ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Tuesday, April 15, 2014

सगळीच माणसं दिसतात...

सगळीच माणसं दिसतात कशी वैतागलेली
डोकी फुटलेली अन्‌ हातात दगड घेतलेली

कणाकणात असतो म्हणे देव वसलेला
मग का इथं मशिदी तिथं मंदीरं बांधलेली

प्रत्येकाचा शेवट तर मातीत ठरलेला
मग अमरत्वाची कसली ही भूल पडलेली

काय अर्थ असल्या खोट्या जगण्याला
वर्षं नुसतीच वाया गेली की हो जगलेली


Share/Bookmark

Sunday, April 13, 2014

एका इंटरव्ह्यूची गोष्ट


"सत्य कल्पनेहून रंजक असते"
(या कथेतील सर्व पात्रे व प्रसंग काल्पनिक असून प्रत्यक्ष जीवनातील व्यक्ती वा प्रसंगांशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)

"हॅलो, रजत शर्मा जी?"
"बोला, पंतप्रधान नरेन्द्रभाई..."
"अरे, अजून इलेक्शन व्हायच्या आहेत. भावी पंतप्रधान म्हणा..."
"इलेक्शन काय, होत राहतील हो. पण तुम्हीच आमचे पंतप्रधान! मोदी मोदी मोदी..."
"बास बास बास! गेले पाच-सहा महिने तेच ऐकतोय सारखं. तुम्ही अजून टेन्शन देऊ नका."
"तुम्हाला कसलं आलंय टेन्शन, नरेन्द्रभाई? तुम्ही तर स्वतःच देशातल्या सगळ्या प्रश्नांवर रामबाण उपाय आहात. जय श्रीराम."
"जय श्रीराम. जय श्रीराम."
"बरं, फोन कशासाठी केला होतात? काही विशेष काम माझ्याकडं?"
"हो तर. जरा विशेषच काम आहे. तुम्ही तुमच्या चॅनलवर कुठलातरी मुलाखतीचा कार्यक्रम चालवता ना?"
"हो हो, 'आप की अदालत'. त्यासाठीच तर एवढा फेमस आहे ना मी."
"काय म्हणालात? 'आप' की अदालत? बाप रे, तुम्हीपण 'आप'चा झाडू घेतला का काय हातात?"
"अहो नाही नाही नरेन्द्रभाई, ते केजरीवालचं 'आप' म्हणजे 'आम आदमी'चं. हे 'आप' म्हणजे आपल्या-आपल्यातलं. हॅ हॅ हॅ."
"हॅ हॅ हॅ, पण म्हणजे ते पत्रकार लोक घेतात तसलीच मुलाखत ना?"
"हो तसलीच, फक्त सेट असतो कोर्टाचा. आणि ज्याची मुलाखत घ्यायचीय त्याला आम्ही उभं करतो आरोपीच्या पिंजर्‍यात."
"अरे बापरे! कोर्ट? आरोपीचा पिंजरा?"
"पण तुम्ही कशाला घाबरताय नरेन्द्रभाई? तुम्हाला तर सुप्रिम कोर्टानं क्लीन चिट दिलीय ना?"
"अहो क्लीन चिट नाही ती शर्मा जी. 'सबळ पुराव्यांअभावी आरोप सिद्ध होत नाहीत', असं म्हटलंय. त्यामुळं अजूनही पुरावे बाहेर येऊ नयेत म्हणून खूप सावध रहावं लागतं हो."
"बरं बरं, ते मुलाखतीचं काय म्हणत होता तुम्ही?"
"हां, ते काँग्रेसवाले आणि 'आप'वाले सगळीकडं सांगत फिरतायत की, मोदी मुलाखतीला घाबरतो, मोदी पत्रकारांना घाबरतो."
"हॅ, एवढंच ना? मग घ्यायची एखादी जंगी पत्रकार परीषद. नाहीतर असं करा ना, तुम्हाला मुलाखत द्यायचीच आहे असं जाहीर करुन टाका एकदा. मग बघा तो करणसुद्धा तुमच्या मागं-मागं फिरेल मुलाखत घ्यायला..."
"......"
"हॅलो, हॅलो नरेन्द्रभाई! हॅलो..."
"हां हॅलो."
"ओह्‌, मला वाटलं फोन कट झाला की काय?"
"नाही, मी लाईनवरच आहे. जरा पाणी पिऊन घेतलं. ते करण थापरचं काय म्हणत होता तुम्ही?"
"कोण? मी? हां हां, ते करण थापर नाही करण जोहरचं म्हणत होतो मी. म्हटलं करण जोहरपण मागं-मागं फिरेल तुमची मुलाखत घ्यायला..."
"अच्छा अच्छा, करण जोहर काय? मला वाटलं पुन्हा करण थापर... बरं ते जाऊ दे, तुमच्या त्या आपल्या-आपल्या अदालतमधे का नाही बोलवत तुम्ही मला?"
"खरंच आयडीया चांगली आहे. नाही तरी तुम्हाला खूप चांगला टीआरपी मिळतोय सध्या. आमच्या चॅनेलचं तर नशीब उघडलं म्हणायचं. बोला, कधी ठेवायचा इंटरव्ह्यू?"
"ते ठरवू नंतर. आधी माझ्या काही अटी आहेत इंटरव्ह्यूसाठी, त्यावर बोलूयात का?"
"हो हो, नक्कीच! मला मान्य आहेत तुमच्या सर्व अटी..."
"अहो आधी काय अटी आहेत त्या ऐकून तरी घ्या!"
"बरं, बोला काय अटी आहेत तुमच्या?"
"त्या अरविंद केजरीवालनं सभा आणि पत्रकार परीषदा घेऊन खूप प्रश्न विचारुन ठेवलेत आधीच. त्यातला एकपण प्रश्न तुमच्या लिस्टमधे नसला पाहिजे."
"हो हो, मंजूर. सारखे-सारखे तेच-तेच प्रश्न विचारत असतो तो. मी जरा वेगळे प्रश्न विचारेन."
"छान. मी दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवतोय लोकसभेची. एकाच मतदारसंघातून का नाही लढवत, असं विचारायचं नाही."
"मंजूर, तुम्ही दोनच काय ५४३ मतदारसंघांतून उभे राहिलात तरी नाही विचारणार."
"माझं लग्न, माझी बायको, मी आधीच्या निवडणुकांच्या वेळी ही माहिती का लपवली, यातलं काहीही विचारायचं नाही."
"कबूल, तुमचं लग्न ही तुमची खाजगी बाब आहे. त्यावर मी कशाला प्रश्न विचारेन. हां, पण गांधी फॅमिलीत कोण कुणाचा मुलगा, कोण कुणाची सून, यावर बोललं तर चालेल ना?"
"चालेल चालेल. पुढं ऐका. एका बाईवर पाळत ठेवायला सांगितली होती मी, खाजगी कारणातून. त्यावर अजिबात प्रश्न विचारायचा नाही."
"कारण खाजगी होतं ना, मग नाही विचारणार."
"अमित शाहबद्दल प्रश्न विचारायचा नाही."
"तोबा तोबा! अमित शाह, माया कोडनानीबद्दल बिल्कुल काही विचारणार नाही."
"छान! गॅसच्या किंमतीबद्दल मला विचारायचं नाही. अंबानीच्या रिलायन्सबद्दल पण विचारायचं नाही..."
"काळजीच करु नका. सांगितलं ना, केजरीवालनं विचारलेला एकपण प्रश्न रिपीट होणार नाही याची काळजी घेईन मी."
"येडीयुरप्पा, श्रीरामलू, पासवान यांच्याबद्दल चर्चा करायची नाही."
"नाही करणार. पण काँग्रेसच्या मंत्र्यांनी केलेला भ्रष्टाचार, आदर्श घोटाळा, वगैरे?"
"हां त्यावर बोला सारखं-सारखं. झालंच तर मुलायमसिंगच्या गुंड मंत्र्यांबद्दल पण विचारा. फक्त अमित शाह, येडीयुराप्पा..."
"नाही नाही, त्यांची नावं नाही घेणार. एक काम करा नरेन्द्रभाई, तुम्हीच सांगा मी कुठले प्रश्न विचारु..."
"हां हे ठीकाय. असं विचारा की, राहुल गांधी हे म्हणाला त्यावर तुम्हाला काय म्हणायचंय? किंवा सोनिया गांधी तुम्हाला काहीतरी म्हणाल्या, त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? किंवा मुलायम असं म्हणाला ते बरोबर आहे का? किंवा मोबाईलवर, फेसबुकवर 'अबकीबारमोदीसरकार' कसं गाजतंय, त्यावर चर्चा करा. अगदी खाजगीच प्रश्न विचारायचा असेल तर, माझे कपडे, ड्रेसिंग सेन्स, फॅशन डिझायनर, याबद्दल विचारा."
"ब्रिलियण्ट नरेन्द्रभाई! हा अगदी आगळावेगळा एपिसोड होणार आहे 'आप की अदालत'चा. पण मी काय म्हणतो, थोडेसे तरी विरोधी प्रश्न विचारावे लागतीलच मला. नाहीतर लोकांना शंका येईल, हा इंटरव्ह्यू आहे की तुमची सभा?"
"हं, बरोबर आहे तुमचं म्हणणं. असं करा, मला विरोध करणार्‍या अडवाणी, जसवंतसिंग, मुरली मनोहर जोशी, यांच्याबद्दल विचारा अवघड प्रश्न."
"हे चालेल. ठीकाय तर मग, मी तयार आहे. बोला कधी घ्यायचा इंटरव्ह्यू?"
"ते सांगतो मी. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा."
"अजून काही राहिलं का नरेन्द्रभाई?"
"इंटरव्ह्यू सुरु झाल्यापासून संपेपर्यंत सारखा 'मोदी मोदी' असा घोष होत राहिला पाहिजे."
"एवढंच ना? तो तर मी आत्तापासूनच सुरु करतोय... मोदी मोदी मोदी..."
"धन्यवाद. भेटू या मग 'आप की अदालत'मधे!"


Share/Bookmark

Thursday, April 3, 2014

What happens when someone...

When someone claims to change the entire situation,
Not with logic but with a magic wand,
When we expect mortal men to become Gods who will uplift us,
Without we taking any efforts ourselves,
It is sure that these men will grow larger than life,
And we will be left with nothing but repenting upon choices we made,
And decisions we didn't take!

Share/Bookmark

Wednesday, April 2, 2014

आपणच

आपणच आपली थोपटावी पाठ
आपणच सांगावा आपलाच थाट

आपणच करावी आपलीच चर्चा
चर्चेत लावावी दुसऱ्यांची वाट

आपणच बांधावे आपलेच देऊळ
स्वतःलाच म्हणावे अनाथांचा नाथ

आपणच म्हणावी आपलीच आरती
सोबतीला घ्यावी चमच्यांची साथ

मिळेल तिकडून मिळवावा फायदा
नंतर घालावी कंबरेत लाथ

Share/Bookmark

Thursday, March 27, 2014

देश युवा है, हम युवा हैं

देश युवा है, हम युवा हैं
जीतेंगे, विश्वास हुवा है

आने दो जो आँधी आये
पक्का अपना बेस हुवा है

सोच है, जोश है, और हमारे
बडे-बुजुर्गों की दुवा है

सबको लेकर साथ है चलना
दिल को ये एहसास हुवा है

देश युवा है, हम युवा हैं
जीतेंगे, विश्वास हुवा है


Share/Bookmark

Thursday, March 20, 2014

या माजावरती औषध काय?

शिवसेनेच्या प्रसिद्ध ‘गर्वसे कहो हम हिंदू है’ पासून मनसेच्या ‘गर्वच नाही तर माज आहे मराठी असल्याचा’ पर्यंतचा प्रवास जर तुम्हाला नवनिर्माणाचं आणि सुराज्याचं चिन्ह वाटत असेल तर या ‘माजरोगा’ची लागण तुम्हालाही झाली आहे, हे नक्की. शाळेत प्रतिज्ञा म्हणायची - 'भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत...' आणि प्रत्यक्षात मात्र धर्म, जात, राज्य, शहर, वस्ती, अशा नवनवीन मुद्द्यांवर भेदभाव करायचा. हा ‘आपल्या’तला नाही असं दिसलं की लागले सगळेच चोची मारायला. मग ‘आपल्या’सारखेच शंभर कावळे जमा करायचे आणि सण-समारंभ, जयंत्या-पुण्यतिथ्यांच्या निमित्तानं शक्तिप्रदर्शन करत फिरायचं. अशा मिरवणुकांमधल्या स्पीकरचा वाढता आवाज हा मिरवणुकीत सहभागी झालेल्या जनतेच्या ढासळणार्‍या आत्मविश्वासाचं प्रतिक असतं, असं मला नेहमी वाटतं. जेवढा आवाज मोठा, तेवढी माणसं भेदरलेली. आपण कुठल्याही प्रकारे श्रेष्ठ नाही, आपल्यामधे कसलंही विशेष कौशल्य, क‌र्तृत्व नाही, त्यामुळं एकंदरीतच आपला निभाव लागणं कठीण आहे, याची कळत-नकळत जाणीव झालेली माणसं ‘आपल्या’सारख्याच असुरक्षित इतरांचा शोध घेतात आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. पण...

चार टाळकी एकत्र आली की विधायक कामांऐवजी विध्वंसक कामाचंच प्लॅनिंग सुरु होतं, याचं कारण काय? एक तर 'गर्दीचा आयक्यू हा त्यातील सर्व माणसांच्या आयक्यूचा लसावि असतो', हे वैश्विक सत्य. त्यातून आपल्याकडं (भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, त्याहून विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात, आणि त्याहून म्हणजे पुण्यात) भयंकर सुबत्ता आणि स्थैर्य आलेलं आहे. फारसं काम न करता प्रत्येकाला मुबलक (व गरजेपेक्षा जास्त) पैसा मिळतोय. सरकार, प्रशासन, पोलिस वगैरे खूप म्हणजे खूपच सहिष्णुतेनं आणि दयाबुद्धीनं नागरिकांना वागवतायत. (हे वाक्य उपहासानं लिहिलेलं नाही. पुण्याबाहेरील किंवा महाराष्ट्राबाहेरील प्रशासन आणि पोलिसांची भूमिका लक्षात घेतल्यास आपण खूप सुरक्षित आहोत, हे मान्य करावंच लागेल!) आपल्याकडं भूकंप, ज्वालामुखी, महापूर, वगैरे नैसर्गिक आपत्तीदेखील यायची शक्यता दूरदूरपर्यंत नाही. अशा परिस्थितीत, आपण अजिंक्य, अमर, अविनाशी वगैरे झाल्यासारखं जन्तेला वाटण्यात काही आश्चर्य नाही. (इथं ‘जन्ता’ म्हणजे ‘आप’वाले म्हणतात तसे फक्त झोपडपट्टीत राहणारे लोक नव्हे. पैशानं, शिक्षणानं, जातीनं, नोकरीनं, किंवा व्यवसायानं माणसाची लेव्हल ठरवून बरेचजण ‘आम जनते’च्या व्याख्येतून स्वतःची सुटका करुन घेतात. पण ही सगळी आवरणं काढून एकंदरीत माणसांचे स्वभाव, वृत्ती, आणि वर्तणूक यांच्या कसोटीवर ‘जनते’ची व्याख्या केली गेली पाहिजे.) या जन्तेला आपल्या आर्थिक आणि सामाजिक स्थैर्याचं आणि सुबत्तेचं श्रेय स्वतःकडंच राखून, उरलेलं अपयश, समस्यांबद्दल मात्र राजकारण, प्रशासन, सरकारला दोष द्यायचा आहे. आणि हा जो धर्माचा, जातीचा, भाषेचा, गावाचा, नावाचा, पैशाचा वगैरे माज आहे ना, त्याची मुळं या स्थैर्य आणि सुबत्तेतच आहेत!

हा आहे आपला आजार. पुण्यात दिवसाढवळ्या बाईकवरुन गोळ्या झाडत दहशतवादी फिरत नाहीत. नदीवरच्या पुलांनीच जोडल्या गेलेल्या पुणे शहराला येता-जाता ‘पूल उडवून देऊ’, अशा धमक्या मिळत नाहीत. पुण्यात (व आजूबाजूच्या मोठ्या परिसरात) कंपन्या बंद पडल्या, नोकर्‍या मिळत नाहीत, वगैरे परिस्थिती सध्याही नाही आणि नजिकच्या भविष्यकाळात येईल असंही दिसत नाही. उलट, नोकरी-धंदा न करता निव्वळ बापजाद्यांच्या जमिनी विकल्या तरी आपल्यासहित पुढच्या काही पिढ्यांची सोय होऊ शकेल, अशी परिस्थिती. प्रत्येक धर्माला, जातीला किमान एक तरी प्रभावशाली नेता मिळालेला आहे, जो त्या-त्या सीझनमधे ‘आपल्या’ जन्तेला चुचकारायचं काम बिनचूक करतोय. इतक्या सुरक्षित आणि कम्फर्टेबल वातावरणात, मुळातच ‘सेन्स’चा अभाव असणार्‍या (खरंतर नॉन्सेन्सच म्हणायचं होतं) जन्तेला माज नाही चढणार तर काय होणार?

आता यावर उपचाराचे दोनच पर्याय -

पहिला, अस्थैर्य निर्माण करणं, जन्तेला पुन्हा दरिद्री बनवणं, बेसिक सर्व्हायवलसाठी स्ट्रगल करायला लावणं.

आणि दुसरा, हे स्थैर्य आणि ही सुबत्ता अशीच टिकवून, त्यांचा विवेकबुद्धीनं अधिक प्रगतीसाठी वापर करणं.

आता आम जनतेच्या व्याख्येत स्वतःलासुद्धा कन्सिडर करुन, यांपैकी कुठला पर्याय सोपा (किंबहुना शक्य) वाटतोय, सांगू शकाल?


Share/Bookmark

Wednesday, March 19, 2014

शिवजयंती… परत?

आज पुणं कसं बाळंतिणीच्या खोलीसारखं सजलंय. सगळीकडं भगव्या लंगोट्या वाळत घातलेल्या दिसतायत... काल रात्री बारा वाजता मोटारसायकलींच्या पुंगळ्या काढून 'जय भवानी जय शिवाजी' किंचाळत 'तरुणाई' रस्त्यांवर सांडली होती. आज दिवसभर कर्कश्श आवाजात पोवाडे आणि असंबद्ध गाणी (हो, आत्ताच 'ये देश है वीर जवानों का' आणि 'गणराज रंगी नाचतो' ऐकून आलोय) वाजवली जातायत. संध्याकाळी तर 'चिकनी चमेली' आणि 'तुझा झगा' वगैरे हमखास ऐकायला (आणि बघायला) मिळणार, तेही 'भव्य' स्वरुपात (हो, आमचं महाराजांवरचं प्रेमच भव्य-दिव्य आहे ना!).

होय, आज शिवजयंती आहे… परत!! आत्ता गेल्या महिन्यातच तर झाली होती? असू दे, असू दे. महाराज आहेत ते, मराठी आणि हिंदू माणसाचे (मूळ)हृदयसम्राट. त्यांच्यावर कुठं शंका घ्यायची? उगाच भावना दुखावल्या जातील, नाही का? वर्षातून दोनदाच काय, मासिक जयंती साजरी करा भौ… आपल्या बापाचं काय जातंय? नाही तरी मराठी माणसाला अभिमान वाटावं अशी गोष्ट शंभर-दोनशे वर्षांतून एखादीच घडते. मग पुढं वर्षानुवर्षं, पिढ्यान्‌पिढ्या नुसती जयंती आणि पुण्यतिथी.

आता यावर आजूबाजूचे काही ‘वैचारिक हिंदुत्ववादी’ (विरोधाभास वाटतोय खरा, पण लेट्स अझ्युम) म्हणतात की, “जयंती-स्मृतिदिन वगैरे साजरे केलेच पाहिजेत, जेणेकरुन या थोर विभूतींचा वसा पुढे घेऊन जाता येईल. शिवाय या दिवशी काही चांगले आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमही होतातच. पेला अर्धा आहे अजून… तळाला गेलेला नाही”, वगैरे वगैरे!

खरं सांगायचं तर, हे 'अर्धा पेला' तत्त्वज्ञान म्हणजे स्वतःची फसवणूक आहे. शिवजयंती किंवा सार्वजनिक गणेशोत्सव म्हटलं की डोळ्यांसमोर काय चित्र उभं राहतं, हा प्रश्न आपल्या आजूबाजूच्या लोकांना (आणि स्वतःलाही) विचारून बघा. किती जण 'चांगले आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम, विचारांचा वसा' वगैरे उत्तर देतात पहा. सगळ्यांच्या दृष्टीनं हे असले सण आणि जयंत्या-मयंत्या म्हणजे डोक्याला तापच असतो. ट्रॅफीकची वाट, रस्त्यांचा सत्यानाश, कानांवर अत्याचार, अतिउत्साही भक्तांचा आणि कार्यकर्त्यांचा माज, अशाच गोष्टी समोर येतात. हे वास्तव स्विकारल्याशिवाय त्यावर उपाय शोधता येणार नाही. त्यामुळं आपला समाज आजारी आहे, हे सत्य स्वीकारणं गरजेचं आहे! आम्ही निरोगी आहोत, या भ्रमात राहिल्यास उपचाराची आशाच उरणार नाही…

असो. आता येत्या १४ एप्रिलच्या आंबेडकर जयंतीची तयारी महिनाभर आधीच जोमात सुरु आहे. १४ एप्रिलची होर्डींग्ज १२ मार्चलाच लावली गेलीत. तेवढ्या आठवड्याभरात पुण्यातले कुठले रस्ते टाळायचे, याची यादीच बनवली पाहिजे. म्हणजे किमान स्वतःपुरता मनस्ताप तरी टाळता येईल, नाही का?


Share/Bookmark