ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Friday, July 12, 2019

शिक्षण हक्क कायदा आणि राज्य सरकार

विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा प्रदान करणे हा मूलभूत शिक्षणासाठी शाळांची स्थापना करण्याला पर्याय होऊ शकत नाही: केरळ उच्च न्यायालय

"प्रत्येक एक किलोमीटरवर इयत्ता पहिली ते पाचवी आणि प्रत्येक तीन किलोमीटरवर इयत्ता सहावी ते आठवीचे वर्ग असणाऱ्या शाळांची स्थापना करण्याचे आपले कर्तव्य राज्य सरकार झटकून टाकू शकत नाही."

केरळ उच्च न्यायालयाने नमूद केले आहे की, विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा प्रदान करणे हा मूलभूत शिक्षणासाठी शाळांची स्थापना करण्याला पर्याय होऊ शकत नाही.

न्यायमूर्ती व्ही. चितमबरेश, न्यायमूर्ती अलेक्झांडर थॉमस आणि न्यायमूर्ती अशोक मेनन यांचा समावेश असलेल्या संपूर्ण न्यायपीठाच्या निकालाची सुरुवात या प्रसिद्ध संस्कृत सुभाषिताने होते: "विद्या धनम् सर्व धनात् प्रधानम्" (ज्ञान सर्व संपत्तीच्या सर्वोच्चस्थानी आहे).

कु. श्रेया विनोद विरुद्ध लोक निर्देशनाचे संचालक व इतर, तसेच टीकेएमएमएलपी व यु.पी. स्कूल विरुद्ध केरळ राज्य सरकार व इतर या प्रकरणांमधील निर्णयांच्या अचूकतेवरील संशयासंदर्भात उत्तर देताना न्यायपीठाने वरील विधान केले आहे.

शिक्षण हक्क कायद्याच्या अनुषंगाने नवीन इयत्ता सुरू करण्यासाठी शाळांची पुनर्रचना करण्याच्या आपल्या अर्जांचा नऊ वर्षांनंतरदेखील विचार केला जात नाही, ह्या वस्तुस्थितीने उद्विग्न झालेल्या शैक्षणिक संस्थांकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकांमधून सदर प्रकरणे समोर आली आहेत. वाहतूक सुविधा पुरविल्या गेल्या आहेत आणि मूलभूत शिक्षण पूर्ण करण्यासाठी एक मूल दुसऱ्या शाळेत जाऊन प्रवेश घेऊ शकते, या आधारावर राज्य सरकारने सदर अर्जांचा विचार न करण्याच्या कृतीचे समर्थन केले आहे. शाळांमध्ये नव्याने सुरू करण्याच्या अतिरिक्त वर्गांवरील शिक्षकांचे पगार करण्यासाठी राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक ओझे पडणार असल्याच्या मुद्द्याकडेही राज्य सरकारने लक्ष वेधले आहे.

सादर करण्यात आलेली तथ्ये लक्षात घेऊन न्यायपीठाने असे नमूद केले आहे की, राज्य नियमांमधील नियम ६ (१) मध्ये नमूद केल्यानुसार प्रत्येक किलोमीटरला पहिली ते पाचवीचे वर्ग असलेल्या आणि प्रत्येक तीन किलोमीटरला सहावी ते आठवीचे वर्ग असलेल्या शाळा स्थापन करण्याचे आपले कर्तव्य राज्य सरकार झटकून टाकू शकत नाही. त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, अधिनियमाच्या कलम ५ अंतर्गत बालकाला इतर शाळेत प्रवेश बदलून घेण्याचा अधिकार असल्याचे कारण देऊन राज्य सरकार या कायद्यान्वये आपल्यावर आलेल्या दायित्वातून स्वतःची सुटका करून घेऊ शकत नाही.

"आपण या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की, वर स्पष्ट केल्यानुसार कायद्याने कल्पना केलेल्या मूलभूत शिक्षणाच्या पूर्ततेसाठी बालकांना एका शाळेतून दुसऱ्या शाळेत ढकलले जाऊन त्यांना वैयक्तिक संपत्तीप्रमाणे वागणूक दिली जाऊ नये. केवळ एका शाळेपासून दुसऱ्या शाळेपर्यंत सहजतेने प्रवास करण्याची सुविधा किंवा सध्याच्या शाळेतून स्थलांतर दाखला मिळण्याच्या दृष्टीने या कायद्याकडे बघितले जाऊ नये. मूलभूत शिक्षण पुरविणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या समान वर्गांसहित सर्व शाळांची पुनर्रचना करण्याची योजना या कायद्यामध्ये अपेक्षित आहे, ज्याचे उल्लंघन कोणतेही राज्य सरकार करू शकत नाही. सध्याच्या पहिली ते चौथी आणि सहावी ते आठवी अशा इयत्ता असणाऱ्या शाळांच्या रचनेकडून सर्वत्र पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग असणाऱ्या शाळांची रचना करताना, अचानक शाळांची संख्या वाढल्याने राज्य सरकारवर अचानक खूप मोठा आर्थिक बोजा पडू शकतो. या कायद्याच्या ७ व्या कलमांतर्गत हे आर्थिक उत्तरदायित्व केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी एकत्रितपणे स्वीकारून दोघांमध्ये जबाबदारी वाटून घेण्याची तरतूद आहे, या वस्तुस्थितीची आपल्याला कल्पना नाही असे नाही. या कायद्याच्या अंमलबजावणीतील अगदी प्राथमिक टप्पा म्हणून, पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग असलेल्या शाळांना पाचवीचा वर्ग जोडण्यासाठी, तसेच पाचवी ते सातवीपर्यंत वर्ग असलेल्या शाळांना आठवीचा वर्ग जोडण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत राज्य सरकार परवानगी नाकारू शकत नाही. हा कायदा आणि त्या अनुषंगाने नियम अस्तित्वात आल्यानंतर केरळ एजुकेशन ऍक्ट, १९५८ आणि केरळ एजुकेशन रूल्स, १९५९ च्या अंतर्गत विचारात घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक गरजांचे अस्तित्व संपुष्टात आल्यासारखे आहे."

केरळमधील बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार नियम, २०११ मधील नियम ६(४) चा संदर्भ देत न्यायपीठाने म्हटले आहे की:

या नियमांमधील नियम ६(४) केवळ शासकीय किंवा स्थानिक प्राधिकरणाद्वारे ठरविण्यात आलेल्या अशा लहान वस्त्यांवरील मुलांना लागू होतो, जिथे जवळपास कोणतीही शाळा अस्तित्वात नसेल, उदाहरणार्थ अट्टप्पडीचे आदिवासी क्षेत्र. हेतू असा आहे की, एखाद्या लहान वस्तीतील बालकाचेही शालेय वाहतुकीच्या अभावामुळे नुकसान होऊ नये आणि कोणत्याही अडथळ्यांशिवाय मूलभूत शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी कायद्याने खात्री केली जावी. या नियमांमधील नियम ६(४) च्या मागे लपत, कायद्यातील कलम १९ आणि नियमांपैकी नियम ६(१) अंतर्गत बंधनकारक केलेली मूलभूत शिक्षणासाठी शाळा स्थापन करण्याची जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही.

वर संदर्भ दिलेल्या निकालांच्या विरुद्ध जात न्यायपीठाने नमूद केले की, 'वाहतूक सुविधा उपलब्ध करून दिल्याने त्यांच्या शैक्षणिक गरजा भागतील' असे विधान करणारा सर्वसाधारण शिक्षण विभागाचा आदेश अन्यायकारक आहे.

"नियम ६(४) च्या अंतर्गत राज्य सरकारने वाहतूक सुविधा प्रदान करणे हे यापूर्वी नमूद केलेल्या विशिष्ट आकस्मिक परिस्थितीसाठी लागू पडते, परंतु मूलभूत शिक्षणासाठी शाळा स्थापन करण्याला ते पर्याय ठरू शकत नाही. वर नमूद केलेल्या निकालांप्रमाणे, वाहतुकीची सुविधा देऊन कायद्यातील कलम १९ तसेच नियम ६(१) अंतर्गत राज्य सरकारवरील वैधानिक कर्तव्य टाळता येणार नाही."

यानंतर, वरील कथनाच्या संदर्भात सध्याच्या शाळांमधील वर्ग वाढविण्यासाठी शैक्षणिक संस्थांच्या अर्जांचा विचार करण्याचे निर्देश न्यायपीठाने संबंधित विभागाला दिले.

मूळ लेख: https://www.livelaw.in/news-updates/transportation-facilities-no-substitute-to-elementary-education-schools-establishment-146247


Share/Bookmark

Monday, July 8, 2019

शिक्षा का अधिकार

शिक्षा का अधिकार
हमें सबको बताना है।
शिक्षा का अधिकार
हमें सबको दिलाना है।

ना पैसे की अब चिंता
ना कागज कोई जरुरी।
बस मन में हो इच्छा
हमें सबको पढाना है।
शिक्षा का अधिकार…

अब सारे बच्चे पढेंगे
पढ-लिख कर आगे बढेंगे।
इस देश को दुनिया में
आगे ले जाना है।
शिक्षा का अधिकार…

- मंदार शिंदे 9822401246


Share/Bookmark

Saturday, July 6, 2019

संस्कृती

हाताने लिहिलेले रंगवलेले फलक नाहीत, त्याजागी सुरेख रंगीत फ्लेक्स प्रिंटिंग केलेले प्लास्टिकचे (पावसात न भिजणारे) बोर्ड... लहान-लहान मुलींना नऊवारी साड्या 'नेसवलेल्या' नाहीत, त्याऐवजी 'शिवलेल्या' साड्या आणि धोतरं मुला-मुलींनी चढवलेली... ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांचा तोंडाने जयघोष नाही, पण स्पीकरवर कर्कश्श आवाजात अजय-अतुलचं 'माऊली माऊली' वाजतंय... अशा प्रकारे, पहाटे-पहाटे ११ वाजता, ट्रॅफिकच्या वेळेत रस्त्यावरून ट्रॅफिकची वाट लावत, पुढच्या पिढीला आपल्या महान संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी 'प्रभातफेरी' येत आहे हो sss. बोला फ्लेक्स प्रिंटिंगवाले हारी विठ्ठल.. श्री अजय आणि अतुल राम राम.. संस्कृती बचाव मंडळ की जय !!


Share/Bookmark

Friday, July 5, 2019

असंस्कृतपणे वागण्याचे परिणाम

(मॅनेजमेंट विषयातील संशोधक क्रिस्टीन पोरॅथ यांचं टेड डॉट कॉम वरील भाषण)

असंस्कृतपणे वागण्याचे लोकांवर काय परिणाम होतात, याचा मी अभ्यास करते.

असंस्कृतपणे वागणं म्हणजे काय ?

दुसऱ्यांचा आदर न करणं किंवा उद्धटपणाने वागणं. यामध्ये वागण्याच्या निरनिराळ्या तऱ्हांचा समावेश होतो - जसं की, एखाद्याची नक्कल करणं किंवा त्याला/तिला कमी लेखणं, किंवा लोकांना बोचेल अशी चेष्टा करणं, किंवा एखाद्याचे मन दुखावणारे विनोद सांगणं, वगैरे.

म्हणून मग आम्ही असंस्कृतपणे वागण्याचे लोकांच्या कामगिरीवर काय परिणाम होतात, याचा अभ्यास सुरू केला. आणि आम्हाला जे दिसून आलं, त्यानं आमचे डोळे उघडले.

आम्ही बिझनेस स्कूलमधील माजी विद्यार्थ्यांना एक सर्वे पाठवला. ते सर्वजण निरनिराळ्या कंपन्यांमध्ये काम करीत होते. आम्ही त्यांना काही वाक्यं लिहिण्यास सांगितली - अशा एका अनुभवाबद्दल, जेव्हा त्यांच्याशी कुणीतरी उद्धटपणे वागलं होतं, त्यांचा अपमान केला होता, त्यांच्या भावना दुखावेल असं वागलं होतं. आणि यावर त्यांची प्रतिक्रिया काय होती याबद्दलही विचारलं.

एका व्यक्तीनं आम्हाला त्यांच्याशी अपमानकारक भाषेत बोलणाऱ्या बॉसबद्दल सांगितलं. ते म्हणायचे, "हे तर एखाद्या बालवाडीतल्या मुलालासुद्धा जमेल." आणि दुसर्‍या एका बॉसनं कुणाच्यातरी कामाचे कागद संपूर्ण टीमसमोर फाडून टाकले होते.

आम्हाला असं लक्षात आलं की, या असंस्कृत वागण्यामुळं लोकांची काम करण्याची प्रेरणा कमी होत होती: ६६% लोकांनी त्यानंतर काम करताना घेत असलेले प्रयत्न कमी केले. जे घडलं त्याबद्दल चिंता करण्यात ८०% लोकांचा वेळ वाया गेला, आणि १२% लोकांनी ती नोकरीच सोडून दिली.

सिस्को कंपनीने हे आकडे वाचले आणि अंदाज बांधला की, अशा असंस्कृत वागण्यामुळं त्यांना वर्षाला एकंदर १२ दशलक्ष डॉलर्स एवढी किंमत मोजावी लागत होती.

पण तुम्हाला स्वतःला असा अनुभव आलेला नसेल तर काय ? तुम्हाला असं काही घडताना फक्त बघायला किंवा ऐकायला मिळालं असेल तर ?

दुसऱ्या एका संशोधनामध्ये आम्ही, एका छोट्या समूहातील एक सहकारी दुसऱ्याचा अपमान करत असताना त्याचे इतरांवर होणारे परिणाम तपासले. आणि त्यातून आम्हाला खरोखर आश्चर्यकारक गोष्ट कळाली. ती म्हणजे, अशी काही घटना घडताना बघणार्‍यांची कामगिरीदेखील खालावलेली होती, आणि थोडीफार नव्हे, तर बऱ्यापैकी लक्षात येण्यासारखी.

असंस्कृतपणा हा एखाद्या रोगासारखा आहे. तो संसर्गजन्य असतो आणि आपणसुद्धा नकळत त्याचे वाहक बनतो, फक्त त्याच्या आजूबाजूला असल्यामुळे.

मग जर असंस्कृतपणाची एवढी मोठी किंमत आपल्याला मोजावी लागत असेल, तरीदेखील आपल्याला इतक्या मोठ्या प्रमाणावर अजूनही तसे वागताना लोक का दिसतात ?

सगळ्यात पहिलं कारण आहे तणाव. लोक कशामुळं तरी दडपून गेले आहेत, घाबरून गेले आहेत.

लोकांनी सुसंस्कृतपणे न वागण्यामागं आणखी काय कारण असू शकेल ? त्यांना कदाचित असं वाटतं की, सुसंस्कृतपणे वागल्यामुळं इतर लोक त्यांचं नेतृत्व मान्य करणार नाहीत. ते विचार करतात की: चांगलं वागणारी व्यक्ती नेहमी मागेच राहते ना ? खरंतर दीर्घकाळाचा विचार केल्यास, चांगल्या व्यक्ती मागे पडलेल्या दिसत नाहीत.

एका बायोटेक्नॉलॉजी कंपनीमध्ये सहकाऱ्यांना आणि मला असं दिसून आलं की, सुसंस्कृत दिसणाऱ्या व्यक्तींकडं इतरांपेक्षा दुप्पट वेळेला लीडर म्हणून बघण्यात येत होतं, आणि ते लक्षणीय प्रमाणात चांगली कामगिरी बजावत होते.

सुसंस्कृतपणा मूल्यवान का आहे ? कारण लोक तुम्हाला एक महत्त्वाची आणि एक ताकदवान व्यक्ती समजू लागतात - दोन महत्त्वाच्या गुणांचं असामान्य मिश्रण: आपुलकीनं वागणारे आणि कामासाठी सक्षम, मित्रत्वानं वागणारे आणि स्मार्ट देखील.

तर मग सुरुवात कुठून करायची ? लोकांचा आत्मसन्मान कसा जागा करता येईल ? तर एक चांगली गोष्ट म्हणजे, हे करण्यासाठी खूप मोठा बदल करण्याची गरज नाही. छोट्या छोट्या गोष्टींनी खूप मोठा फरक पडू शकतो. मला असं लक्षात आलं की, लोकांचे आभार मानणं, त्यांच्या कामाचं श्रेय त्यांना देणं, लक्ष देऊन त्यांचं बोलणं ऐकणं, नम्रपणे प्रश्न विचारणं, इतरांची दखल घेणं, आणि हसतमुख राहणं, या सगळ्यांचा खूप मोठा प्रभाव पडतो.

माझ्या अभ्यासातून मला कळलेली गोष्ट म्हणजे, जेव्हा आपल्या आजूबाजूचं वातावरण अधिक सुसंस्कृत असेल, तेव्हा आपण जास्त कार्यक्षम असतो, जास्त क्रिएटिव असतो, इतरांना मदत करण्याची जास्त तयारी दाखवतो, आपण जास्त आनंदी असतो, आणि जास्त निरोगीदेखील असतो. आपण अधिक चांगलं आयुष्य जगू शकतो.

आपल्यापैकी प्रत्येकानं थोडासा जास्त विचार केला तर, कामाच्या ठिकाणी, घरी, ऑनलाईन, शाळांमध्ये आणि आपल्या समाजामध्ये आजूबाजूला असलेल्या इतर लोकांचा सन्मान वाढवण्यासाठी प्रयत्न करू शकतो.

प्रत्येक वेळी संवाद साधताना या गोष्टीचा विचार करा: तुम्हाला नक्की कसं वागायचं आहे ? सुसंस्कृतपणे की असंस्कृतपणे ?


Share/Bookmark

Saturday, June 29, 2019

खुर्च्या

खुर्च्या

त्या अवाढव्य प्रेक्षागृहामध्ये
एकटा मी
स्टेजवर उभा राहून
समोर पहात होतो -
खुर्च्या... फक्त खुर्च्या...
अस्तित्वाच्या टोकापर्यंत
क्षीण होत जाणाऱ्या उजेडात
नुसत्या खुर्च्या...
रिकाम्या...
आणि तरीही सचेतन
नुकत्याच उठून गेलेल्या माणसांपेक्षाही
भयानक सचेतन
स्वतःचं भानामती विश्व
निर्माण करणाऱ्या
क्रूर...
स्टेजकडे एकटक पाहणाऱ्या
नि:शब्द... निर्दय...
हजारो माणसांची कलेवरं
प्रेक्षालयाच्या दरवाजाबाहेर
फेकून देणाऱ्या...
राक्षसिणी...
जागेवरून उठत नव्हत्या
करकचून बसलेल्या
आणि तरीही पसरत होत्या
सार्‍या हवेमध्ये
तडजोड नसलेल्या द्वेषाने...
मी चटकन विंगमध्ये गेलो
आणि जाता जाता ऐकला
हास्याचा एक प्रचंड स्फोट
गलिच्छ तिरस्काराने,
निथळलेला,
जो होता माझ्यासाठी
आणि त्या सर्वांसाठीही
जे खुर्च्यांवर बसून गेले होते
भूतकाळात
आणि बसणार होते
भविष्यकाळातही.

- कुसुमाग्रज (प्रवासी पक्षी)


Share/Bookmark

हिंमत

हिंमत

बातमी ऐकलीत ना ?
राजधानीतील सिंहासनाचे सिंह
राजकारणाला वैतागून
जंगलात पळून गेले आहेत
आणि आता शोध जारी आहे
अन्य प्राण्यांचा...
तसे अर्जदार खूपच आहेत
पण, कुंभाराच्या सेवेला विटलेले
दोघेजण आत्मविश्वासाने सांगताहेत
फक्त आम्हीच !
कारण वृत्तपत्रांचे अंक
त्यातील अग्रलेखासह
चावून गिळण्याची आणि पचवण्याची
हिंमत - फक्त आमच्यातच आहे.

- कुसुमाग्रज (प्रवासी पक्षी)


Share/Bookmark

Wednesday, June 19, 2019

अवघड सोपे झाले हो...

"अवघड सोपे झाले हो..."

'बालभारती'च्या इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात नवीन पद्धतीनं अंकांचं शब्दलेखन दिलेलं आहे, त्याबद्दल -

१) मुलांना एक, दोन, तीन, चार असे बेसिक अंक आणि दहा, वीस, तीस, चाळीस असे युनिट अंक पटकन कळतात. त्यापुढं पुन्हा एक, दोन, तीन जोडून आकड्यांची रचना समजणं खरंच खूप सोपं जातं.

२) दुसरीच्या पुस्तकात, एकवीसच्या 'ऐवजी' वीस एक, बावीसच्या 'ऐवजी' वीस दोन, असं दिलेलं नाही. उलट, वीस एक 'म्हणजे' एकवीस आणि वीस दोन 'म्हणजे' बावीस असं स्पष्ट करुन मांडलेलं आहे. यामुळं मुलांना एकवीस म्हणजे नक्की किती आणि बावीस म्हणजे नक्की किती हे चांगलं कळेल. तिसरीच्या पुढं वीस एक, वीस दोन नसेल. हे फक्त सुरुवातीला समजावून देण्यासाठी आहे.

३) दुसरीच्या मुलांना 'जोडाक्षरांचा खूप त्रास नको' असं एक  कारण या बदलासाठी दिलेलं आहे. पण जोडाक्षरं नको 'म्हणूनच' आकडे लिहायची पद्धत बदलली असा विरोधकांनी अर्थाचा अनर्थ केलेला आहे. त्याकडं दुर्लक्ष केलेलंच बरं.

४) नवीन पद्धतीनं 'मराठीचा गळा आवळला' वगैरे म्हणणाऱ्यांसाठी प्रश्न - एकोणसाठ आणि एकोणसत्तर हे आकड्यात लिहिताना तुमचा स्वतःचा गोंधळ व्हायचा की नाही. अनेकांचा आजही होतो. त्यापेक्षा पन्नास नऊ आणि साठ नऊ जास्त लॉजिकल नाही का ? (माझ्या मोबाईल नंबरमध्ये शेवटी शेहेचाळीस - ४६ आहे. संपूर्ण नंबर मराठीत सांगितला तरी शेवटचं शेहेचाळीस म्हणजे 'फोर सिक्स' हे मी गेली सतरा वर्षं सांगत आलोय !)

५) आधीच्या पिढीला शाळेत पावकी, दिडकीचे पाढे शिकवले जायचे. ती पद्धत बंद झाल्यावर तेव्हाच्या लोकांनी असेच गळे काढले होते. आपण शाळेत पावकी, दिडकी शिकलो नाही, मग काय नुकसान झालं ? किंवा शिकून काय फायदा झाला असता कुणी सांगू शकेल काय ? आता आपल्या मुलांसाठी काहीतरी सोपी पद्धत येतीय म्हटल्यावर आपण स्वागत करण्याऐवजी विरोध का करतोय ?

६) मोबाईलमुळं फोन नंबर लक्षात ठेवायची शक्ती नष्ट झाली, कॅल्क्युलेटरमुळं आकडेमोड करायची ताकद संपली, कॉम्प्युटरमुळं हातानं लिहायची सवय मोडली, अशा तक्रारी करणाऱ्यांनी मोबाईल, कॅल्क्युलेटर, कॉम्प्युटरवर बहिष्कार का नाही टाकला ? ही दांभिकता मुलांच्या फायद्याच्या आड का आणतोय आपण ?

७) दुसरीच्या पुस्तकात आकडे अक्षरांत लिहायची पद्धत बदलली, याला राजकीय रंग देणं तर महादुर्दैवी आहे. गणिताचं पुस्तक तयार करणाऱ्या समितीवर कोण आहे, तेवढी तरी माहिती घेऊन मगच त्यावर कॉमेंट करावी, ही विनंती.

८) मराठीतून आकडे सोपे करुन लिहिल्याबद्दल सोशल मिडीयावर 'बालभारती'ची अक्क्ल काढणाऱ्यांपैकी खरोखर किती जणांची मुलं मराठी मिडीयमच्या शाळेत शिकतात ?

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ही नवीन पद्धत एकदा आपल्या मुलांना दाखवा आणि त्यांचं मत विचारा. मला अशा पद्धतीनं गणित शिकवलं असतं तर कदाचित मलाही तो विषय आवडला असता. असो.

मुलांच्या मनाचा विचार करुन, भाषेच्या खोट्या अस्मितेकडं दुर्लक्ष करुन, अभ्यासक्रमात आणि शिकवण्याच्या पद्धतीत धाडसी प्रयोग करणाऱ्या 'बालभारती'चे आणि विशेषतः डॉ. मंगला नारळीकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन !

- मंदार शिंदे
(नव्वद-आठ वीस-दोन चाळीस बारा चाळीस-सहा)

(वाचण्यासाठी इमेजवर क्लिक करा.)



Share/Bookmark