ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Tuesday, November 19, 2019

चला, बालहक्क समजून घेऊया...

संयुक्त राष्ट्र बालहक्क करार - UNCRC ची ३० वर्षे

दि. २०/११/२०१९ ।। मंदार शिंदे ९८२२४०१२४६


    बालहक्कांच्या संरक्षणासाठी वचनबद्ध देशांनी एकत्र येऊन 'युनाइटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन राईट्स ऑफ दी चाईल्ड' अर्थात UNCRC किंवा CRC हा महत्वपूर्ण करार मान्य केला. मूल कुणाला म्हणावे, त्यांना नेमके कोणते हक्क असतात, आणि सहभागी देशांमधील संबंधित सरकारांनी नेमक्या कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात, याबाबत स्पष्टीकरण UNCRC मध्ये देण्यात आलेले आहे. हे सर्व हक्क एकमेकांशी संबंधित असून, यापैकी प्रत्येक हक्काचे समान महत्व आहे आणि मुलांना या हक्कांपासून कुणीही वंचित ठेऊ शकत नाही, अशी या कराराची संकल्पना आहे.

    बरोबर ३० वर्षांपूर्वी, २० नोव्हेंबर १९८९ या दिवशी जागतिक स्तरावरील नेत्यांनी एकत्र येऊन जगभरातील मुलांना एक ऐतिहासिक वचन दिले - एका आंतरराष्ट्रीय कायदेशीर आराखड्याच्या, म्हणजेच UNCRC च्या माध्यमातून प्रत्येक बालकाच्या हक्कांचे संरक्षण आणि पूर्तता करण्याचे वचन.

    या UNCRC चे नेमके म्हणणे काय आहे? तर मुले ही आपल्या पालकांच्या मालकीच्या वस्तू नव्हेत की ज्यांच्यासाठी सर्व निर्णय मोठ्यांनीच घ्यावेत. तसेच, मुले म्हणजे फक्त मोठे होण्याची वाट बघणाऱ्या आणि मोठेपणी कसे वागावे याची तयारी करणाऱ्या व्यक्ती नव्हेत. त्यांनाही आपले स्वतंत्र अस्तित्व आणि हक्क असतात. वयाच्या १८व्या वर्षापर्यंतच्या बालपणाला प्रौढ अवस्थेपेक्षा पूर्णपणे वेगळे समजले जावे, असे या करारात म्हटले आहे. बालपणीचा काळ विशेष आणि सुरक्षित असावा, ज्यामध्ये मुलांना सन्मानाने वाढू द्यावे, शिकू द्यावे, खेळू द्यावे, खुलू द्यावे आणि फुलू द्यावे.


UNCRC मधील कलमेः

१. मूल म्हणजे नक्की कोण: १८ वर्षांपेक्षा कमी वयाची कोणतीही व्यक्ती.

२. भेदभावास मनाई: ओळख, ठिकाण, भाषा, धर्म, विचार, रंगरूप, अपंगत्व, आर्थिक स्थिती, कौटुंबिक पार्श्वभूमी, कुटुंबाच्या श्रद्धा आणि कौटुंबिक व्यवसाय यावरून भेदभावास मनाई. कोणत्याही कारणाने कोणत्याही बालकास अन्यायकारक पद्धतीने वागविले जाऊ नये.

३. मुलांच्या सर्वोच्च हिताचा विचार: प्रौढांनी आणि शासनाने आपण घेत असलेल्या निर्णयांचा मुलांवर काय परिणाम होईल याचा विचार कोणताही निर्णय घेताना करावा.

४. बालहक्कांची प्रत्यक्ष अंमलबजावणीः आपल्या देशातील प्रत्येक बालकास या करारातील सर्व हक्कांचा लाभ घेता यावा याची काळजी संबंधित शासनाने घ्यावी.

५. मुलांच्या विकासात कुटुंबाचे मार्गदर्शन: आपले हक्क उत्तम रीतीने कसे वापरावे याबाबत आपल्या मुलांना मार्गदर्शन करण्याचे काम शासनाने मुलांच्या कुटुंबांना व लोकसमूहांना करु द्यावे.

६. जिवंत राहणे आणि विकसित होणे: प्रत्येक बालकास जिवंत राहण्याचा हक्क आहे. उत्तम रीतीने मुलांचे अस्तित्व टिकवण्याची व त्यांचा विकास घडवण्याची काळजी शासनाने घ्यावी.

७. नाव आणि राष्ट्रीयत्वः मुलांची जन्मानंतर नोंदणी करण्यात यावी व शासनाची अधिकृत मान्यता असणारे एक नाव ठेवण्यात यावे. मुलांना स्वतःचे राष्ट्रीयत्व  असावे (म्हणजेच कोणत्यातरी देशाचे नागरिक म्हणून त्यांना ओळख मिळावी). 

८. ओळख: मुलांना स्वतःची स्वतंत्र ओळख प्राप्त करण्याचा हक्क आहे, म्हणजेच त्यांचे नाव, राष्ट्रीयत्व आणि  कौटुंबिक नातेसंबंधांची अधिकृत नोंद केलेली असावी.

९. कुटुंब एकत्र राखणे: मुलांची व्यवस्थित काळजी घेतली जात नसेल अशा परिस्थितीव्यतिरिक्त केव्हाही मुलांना त्यांच्या पालकांपासून दूर करू नये.

१०. भिन्न देशांमधील पालकांशी संपर्क: वेगवेगळ्या देशांमध्ये  राहत असलेल्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी व एकमेकांसोबत राहण्यासाठी प्रवास करण्याची परवानगी संबंधित देशांच्या  शासनांकडून देण्यात यावी.

११. अपहरणापासून संरक्षणः कायद्याचे उल्लंघन करून मुलांना देशाबाहेर घेऊन जाण्याचे प्रकार संबंधित देशांच्या शासनांनी घडू देऊ नयेत.

१२. मुलांच्या मतांचा आदर: मुलांवर परिणाम करणाऱ्या मुद्यांवर मोकळेपणाने मत प्रदर्शित करण्याचा हक्क प्रत्येक बालकास आहे. मोठ्या माणसांनी मुलांचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि मुलांच्या मतांचा गांभीर्याने विचार करावा.

१३. मोकळेपणाने विचार मांडणे: आपण शिकलेल्या गोष्टी, आपले विचार आणि आपल्या भावना इतरांजवळ मोकळेपणाने व्यक्त करण्याचा हक्क मुलांना आहे.

१४. वैचारिक आणि धार्मिक स्वातंत्र्य: मुले आपले स्वतःचे विचार, मते आणि धर्म निवडू शकतात.

१५. समूह निर्मिती अथवा सहभागः मुले कोणत्याही समूहात अथवा संस्थेत सहभागी होऊ शकतात किंवा नवीन संस्था अथवा समूह निर्माण करून इतरांशी भेटीगाठी करू शकतात.

१६. खाजगीपणाचे संरक्षण: प्रत्येक बालकास आपले खाजगीपण जपण्याचा हक्क आहे.

१७. माहिती प्राप्त करणे: इंटरनेट, रेडीयो, टेलिव्हिजन, वर्तमानपत्रे, पुस्तके आणि इतर स्रोतांद्वारे माहिती मिळवण्याचा हक्क मुलांना आहे.

१८. पालकांची जबाबदारी: पालकांनी आणि सांभाळ करणाऱ्यांनी नेहमी मुलांसाठी काय सर्वोत्तम राहील याचा विचार करावा. यासाठी संबंधित शासनाने त्यांना मदत करावी.

१९. हिंसेपासून संरक्षणः संबंधित शासनाने मुलांचे हिंसेपासून व अत्याचारापासून रक्षण करावे, तसेच मुलांची काळजी घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून मुले दुर्लक्षित राहणार नाहीत याची काळजी घ्यावी.

२०. कुटुंबाचा आधार नसलेली मुले: आपल्या स्वतःच्या कुटुंबाकडून ज्यांची काळजी घेतली जाऊ शकत नाही अशा  मुलांना इतर लोकांनी व्यवस्थित आणि आदराने सांभाळावे, अशा प्रत्येक बालकाचा तो हक्क आहे.

२१. दत्तक गेलेली मुलेः दत्तक गेलेल्या मुलांसाठी जे काही सर्वोत्तम असेल ते केले जाणे महत्त्वाचे आहे.

२२. निर्वासित मुले: निर्वासित म्हणून दुसऱ्या देशात आश्रयाला आलेल्या मुलांना मदत आणि संरक्षण दिले जावे. त्या देशात जन्माला आलेल्या मुलांप्रमाणेच सर्व हक्क या मुलांनाही मिळावेत.

२३. दिव्यांग मुलेः अशा मुलांना स्वावलंबी बनता यावे आणि समाजात सक्रिय सहभाग घेता यावा, यासाठी कोणतेही अडथळे राहू नयेत याची काळजी संबंधित शासनाने घ्यावी.

२४. आरोग्य, पाणी, अन्न, पर्यावरण: सर्वोत्तम आरोग्य सेवा, स्वच्छ पाणी, पौष्टिक अन्न आणि स्वच्छ व सुरक्षित पर्यावरण मिळवण्याचा प्रत्येक बालकास हक्क आहे.

२५. मुलांना ठेवलेल्या ठिकाणाची तपासणीः संगोपन, संरक्षण किंवा आरोग्याच्या कारणावरून घरापासून दूर कुठेतरी ठेवण्यात आलेल्या मुलांच्या परिस्थितीची नियमितपणे तपासणी केली जावी आणि संबंधित मुलास ठेवण्यासाठी अजूनही तीच सर्वोत्तम जागा आहे का, याची खात्री केली जावी.

२६. सामाजिक व आर्थिक मदतः संबंधित शासनाने गरीब कुटुंबातील मुलांना पैसे किंवा इतर मदत पुरवावी.

२७. अन्न, वस्त्र, सुरक्षित निवाराः अन्न, वस्त्र आणि राहण्यासाठी सुरक्षित जागा मिळवण्याचा प्रत्येक बालकास हक्क आहे.

२८. शिक्षण प्राप्त करणे: प्रत्येक बालकास शिक्षण घेण्याचा हक्क आहे. प्राथमिक शिक्षण मोफत दिले जावे. माध्यमिक आणि उच्च शिक्षण प्रत्येक बालकास उपलब्ध करून दिले जावे.

२९. शिक्षणाची उद्दीष्टे: मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या व्यक्तिमत्व, कौशल्य आणि क्षमतांचा पूर्ण विकास घडवण्यासाठी मदत मिळावी.

३०. अल्पसंख्य संस्कृती, भाषा आणि धर्म: अल्पसंख्य असूनही आपली स्वतःची भाषा, संस्कृती आणि धर्माचे आचरण करण्याचा सर्व मुलांना हक्क आहे.

३१. आराम, खेळ, संस्कृती, कला: प्रत्येक बालकास विश्रांती घेण्याचा, आराम करण्याचा, खेळण्याचा, तसेच सांस्कृतिक आणि सृजनात्मक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचा हक्क आहे.

३२. धोकादायक कामापासून संरक्षण: मुलांच्या शिक्षण, आरोग्य किंवा विकासासाठी धोकादायक किंवा वाईट असलेले काम करण्याविरुद्ध संरक्षण मिळवण्याचा सर्व मुलांना हक्क आहे.

३३. धोकादायक औषधांपासून संरक्षणः शासनाने धोकादायक औषधांचे सेवन, निर्मिती, वाहतूक किंवा विक्री करण्यापासून मुलांचे संरक्षण करावे.

३४. लैंगिक अत्याचारापासून संरक्षण: शासनाने लैंगिक पिळवणूक व लैंगिक अत्याचारापासून मुलांचे संरक्षण करावे.

३५. मानवी विक्री आणि तस्करीस प्रतिबंध: मुलांचे अपहरण आणि विक्री होऊ नये याची काळजी शासनाने घ्यावी.

३६. पिळवणुकीपासून संरक्षणः सर्व प्रकारच्या पिळवणुकीपासून संरक्षण मिळवण्याचा प्रत्येक बालकास हक्क आहे.

३७. ताब्यात घेतलेली मुलेः कायदा तोडल्याच्या आरोपाखालील मुलांना ठार मारले जाऊ नये, त्यांचा छळ केला जाऊ नये, त्यांना कायमचे तुरूंगात डांबू नये, किंवा प्रौढ व्यक्तींसोबत तुरुंगात ठेवू नये.

३८. युध्दकाळातील संरक्षण: युध्दकाळामध्ये संरक्षण मिळवण्याचा सर्व मुलांना हक्क आहे.

३९. बरे होऊन पूर्वस्थितीला येणे: जखमी झालेल्या, दुर्लक्षित केल्या गेलेल्या, वाईट पद्धतीने वागवल्या गेलेल्या किंवा युध्दग्रस्त मुलांना आपले आरोग्य आणि आत्मसन्मान पूर्वस्थितीला आणण्यासाठी मदत मिळवण्याचा हक्क आहे.

४०. कायदा तोडणारी मुले: कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखालील मुलांना कायदेशीर सहाय्य आणि न्यायपूर्ण वागणूक मिळवण्याचा हक्क आहे.

४१. मुलांसाठी सर्वोत्तम कायद्यांची अंमलबजावणीः जर एखाद्या देशातील कायदे या करारापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने बाल हक्कांचे संरक्षण करत असतील, तर त्याच कायद्यांची अंमलबजावणी करण्यात यावी.

४२. प्रत्येक व्यक्तीस बालहक्क माहिती व्हावेत: या कराराबद्दल आणि बालहक्कांबद्दल माहिती प्रत्येक शासनाने मुले आणि मोठ्या माणसांपर्यंत स्वतःहून पोहोचवावी.

४३. या कराराची कार्यपद्धती (४३ ते ५४): सर्व मुलांना आपल्या सर्व हक्कांचा लाभ घेता यावा यासाठी संबंधित शासनव्यवस्था, बालहक्क समिती आणि युनिसेफ यांच्यासहीत संयुक्त राष्ट्रसंघ, तसेच इतर संस्था कशाप्रकारे काम करतात याची माहिती या कलमामध्ये देण्यात आलेली आहे.


मागील ३० वर्षांमधील वाटचालः

    UNCRC हा आतापर्यंत सर्वात जास्त मान्यता प्राप्त झालेला मानवी हक्क संबंधी करार आहे. या कराराने संबंधित शासनव्यवस्थेला कायदे आणि धोरणे बदलण्यासाठी, तसेच प्रत्येक बालकास सर्वोत्तम आरोग्य सेवा आणि पोषण पुरविण्यावर गुंतवणूक करण्यासाठी प्रेरणा दिली आहे. या करारामुळे मुलांचे हिंसेपासून व पिळवणुकीपासून संरक्षण करण्यासाठी अधिक कडक उपाययोजना करणे भाग पडले आहे. तसेच या करारामुळे मोठ्या प्रमाणावर मुलांना आपले म्हणणे मांडता आले असून, आपल्या समाजातील त्यांचा सहभाग वाढला आहे.

    काही बाबतीत अशी प्रगती झालेली असली तरी, अजूनही UNCRC ची संपूर्ण अंमलबजावणी अथवा सर्वत्र प्रचार आणि प्रसार झालेला नाही. पुरेशा आरोग्य सेवा, पोषण, शिक्षण आणि संरक्षण न मिळाल्याने लाखो मुलांच्या हक्कांचे उल्लंघन होतच आहे. शाळा सोडणे, धोकादायक काम करणे, लग्न करणे, युद्धामध्ये लढणे भाग पाडले गेल्याने, तसेच प्रौढांसाठीच्या तुरुंगांमध्ये डांबून टाकल्याने मुलांचे बालपण अर्ध्यातूनच कुजून जात आहे.

    यासोबतच, डिजिटल तंत्रज्ञानाचा उदय, पर्यावरणीय बदल, दीर्घकाळ चालणारे संघर्ष आणि समूह स्थलांतर, अशा जागतिक बदलांमुळे बालपणाचे संदर्भ पूर्णपणे बदलून जात आहेत. आजच्या मुलांसमोर त्यांच्या हक्कांच्या आड येणारे नवे धोके उभे ठाकले आहेत, परंतु त्याचवेळी आपले हक्क प्रत्यक्षात उतरवण्याच्या नवीन संधीदेखील त्यांच्या समोर आहेत.

गेल्या ३० वर्षांच्या कालावधीत, जागतिक स्तरावर मुलांच्या आयुष्यामध्ये पुढीलप्रमाणे परिवर्तन घडून आले आहे:

- १९९० पासून ५ वर्षांखालील मुलांच्या मृत्युंमध्ये ५०% पेक्षा जास्त घट;
- १९९० पासून कुपोषित मुलांच्या प्रमाणात जवळजवळ ५०% घट;
- १९९० च्या तुलनेत कितीतरी जास्त लोकांना आज शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध.

परंतु असे असले तरी, जगभरातील बालकांवर पुढील धोक्यांचे सावट अजूनही दिसत आहेः

- २६.२ कोटी मुले आणि युवक शालेय शिक्षणापासून वंचित;
- ६५ कोटी मुली आणि महिलांचे वयाची १८ वर्षे पूर्ण होण्याआधीच लग्न;
- २०४० सालापर्यंत, जवळपास २५% मुले अत्यंत मर्यादित पाणीसाठा असलेल्या क्षेत्रामध्ये राहत असतील.


UNCRC आणि भारत:

    भारताने ११ डिसेंबर १९९२ रोजी UNCRC चा स्वीकार केला, ज्यामध्ये बालमजुरीसंदर्भातील काही मुद्यांवरील विशिष्ट मतभेद वगळता सर्व कलमांना तत्वत: मंजुरी देण्यात आली.

    भारतामध्ये १८ वर्षे वयाखालील मुलांना काम करण्यास प्रतिबंध करणारा कायदा आहे, परंतु बालमजुरीवर सरसकट बंदी मात्र नाही. 'धोकादायक' मानल्या गेलेल्या उद्योगांव्यतिरिक्त इतर जवळपास सर्व उद्योगांमध्ये १८ वर्षांखालील मुलांना कामावर ठेवण्यास सर्वसाधारणपणे मान्यता आहे. ऑक्टोबर २००६ मध्ये आलेल्या एका कायद्यानुसार, हॉटेल, उपहारगृहे, आणि घरगुती कामासाठी नोकर म्हणून बालमजूर ठेवण्यास बंदी घालण्यात आली असली तरी, घरकामात मदत करण्यासाठी मुलांना अजूनही मोठया प्रमाणावर मागणी असल्याचे दिसून येते. अगदी शासकीय आकडेवारीवर विश्वास ठेवला तरीदेखील, देशातील सध्याच्या १४ वर्षांखालील बालमजुरांची संख्या ४० लाखांपर्यंत असल्याचे समजते.

    २०१६ सालच्या बालमजुरी प्रतिबंधक कायद्यामध्ये १४ वर्षे वयाखालील मुलांना नोकरीवर ठेवण्यास मनाई करण्यात आली, तसेच किशोरवयीन (१४ ते १७ वयोगटातील) मुलांच्या धोकादायक व्यवसायातील कामावर बंदी घालण्यात आली. १४ वर्षांखालील मुलांनी काम करण्याच्या बाबतीत काही अपवाद नोंदवण्यात आले, जसे की कुटुंबाच्या व्यवसायात मदत करणे, आणि त्यांच्या शालेय शिक्षणामध्ये अडथळा न आणता व संध्याकाळी ७ ते सकाळी ८ ही वेळ सोडून इतर वेळेत मनोरंजनाच्या उद्योगात काम करणे.

    बालमजुरीच्या मुद्यावर भारताचे UNCRC सोबत मतभेद आहेतच, परंतु याशिवाय भेदभावास प्रतिबंध, जीवनावश्यक वातावरणाची निश्चिती, विकासाच्या समान व पुरेशा संधी, मुलांच्या मतांचा आदर, वैचारिक आणि धार्मिक स्वातंत्र्य, खाजगी आयुष्याची जपणूक, शिक्षण व माहिती मिळवण्याचा अधिकार, हिंसा, धोकादायक काम, लैंगिक छळ आणि पिळवणुकीपासून संरक्षण अशा हक्कांचा लाभ देशातील सर्व मुलांना मिळवून देण्यातही गेल्या ३० वर्षांत शासनाला यश आलेले नाही.

    UNCRC ने जागतिक स्तरावर मान्य केलेले हक्क आपल्या देशातील मुलांना मिळत नसल्याच्या मुद्यावर पालक, मुलांचे सांभाळकर्ते, तसेच समाजातील सजग नागरिकांनी मुलांच्या वतीने शासनाला जाब विचारण्याची जबाबदारी स्विकारली पाहिजे. तसेच, या बालहक्कांबद्दल मुलांना आणि एकूणच समाजाला माहिती मिळावी यासाठी शासनाने आणि माध्यमांनी स्वतःहून विशेष प्रयत्न करायची गरज आहे.


- मंदार शिंदे
९८२२४०१२४६
shindemandar@yahoo.com

(Click on the image to read)



Share/Bookmark

Wednesday, November 13, 2019

वारुची गोष्ट

चला गोष्ट सांगूया…

✈🛩👩‍✈👨‍👧👩‍✈🛩✈

वारुची गोष्ट
(लेखकः मंदार शिंदे 9822401246)

एक होतं विमान, नाव त्याचं वारु;
उडण्याचं काम अजून व्हायचं होतं सुरु.
चकचकीत पोलादाची होती त्याची बॉडी;
वयाच्या मानानं मात्र बरीच होती जाडी.
जाडजूड लांब-रुंद वारु सुखात होता;
उडण्याची वेळ येऊच नये, विचार करत होता.
बसवलेले होते त्याला जरी मोठ्ठे पंख;
हवेत उडायच्या विचारानं डोकंच व्हायचं बंद.
खरंच सांगतो वारुचं हे वागणं होतं विचित्र;
हवेत उडायला घाबरणारं हे विमान होतं भित्रं.

पुढची गोष्ट वाचा अमेझॉन किंडलवर -

जेशूची गोष्ट व इतर: Stories in Verse 
(Marathi Edition) by Mandar Shinde

 https://www.amazon.in/dp/B089VKFWJ9


✈🛩👩‍✈👨‍👧👩‍✈🛩✈

- मंदार शिंदे 9822401246


Share/Bookmark

Monday, November 4, 2019

गाडी बुला रही है...


"गाडी बुला रही है…"
🚂🚂🇿🇦🇮🇳📚📚🚂🚂
- मंदार शिंदे ९८२२४०१२४६

या फोटोमध्ये दिसणारी ट्रेन साधीसुधी ट्रेन नाही. एका माणसाचं आणि दोन देशांचं आयुष्य बदलून टाकणारी ट्रेन आहे ही. याच ट्रेनमधून, मोहनदास करमचंद गांधी नावाच्या माणसाला प्रस्थापित व्यवस्थेनं प्लॅटफॉर्मवर ढकलून दिलं आणि त्याच प्लॅटफॉर्मवर आयुष्यातलं खूप मोठं सत्य त्याला भेटलं. 'मोहनचा महात्मा' होण्याची खरी प्रक्रिया इथूनच सुरू झाली, असं मानलं जातं.

नाही, या फोटोमधे दिसणारी ट्रेन खरीखुरी ट्रेन नाही आणि हा प्लॅटफॉर्मसुद्धा दक्षिण आफ्रिकेतला नाही. नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरच्या 'इस्पॅलियर हेरिटेज स्कूल' या शाळेच्या आवारात ही रचना केली आहे शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांनी!

दगडाच्या मूर्तीला देवाची प्रतिकृती न मानता देवच समजून तिला मनोभावे पूजणारी आपली संस्कृती. अशा संस्कृतीमध्ये, मोहनचा महात्मा करणाऱ्या ट्रेनची ही 'प्रतिकृती' आहे, असं मला म्हणावंसं वाटत नाही. या ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर उतरलं की समोरच्या विस्तीर्ण पटांगणात महात्मा गांधींचं जगातील पहिलं भव्य धातू स्तंभ शिल्प, सचिन जोशी आणि श्याम लोंढे या मित्रांनी उभं केलेलं दिसतं.

महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रभावित होऊन, शिक्षण क्षेत्रात अनेक व्यावहारिक प्रयोग करीत, 'इस्पॅलियर' नावाची ही प्रयोगशील शाळा सचिन जोशी चालवतात. झाडा-झुडपांना स्वतःच्या कलानं वाढू देण्यासाठी फक्त आधाराला उभी केलेली भिंत किंवा रचना असा 'इस्पॅलियर' या मूळ फ्रेंच शब्दाचा अर्थ. शाळेच्या नावावरून इथल्या शिक्षणपद्धतीचा अंदाज आला असेल तुम्हाला. 'इस्पॅलियर हेरिटेज स्कूल'च्या संपूर्ण परिसरात शिक्षणाबद्दलच्या इतक्या अभिनव संकल्पना प्रत्यक्षात आणलेल्या आहेत की, या परिसरात एखाद्या मुलाला कुठल्याही सूचनांशिवाय फक्त फिरू दिलं तरी ते खूप काही शिकून जाईल. मुलंच कशाला, मोठ्या माणसांनीसुद्धा शिकण्यासारख्या असंख्य गोष्टी या वास्तूच्या काना-कोपऱ्यात पेरून ठेवलेल्या आहेत.

शाळेच्या भिंतीवर रंगवलेली पुस्तकांची कव्हर्स, गोथिक शैलीतल्या बांधकामात बसवलेले रविंद्रनाथ टागोरांचे ग्रीक तत्वज्ञांसारखे शिल्प, लपाछपी खेळण्यासाठी आणि गोष्टी सांगण्या-ऐकण्यासाठी खास सीतागुंफेसारख्या बनवलेल्या छोट्या-छोट्या जागा, झाडाखालचा वर्ग, वरच्या मजल्यावरून खाली यायला घसरगुंडी, भिंतीमध्ये कोरलेली महत्त्वाची ऐतिहासिक सामाजिक घटना-चित्रं, अशी अनेक उदाहरणं देता येतील. पण त्याबद्दल वाचून किंवा फोटो बघून या गोष्टी समजणार नाहीत. त्या प्रत्यक्ष जाऊन अनुभवल्याच पाहिजेत.

तशीच ही मोहनचा महात्मा बनवणारी ट्रेन आणि त्या ट्रेनच्या बोगीत रचलेली शाळेची लायब्ररी! अशी ट्रेन आणि असा प्लॅटफॉर्म प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी अनुभवायला मिळतो, पण त्या प्रत्येक मोहनचा महात्मा नाही होत. मग 'त्या' मोहनचा महात्मा करणारी ही ट्रेन प्रत्येकानं किमान बघून तरी यावी, मनात साठवावी. त्या प्लॅटफॉर्मवरच्या बाकड्यावर एकट्यानं बसून आपल्या आयुष्यातला 'ट्रेन प्रसंग' आठवावा आणि आपल्या आत्म्याला त्या महात्म्याशी जोडण्याचा प्रयत्न करावा…

- मंदार शिंदे ९८२२४०१२४६
०१/११/२०१९


Share/Bookmark

Tuesday, October 29, 2019

गोष्ट बायकांच्या बस प्रवासाची...

गोष्ट बायकांच्या बस प्रवासाची

- मंदार शिंदे ९८२२४०१२४६
(वाचन वेळः ६ मिनिटे)

संगीताचा नवरा एका कंपनीत नोकरी करतो. घरापासून कंपनी दहा-बारा किलोमीटर अंतरावर आहे. रोज कंपनीत जाऊन परत यायला साधारण अर्धा लीटर पेट्रोल बाईकमधे टाकावं लागतं. म्हणजे जवळपास रोजचे चाळीस रुपये खर्च होतात. महिन्याचे साधारण एक हजार रुपये.

दहा-बारा हजार रुपये पगारावर काम करणाऱ्या संगीताच्या नवऱ्याला हे प्रवासाचे हजार रुपये परवडत नाहीत, पण त्याशिवाय तो कामावर जाऊच शकणार नाही. नाईलाज आहे.

संगीतासुद्धा कामाला जाते, पण ती कुठल्या कंपनीत नोकरीला नाही.

सकाळी लवकर तीन-चार ऑफीसेसमधे साफसफाईचं काम असतं. डॉक्टरांचं क्लिनिक, सीए साहेबांचं ऑफीस, कोचिंग क्लासेस, अशा ठिकाणी तिला सकाळी दहा वाजेपर्यंत काम संपवावं लागतं. कालचा दिवसभर साठलेला कचरा टाकणं, झाडून-पुसून ऑफीस स्वच्छ करणं, टेबलं आणि खिडक्यांच्या काचा रोज साफ करणं, असं साधारणपणे काम असतं.

दुपारच्या वेळेत एका पाळणाघराची सफाई आणि संध्याकाळी एक-दोन कामं उरकून संगीता घरी येते.

संगीता काम करत असलेलं पाळणाघर तिच्या घरापासून सगळ्यात लांब म्हणजे पाच किलोमीटर अंतरावर आहे. पण वेगवेगळ्या ऑफिसच्या वेगवेगळ्या बिल्डींग एकमेकांपासून लांब-लांब आहेत. हिशोबच केला तर दिवसभरात संगीताला सुद्धा पंधरा-वीस किलोमीटरचा प्रवास पडतो.

पण संगीताकडं स्वतःची गाडी नाही आणि बसमधे एकदा बसलं की दहा रुपयांचं तिकीट काढायला लागतं. दिवसातून पाच-सहा वेळा चढ-उतार करून पन्नास-साठ रूपये खर्च करणं तिला शक्य नाही. सगळीकडची कामं धरून तिचं महिन्याचं उत्पन्न सहा-सात हजारांच्या आतच आहे.

कधीतरी खूपच दमायला झालं तर संगीता बस स्टॉपवर जाऊन थांबते. पण मग स्टॉपच्या समोर लावलेलं मोठ्ठं होर्डींग तिला दिसतं. एक आई आपल्या मुलाला हॉर्लिक्स घालून दुधाचा ग्लास देताना दिसते. किंवा किंडरजॉय चॉकलेटसाठी हट्ट करणारा मुलगा आणि कौतुकानं त्याला किंडरजॉय घेऊन देणारी आई दिसते. मग संगीता पुन्हा चालत-चालत घरी जायला निघते. बस तिकीटाच्या वाचवलेल्या दहा रुपयांची इवलीशी कॅडबरी मुलासाठी आठवणीनं घेऊन जाते.

नेहा एका सॉफ्टवेअर कंपनीत जॉब करते. नेहाचा नवरा एका बँकेत जॉब करतो. नेहाची कंपनी आणि तिच्या नवऱ्याची बँक घरापासून पंधरा-वीस किलोमीटर अंतरावर आहेत. नेहाकडं स्वतःची स्कूटी आहे आणि तिच्या नवऱ्याकडं बाईक आहे.

नेहाचा नवरा रोज बँकेत बाईक घेऊन जातो. त्याच्या बाईकचं ऐव्हरेज चांगलं आहे. नेहाची कंपनी छोटी आहे, त्यामुळं कॅब वगैरे न्यायला येत नाही. स्कूटीचं ऐव्हरेज कमी असल्यामुळं ती परवडत नाही. नेहाला दोनदा बस बदलून ऑफीसला जावं लागतं.

येताना कधी-कधी नेहाचा नवरा तिला पिक-अप करतो, पण त्याच्या सोयीनुसार! बहुतेक वेळेला त्याला बँक बंद झाल्यावर मित्रांसोबत पार्टीला 'जावं लागतं'. नेहाला आवडत नसताना बसचा प्रवास करावा लागतो. दोन बस बदलल्यामुळं तिकीटाचे पैसेसुद्धा जास्तच खर्च होतात.

महिन्याच्या जमा-खर्चाचा हिशोब मांडला की नेहा आणि तिच्या नवऱ्याची नेहमी भांडणं होतात. नेहाचा पगार तिच्या नवऱ्याच्या पगारापेक्षा कमी असूनसुद्धा तिचा रोजचा बस तिकीटांचा खर्च त्याच्या बाईकच्या पेट्रोल खर्चापेक्षा जास्त होतो. यावरून तिचा नवरा कधी चेष्टेत तर कधी रागानं तिला बोलतो. होम-लोनचे हप्ते सुरु असल्यानं नेहाला जॉब सोडणंसुद्धा शक्य होत नाही.

यावर नेहानंच एक उपाय शोधून काढलाय. ऑफीसपासून घराच्या उलट्या दिशेनं अर्धा-एक किलोमीटर चालत गेलं की मोठा चौक लागतो. तिथून तिच्या घराच्या दिशेनं जाणारी बस मिळू शकते.

आता ऑफिसच्या दारातून बस पकडून नंतर दुसरी बस पकडण्याऐवजी, नेहा रोज सकाळ-संध्याकाळ एक-एक किलोमीटर चालत जाते. चालण्याचा आणि स्टॉपवर बसची वाट बघण्याचा तासभर वेळ जास्त जातो खरा, पण दोनऐवजी एकाच बसचं तिकीट काढायला लागतं. असं करून महिन्याचा प्रवासखर्च एकाच महिन्यात तिनं निम्म्यावर आणून ठेवलाय. आयताच व्यायाम होतोय याचं समाधानही आहेच.

दोघांचा मिळून महिन्याचा प्रवासखर्च कमी झाला म्हणून नेहाचा नवरा खूष आहे. याच महिन्यात त्याचं प्रमोशनसुद्धा ड्यू आहे. आपण वरची पोस्ट घ्यायला लायक आहोत हे इम्प्रेशन मॅनेजमेंटवर पाडण्यासाठी त्यानं कार घ्यायचं ठरवलंय. कार लोनसाठी अप्लायसुद्धा केलंय. नेहा तसाही बसच्या तिकिटांवर खर्च करत असते, म्हणून तिची 'पडून राहिलेली' स्कूटी विकून कारच्या डाऊन पेमेंटची तयारी तिचा नवरा करतोय.

रचनाच्या कॉलेजचा ग्रुप नाट्यस्पर्धेत उतरतोय. तालमीला कॉलेजजवळ जागा मिळत नाही, म्हणून एका ग्रुप मेम्बरच्या सोसायटीत गच्चीवर तालमी करायचं ठरलंय. पण ती सोसायटी शहरापासून थोडी लांब आहे. रचनाच्या घरापासून तर कॉलेज दहा किलोमीटर आणि तालमीचं ठिकाण तिथून पुढं दहा किलोमीटर.

घरून नाटकात काम करायला विरोध नाही, पण बसनं प्रवास करायचा म्हणजे अजून पैसे खर्च होणार. कॉलेज संपल्यावर कुणाच्या तरी गाडीवर बसून जायचा विचार केला. पण बाकीचे सगळे तिकडच्याच भागात राहणारे. त्यामुळं तालमीनंतर एकटीलाच बसनं परत येणं भाग पडणार!

कॉलेजचं अजून एक वर्ष बाकी आहे. शेवटच्या वर्षी प्रोजेक्ट वगैरेसाठी जास्त पैसे खर्च होणारच आहेत. शिवाय वर्षभर वह्या-पुस्तकं, सहली, गॅदरिंग, काही ना काही खर्च असतातच. धाकटा भाऊसुद्धा दहावीत आहे. त्याच्या कॉलेजसाठी पुन्हा खर्च वाढणारच. आत्ता महिना-दीड महिन्यासाठी फक्त बसभाड्याचे जादा हजार रुपये आपल्याला कसे परवडतील?

रचनानं नाटकात काम करायला नकार दिलाय. त्या ऐवजी कॉलेजच्या जवळच एका कॉम्प्युटर इन्स्टीट्यूटमधे पार्ट-टाईम जॉबसाठी इंटरव्ह्यू देऊन आलीय. पुढच्या वर्षी नाटकात भाग घ्यायचा असेल तर बस भाड्यापुरते तरी पैसे आपल्या स्वत:च्या पर्समधे असावेत असा विचार तिनं केलाय.

बसच्या तिकीटांचा खर्च परवडत नाही म्हणून बायका काही किलोमीटर रोज चालत जातात, किंवा बसच्या प्रवासासाठी पैसे खर्च होतील म्हणून त्यांना काही संधी सोडाव्या लागतात, यावर संगीताच्या नवऱ्याचा, नेहाच्या नवऱ्याचा, रचनाच्या मित्रांचा विश्वास बसत नाही. संगीता, नेहा, आणि रचना त्यांना ही गोष्ट समजावण्याच्या किंवा पटवून देण्याच्या भानगडीत पडत नाहीत. 

बसच्या रोजच्या प्रवासाला पैसे पडणार नसतील तर आपले किती कष्ट वाचतील किंवा आपल्याला कुठल्या संधी मिळू शकतील, यावर संगीता, नेहा, आणि रचना विचार करतायत. बायकांचा रोजचा बसचा प्रवास हा मुद्दा पुढच्या निवडणुकीत राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर येऊ शकेल का, हा विचार मात्र अजून त्या तिघींपैकी कुणाच्याही डोक्यात आलेला दिसत नाही…

- मंदार शिंदे ९८२२४०१२४६
२९/१०/२०१९


Share/Bookmark

Monday, October 28, 2019

National Education Policy Update News

नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षण हक्क कायद्याची व्याप्ती बारावीपर्यंत वाढवण्याच्या भूमिकेवर घूमजाव

- रितिका चोप्रा । दि इंडियन एक्सप्रेस - २८ ऑक्टोबर २०१९

शिक्षण हक्क कायद्याची व्याप्ती बारावीपर्यंत वाढवण्याच्या, तसंच तीन वर्षांच्या बालशिक्षणाचा त्यामध्ये समावेश करण्याबद्दलच्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यातील तरतुदींवर मानव संसाधन विकास मंत्रालयानं घूमजाव केलं आहे.

"शिक्षण हक्क कायद्याची व्याप्ती वाढवण्यावर विचार केला जाईल" असं अंतिम धोरणात म्हटलं आहे, ज्याबद्दल धोरणाच्या मसुद्यात खात्रीने व्याप्ती वाढवण्याचा उल्लेख केला होता.

माजी इस्रोप्रमुख के कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञांच्या समितीनं जून महिन्यात मानव संसाधन विकास मंत्रालयाकडं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा सादर केला होता, आणि जनतेच्या सूचनांसाठी मंत्रालयाच्या वेबसाईटवर तो अपलोड करण्यात आला होता. सरकारकडं यावर दोन लाख सूचना प्राप्त झाल्या असून, पन्नास पानांच्या अंतिम धोरणावर आता कॅबिनेटची मंजुरी मिळणं बाकी आहे.

धोरणाच्या मसुद्यातील नॅशनल ट्युटर्स प्रोग्रॅम आणि रेमेडीयल इंस्ट्रक्शनल एड्स प्रोग्रॅम सुरू करण्याची सूचनादेखील अंतिम धोरणात बाजूला ठेवण्यात आली आहे. मूलभूत वाचन आणि गणितीय क्षमता विकासासाठी हे दोन उपक्रम सुचवण्यात आले होते.

नॅशनल ट्युटर्स प्रोग्रॅम अंतर्गत, प्रत्येक शाळेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेमध्ये आठवड्यातून पाच तासांपर्यंत, मदतीची गरज असलेल्या इतर विद्यार्थ्यांसोबत जोडून देण्याचं नियोजन होतं. रेमेडीयल इंस्ट्रक्शनल एड्स प्रोग्रॅम हा दहा वर्षांचा प्रकल्प सांगितला होता, ज्यामध्ये अभ्यासात मागं पडलेल्या विद्यार्थ्यांना मदत करून त्यांना इतर विद्यार्थ्यांच्या पातळीवर घेऊन येण्यासाठी स्थानिक समुदायांमधून मार्गदर्शक - विशेषतः महिला - प्रशिक्षित करण्याचं नियोजन होतं.

अंतिम शैक्षणिक धोरणामध्ये फक्त एकास एक सह-अध्ययन (वन-टू-वन पीयर ट्यूटरिंग) संकल्पनेची शिफारस करण्यात आली आहे. "प्रशिक्षित शिक्षकांच्या देखरेखीखाली आणि सुरक्षाविषयक बाबींची पुरेशी काळजी घेऊन, सहअध्ययनाचा उपक्रम स्वयंसेवी पध्दतीने इतर विद्यार्थ्यांसाठी आनंददायी स्वरूपात राबविता येईल… शालेय शिक्षण व्यवस्थेच्या या मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या कार्यात सहभाग घेणे स्थानिक समुदायातील व इतर प्रशिक्षित स्वयंसेवकांसाठी आणखी सोयीचे बनविले जाईल," असं अंतिम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात म्हटलं आहे.

https://indianexpress.com/article/education/education-policy-dilutes-assurance-on-rte-cover-up-to-class-12-6090605/




Share/Bookmark

Friday, October 25, 2019

राजकारणाचे धडे

राजकारणाचे धडे

- मंदार शिंदे ९८२२४०१२४६
(वाचन वेळः ८ मिनिटे)

    २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांमध्ये शरद पवारांनी प्रचाराचं रान पेटवलं आणि भाजपच्या 'सत्ता एक्सप्रेस'ला करकचून ब्रेक लागला. पवारांनी व्यक्तिशः घेतलेल्या कष्टाचं आमदाररुपी फळ त्यांना बऱ्यापैकी मिळालं असलं तरी, काँग्रेसची वाढलेली ताकद किंवा थांबलेली घसरण ही जास्त चर्चेचा आणि आश्चर्याचा विषय ठरली हे खरं. कुठलाही स्टार प्रचारक नाही, पवारांसारखा खंबीर नेता नाही, दमदार उमेदवार नाहीत, स्थानिक किंवा राज्याच्या पातळीवर आग लावणारे मुद्दे नाहीत, फंडिंग आणि कार्यकर्त्यांची अनेक वर्षांपासून वानवाच आहे, अशा परिस्थितीत काँग्रेसला लोकांनी दिलेला प्रतिसाद (मतं) अनपेक्षितच. पण या अनपेक्षित निकालाचं विश्लेषण करणंदेखील महत्त्वाचं आणि तितकंच इंटरेस्टिंग ठरेल.

    मुळात, राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष यांच्या अस्तित्वाच्या कसोटीतच बेसिक फरक असतो. एखाद-दुसऱ्या टर्ममध्ये सत्ता गेली किंवा मिळाली म्हणून राष्ट्रीय पक्ष संपत नसतो किंवा फार मोठाही होत नसतो. प्रादेशिक पक्षासाठी मात्र प्रत्येक टर्म ही निर्णयात्मक ठरू शकते. एखाद्या टर्मला मागं पडलेला प्रादेशिक पक्ष पुन्हा उभा करणं फार कठीण जातं. काँग्रेस हा एक राष्ट्रीय पक्ष आहे, महाराष्ट्रात पाच-दहा वर्षे वरखाली झाल्यानं मूळ संघटनेला फार मोठा धक्का बसत नाही. पण शिवसेना, मनसे, आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रादेशिक पक्ष आहेत. एक-दोन टर्म सत्तेपासून लांब राहिले तर, फंडिंगपासून कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्याचं शॉर्टेज निर्माण होतं. हा बॅकलॉग रिकव्हर करणं पुढं-पुढं अजून कठीण होत जातं. यासाठी सत्तेत टिकून राहणं खूप गरजेचं आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांनी प्रचंड तडजोडी करत हा सत्तेत टिकून राहण्याचा मार्ग स्वीकारला आहे. तो त्यांच्या प्रगतीसाठी नाही, तर अस्तित्वासाठी गरजेचा आहे. राज ठाकरे, राजू शेट्टी, अशा इतर प्रादेशिक नेत्यांचा व्यक्तिगत करिष्मा फार काळ टिकणं शक्य नाही. त्यांनी एक बेसिक अजेंडा डोळ्यासमोर ठेवून, किरकोळ तडजोडी करायला हरकत नसावी. अस्तित्व टिकलं तरच ताकद वाढवता येईल. डायरेक्ट ताकद वाढवायला गेला, तर बेडकाचा बैल होण्याऐवजी फुटून मृत्यू होईल, हे लक्षात ठेवलं पाहिजे.

    २०१४ मध्ये मोदी लाट प्रचंड वेगानं येऊन आदळली ती थेट काँग्रेसवरच. मुळात केजरीवालनं तयार केलेल्या पीचवर मोदींनी बॅटिंग करून मॅच जिंकली. तेव्हा केंद्रात आणि दिल्लीसारख्या राज्यांमध्ये काँग्रेसचं अस्तित्व संपल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. पण पुढच्या पाच वर्षांत 'मोदी फीवर' टिकून राहिला, किंबहुना वाढतच गेला, तरीसुद्धा राजस्थान, मध्य प्रदेश, आणि पंजाब, यांसारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या राज्यांमध्ये भाजपचा पाडाव करून काँग्रेसनं सत्ता हिसकावून घेतली. कर्नाटक, गोवा, यांसारख्या राज्यांमध्ये सत्तेत राहण्यासाठी भाजपला आपला नैतिकतेचा बुरखा फाडून हरप्रकारच्या लांड्या-लबाड्या कराव्या लागल्या. आणि आता काही महिन्यांपूर्वीच लोकसभेला एकतर्फी बहुमत मिळवणाऱ्या भाजपनं महाराष्ट्रात मात्र हात दाखवून अवलक्षण करून घेतलंय.

    काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांना कंटाळून जनतेनं मोदींच्या उमेदवारांना निवडून दिलं होतं, त्यांच्या जागी पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच इम्पोर्ट केलेले उमेदवार फडणवीसांनी महाराष्ट्रातल्या जनतेच्या माथी मारायचा प्रयत्न केला. पूर्वी राष्ट्रवादीला 'पक्ष' न म्हणता, 'निवडून येणाऱ्या लोकांची टोळी' म्हणायचे. तोच फॉर्म्युला वापरायचा अयशस्वी प्रयत्न फडणवीसांनी केला. पण म्हणून फक्त बाहेरून आलेल्यांवर आपल्या अपयशाचं खापर त्यांना फोडता येणार नाही. पंकजा मुंडे, राम शिंदे, शिवतारेंसारखे मंत्री, आणि योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, अशा मूळच्या 'अातल्याच' भाजपवासी नेत्यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवलाय. पण आपल्या नियोजित प्रयत्नांना मिळालेलं अपयश पचवण्यासाठी आणि त्यातून भविष्यात उपयोगी पडणारा धडा शिकण्यासाठी लागणारी राजकीय मॅच्युरिटी फडणवीसांसाठी 'आऊट ऑफ सिलॅबस' आहे. त्यामुळं 'स्ट्राईक रेट'ची गणितं मांडून शब्दच्छल करण्याचा पोरखेळ त्यांनी चालवलाय. पुढच्या वेळी २८८ पैकी एकच जागा लढवून ती जिंकली, म्हणजे स्ट्राईक रेट १००% होऊ शकेल असंही पुढच्या पाच वर्षात ते 'अभ्यासोनी' प्रकटतील. फक्त ती एक जागा त्यांची स्वतःची किंवा प्रदेशाध्यक्षांची नसावी, अन्यथा स्ट्राईक रेट शून्यदेखील होऊ शकतो, एवढं लक्षात आलं तरी खूप आहे.

    राष्ट्रवादीसाठी ही पुढची पाच वर्षं खूप क्रिटिकल असणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडून भाजपच्या दावणीला गेलेले बैल सूर्यास्तानंतर माघारी फिरण्याची दाट शक्यता आहे. कारण घरच्यांना डावलून यांना उमेदवारी देऊनसुद्धा निवडून न आलेल्या या अपशकुनी नेत्यांना 'सासरचे लोक' अजून पाच वर्षं नांदवतील, असं वाटत नाही. या परत फिरणाऱ्या चिमण्यांचं नेतृत्व पुन्हा एकदा श्रीमंत छत्रपती राजेंनी केलं तर आश्चर्य वाटायला नको. 'विचित्र दिसत असले तरी आपलेच आहेत ते' असं राष्ट्रवादीचे सध्याचे एकनिष्ठ कार्यकर्ते आणि नेते मानून घेतील का? त्यांच्यावर राग धरुन आपलेच कष्ट वाढवायचे, की या पूर्वाश्रमीच्या झुंबरांना आता पायरीचे दगड बनवून पक्ष अजून मजबूत करायचा, यावर राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला भावना बाजूला ठेवून निर्णय घ्यायला लागणार आहे. यावेळी साहेबांनी तारुन नेलं, पण पुढच्या वेळेसाठी साहेबांना गृहीत धरता येणार नाही. त्या अनुषंगानं मोर्चेबांधणी आत्तापासूनच करावी लागणार आहे.

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सुरुवातीच्या काळात त्यांना शरद पवारांची 'बी टीम' म्हटलं जायचं, पाच वर्षांपूर्वी अरविंद केजरीवालच्या आम आदमी पार्टीला कधी काँग्रेसची तर कधी भाजपची 'बी टीम' म्हणायचे. सध्या वंचित बहुजन आघाडीला हा आरोप सहन करायला लागतोय. या वेळी विधानसभेला काँग्रेस-राष्ट्रवादीचा उमेदवार जितक्या ठिकाणी दोन-तीन हजारांनी पडला, त्या प्रत्येक ठिकाणी 'वंचित'च्या उमेदवारांनी पाच-सात हजार मतं मिळवली आहेत. 'वंचित' नसते तर काँग्रेस-राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला असता, असं बोललं जातंय. पण या झाल्या जर-तरच्या गोष्टी! 'वंचित'चा उमेदवार नसता तर ती मतं 'नोटा'ला सुद्धा जाऊ शकली असती ना? 'वंचित'नं ज्या उमेदवारांना किंवा लोकसमूहांना संधी आणि प्रतिनिधित्व दिलंय, त्यांना आघाडी आणि युतीकडून अशी संधी कधीच मिळाली नाही, भविष्यातही मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळं 'वंचित'नं कुणाचीही 'बी टीम' असल्याच्या आरोपाकडं दुर्लक्ष करत, वर सांगितल्याप्रमाणं एक बेसिक अजेंडा समोर ठेऊन राजकारणात आपलं अस्तित्व टिकवून ठेवावं. आज ना उद्या बहुजन समाजाला त्यांची गरज आणि महत्व पटेल आणि ते 'वंचित'च्या मागं ठामपणे उभे राहतील, अशी आशा धरायला वाव आहे.

    घराणेशाहीतून पुढं आलेल्या उमेदवारांना विरोधकांनी फारसा मजबूत पर्याय न देण्याचा एक अलिखित करार सगळेच पक्ष पाळतात. पण विरोधकांनी चांगला पर्याय दिला नाही तरी आपल्याला हा प्रस्थापित घराण्याचा उमेदवार नकोय, हे सांगण्यासाठी मतदारांकडं आता 'नोटा'चा पर्याय उपलब्ध आहे. सर्वसाधारणपणे 'नोटा'ला पडणारी मतं एकूण मतांच्या ०.५ ते १.५ टक्के एवढ्या प्रमाणात दिसून येतात. या वेळच्या निवडणुकीत, लातूर ग्रामीणला धीरज देशमुख, पलूस-कडेगावला विश्वजीत कदम, वरळीला आदित्य ठाकरे, यांच्याविरुध्द विरोधकांनी नाममात्र उमेदवार दिले. पण मतदारांनी 'नोटा'ला ५ ते १५ टक्के एवढं जास्त मतदान करून आपली नापसंती आवर्जून नोंदवलेली दिसली. या प्रतिकूल मतांचा संबंधित उमेदवारांनी आणि राजकीय पक्षांनी जरूर विचार करावा.

    राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसनं राज्यातलं आपलं अस्तित्व आणि महत्त्व दोन्ही टिकवून ठेवलेलं असलं तरी, प्रादेशिक नेतृत्व मजबूत करण्याची त्यांनाही गरज आहेच. विधानसभा आणि इतर स्थानिक निवडणुका प्रादेशिक प्रश्नांवर लढल्या जातात. त्यासाठी हे प्रश्न समजू शकणारं प्रादेशिक नेतृत्व विकसित करण्याच्या दृष्टीनं तातडीनं पावलं उचलणं गरजेचं आहे. प्रादेशिक स्तरावर आपला करिष्मा दाखवणारे कॅप्टन अमरिंदर, अशोक गेहलोत, डॉ. शशी थरूर, भूपेन्द्र सिंह हुड्डा, अशा नेत्यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विशिष्ट कालावधीसाठी संधी देण्यात यावी. जेणेकरून त्यांच्या अनुभवाचा आणि मेथडॉलॉजीचा फायदा पक्षाला देशभरात करून येता येईल. सोनिया गांधी काँग्रेसमध्ये येण्याआधीच्या काळात राष्ट्रीय नेतृत्व बदलतं राहील याची काळजी घेतली जायची. साधारण १९९८-९९ च्या दरम्यान शरद पवार, ममता बॅनर्जी, आणि इतर अनेक मजबूत प्रादेशिक नेते पक्ष सोडून गेले आणि काँग्रेसच्या प्रदेश कमिट्यांना चक्क एटीएम सेंटरचं स्वरूप आलं. एटीएम केंद्रात जसे प्रत्यक्ष निर्णय घेतले जात नाहीत, वॉचमनशिवाय इतर कुणी विशेष कौशल्य किंवा अधिकार असलेला प्रतिनिधी उपलब्ध नसतो, मशीनमध्ये पैसे भरण्यासाठी मुख्य ब्रांचवर सगळे एटीएम अवलंबून असतात, अशा प्रकारची पक्ष रचना चुकीची आणि नुकसानकारकच आहे. ती बदलण्यासाठी आणि पक्षांतर्गत निर्णय प्रक्रियेचं विकेंद्रीकरण करण्यासाठी तातडीनं उपाययोजना करायची गरज आहे.

    निवडणूक प्रचाराची माध्यमं बदलतायत, साधनं बदलतायत, मतदानाच्या एक महिना आधी प्रचार करून भागत नाही, प्रचार पाच वर्षं सुरूच ठेवायला लागतोय, हे २०१४ च्या निवडणुकीनं आणि त्यानंतरच्या पाच वर्षांच्या काळानं शिकवलं. "सत्ता येते, जाते… पण पाय जमिनीवर ठेवावे लागतात" हे २०१९ च्या निवडणुकीनं शिकवलं. आता हे धडे व्यवहारात कोण कसं वापरतंय, यावर त्या-त्या 'विद्यार्थ्या'ची भविष्यातली राजकीय वाटचाल आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा अवलंबून राहील हे नक्की !

- मंदार शिंदे
9822401246
२५/१०/२০१९


Share/Bookmark

Sunday, October 20, 2019

Voting is important... My say in Hindustan Times


Not voting is denying our say in democracy...

Municipal corporation, legislative assembly and parliament have their own roles and significance in the structure of democracy. Expecting same deliverables from representatives at all these levels shows our lack of knowledge and understanding of the system. Local administration (municipal corporation) is responsible for availability and maintenance of infrastructural facilities and services in the neighbourhood. Members of legislative assembly (MLAs) and parliament have a broader role to play in forming laws and policies, at state and national levels. Citizens can demand implementation of schemes and projects at appropriate levels of representation. It would not be wise to hold a member of legislative assembly responsible for absence or inadequacy of local infrastructure or disruption in local service. Voting is our fundamental right, which must be exercised by every citizen to select their representative. Even if the voters are not convinced with available options to choose from, they can constitutionally express their disapproval by voting for NOTA (None Of The Above). But boycotting voting as a mark of protest is equivalent to denying our own existence and significance in the entire mechanism of democracy.

- Mandar Shinde
Sunday Hindustan Times, Pune
20/10/2019



Share/Bookmark