
ऐसी अक्षरे
Thursday, September 21, 2023
Government School Adoption Scheme

Sunday, April 25, 2021
Education in Corona Times
यंदाही शाळा वेळेवर, म्हणजे १५ जूनला, सुरू होणार नाहीत असे गृहीत धरून आत्ताच नियोजन करावे लागेल. त्या दृष्टीने खालील मुद्द्यांवर विचार, चर्चा, आणि कृती व्हावी.
(१) पुढील इयत्तांची पटनोंदणी कशी करावी याचे नियोजन करावे लागेल. पुढे आलेल्या मुलांची नावे शाळेकडे आहेतच; परंतु शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणात सापडलेली मुले, करोना काळात पालकांसोबत स्थलांतर होऊन गेलेली किंवा आलेली मुले, वयानुरुप पहिल्या इयत्तेमध्ये प्रवेश घेणारी मुले, यांना विचारात घेऊन पटनोंदणीचे नियोजन करावे. त्यासाठी शाळेतील शिक्षकांनी गृहभेटी कराव्यात का? शक्य असेल तिथे, पालकांशी फोनवरून संपर्क साधता येईल का? मुलांची माहिती मिळवण्यासाठी शासनाच्या इतर विभागांची मदत घेता येईल का? उदाहरणार्थ, जन्म-मृत्यू नोंदी, अंगणवाडी, रेशनिंग आणि आधार डेटा, इत्यादी. या पर्यायांची चाचपणी व्हावी.
(२) चालू शैक्षणिक वर्षात राज्य मंडळाने आणि शिक्षकांनी पाठ्यपुस्तके मुलांपर्यंत पोहोचवली. मुलांना शाळेत येणे शक्य नसेल अशा ठिकाणी ती घरपोच केली. आता पाठ्यपुस्तके मुलांपर्यंत कशी पोहोचवता येतील? यावेळी पूर्वनियोजन आणि इतर शासकीय विभाग (उदाहरणार्थ, पोस्ट खाते) यांच्या माध्यमातून जलद आणि खात्रीशीर वितरण करता येईल का?
(३) पुढील वर्षी मुले प्रत्यक्ष शाळेत येण्याचे प्रमाण कमी राहील, असे गृहीत धरून, पालक आणि/किंवा गाव-वस्ती पातळीवर शिक्षण सहायक किंवा स्वयंसेवक यांची निवड व सक्षमीकरण असा कार्यक्रम राबवता येईल का? नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात 'पायाभूत साक्षरता आणि अंकज्ञान' यासंबंधी वस्ती पातळीवरील साक्षर स्वयंसेवकांचा सहभाग घ्यायचे सुचवले आहे. पाठ्यपुस्तकांमध्ये शिक्षकांसाठी सूचना असतात तशा पालक/स्वयंसेवक यांच्यासाठी सूचना (सुलभकाच्या भूमिकेतून) समाविष्ट करता येतील का? स्वयंसेवकांकडून विना-मोबदला कामाची अपेक्षा करण्याऐवजी, वस्तीमधील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना अर्धवेळ रोजगाराची संधी देता येईल का?
(४) वस्तीपातळीवर आठ-दहा-पंधरा मुले एकत्र येऊन काही कृती करू शकतील अशी उपकेंद्रे (सॅटेलाईट सेंटर) सुरू करता येतील का? अशा ठिकाणी इंटरनेट कनेक्शन, कॉम्प्युटर, स्क्रीन, पुस्तके, अशी काही साधने शाळेमार्फत उपलब्ध झाल्यास ऑनलाईन शिक्षणाची व्याप्ती व परिणाम वाढेल. अशा उपकेंद्रांवर शिक्षकांनी ठराविक दिवशी काही उपक्रम राबवावेत, मूल्यमापन करावे. इतर दिवशी सुलभक (फॅसिलिटेटर) यांच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवता येईल. विशेषतः वस्तीमधील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक/स्वयंसेवक यांच्या माध्यमातून मार्गदर्शनाची सोय अशा सॅटेलाईट सेंटरवर करता येईल.
(५) चालू शैक्षणिक वर्षात काही शिक्षक आणि स्वयंसेवी संस्थांनी राबवलेला प्रत्यक्ष कार्यपत्रिकेचा (ऑफलाईन वर्कशीटचा) प्रयोग अभ्यासून सर्वत्र राबवता येईल का? वर्कशीटमुळे मुलांचे ऑनलाईन अवलंबन कमी होऊ शकेल, तसेच विद्यार्थ्यांकडून वर्षभर लेखी स्वरूपात साहित्य जमा होत गेल्याने मूल्यमापनासाठी शिक्षकांना मदत होईल. वर्कशीटचे वितरण, संकलन यासाठी आतापासून नियोजन करता येईल का? पोस्ट किंवा खाजगी कुरियर कंपन्या, अमेझॉनसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांचे जाळे वापरता येईल का?
(६) यंदा सगळे उपक्रम, मैदानी खेळ व कला विषयांकडे पुरेसे लक्ष देता आले नाही. पुढील वर्षामध्ये या गोष्टी कशा राबवणार याचे पर्यायी नियोजन करता येईल का? शाळा आणि शिक्षक यांच्याशिवाय शासकीय आणि सामाजिक घटकांचा वापर करून घेता येईल? स्थानिक उद्याने आणि खेळाची मैदाने, खाजगी क्रीडा प्रशिक्षण संस्था, यांच्याशी समन्वय साधून मुलांना सुरक्षित आणि नियमित सुविधा देता येतील का?
(७) मार्च २०२२ मध्येही दहावी-बारावीची सार्वत्रिक परीक्षा घेता येणार नाही असे गृहीत धरून नियोजन करता येईल का? यासाठी राज्य मंडळाकडून तिमाही मूल्यमापनाचे प्रश्नसंच देता येतील का? बोर्डाकडून हे प्रश्नसंच शाळांना नियमितपणे पाठवले, तर विद्यार्थी शाळेत जाऊन, सोशल डिस्टन्सिंग पाळून, तिमाही परीक्षा देऊ शकतील आणि शाळेतून एकत्रितपणे उत्तरपत्रिका बोर्डाकडे पाठवण्याची सोय करता येईल. अर्थात, यासाठी शाळा किंवा सॅटेलाईट सेंटरद्वारे पुरेसे मार्गदर्शन प्राप्त व्हायला हवे.
परीक्षा हवी की नको, सरसकट पुढील वर्गात प्रवेश द्यावा की नाही, या विषयावरील चर्चा आता थांबवून, पुढील शैक्षणिक वर्षाचे नियोजन करावे. यात शिक्षणाच्या नवीन माध्यमांचा विचार प्रामुख्याने व्हावा. उदाहरणार्थ, 'बिल्डींग ऐज अ लर्निंग एड' या 'बाला' संकल्पनेच्या धर्तीवर 'कम्युनिटी ऐज अ लर्निंग एड' अशा ('काला'?) संकल्पनेवर काम करता येईल का? फक्त पाठ्यपुस्तकातूनच नव्हे, तर शाळेची इमारत, परिसर, वस्तू, यांच्या माध्यमातून मुले काहीतरी शिकू शकतील अशा प्रकारे शाळेच्या भिंती आणि परिसर रंगवण्यात आले, मजकूर नोंदवण्यात आला. आता मुले वस्तीमध्येच राहणार असतील तर, सार्वजनिक भिंती, शासकीय इमारती, मंदिरे, उद्याने, झाडे, बसेस, रिक्षा, अशा सर्व ठिकाणी मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने काही मजकूर/साहित्य उपलब्ध करता येईल का? घंटागाडी आणि प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रिक्षा, तसेच धार्मिक स्थळांवरील ध्वनिक्षेपक यंत्रणेचा मुलांच्या शिक्षणासाठी वापर करता येईल का?
वरील सर्व सूचना वैयक्तिक अनुभव आणि विचारातून मांडलेल्या आहेत. तज्ज्ञ, अनुभवी, आणि अधिकारी व्यक्तींनी योग्य तो बदल, चर्चा, कार्यवाही करावी. करोनावर नियंत्रण प्राप्त होऊन परिस्थिती पूर्ववत झाली तर चांगलेच आहे, पण तसे न झाल्यास, आणखी एक वर्ष (किंवा पुढील काही वर्षे) मुलांच्या शिक्षणाचा बळी जाऊ नये!
(लेखक पुण्यातील बालहक्क कृती समितीचे संयोजक आहेत.)

Education in Corona Times
Wednesday, March 3, 2021
Special Drive for Education in Maharashtra
An Appeal to the parents, citizens, and social organizations…
The Government of Maharashtra has launched a special drive to bring all children up to 18 years of age in the main stream of education. For this, all the primary, secondary, higher secondary school teachers as well as Anganwadi workers are conducting a door-to-door survey to find out children not enrolled in or not attending any Anganwadi, Balwadi, or any kind of school.
If you spot any child between 3 and 18 years of age around you, who should be enrolled in or attending a school, or children living at the construction sites, or on footpaths, or children begging at traffic signals, or children of sugarcane workers and brick kiln workers, then please visit your nearby Corporation school or Zilla Parishad school and report about these children.
Remember, every child never enrolled in a school, or dropped out of school, or temporarily migrated, or left out of school due to recent Covid crisis should also be included in this survey. Efforts to bring these children back to school can be planned accordingly.
Also, a ward-level or village-level committee has been formed under this special drive. As a voluntary organization or as an educationist, you can get involved in the functioning of this committee working under the chairmanship of your local Corporator or Sarpanch.
Let’s come together and help every child get its right to education!
पालक, नागरिक, आणि स्वयंसेवी संस्थांना आवाहन…
१८ वर्षे वयापर्यंतच्या सर्व मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक विशेष मोहिम सुरु केली आहे. अंगणवाडी, बालवाडी, किंवा पहिली ते बारावीपर्यंत शाळेत जाऊ न शकणारी मुले शोधून त्यांना जवळच्या शाळेत दाखल करण्यासाठी ही मोहिम सुरु आहे. यासाठी सर्व शाळांमधील प्राथमिक, माध्यमिक, उच्च-माध्यमिक शिक्षक, तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस घरोघरी जाऊन अशा शाळाबाह्य मुलांची माहिती गोळा करीत आहेत.
तुमच्या आजूबाजूला, तुमच्या बघण्यात जर अशी ३ ते १८ वर्षांची मुले असतील, किंवा बांधकाम साईटवर राहणारी, फुटपाथवर राहणारी, रस्त्यावर सिग्नलला भीक मागणारी, ऊसतोडणी किंवा वीटभट्टी मजुरांची मुले किंवा वस्ती तुम्हाला माहिती असतील तर जवळच्या महानगरपालिकेच्या किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये त्यांची माहिती जरूर कळवा.
लक्षात घ्या, कधीही शाळेत न गेलेली, शाळा अर्धवट सोडलेली, तात्पुरते स्थलांतर झालेली, एवढेच नव्हे तर कोविड परिस्थितीमुळे शाळेत जाऊ न शकलेली मुलेसुद्धा यामध्ये नोंदवली जाणे गरजेचे आहे. त्यानुसार या मुलांना शाळेत दाखल करून घ्यायचे नियोजन करता येईल.
याशिवाय, तुमच्या वॉर्ड अथवा गाव पातळीवर यासाठी स्थानिक नगरसेवक किंवा सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन झाली असेल. त्यामध्ये स्वयंसेवी संस्था किंवा शिक्षणतज्ज्ञ या नात्याने तुम्ही सहभागी होऊ शकता.
शोध दारोदारी । प्रबोधनाची फेरी ।
एक मूल न राही । शाळाबाह्य ॥

Special Drive for Education in Maharashtra
Wednesday, September 16, 2020
MP Ariff, RTE and NEP
१४ सप्टेंबर २०२० रोजी संसदेमध्ये नवीन 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा'संदर्भात काही प्रश्न विचारले गेले. शालेय शिक्षणाशी संबंधित धोरणात सुचवलेल्या बदलांच्या अंमलबजावणीसाठी 'शिक्षण हक्क कायदा २००९' मध्ये सुधारणा करण्याचा सरकारचा हेतु आहे का? नसेल तर, 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०' कशा प्रकारे अंमलात आणण्याचा सरकारचा विचार आहे? आणि नव्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सरकारने काही कालमर्यादा निश्चित केल्या आहेत का?
या प्रश्नांना भारत सरकारचे शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल 'निशंक' यांनी दिलेले उत्तर असे की, 'शिक्षण हक्क कायदा २००९' (बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९) यामध्ये सुधारणा करण्याबद्दल नवीन धोरणामध्ये कोणताही उल्लेख केलेला नसून, अंमलबजावणीसंदर्भात निरनिराळ्या कालमर्यादा आणि कार्यपद्धतींचा उल्लेख धोरणामध्येच करण्यात आला आहे.
२००९ च्या 'शिक्षण हक्क कायद्या'मध्ये शिक्षणातील संधी आणि समानतेबद्दल काही गोष्टी सरकारसाठी बंधनकारक ठरवण्यात आलेल्या होत्या. नवीन 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा'मध्ये यातील काही गोष्टी टाळण्याबद्दल किंवा त्यातून पळवाट काढण्याबद्दल सूचना केलेल्या दिसतात. संसदेमध्ये शिक्षण मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानुसार, 'शिक्षण हक्क कायदा २००९' बदलायचा नसेल, तर नवीन धोरणाच्या आधारे पळवाट काढणे बेकायदेशीर ठरेल. हे महत्त्वाचे प्रश्न संसदेमध्ये उपस्थित केल्याबद्दल अलापुझा लोकसभा मतदारसंघाचे खासदार ऐडव्होकेट ए. एम. अरिफ यांचे आपण अभिनंदन केले पाहिजे, धन्यवाद मानले पाहिजेत.
पण सध्याच्या काळातील सुशांत सिंग राजपूत यांची आत्महत्या, रिया चक्रवर्ती यांचा तुरुंगवास, कंगणा राणौत यांचे समाजप्रबोधन, कोरोना आणि लॉकडाऊनग्रस्त अर्थव्यवस्था, अशा महत्त्वाच्या जीवनावश्यक घडामोडींना ओलांडून सर्वसामान्य मुलांसाठी शालेय शिक्षणाच्या अधिकाराचा विचार करणारे हे ए. एम. अरिफ नक्की आहेत तरी कोण?
५६ वर्षांचे अरिफ २००६ पासून २०१९ पर्यंत केरळ राज्यातील अरूर मतदारसंघाचे आमदार होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने केरळ राज्यात १४ जागा लढवल्या, त्यापैकी फक्त एका म्हणजे अलापुझा मतदारसंघातून त्यांचा उमेदवार निवडून आला, तो म्हणजे ऐडव्होकेट ए. एम. अरिफ.
अब्दुल माजिद या पोलिस अधिकाऱ्याचा मुलगा असलेले अरिफ बी.एस्सी.चे शिक्षण घेत असताना विद्यार्थी चळवळीत सक्रीय झाले. आधी कॉलेज युनियनच्या मॅगझिनचे संपादक म्हणून आणि नंतर युनियनचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. पुढे 'स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया'चे चेरथला क्षेत्र अध्यक्ष, अलापुझा जिल्हा सचिव आणि कम्युनिस्ट पार्टीच्या विद्यार्थी विभागाचे राज्य समिती सदस्य असा प्रवास करत ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या 'डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया' या युवा विभागाचे राज्यस्तरीय समिती सदस्य झाले.
चेरथलामधील एस. एन. कॉलेजमध्ये शिकत असताना अरिफ यांच्या राजकीय घडामोडींमधील सहभागामुळे, पोलिस अधिकारी असलेल्या त्यांच्या वडीलांची चेरथलामधून कैनाकरी येथे बदली करण्यात आल्याचे सांगितले जाते. तत्कालीन पोलिस अधीक्षकांच्या थेट आदेशानुसार त्यांच्या कुटुंबाला पोलिस वसाहतीमधील घर सोडावे लागले होते, असा उल्लेख अरिफ यांच्या विकिपेडीया पेजवर आढळतो.
मुथांगा येथे पोलिस गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व अरिफ यांनी केले होते. आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात अरिफ यांच्या मणक्याला आणि मांडीला दुखापत झाली होती, असाही उल्लेख सापडतो.
२००६ साली अरूर मतदारसंघातून तत्कालीन कृषी मंत्री के. आर. गौरी अम्मा यांचा चार हजार मतांनी पराभव करत अरिफ केरळ विधानसभेत आमदार म्हणून दाखल झाले. (त्यापूर्वी गौरी अम्मा याच मतदारसंघातून नऊ वेळा निवडून गेल्या होत्या.) २०११ मध्ये सोळा हजार आणि २०१६ मध्ये अडतीस हजार मतांनी ते अरूरमधून पुन्हा-पुन्हा निवडून आले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ४० टक्के मते मिळवून ते खासदार म्हणून निवडून आले. (आमदार अरिफ खासदार झाल्यामुळे रिक्त झालेल्या अरूर विधानसभा मतदारसंघात २०१९ मध्ये पोट-निवडणूक घेण्यात आली, तेव्हा मात्र त्यांच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीला आपला उमेदवार तिथून निवडून आणता आला नाही.)
काही काळापूर्वी 'रुबेला' नावाचा एक संसर्गजन्य आजार पसरला होता. संक्रमित व्यक्ती खोकल्यावर किंवा शिंकल्यावर त्यावेळी संपर्कात आलेल्या व्यक्तींमध्ये याचे विषाणू पसरतात, असे सांगण्यात आले होते. रुबेला हा स्वतः घातक रोग नसला तरी, त्याच्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन न्यूमोनियासारखे इतर आजार बळावू शकतात, असा प्रचार करण्यात आला होता. या विषाणूच्या संसर्गापासून बचावासाठी 'सक्तीच्या' लसीकरणाचा प्रयत्न सरकारी पातळीवर करण्यात आला, तेव्हा स्वतःच्या पक्षाचे सरकार असूनही तत्कालीन आमदार अरिफ यांनी लसीकरणाच्या सक्तीविरोधात मोहीम सुरु केली. मी माझ्या मुलांना कोणतीही लस दिलेली नाही आणि ती पूर्णपणे तंदुरुस्त आणि सुरक्षित आहेत, असे सार्वजनिकरित्या जाहीर करून त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारचा रोष ओढवून घेतला. प्रसारमाध्यमे आणि सोशल मिडीयामध्ये (नेहमीप्रमाणे) त्यांच्या भूमिकेला धार्मिक रंग देऊन त्यांच्यावर प्रचंड टीका केली गेली. परंतु 'लसीकरणाला विरोध म्हणजे देशद्रोह' (ऐन्टी-व्हॅक्सिनेशन इज ऐन्टी नॅशनल) हा प्रचार त्यांनी स्पष्टपणे खोडून काढला.
आज पुन्हा एकदा आपल्या भूमिकेतील स्पष्टता आणि न्याय व समता या मूल्यांशी आपली बांधिलकी दाखवत ए. एम. अरिफ यांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या संदर्भाने 'शिक्षण हक्क कायद्या'चा विषय ऐरणीवर आणला आहे, याबद्दल ते नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत.
संदर्भः विकिपेडीया आणि इतर वेबसाईट्स
- मंदार शिंदे
१६/०९/२०२०
Mobile: 9822401246
E-mail: shindemandar@yahoo.com
Blog: http://aisiakshare.blogspot.com
Books on Amazon: http://amazon.com/author/aksharmann

MP Ariff, RTE and NEP
Monday, March 9, 2020
SMC GR Simplified

SMC GR Simplified
Tuesday, November 19, 2019
चला, बालहक्क समजून घेऊया...

चला, बालहक्क समजून घेऊया...
Monday, November 4, 2019
गाडी बुला रही है...

गाडी बुला रही है...
Monday, October 28, 2019
National Education Policy Update News

National Education Policy Update News
Wednesday, October 2, 2019
महाराष्ट्रातील मुलांच्या शिक्षणासाठी जाहीरनामा

महाराष्ट्रातील मुलांच्या शिक्षणासाठी जाहीरनामा