदी सरकारच्या नशिबानं सध्याच्या नेपाळी मंत्रिमंडळाकडून त्याला हिरवा कंदील मिळाला. (http://in.reuters.com/article/2014/09/18/nepal-india-electricity-idUSL3N0RJ53720140918) आणखी सत्य शोधायचं म्हटलं तर, २०२१ मधे पूर्ण होणार्‍या या जीएमआर प्रकल्पातून १२ टक्के वीज नेपाळला मोफत पुरवली जाईल, उरलेली वीज भारताला पुरवली जाईल, आणि या प्रकल्पात नेपाळ २७ टक्क्यांचा भागीदार असेल.

मुद्दा ४. व्हियेतनाम सोबत राजकीय संबंध मजबूत केल्यामुळे व्हियेतनामच्या समुद्रातील तेल उत्त्खाननाचे कंत्राट ONGC  ला मिळणार आहे. चीनशी संबंध बिघडतील या भीतीमुळे आधीचे  सरकार हे कंत्राट घ्यायला घाबरत होते.
सत्य काय आहे? - मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी एप्रिल २०१४ मधे इकॉनॉमिक टाइम्सनं दिलेल्या बातमीनुसार, व्हिएतनामनं ओएनजीसी विदेश (ओव्हीएल) या भारतीय कंपनीला नोव्हेंबर २०१३ मधे पाच आणि एप्रिल २०१४ मधे दोन, अशी एकूण सात कंत्राटं आधीच देऊ केली होती. ओव्हीएल १९८८ पासून व्हिएतनाममधे कार्यरत असून, कंपनीची व्हिएतनाममधली गुंतवणूक ५० कोटी अमेरिकन डॉलर्सहून जास्त झाली आहे. (http://articles.economictimes.indiatimes.com/2014-04-30/news/49523412_1_blocks-127-ovl-petrovietnam)

मुद्दा ५. अमेरिकेचे निर्बंध झुगारून इराण आता भारताला कच्चॆ तेल विकणार आहे आणि ते सुद्धा भारतीय रुपयांमध्ये ! याचाच अर्थ देशातील परकीय गंगाजळीला धक्का पोहोचणार नाही. इराण मधल्या 'चाबहार' बंदराचे बांधकाम भारत करणार आहे जिथे भारतीय नौकांना खास प्रवेशद्वार असेल.
सत्य काय आहे? - जुलै २०१३ मधे टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या बातमीनुसार, अमेरिका व इतर पाश्चात्त्य देशांनी आर्थिक निर्बंध लादल्यानं इराण भारताला विकलेल्या तेलाची किंमत पूर्णपणे रुपयांमधे स्विकारायला तेव्हाच तयार झालं होतं. (http://timesofindia.indiatimes.com/india/Iran-agrees-to-take-all-oil-payments-from-India-in-rupees/articleshow/21067897.cms) 'चाबहार' बंदर बांधण्यासाठी इराणला भारतानं मदत केली होती, पण ती मोदी सत्तेत आल्यावर नव्हे, तर १९९० च्या दशकात! अमेरिका आणि युरोपियन राष्ट्रांचे निर्बंध झुगारुन भारतानं २०११-१२ मधे युद्धग्रस्त अफगाणिस्तानला मदत म्हणून एक लाख मेट्रीक टन गहू याच 'चाबहार' बंदरातून निर्यात केला होता. (http://www.telegraph.co.uk/news/worldnews/middleeast/iran/9115192/India-begins-use-of-Chabahar-port-in-Iran-despite-international-pressure.html)

मुद्दा ६. ऑसट्रेलिया भेटीदरम्यान पंतप्रधान टोनी अबोट यांनी भारताला युरेनियम पुरवठा करण्याचे मान्य केले  आहे.  ऑसट्रेलिया हा जगातील सगळ्यात मोठा युरेनियम उत्पादक देश आहे.
सत्य काय आहे? - 'सिडनी मॉर्निंग हेराल्ड' या ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रानं मार्च २०१३ मधे दिलेल्या बातमीनुसार, ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड आणि भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यादरम्यान युरेनियम खरेदी-विक्रीसंदर्भात चर्चा १८ मार्च २०१३ रोजी सुरु होत असून, प्रत्यक्ष करारावर सह्या होण्यास व विक्री सुरु होण्यास दोन वर्षांचा कालावधी लागेल. (http://www.smh.com.au/world/australia-and-india-to-start-uranium-sale-talks-20130306-2fmoq.html) आता २०१३ नंतर दोन वर्षांनी मनमोहन सिंग जाऊन नरेंद्र मोदी आले तर मूळ कराराचं श्रेय कुणाला मिळणार सांगा बरं!

मुद्दा ७. चीन भारतात २० बिलियन $ ची गुंतवणूक करणार आहे (१,४०,००० कोटी रुपये !)
सत्य काय आहे? - चीनमधील भारतीय दूतावासाच्या अधिकृत वेबसाईटनुसार, चीनची भारतातील प्रत्यक्ष गुंतवणूक डिसेंबर २०११ पर्यंत ५७५ मिलियन डॉलर्स आणि ऑक्टोबर २०१२ पर्यंत ६५७ मिलियन डॉलर्स इतकी होती. (http://www.indianembassy.org.cn/DynamicContent.aspx?MenuId=3&SubMenuId=0) भारतातल्या २० बिलियन डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा प्रत्यक्षात कधी येईल माहिती नाही, पण त्याबरोबरच चीननं पाकिस्तानात ४६ बिलियन डॉलर्सच्या गुंतवणुकीचीसुद्धा घोषणा केलेली तुम्हाला माहिती असेलच. (https://www.wsws.org/en/articles/2015/04/28/paki-a28.html)

मुद्दा ८. भारतीय सरंक्षण व्यवस्थेने Pentagaon  सारख्या संस्थेसोबत करार केला आहे. पाकिस्तानसारखे देश आता भारतावर अतिरेकी हल्ले करण्याआधी दहा वेळा विचार करतील.
सत्य काय आहे? - पेन्टॅगॉन हे अमेरिकेच्या संरक्षण विभागाचं मुख्यालय असून, ११ सप्टेंबर २००१ रोजी दहशतवाद्यांनी अमेरिकन एअरलाईन्सचं एक विमान हायजॅक करुन थेट पेन्टॅगॉनच्या पश्चिम बाजूला धडकवलं होतं. या आत्मघातकी हल्ल्यात १८९ माणसं मेली होती. (http://en.wikipedia.org/wiki/The_Pentagon) शिवाय, या मुद्द्यामधे म्हटलेला करार म्हणजे रुटीन ॲग्रीमेंट असून, आतापर्यंत पेन्टॅगॉननं जगातल्या अनेक देशांसोबत असे शेकडो करार केले आहेत. परंतु या करारांचा अतिरेक्यांवर काही परीणाम झालेला अजून तरी ऐकीवात नाही. (http://articles.economictimes.indiatimes.com/2015-05-13/news/62124140_1_agreements-indian-embassy-defence)

मुद्दा ९. जपान भारतात ३० बिलियन $ ची गुंतवणूक करणार आहे (२,००,००० कोटी रुपये !). ही गुंतवणूक दिल्ली - मुंबई औद्योगिक कोरेडोर मध्ये करण्यात येणार आहे.
सत्य काय आहे? - जपानमधील भारतीय दूतावासाच्या अधिकृत वेबसाईटनुसार, नोव्हेंबर २००४ मधे जपानचे पंतप्रधान जुनिचिरो कोइझुमी आणि भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भारत-जपान आर्थिक संबंध दृढ करण्यासाठी जॉइंट स्टडी ग्रुपची स्थापना केली. २००६ मधे आलेल्या या ग्रुपच्या अहवालानुसार २००७ साली आर्थिक भागीदारीचा करार करण्यात आला, जो चर्चेच्या १४ फेर्‍यांनंतर सप्टेंबर २०१० मधे अंमलात आणला गेला. २०११ मधे या करारावर सह्या करण्यात आल्या. डिसेंबर २००६ मधे जपानच्या भेटीवर गेलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सही केलेल्या 'एमओयु'च्या आधारे ऑगस्ट २००७ मधे 'दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर'ला मान्यता मिळाली. यासाठीचं विशेष विकास महामंडळ जानेवारी २००८ मधे स्थापन करण्यात आलं. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी ४.५ बिलियन डॉलर्स गुंतवणुकीची घोषणा तर जपान सरकारनं २०११ मधेच केली होती. या प्रकल्पासाठी जपान-इंडीया टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली असून, या टास्क फोर्सची दहावी बैठक ऑक्टोबर २०१२ मधे टोकियोत झाल्याचं या अधिकृत वेबसाईटवर म्हटलं आहे. (http://www.indembassy-tokyo.gov.in/india_japan_economic_relations.html) आता यात मोदी सरकारचं कर्तृत्व काय असेल बरं?

मुद्दा १०. पूर्वोत्तर सीमारेषा रस्ता बांधण्याचे भारत-चीन ने मान्य केले आहे. मागील सरकारच्या काळात कितीतरी वर्ष हा प्रस्ताव्व प्रलंबित होता. आणि यासाठीच चीन ने भारतातील गुंतवणूक थांबवली होती.
सत्य काय आहे? - भारत सरकारच्या ईशान्य भाग विकास मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटनुसार, या रस्त्याचं काम सप्टेंबर २००५ पासूनच सुरु आहे. (http://www.mdoner.gov.in/content/sardp-ne) परंतु, खंडणी, अपहरण, आणि इतर दहशतवादी कारवायांमुळं हे काम सतत बंद पडत आलेलं आहे. (http://www.business-standard.com/article/companies/india-s-north-east-risky-terrain-for-road-construction-113112000828_1.html) मात्र या रस्त्यामुळं चीननं भारतातील गुंतवणूक थांबवल्याचा मुद्दा असंबंध आहे.

मुद्दा ११. भारत सरकारने येमेन मधून ४५००+ भारतीय लोकांना सुखरूप मायदेशी परत आणले. शिवाय ४१ देशातील लोकांना मायदेशी परत नेण्यास मदत केली. सौदी अरेबिया ने येमेन वर हा हल्ला केला होता आणि येमेन ने "नो फ्लाय झोन" घोषित केला होता. श्री नरेंद्र मोदी यांनी स्वत: सौदी अरेबिया चे राजे सुलेमान यांना दूरध्वनी करून भारतीय विमान सौदी अरेबिया च्या हदीत येऊ देण्याची मागणी केली. सुलेमान यांनी ती मान्य केली. अजित डोवल, सुषमा स्वराज आणि व्ही के सिंग यांनी या प्रकियेत महत्वाचा हातभार लावला. आणि हो ...४५०० भारतीयांपैकी फार कमी हिंदू होते बंर का !!!
सत्य काय आहे? - १९९० साली इराक-कुवेत युद्धातून एक लाखाहून अधिक भारतीयांची सुटका तेव्हाच्या सरकारनं आणि लष्करानं केली होती. २००६ मधे लेबनन युद्धातून २,२८० लोकांची 'ऑपरेशन सुकून' अंतर्गत सुटका करण्यात आली, ज्यामधे १,७६४ भारतीय, ११२ श्रीलंकन, ६४ नेपाळी, आणि इतर देशांतील नागरिकांचा समावेश होता. २०११ च्या लिबियन युद्धातून 'ऑपरेशन सेफ होमकमिंग' अंतर्गत १५,००० पेक्षा जास्त भारतीयांची सुटका करण्यात आली. (http://en.wikipedia.org/wiki/Operation_Safe_Homecoming आणि http://en.wikipedia.org/wiki/Operation_Sukoon) या यशस्वी कामगिरीचे श्रेय त्यावेळच्या सरकार आणि मंत्र्यांनी न लाटता, प्रत्यक्ष जमिनीवर उतरुन काम करणार्‍या लष्कराला देण्यात आलं होतं.

मुद्दा १२. श्री नरेंद्र मोदींच्या प्रयत्नामुळे फ्रांस ने भारताला ३६ लढाऊ विमाने देण्याचे मान्य केले. ह्या सौद्यामध्ये कोणीही मध्यस्थ नव्हता.
सत्य काय आहे? - जानेवारी २०१५ मधे एका मुलाखतीत, संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी फ्रान्सच्या दसॉल्ट कंपनीच्या राफेल लढाऊ विमानांऐवजी आपल्या हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडनं बनवलेल्या सुखोई-३०एमकेआय लढाऊ विमानांचा पर्याय सुचवला होता. दसॉल्ट कंपनीची राफेल विमानं प्रचंड महाग असून, भारतीय वायु सेनेच्या सर्व अटी त्यांनी पाळलेल्या नाहीत. त्यामुळं गेल्या तीन वर्षांपासून ही कंपनी भारताला १२६ राफेल लढाऊ विमानं विकण्यासाठी प्रयत्न करत असूनही संरक्षण मंत्रालय आणि भारतीय वायु सेनेनं हा व्यवहार थोपवून धरला होता. अशात नरेंद्र मोदींनी फ्रान्सला जाऊन त्या १२६ पैकी ३६ विमानं खरेदी केली आणि 'मेक इन इंडीया'च्या संकल्पनेलाही हरताळ फासला. (http://www.business-standard.com/article/economy-policy/parrikar-outlines-alternatives-to-rafale-115011300014_1.html)

मुद्दा १३. क्यानडा भेटीदरम्यान भारतीय न्युक्लीयर प्लांट साठी ५ वर्षे य़ुरेनिउम पुरवठा करण्याचे क्यानडा ने मान्य केले.
सत्य काय आहे? - भारत-कॅनडा नागरी अणुसहयोग करारावर २०१० मधेच सह्या झाल्या होत्या, पण कॅनडानं भारताला युरेनियमची प्रत्यक्ष विक्री करण्याचा करार २०१३ मधे झाला. सप्टेंबर २०१३ मधे परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांच्या कॅनडा भेटीदरम्यान हा करार अंमलात आला. (http://www.stratpost.com/canada-to-supply-uranium-to-india)

मुद्दा १४. फ्रांस भारतामध्ये २ बिलियन युरो ची गुंतवणूक करणार आहे.
सत्य काय आहे? - अमूक कोटी डॉलर्सची गुंतवणूक आणि तमूक लाख युरोंची गुंतवणूक हे दोन दिवसांच्या भेटीत ठरणारे निर्णय नसून त्यामागे कित्येक वर्षांची आणि आधीच्या सरकारांची मेहनत असते. तरीसुद्धा नरेंद्र मोदींना प्रसिद्धीलोलुपतेचं श्रेय द्यावंच लागेल, कारण 'व्हायब्रंट गुजरात'च्या नावाखाली त्यांनी 'प्रॉमिस्ड इन्व्हेस्टमेंट्स'चा नवा फंडा राजकारणात आणला. 'व्हायब्रंट गुजरात' अंतर्गत २००३ ते २०१५ पर्यंत मोदींनी १,४८९ बिलियन डॉलर्सच्या गुंतवणुकींसाठी जगभरातल्या कंपन्यांसोबत करार केले आहेत. एका संशोधनपर लेखानुसार, यापैकी फक्त ९ टक्केच रक्कम प्रत्यक्ष गुंतवण्यात आली आहे. (http://scroll.in/article/700301/if-all-the-investments-promised-at-vibrant-gujarat-were-added-up-they-would-nearly-equal-indias-gdp) आता फ्रान्स, चीन, जपान नक्की किती गुंतवणूक करतात ते पाहण्यासाठी आपल्याला बरीच वाट पहावी लागेल...

मित्रांनो, मोदी सरकारच्या (खोट्या) प्रचाराचे मुद्दे संपायची काही लक्षणं नाहीत. पण प्रत्येक मुद्द्यावर थोडा वेळ दिला तर त्यामागचं सत्य आपल्याला नक्की सापडेल. आता एवढं लांबलचक स्पष्टीकरण वाचायला आणि त्याबरोबर दिलेल्या लिंक्सवर जाऊन माहिती तपासून बघायला तुमच्याकडं वेळ नसेलही. तरीसुद्धा, म्हणतात ना - 'म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो!' तेव्हा काळ सोकावू नये यासाठी खर्‍या देशभक्तांना सजग रहावंच लागेल आणि असत्य खोडून काढण्यासाठी सत्य समोर आणावंच लागेल. तुम्हालाही जर अंधभक्तांच्या दिशाभूल करणार्‍या पोस्ट थोपवायच्या असतील तर ही सत्य परिस्थिती मांडणारी पोस्ट नक्की शेअर करा, फॉरवर्ड करा. 'खोटं बोल पण रेटून बोल' या प्रवृत्तीला एकच उत्तर - 'खरं काय ते न घाबरता बोल!'

(या लेखातील मुद्दे व लिंक्स फेसबुक आणि इतर सोशल नेटवर्किंग वेबसाईटवरुन घेण्यात आले आहेत.)


Share/Bookmark