ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Sunday, July 26, 2015

परप्रांतीय मुलांचा भाषेचा प्रश्न हाताळताना...

आम्ही पुण्यात शिक्षणहक्क कायद्याच्या प्रसारासाठी 'एव्हरी चाइल्ड काउंट्स' हे नागरीक अभियान चालवतो. यामधे ६ ते १४ वयोगटातील शालाबाह्य मुलं शोधून त्यांना जवळच्या म.न.पा. / जि.प. शाळांमधे प्रवेश घेण्यास मदत केली जाते. संपूर्ण पुण्यात हे अभियान राबवण्यासाठी स्वयंसेवक म्हणून विविध क्षेत्रातले नागरीक सहभागी होतात. शालाबाह्य मुलं शोधताना पुण्यातल्या अधिकृत झोपडपट्ट्यांबरोबरच नव्यानं वसवल्या जाणार्‍या वस्त्या आणि बांधकाम साईट्सवरच्या मजूर-वस्त्यांचं सर्वेक्षण केलं जातं. पुण्यातल्या बांधकामांवर काम करणारे बहुतांश मजूर कर्नाटक, राजस्थान, बिहार, आंध्र प्रदेश, अशा परराज्यांतून आलेले आहेत. त्यांची मुलं बर्‍याचदा शालाबाह्यच असतात. या मुलांच्या पालकांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देणं, शाळेत जाण्याचे फायदे समजावणं, इत्यादी गोष्टी स्वयंसेवक पार पाडतात. पण शिक्षणासाठी तयार झालेल्या मुलांना जवळच्या म.न.पा. / जि.प. शाळांमधेच प्रवेश घेऊन दिला जातो आणि या शाळा मराठी माध्यमाच्या आहेत. अशा वेळी, मुलांना मराठी शाळेत दाखल करताना पालकांकडून काही ठराविक प्रश्न विचारले जातात -

- शिक्षकांची मराठी भाषा मुलांना समजणार का?
- आम्ही काम संपल्यावर आमच्या गावीच जाणार आहोत, तर आत्ता मराठी माध्यमात शिकून काय फायदा?
- आमची मातृभाषा तेलगु, तमिळ, कन्नड, बंगाली, हिंदी आहे, तर आमच्या मुलांनी मराठी का शिकायचं?

अशा प्रश्नांना उत्तर देणं स्वयंसेवकांना बर्‍याचदा अवघड जातं. आमच्या अनुभवानुसार आम्ही पुढीलप्रमाणे त्यांची उत्तरं देतो -

- शाळेत गेल्यानं प्रत्येक मूल ‘कसं शिकायचं’ हे शिकू लागतं. त्याच्या मनात शिक्षणाविषयी योग्य वयात गोडी निर्माण होते, मग माध्यम कोणतंही असो. जरी त्यानंतर मूल आपल्या मूळगावी गेलं, तरी तिथल्या शाळेत मातृभाषेतून सहज शिक्षण घेऊ शकतं.
- सहा-सात वर्षांच्या कोणत्याही मुला/मुलीला नवीन भाषा शिकणं अवघड नसतं. वेगळ्या भाषेची भीती लहान मुलांपेक्षा मोठ्यांच्याच मनात जास्त असते. वास्तविक, सहा-सात वर्षांच्या मुलाची मातृभाषा (लिपी) शिकण्याची प्रक्रियादेखील याच वयात सुरु असते. त्या भाषेबरोबरच मराठीदेखील ते पटकन शिकू शकतं.
- जर संपूर्ण कुटुंब कामानिमित्त चार-पाच वर्षांसाठी पुण्यात राहणार असेल, तर दैनंदिन व्यवहारात त्यांना मराठी भाषेचा उपयोगच होईल. स्थानिक भाषा येत असल्यामुळं मुलांचा आणि एकूणच कुटुंबाचा रहिवास सुखकारक होईल.
- मराठी आणि हिंदीची लिपी एकच म्हणजे देवनागरी आहे. त्यामुळं मुलांना मराठीबरोबरच हिंदी वाचन आणि लेखन सुलभ होईल. हिंदी ही संपूर्ण भारतात वापरली जाणारी भाषा असल्यामुळं, मराठी भाषा शिकणं कधीच वाया जाणार नाही.

शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणताना भाषाविषयक प्रश्नांवर आम्ही शोधलेली ही उत्तरं बहुतांश पालकांना पटतात. पुण्याबरोबरच नाशिकमधेही असाच एक अनुभव आला. नाशिकरोडला गेल्या तीन वर्षांपासून एक मोठी कन्स्ट्रक्शन साईट सुरु आहे. बांधकाम करणारे सर्व मजूर मध्य प्रदेशातून आले असून त्यांची मुलं जवळच्या नाशिक म.न.पा. शाळेत जातात. ही शाळा मराठी माध्यमाची आहे. तीन वर्षांपूर्वी पहिलीत प्रवेश घेतलेली मुलं आता चौथीत आहेत, त्यांना शाळेत जायला आवडतं, आणि त्यांची शैक्षणिक प्रगतीदेखील चांगली आहे. आता ही मुलं कधीही आपल्या मूळगावी परतली तरी त्यांचं शिक्षण नक्कीच चालू राहील. भाषा ही शिक्षण घेण्यातली अडचण बनू शकत नाही...


Share/Bookmark