ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Tuesday, January 28, 2020

पाकदर्पण १८९३

आजपासून जवळपास सव्वाशे वर्षांपूर्वी म्हणजे १८९३ साली सौ. गोदावरीबाई पंडित यांनी लिहिलेल्या "पाकदर्पण" (महाराष्ट्रीय स्वयंपाकशास्त्र) पुस्तकाची प्रस्तावना इथे देत आहे. त्यावेळची भाषा, सामाजिक परिस्थिती, आणि इतर बऱ्याच गोष्टींवर प्रकाश टाकणारा हा लेख आहे. या पुस्तकातील पाककृतीदेखील माहितीपूर्ण आणि मजेदार आहेत...

"पाकदर्पण अथवा, महाराष्ट्रीय स्वयंपाकशास्त्र"अनेक शास्त्रीय माहितीवरून व प्रत्यक्ष अनुभवावरुन, सौ. गोदावरीबाई पंडित - नीतिदर्पण, प्रीतीचा मोबदला, रंगवल्लिका, पुराणयुक्ति रत्नमाला, वगैरे पुस्तकांची कर्त्री - यांनी तयार केले, ते पुणे पेठ बुधवार येथे भाऊ गोविंद सापकर यांणी आपले 'ज्ञानचक्षू' छापखान्यात छापून प्रसिद्ध केले.सन १८९३ डिसेंबर.

प्रस्तावना

आपल्या देशांत अलीकडे दिवसेंदिवस प्रजा अशक्त होत चालली, अशी हाकाटी मात्र सर्वत्र समंजस मनुष्यांच्या तोंडून ऐकण्यांत येत आहे, पण त्याच्या परिहारार्थ यत्न मात्र कोणाकडून यथातथ्य होत असल्याचे पाहण्यांत येत नाही!! ही किती सखेदाश्चर्याची गोष्ट आहे? चालू मन्वंतरांत तर असे आहे की, अन्नमय प्राण, आणि प्राणमय पराक्रम आहे! माझी समजूत तर अशी आहे की, प्रजा अशक्त होण्यास आणखी काही कारणे हल्लीच्या काळांत असतील, पण त्यांस खावयास अन्न जे मिळते, ते मिळावे तसे म्हणजे यथा प्रकारयुक्त तयार झालेले मिळत नाही हेंही पण एक कारण प्रधान आहे; याविषयी तिळमात्र शंका नाही.

या माझ्या म्हणण्यास विरुद्ध मतेंही पडण्याचा संभव आहे. तथापि सूक्ष्म विचारी आणि दूरदर्शी लोक ही गोष्ट निर्भ्रांतपणे कबूल करतील, अशी माझी खात्री आहे. शरीरप्रकृतीस आरोग्य असणे, हुशारी असणे, बुद्धि तीव्र राहणे, अंतःकरण आनंदी व स्थीर असणे, ह्या सर्व गोष्टी खरोखर चांगल्या अन्नावर बहुतेक अंशी अवलंबून आहेत; अशी वैद्यशास्त्राची, विद्वान् वैद्यांची आणि शारीरशास्त्रसंपन्न डाक्तरांची मते आहेत; मग माझे ह्मणणें खोटे कसें होईल? सारांश चांगले, यथाप्रकार तयार केलेले, स्वच्छ, आणि ताजे अन्न हें संपूर्ण आरोग्याचे, समाधानाचे व आनंदाचे माहेर घर आहे. म्हणून असे अन्न अलीकडील प्रजेस मिळण्याची समृद्धि झाल्यास मोठा नफा होणार आहे हे वेगळे सांगणे नको.

मग असे अन्न अलीकडील काळांत कोणासही मिळत नाहीं की काय? आणि म्हणून प्रजा अशक्त होत चालली की काय? असे प्रश्न सहजच कोणाच्या मनांत उत्पन्न होणार आहेत. परंतु या प्रश्नांची उत्तरें अशी आहेत की, चांगले अन्न कोणास मिळत नसेल, असे माझे म्हणणे नाहीं; ईश्वरकृपेने तें सर्वांस चांगले आणि विपुल मिळावे, अशीच माझी इच्छा आहे. तथापि तें स्वादिष्ट, रसभरित, आणि क्रियाशुद्ध मिळत गेल्यास उत्तम, असें माझें आग्रहपूर्वक म्हणणे आहे. याविषयी मात्र समंजस लोक विचार करतील अशी माझी आशा आहे. आपल्या लोकांत शंभर घरात पाहिले, तर पांच घरचा स्वयंपाक देखील स्वादिष्ट, यथाशास्त्ररीत्या तयार केलेला, रसभरित आणि खाल्ल्याबरोबर दुखणेकऱ्यासही उत्साह व बल देणारा असा सांपडेल की नाही हा संशयच आहे. उदाहरणार्थ पहा की, ज्या दिवशी प्रसंगवशात आपणास खाणावळीत जाऊन जेवण्याचा प्रसंग येतो, त्या दिवशी आपल्या मानसिक वृत्तीचे धर्म किती आनंदांत, समाधानांत आणि तरतरीतपणांत असतात, आणि ज्या दिवशी आपण आपल्या घरीं, स्वच्छ जागेत, स्वच्छ पात्रांत, आणि आपल्या स्वच्छ व प्रिय मनुष्यांच्या हातचे अन्न भक्षण करितों, त्या दिवशी आपली वृत्ति किती प्रसन्नतेत आणि आनंदोत्सहांत असते!

वर हे जे मी उदाहरण लिहिले आहे, त्याचा अनुभव बहुतेक माझ्या प्रिय देशबांधवांस आणि भगिनींस असेलच. म्हणून माझ्या सांगण्याचा सखोल अर्थ अशांच्या ध्यानात येण्यास उशीर लागणार नाही. परंतु नेहमी जे गलिच्छ खाणावळीतच फुक्का झोडून मिटक्या मारीत बसणारे त्यांना मात्र हे माझे उदाहरण मुळीच लागू पडणार नाही हे उघड आहे. असो. सांगण्यांचे तात्पर्य इतकेंच की, चांगले, स्वादिष्ट, यथाशास्त्र केलेले, आणि ताजे असे अन्न हें बल, बुद्धि, पराक्रम, आनंद यांस देणारे असून मुख्यत्वे सुस्वरूप व सबल अशी प्रजा उत्पन्न करणारें आहे, हे सर्वानी ध्यानांत ठेवून स्वशक्त्यनुसार होईल तितके करून असे अन्न सेवन करण्याची नित्य खबरदारी ठेवावी, म्हणजे स्वताचे शरीरास आरोग्याची आणि सुखाची समृद्धि होऊन आपले आयुष्य, बल, पराक्रम, बुद्धी, विद्या, शौर्य यांची वाढ होईल. आणि प्रजाही सशक्त अशी होईल.

आपल्या देशात चांगल्या अन्नाची ईश्वरकृपेने समृद्धि आहे; पण ते यथाप्रकार तयार करण्याची कला मात्र लोपल्यासारखी झाली आहे, ही दुःखाची गोष्ट होय. सुमारे पांच हजार वर्षांपूर्वी ही कला भरतखंडांत चांगली जागृत होती, अशी माहिती मिळते. त्या अलीकडे उत्तरोत्तर ही कला नीच वर्गात मोडत जाऊन ऱ्हास पावत गेली!! वस्तुतः ही कला नीच नाहीं, सर्व कलेचे आदिपीठ ही कला असून केवळ प्राणदाती अशी आहे. तथापि साडेसातीचा फेरा या कलेस शेवटी येऊन पोचला. आणि ती नीच लोकांच्या हाती जाऊन निंद्य होऊन बसली!!

पूर्वी मोठमोठे विद्वान, पराक्रमी, शूर, श्रीमान अशा लोकांस देखील बहुतेक ही कला अवगत होती. 'पुण्यश्लोक नृपावलीत पहिला' असा जो महा पराक्रमी आणि पुण्यशील राजा 'नल' निषध देशाधिपति तो देखील या पाककलेत अतिशय निपुण होता असे इतिहासावरून समजते. त्याचप्रमाणे इतर राजेही जेव्हां महा अरण्यांतून शिकारीस जात असत, तेव्हां मृगमांसादि अन्न तयार करून किंवा कंदमूलादि अन्न स्वहस्तानेच तयार करून ते खात असत. अशी उदाहरणे शेकडो सांपडतात. पांडवांपैकी मोठा बलवान जो भीम तो तर या कलेत मोठा प्रोफेसर होता. मच्छ देशाधिपति राजा विराट, याच्या घरी पांडव अज्ञातवासात असतां विराट राजाच्या येथील सर्व पाकनिष्पत्ति करण्यावर भीम हा आचार्य म्ह. नायक होता. अर्थात तो पाककलेत मोठा निपुण असावा, हे तर उघडच आहे. फार कशाला अजून देखील आपल्या देशी प्रचारांत म्हण अशी आहे की, स्वयंपाक मोठा सणसणीत म्हणजे तिखटमिठाने व तेलादिकांनी परिपूरित व बराच खमंग असला म्हणजे त्यास 'भीमपाक' असे म्हणण्याचा परिपाठ आहे. आणि स्वयंपाक मधुर, स्वादिष्ट, आणि रसभरीत असला म्हणजे त्यास 'नलपाक' अशी संज्ञा मिळते.

इतक्यावरून सारांश एवढाच घ्यावयाचा की, पूर्वी मोठमोठे थोर पुरुष देखील या कलेत निष्णात असत. आणि आतां पाककला मोठी निंद्य मानली जात आहे, ही किती सखेदाश्चर्याची गोष्ट होय! ज्या लोकांस व्यवहारिक विद्यांपैकी कोणतीच दुसरी श्रेष्ठ विद्या, व कला अवगत नाहीं, ज्यांचे ठिकाणी दुसरें काहीच सद्गुण वसत नाहीत, जे व्यसनी, हलकट, भांग्ये आणि गलिच्छ लोक, अशा लोकांच्या हातांत प्रस्तूत ही कला थोडीबहुत दृष्टीस पडते, परंतु काय उपयोग! अशा लोकांच्या संगतीने उलट या श्रेष्ठ कलेचे महत्व मात्र उतरून जाऊन तिची दैना मात्र अधिकाधिक होत चालली आहे.

अलीकडे हजार पांचशे वर्षापासून याप्रमाणें या कलेचा आमच्या श्रेष्ठ पुरुषवर्गास अतिशय तिटकारा येऊन तिला निंद्य ठरवून, तिला पत्करील तो केवळ हतवीर्य असे आपले मत ठोकून देऊन तिला बिचारीला आम्हा बायकांच्या गळ्यांत केवळ अडकावून दिली आहे! केवळ ती वंशपरंपरा आम्हा बायकांसच अगदी बक्षीसपत्र करून दिली आहे. स्वयंपाक म्हणजे केवळ बायकांचेच कर्तव्य कर्म!! पुरुषांनी, त्यांत श्रेष्ठ पुरुषांनी या कामाला अगदी स्पर्शही करु नये!! असें ठरले. चिंता नाही. तेव्हा आम्ही तिचा स्वीकार आनंदाने केला पाहिजे, हे स्पष्ट ठरले! कारण श्रेष्ठ पुरुष वर्गास इतर दुसरी कामे महत्वाची आणि देशहिताची अशी पराक्रमयुक्त करणे आहेत म्हणून! पण तशींही कांही कामे अलीकडे (सुमारे एक शतकांत) त्यांच्याकडून झाल्याची उदाहरणे अद्याप दिसण्यात आलेली नाहीत. मग अजून पुढे त्यांना कांही पराक्रम करून दाखविणे असेल तर मात्र कोण जाणे!! कसेही असो. पाककला ही आम्हा बायकांची खास झाली, त्यात मात्र काही शंका नाही. कारण आता आम्ही ती श्रेष्ठ पुरुष वर्गास परत घ्या म्हणावयास गेलो, तर आतां ते (पुरुष) हजार पांचशें वर्षांची वहिवाट पुढे आणून तक्रार करण्यास उभे राहतील हे उघडच आहे.

असो. या प्रमाणे ही पाककला बायकांकडे तर आली. परंतु तिची स्थिती असावी तशी अजून काही आली नाही. ती बरीच स्थित्यंतर धावून आली. म्हणून तिला यथाशक्ती सर्वानीं त्यांत विशेषेकरून आम्ही बायकांनी सुधारली पाहिजे हे नि:संशय आहे. तेव्हां आता ही कला सुधारण्यास शास्त्रयुक पुस्तकें पाहिजेत, हे उघड आहे. पण ती असावी तितकी, आणि असावी त्या रीतीची मुळीच उपलब्ध नाहीत. अलीकडे दहापांच वर्षात कोंठे एक दोन सूपशास्त्राची पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत असे ऐकते, पण तीही असावी तशी पद्धतवार, लहान मुलींस शिकण्यास उपयोगी पदार्थांची गुणदोषदर्शक आणि पूर्ण माहितीने भरलेली अशी मुळीच नाहीत हे शोधा अंती समजून आले. तेव्हां ही अडचण दूर होऊन माझ्या प्रिय देशभगिनींस प्रस्तुतचे काळी उपयोगी होईल व प्रसंगवशात् देशबंधूंसही उपयोग करता येईल, असे एखादें सूपशास्त्रावर पुस्तक तयार करावे असा हेतु माझ्या मनांत उद्भवला! पण नुस्ता हेतु उद्भावून काय उपयोग? पुस्तक प्रसिद्ध होण्यास बाकीची साधने कशी मिळतील, ही काळजी पुढे येऊन मूर्तिमंत उभी राहिली, तेव्हां अर्थातच मनांतील हेतु मनांतच ठेवून हातपाय आवरून स्वस्थ बसावे लागले.

इतक्यांत जगदीशकृपेने असा काही योग घडून आला की, त्यामुळे हे पाकदर्पण पुस्तक सहजच लिहून तयार करण्यास अनायासेच मला उत्तेजन मिळाले. श्रीमंत सरकार सयाजीराव महाराज गायकवाड यांनां ईशेच्छेनें या जीर्ण झालेल्या पाककलेचा जीर्णोद्धार करावा अशी उत्कटेच्छा प्राप्त होऊन त्यांणी या कामास लागलाच आरंभ करविला. आणि तंजावरप्रांती, मद्रासप्रांती व यवन वगैरे अन्य लोकांत पाकनिष्पत्ति कशी करतात या विषयींची योग्य माहिती मिळवून त्यासंबंधाने दोन तीन भागांची पुस्तके छापून प्रसिद्ध केली.

वास्तविक पाहतां महाराजांचा हा उपकार साऱ्या आमच्या देशावर झाला यांत संशय नाही. या पुस्तकांच्या योगाने महाराजांचा मजवर तर मोठाच अनुग्रह झाला. कारण लागलींच मला- महाराष्ट्रीय लोकांच्या उपयोगी होईल, असे हे पाकदर्पण नामक पुस्तक लिहून ते श्रीमंत सरकार महाराजांस अर्पण करण्याविषयी पूर्ण उत्तेजन आले. आसो. वाचकहो याप्रमाणे या पुस्तकाची मूळपीठिका आहे, ती तुह्मांस सादर केली. आतां माझी स्वतांची थोडी हकीकत येथे देऊन हा बराच लांबलेला प्रस्तावनालेख आटोपून घेते.

'नीतिदर्पण', 'रंगवल्लिका' वगैरे दोन चार पुस्तके मजकडून तयार होऊन प्रसिद्ध झाल्यानंतर कित्येक माझ्या हितचिंतक बांधवांस व भगिनींस अशी जिज्ञासा झाली की, माझी स्वतांची थोडी हकीकत (आत्मचरित्र) मी कोणत्या तरी एखाद्या पुस्तकांत प्रसिद्ध करून सर्वास कळवावी. याचप्रमाणे ज्ञानप्रकाशासारख्या वजनदार पत्रकारांनीही अशाच सूचना केल्या होत्या. या सर्व सूचनांविषयी विचार करण्यास- पाकदर्पण पुस्तकांत ही मला योग्य संधि मिळाली, म्हणून मी ईश्वराचे अत्यंत आभार मानते.

वाचकहो, माझे जन्म पुणेजिल्ह्यांत इंदापूर नांवें जो एक तालुका प्रसिद्ध आहे, तेथें म्हणजे इंदापूर गावात एका कुलीन भिक्षुक घराण्यांत झालें. आई लहानपणीच निवर्तली. लहानपणात शाळेत वगैरे जाऊन शिक्षण मिळवण्याची सोय नव्हती. घरांतील चालीरीती जुन्या वळणाच्या; त्यांतही भिक्षुकीवृत्ति! मग अशा ठिकाणी बायकांस शिक्षणाचे नाव स्वप्नात तरी कशाला येईल! अकरावे वर्षी पुण्यातील एका वीस वर्षांच्या सुशिक्षित वराशी माझे लग्न झाले. पुढे संसार समजू लागल्या पासून विद्वान् व सुशिक्षित प्रियपतीच्या सहवासांत येऊन तेव्हापासून त्यांच्याच सहचर्येमध्यें सुशिक्षण मिळत गेले, आणि अभ्यासाची व योग्यतेची मजल सध्या तुम्ही जाणता आहां येथपर्यंत येऊन पोचली. सारांश विद्वान, सुशील, आणि निर्मळ अंतःकरणाच्या प्रिय पतीच्या सहवासाने स्त्रियांस कोणते सुख प्राप्त होणार नाहीं बरे? सुशिक्षणादि सर्व ऐहिक सुखे प्राप्त होतील यांत काही मोठेंसें आश्चर्य नाहीं; परंतु अशा प्रकारच्या सशास्त्र व सुखरूप संसारिक आचरणापासून जगदीशही प्रसन्न होऊं शकेल यांत संशय नाही. अशा प्रकारच्या भावनेने व निष्ठेने परलोकही माझा सुखाचा होईल अशी मला उमेद आहे.

सुजन बंधूभगिनींनो, प्रस्तुत आमचा संसार मध्यम स्थितीत आहे; पण अत्यंत सुखाचा आहे. मोठ्या श्रीमंत संसाऱ्यास काही तरी तळमळ असेल, पण आम्हास ईशकृपेने पूर्ण समाधान आहे. कारण विद्या, ऐक्य आणि प्रीति ही ज्या दंपत्यात आहेत, ते दंपत्य पूर्ण सुखी अशी माझी समजूत असून तशीच स्थिती आमची आहे ती देहावसानापर्यंत अशीच कायम राहो, हीच प्रार्थना त्या सर्वचालक प्रभुजवळ आहे.

माझ्या उदाहरणावरून इतके घेतां येईल की, स्त्रियांस विद्येचे शिक्षण तर अवश्य पाहिजेच, नको म्हणणार्‍याची बुद्धि अपाक होय. मात्र हे शिक्षण लहानपणी घरी सुशिक्षित आईबापांकडून अथवा शाळेत; व वयात आल्यावर त्यांच्या प्रियपती कडून मिळण्याची तजवीज असावी. म्हणजे अशा व्यवस्थेने मर्यादेचे व स्वधर्माचे उल्लंघन न होतां पुढे त्यांचा संसार सुखरुप होईल. वयांत आलेल्या मुली आपल्या शिक्षणाच्या निमित्ताने माहेरघर किंवा सासरघर सोडून अन्यस्थळी जाणे रीतीस निंद्य आहे.

असो. मला समजू लागल्यापासून पुढे नऊ दहा वर्षांतच माझी योग्यता विद्वान स्त्रियांत गणण्या सारखी झाली. पण लोकापवादामुळें मी आपले शिक्षण झाकून ठेवण्याचा यत्न करीत असे. स्नान केल्यावर नेमाधर्माची पोथी वाचणे झाल्यासही मी ती चोरून व हळू वाचीत असे. कारण शेजारी पाजारी नावें ठेवतील हे भय! शेवटी ही गोष्ट फार दिवस झाकून न राहतां गांवभर समजली. मग लोकचर्चाही सुरू झाली!! ज्या बायकांस लिहिणे वाचणें येत नव्हते, अशांनी तर माझा मोठा तिरस्कार करावा. कारण त्यांच्या सारखी मी अक्षरशून्य नाहीं म्हणून! कित्येक स्त्रियांस माझा अभ्यास पाहून इर्षाही उत्पन्न होऊन त्या आपल्या घरी आपल्या घरांतील माणसांजवळ दिव्याशी पुटपुट करीत बसू लागल्या. तथापि कांही येईना, म्हणून शेवटी माझी निदाहीं करू लागल्या.

कमधर्मसंयोगें अशा समयास माझे 'रंगवल्लिका' नामक रांगोळीचे पुस्तक छापून बाहेर प्रसिद्ध झाले. तेव्हां तर आमच्या कित्येक इष्टमित्रांस मोठाच आचंबा वाटून ते आंतून आमची निंदा व द्वेष करूं लागले. पुढे मुंबईतील उपयुक्त ग्रंथप्रसारक मंडळीनी मी लिहिलेली कादंबरी 'प्रीतीचा मोबदला' नामक प्रसिद्ध केली! तेव्हां तर मजवर लोकचर्चेच्या पुष्पांजुळींचा अतिशय वर्षाव झाला. तथापि अशा समयीही कित्येक नि:सिम साधुजनांनी व खऱ्या आणि थोर अंतःकरणाच्या बंधूभगिनींनी आणि कित्येक थोर वर्तमानपत्रांच्या लेखकांनी उत्तेजनपर लेख लिहून यथाप्रकारे माझी स्तुति लिहून विरुद्ध पक्षवाल्यांची षोडशोपचारे पादप्रक्षालनपूजा बरीच केली. आणि माझे अंतःकरणांतील हा देशसेवेचा उल्हास कमी होऊ न देतां जास्त वृद्धिंगत केला. कित्येक करुणहृदय प्रिय बंधूंनी तर तशा वेळी मजवर एखाद्या देवीप्रमाणे कविता रचून मला प्रोत्साहन दिले. अशांचे उपकार मजवर फार झाले आहेत, हे निराळे सांगणे नको.

पुढे 'नीतिदर्पण' नांवाचें चवथें पुस्तक लिहून ते श्रीमंत सरकार गायकवाड यांजकडे पहाण्यास पाठविले असता त्यांस ते मनापासून आवडले. आणि त्यांनी पूर्ण साह्य देऊन ते छापून प्रसिद्ध ही करविलें. तात्पर्य, अशा रीतीने मी भीतभीत ग्रंथकर्त्री या नांवाने आतां प्रसिद्ध झाले आहे. हे 'पाकदर्पण' पुस्तक माझी पांचवी हस्तकृति होय. सूज्ञांच्या लक्षांत येईल. मला शिक्षण मिळाले आहे, म्हणून मी कोणत्याही रीतीनें धर्ममर्यादेच्या बाहेर किंवा गृहमर्यादेच्या बाहेर गेले आहे, असे मुळीच नाही. उलट सौख्यरूप संसारात अधिक विश्रांति पावत आहे. इतके सांगून माझा कित्ता इतर माझ्या देशभगिनींस कळविण्यास उपदेश करून हा लेख पूर्ण करिते.

मुक्काम सोलापूर, सदर बाजार,
तारीख १ डिसेंबर सन १८९३ इ.


Share/Bookmark

Saturday, January 25, 2020

The Differences


The Differences

He always knew that!
That they were different.

They thought differently.
They felt differently.
They liked different things.
Different desires. Different dreams.

They had different experience.
And strong difference of opinions.

They came from different worlds.
They used different words,
Even when they felt something very similar.
They spoke different languages.
And felt like they belong to different ages.

He never understood,
Why they were together,
With not a single common factor.

He wondered and thought a lot,
Perhaps that was the way he was taught.

But she never thought about it,
Never cared or worried a bit.

Because her thoughts were so pure -
They might be different,
But not opposite, for sure!

And these two were different things.

It was fine, she thought,
Having differences somewhat.

As far as they didn't oppose each other,
They could stay together
And love each other... forever.

Do you know someone like them?
Or don't you think YOU could be them?

- aksharmann
9822401246
25/01/2020



Share/Bookmark

Tuesday, January 21, 2020

कोटाचं गाणं


"कोटाचं गाणं"

(नेहमीच्या युनिफॉर्मऐवजी, 'उन्नती संस्थे'ने यावेळी शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी ऐन थंडीच्या दिवसांत कोट शिवून घेतले, त्याचीच ही गोष्ट!)

संचित ये, सावित्री ये
ये रे शेखर, ये गं सुहाना,
रुपेश आणि विराट ये
शारदा मागे राहू नको ना!

सकाळची वेळ, थंडीचा खेळ
झोपेचा राहिला नाही ठिकाणा.
शाळेत खास, काहीतरी आज
बाई म्हणाल्या, मिळणार आम्हाला.

मिळणार काय, माहिती हाय
भारीच कोट एक ताजा तवाना!
मोठ्यांनी घातला, सिनेमात पाह्यला
तरी नाय झाला, जुना पुराणा.

कॉलर टाईट, वाढेल ऐट
घालून दाखवू आई-बाबांना.
हसली ताई, दादाला घाई
पाणीच आईच्या आले डोळ्यांना.

अंगात कोट, हलतंय पोट
गदागदा खदाखदा हसू येताना.
लाजतंय कोण, नाचतंय कोण
कोटाचा कसला भारी बहाणा.

काढूया फोटो, बाजू को हटो
कोटवाले राजा को सलाम ठोका ना.
अंगात चढवला, मिरव-मिरवला
काढून ठेवायला, सांगू नका ना!
कोटात खेळू, कोटात पळू
राहू दे अंगात, झोपी जाताना...



(Click on image to read)



Share/Bookmark

Saturday, January 18, 2020

एनआरसी गुंडाळण्याची गरज का आहेः चेतन भगत

एनआरसी गुंडाळण्याची गरज का आहेः चेतन भगत
१८/०१/२०२० । टाईम्स ऑफ इंडिया

एनआरसीनं मोठी खळबळ माजवलीय, परस्परविरोधी टोकाची मतं निर्माण केलीत, प्रचंड अस्वस्थता पसरवलीय आणि लोकांना रस्त्यावर उतरायला भाग पाडलंय. सरकार आता दोन पावलं मागं गेलंय. पण अजूनही त्यांनी जे करायला पाहिजे ते केलेलं नाही - ते म्हणजे, अधिकृतरित्या एनआरसी गुंडाळणं किंवा दीर्घकाळासाठी हा मुद्दा बाजूला ठेवून देणं.

हा ‘इगो’चा मुद्दा नाहीये आणि नसलाही पाहिजे. खरं तर एनआरसीची संकल्पना काही वाईट नाही, पण अंमलबजावणीमध्ये मार खाणार हे नक्की. आणि भारतातली वस्तुस्थिती लक्षात घेतली तर एनआरसीमुळं मिळणाऱ्या फायद्यांपुढं प्रश्नचिन्हच उभं राहतं. आजच्या घडीला भारतात एनआरसी लागू केल्यास, ते निष्फळ ठरण्यापासून त्याचे भयंकर परिणाम होण्यापर्यंत काहीही घडू शकतं. चांगल्यात चांगला परिणाम म्हणजे, प्रचंड खर्च करुन निरर्थक आणि गोंधळ निर्माण करणारं काम घडेल. वाईटातला वाईट परिणाम म्हणजे, या निमित्तानं देशात यादवीसुद्धा माजू शकेल.

आता कुणी म्हणेल की, एनआरसीचे तपशील बाहेर आलेले नसताना त्यावर कशाला टिप्पणी करायची? विशेषतः, नागरिकत्व सिद्ध करण्यासाठीचे निकष आणि पद्धत जाहीर केलेली नसताना. पण मुद्दा हाच आहे की, निकष काहीही असले तरी सध्या एनआरसी यशस्वी होऊ शकणार नाही.

जर निकष खूपच सोपे असतील, तर जवळपास सगळेच एनआरसीच्या चाळणीतून सहीसलामत पार पडतील. तीन साक्षीदार किंवा सध्याचं कुठलंही ओळखपत्र एवढाच निकष असेल, तर भारतातली प्रत्येक व्यक्ती एनआरसीमध्ये नोंदवली जाईल. तरीसुद्धा या कामासाठी रांगा लागतील, फायलींचे ढीग उभे राहतील, लोकांना त्रास सहन करावा लागेल, चुका होतील आणि भारतीय बाबूगिरीचा नेहमीचा विक्षिप्तपणा झेलावा लागेल. स्पष्टच बोलायचं तर, पुन्हा एकदा ‘आधार’सारखा सावळागोंधळ अनुभवायला मिळेल. आणि प्रत्येक व्यक्ती त्यामधे नोंदवली जाणार असल्यानं, शेवटी त्याला काहीच अर्थ उरणार नाही. प्रचंड पैसा ओतून, वेळेची आणि कष्टाची नासाडी करुन, आपल्या हाती उरेल फक्त भरपूर चुकांनी भरलेलं नागरिकांच्या माहितीचं एक जाडजूड रजिस्टर.

दुसरी शक्यता म्हणजे, एनआरसीचे निकष खूप कडक ठेवल्यास होणारा अजूनच मोठा गोंधळ. आपलं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी खरोखर ऐतिहासिक कागदपत्रं लागणार असली तर? पिढ्यानपिढ्या जुने जन्माचे दाखले उकरुन काढावे लागतील. तुमचा जन्म जिथं झाला ते हॉस्पिटल कदाचित केव्हाच बंद झालं असेल. जन्माचे दाखले देणारा खेडेगावातला अधिकारी केव्हाच वारला असेल. ज्यांची घरीच बाळंतपणं झालीत अशांना काय करावं ते सुचणारसुद्धा नाही. सध्याची सगळी ओळखपत्रं निरुपयोगी ठरतील. असं झालं तर, नागरिकत्व सिद्ध होईपर्यंत सर्व भारतीय परकीयच समजावे लागतील.

श्रीमंत आणि वजनदार माणसं शेवटी यातून सुटतीलच. गरीब लोक इतस्ततः धावपळ करत, रडत नागरिकत्वाची भीक मागत राहतील. सरकारी बाबू लोकांना हा अधिकारांचा अतिरिक्त डोस मिळून ते आणखी खूष होतील. आणि हो, या सगळ्याचा काहीतरी दर ठरेलच. नागरिकत्वाचे निकष जेवढे कडक, तेवढाच त्यातून पार पडण्याचा दर जास्त राहील.

आणि मग खोट्या कागदपत्रांचं संकट आपल्यावर कोसळेल. जुन्या जन्म दाखल्यावर फोटोशॉप वापरुन बदल करणं फार अवघड आहे काय? आणि तुम्ही ठरलेल्या दरानं पैसे खायला घातले नाहीत, तर तुमचा खराखुरा जन्माचा दाखला फेटाळून लावणं सरकारी बाबूंना फार अवघड आहे काय? (मग तो दाखला खरंच खरा आहे हे कोर्टात सिद्ध करायला तुम्हाला पुढची २० वर्षं लागतील, त्यासाठी शुभेच्छा.)

हे काही बरोबर नाही. फारच जबरदस्ती केली तर लोक निदर्शनं करतील. काही निदर्शनांचं रुपांतर दंगलींमधे होऊ शकेल. हे सगळं झाल्यावर शेवटी एखादं रजिस्टर तयार होईलही, पण त्यातली माहिती, देशातल्या शांततेसारखीच, दूषित झालेली असेल.

त्यामुळं निकष काहीही असले तरी, भारतासारख्या देशातली परिस्थिती लक्षात घेता, इथं एनआरसी राबवणं सध्या तरी शक्य नाही. कदाचित २०२० नंतर भारतात जन्माला आलेल्या सर्व मुलांची अशी काहीतरी नोंद ठेवता येईल. येत्या काही दशकांमध्ये, यामधूनच एखादं चांगलं रजिस्टर तयार होऊही शकेल. पण सध्यातरी हे शक्य दिसत नाही.

पण मुळात आपण एनआरसी करायला घेतलंच कशासाठी? तर, हे सगळं करण्यामागं एक गृहीतक असं आहे की, भारताच्या लोकसंख्येतले काही टक्के लोक घुसखोर असून, आपल्या राष्ट्रीय संपत्तीवर त्यांचा भार पडतोय. सर्वप्रथम, हे गृहीतक खरं असू शकत नाही, कारण असे घुसखोरदेखील आपल्या जीडीपी (राष्ट्रीय उत्पन्न) मध्ये भर घालतच असतात.

बरं ते जाऊ दे, विस्थापितांचं राष्ट्रीय उत्पन्नातलं योगदान आपण बाजूला ठेवू. असं समजू की आपण चांगल्या पद्धतीनं एनआरसीची अंमलबजावणी केली. असंही समजू की, सर्व भारतीय प्रामाणिक बनले, प्रत्येक भारतीय नागरिकाकडं सगळी कागदपत्रं नीट लावून ठेवलेली आपापली एक फाईल आहे आणि असंही समजू की सर्व अधिकाऱ्यांनी हसतमुखानं लांडी-लबाडी न करता काम केलं. असं समजू की आपल्याकडं एक स्वच्छ नीटनेटकं एनआरसी तयार झालं, आणि हा सगळा उद्योग करुन झाल्यावर समजा ५% नागरिकांना अ-भारतीय घोषित करण्यात आलं. ही संख्यासुद्धा ६ कोटींच्या पुढं जाते, म्हणजे इंग्लंडच्या एकूण लोकसंख्येएवढी! मग एवढ्या लोकांचं काय करणार आपण? या सगळ्यांना कुठल्या विमानात बसवून कुठं पाठवून देणार?

आता असाही विचार करुया. दोन्हीपैकी सोपी गोष्ट कुठली आहे? या ६ कोटी लोकांना बरोब्बर वेचून काढून सगळ्यांना बाहेर पाठवून देणं? की आपली अर्थव्यवस्था वेगानं वाढवून आपल्या राष्ट्रीय उत्पन्नात ५% भर घालणं? जरी कुणी घुसखोर आपल्या राष्ट्रीय संपत्तीवर भार टाकत असतील, तरी ही ५% गळती थोपवण्यापेक्षा आपलं उत्पन्न वाढवणं जास्त सोपी गोष्ट आहे. आंब्याची चार नवीन झाडं लावणं सोपं असताना, तुम्ही गावातल्या दोन-चार आंबे चोरणाऱ्या पोरांना शोधायला एक आख्खं वर्ष घालवाल का?

एनआरसी म्हणजे हजेरी घेण्याचं काम आहे. पण तुम्ही भारतासारख्या गजबजलेल्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर हजेरी नाही घेऊ शकत. यातून निष्पन्न होईल फक्त गोंधळ, चुका, वाद, आणि मग काही लोकांची गाडी चुकेल, तर आणखी वाईट गोष्ट म्हणजे काही लोक रुळांवर पडून चिरडले जातील.

पण फक्त अंमलबजावणी नीट होणार नाही एवढंच सध्या एनआरसी गुंडाळायला सांगण्यामागचं कारण नाहीये. अल्पसंख्याकांच्या बाबतीत भाजपची विश्वासार्हता प्रचंड खालावलेली आहे. भाजप नेतृत्वाची प्रतिमा दडपशाहीची, भीती निर्माण करणारी आहे. चूक की बरोबर जाऊद्या, पण अमित शहांनी तुमच्याकडं कागदपत्रं मागणं आणि मनमोहन सिंगांनी ती मागणं यामध्ये फरक आहे की नाही?

याशिवाय, एनआरसी आणण्याची वेळसुद्धा बरोबर नाहीये. ३७० कलम रद्द करणं आणि अयोध्या प्रकरणातला निकाल हे भारतातल्या विशिष्ट भागांमध्ये हिंदूंचे विजय मानले जातायत. याच भागांमध्ये एनआरसी हिंदूंच्या हिताचं असल्याचं मानलं जातंय (खरं तर तसं काही नसून एनआरसी धर्मनिरपेक्ष गोष्ट आहे. एनआरसीमुळे सर्वांचा धर्मनिरपेक्ष छळ होणार आहे). त्यामुळं असे मुद्दे एकामागून एक रेटत राहिल्यास एक विशिष्ट समाज दडपला जाईल, विरोधकांना भाजपवर टीका करण्याची संधी मिळेल आणि आपल्याला आजूबाजूला दिसतायत तशी निदर्शनं केली जातील. एनआरसी आणण्याची वेळ यासाठीही बरोबर नाहीये, कारण आपल्या अर्थव्यवस्थेवरसुद्धा खूप काम करण्याची आत्ता गरज आहे. अशा परिस्थितीत देशात अशांतता पसरणं भारताला परवडणार नाही.

आपल्याला अर्थव्यवस्थेवर खूप काम करायची गरज आहे, तेवढं काम आपल्या सगळ्यांसाठी पुरेसं आहे आणि सगळ्यात आधी तिकडंच लक्ष दिलं गेलं पाहिजे. एनआरसीला सध्या तरी विश्रांतीची गरज आहे, तीसुद्धा अधिकृतपणे.

- चेतन भगत
(मराठी अनुवादः मंदार शिंदे 9822401246)

मूळ लेखः https://timesofindia.indiatimes.com/blogs/toi-edit-page/why-nrc-must-be-shelved-it-will-be-an-expensive-gargantuan-pointless-exercise-that-could-trigger-civil-war-in-the-worst-case/



Share/Bookmark

नाटक है...

नाटक है भाई नाटक है
कुछ और नहीं यह नाटक है

यह हिंदू मुस्लिम नाटक है
यह देशभक्ती भी नाटक है
यह राजनीती इक नाटक है
इन्सां के लिये सब घातक है
बस नाटक है...

वहां जम्मू कश्मीर तोड दिया
आसाम का सिर भी फोड दिया
और महाराष्ट्र से पंगा लिया
यह पडोस का कर्नाटक है
बस नाटक है...

क्यूँ चिता प्रेम की जलती है
हम तुम सब की यह गलती है
नफरत की ईंटो से बांध रखी
दीवार यहाँ से वहाँ तक है
बस नाटक है...

यह दीवार हमें ही गिरानी है
यह जंग तो सदियों पुरानी है
हम साथ लढें तो हरा सकें
नहीं उनमें इतनी ताकत है
बस नाटक है...

यह एनआरसी इक नाटक है
यह सीएए इक नाटक है
यह मंदिर मस्जिद नाटक है
यह तीन सौ सत्तर नाटक है
इन्सां के लिये सब घातक है
दीवार यहाँ से वहाँ तक है
नहीं उनमें इतनी ताकत है
बस नाटक है भाई नाटक है...

@aksharmann
18/01/2020

(Click on image to read)



Share/Bookmark

Wednesday, January 1, 2020

Dabangg 3 - Bhai Ki Movie... Must Watch!

दबंग ३ - भाई की मूव्ही.. मस्ट वॉच!


सलमान खान ऊर्फ चुलबुल पांडे ऊर्फ रॉबिन हूड पांडे ऊर्फ धाकड पांडे ऊर्फ करु पांडे (म्हणजे काय कुणास ठाऊक?) हा उभ्या-आडव्या भारत देशातल्या सर्वसामान्य आणि बहुसंख्य प्रेक्षकांना अपील होणारा ‘हिरो’ आहे. पुण्या-मुंबईसारख्या मेट्रो सिटीपासून शंभरेक किलोमीटर लांब गेलं की ही वस्तुस्थिती जास्त ठळकपणे नजरेत येते. आयुष्मान खुराणा, राजकुमार राव, विकी कौशल, असे नव्या दमाचे ‘ऐक्टर’ इंडस्ट्रीत येत असले तरी, त्यांच्या सिनेमाला सलमान आणि अक्षय कुमारच्या सिनेमासारखी ‘एन्टरटेनमेण्ट व्हॅल्यू’ अजून कमावता आलेली नाही. अजय देवगणचा ‘सिंघम’ आणि रणवीर सिंगचा ‘सिम्बा’ बऱ्यापैकी देशभरातल्या प्रेक्षकांना एन्टरटेन करु शकलेत. पण रणबीर कपूरची ऐक्टींग, आयुष्मानच्या सिनेमांची दमदार स्क्रिप्ट, ठराविकच लोकांना आकर्षित करु शकलेत हे सत्य आहे.

सलमानचा सिनेमा मात्र कितीही टिपिकल असला, स्टोरी कितीही प्रेडीक्टेबल असली, स्क्रिप्ट कितीही कमजोर असली, गाणी कितीही नीरस असली, डायलॉग कितीही बालिश असले, फाईट सीन कितीही अविश्वसनीय असले, तरीदेखील फक्त आणि फक्त सलमानच्या नावावर सिनेमा जबरदस्त हिट होतो, पैसे कमावतो, इंडस्ट्रीत खळबळ माजवतो, कित्येक नव्या-जुन्या कलाकारांना काम आणि प्रसिद्धी मिळवून देतो, हे नक्की!

उदाहरणार्थ, ‘दबंग ३’ मधे महेश मांजरेकरांच्या मुलीला लॉन्च केलंय. तिच्यात विशेष लक्षात राहण्यासारखं काहीच नसलं तरी, करीयरच्या सुरुवातीला तिच्या नावावर १०० कोटीचा सिनेमा लागला ना डायरेक्ट… याला म्हणायचं सलमानची जादू.

सिनेमाची स्टोरी सलमान खाननं लिहिलेली असल्यावर प्रभुदेवाला डिरेक्शनसाठी किती वाव होता माहिती नाही, पण एका गाण्यातला प्रभुदेवाचा डान्स मात्र फुल्टू पैसा वसूल!

सोहेल खानचा गेस्ट अपिअरन्स अगदीच छोटा, पण त्याची एन्ट्री हमखास टाळ्या मिळवणारी! सलमान, अरबाज, सोहेल, या तिघांना एकत्र स्क्रीनवर बघायला अजून मजा आली असती.

डुप्लिकेट विनोद खन्ना संपूर्ण सिनेमात खटकतो, पण ओरिजिनल डिंपल बरोबर असल्यामुळं काही सीनमधे तोसुद्धा खपून जातो. मागच्या ‘दबंग’चे रेफरन्स ओढून-ताणून जुळवायचा प्रयत्न केलाय, पण ‘सिनेमॅटीक लिबर्टी’च्या नावाखाली फिजिक्सच्या नियमांसारखी स्क्रिप्ट रायटींगच्या नियमांची मोडतोडसुद्धा दुर्लक्षित केलेलीच बरी.

पहिल्या ‘दबंग’मधे सिक्स पॅकवाला सोनू सूद भाव खाऊन गेला होता. तिसऱ्या ‘दबंग’चा व्हीलनसुद्धा स्टायलीश आणि इम्प्रेसिव्ह वाटतो. उगाच बावळट आणि किरकोळ व्हीलन समोर असेल तर चुलबुल पांडेची दबंगगिरी उठून दिसणार कशी? त्यामुळं व्हीलनच्या रोलसाठी यावेळी सुद्धा चांगली चॉईस केलेली दिसली.

साजिद-वाजिदच्या संगीतात लक्षात राहण्यासारखं काहीच नाही. काही गाणी मागच्या ‘दबंग’मधल्या गाण्यांमधेच कडवी वाढवून दिल्यासारखी वाटली. यावेळी मुन्नीच्या ऐवजी मुन्ना बदनाम झालाय आणि झंडू बाम, फेव्हीकॉल या ब्रॅन्डनंतर यावेळी ‘सेट वेट जेल’चा नंबर लागलाय, एवढंच गाणी ऐकून लक्षात येतं.

कदाचित प्रभुदेवा डिरेक्टर असल्यामुळं असेल, पण फाईट सीन थोडे साऊथच्या सिनेमासारखे जास्तीचे रक्तबंबाळ वाटले. पण तरीसुद्धा बटबटीत अंगप्रदर्शन किंवा अंगावर येणारे टॉर्चर सीन कमीच वाटले. सलमानच्या सिनेमाची परंपरा जपत एकही किसिंग सीन दाखवलेला नाही, बेड सीन नाही, पाणचट आणि सूचक जोक असले तरी अश्लील किंवा ओंगळवाणे डायलॉग नाहीत. असे सिनेमे फॅमिलीसोबत बघायला जाण्यात लोकांना फारशी रिस्क वाटत नाही. या बाबतीत अक्षय कुमारचे सो-कॉल्ड कॉमेडी सिनेमे अगदीच टाळण्यासारखे असतात.

एकूण, सलमानचा सिनेमा म्हणजे कम्प्लीट फॅमिली एन्टरटेनमेण्ट. देशातली राजकीय उलथा-पालथ, आर्थिक मंदीचं संकट, बेरोजगारीचा प्रश्न, पर्यावरण बदलाची आव्हानं, अशा सगळ्या गोष्टी विसरायला लावणारा आणि शेवटी वाईटाचा पराभव, चांगल्याचा विजय होतोच अशी आशा पेरून जाणारा सलमानचा ‘दबंग ३’ सगळ्या चुका पोटात घालून एकदा बघण्यासारखा… सलमानच्या फॅन्ससाठी तर एवढं सगळं बोलायची सुद्धा गरज नाही. भाई की मूव्ही है, बस्स… मस्ट वॉच!!

- मंदार शिंदे ९८२२४०१२४६
०१/०१/२०२०


Share/Bookmark