ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Sunday, May 26, 2019

असा विचार केला तर...?

असा विचार केला तर…?
(लेखकः मंदार शिंदे ९८२२४०१२४६)
वाचण्यासाठी लागणारा वेळः ०९ मिनिटं

काही दिवसांपूर्वी इंडीयन प्रिमियर लीग (आय.पी.एल.) या क्रिकेटच्या स्पर्धा भारतात पार पडल्या. त्यात चेन्नईच्या संघाला मुंबईच्या संघानं हरवलं म्हणे. देशातल्या लाखो-करोडो क्रिकेटप्रेमींचं या स्पर्धेकडं आणि अंतिम निकालाकडं बारीक लक्ष होतं. विशेष म्हणजे, कुणी किती विकेट घेतल्या किंवा कुणी किती रन्स काढल्या, यापेक्षा थोडी जास्तच चर्चा मैदानाबाहेरच्या किंवा खेळाशी थेट संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल सुरु होती. उदाहरणार्थ, कोण कुठल्या कॅप्टनबद्दल काय बोलला, कुणी कुणाला कशा शिव्या घातल्या, कुणी कुणाला कशी खुन्नस दिली, वगैरे वगैरे. बरं, ही खुन्नस आणि त्या शिव्या फक्त खेळाडूंपुरत्या मर्यादीत नव्हत्या. प्रत्येक संघाचे पाठीराखे आणि चाहते आपापल्या संघाच्या आणि खेळाडूंच्या वतीनं स्वतःच्या घरी, कॉलेजात, ऑफीसात, बसमध्ये, हॉटेलमध्ये, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल मिडीयावर वादावादी आणि भांडणं करताना दिसत होते. टीव्हीवर आणि मोबाईलवर स्कोअर बघणं, हॉटेलमध्ये जेवताना मोठ्या स्क्रीनवर मॅच बघणं, कोण कुणाला हरवणार आणि कोण कप जिंकणार यावर पैजा लावणं, असा हा ‘राष्ट्रीय सोहळा’ काही दिवस सुरु होता. सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, चेन्नईच्या संघात खरोखर चेन्नईचे किती खेळाडू होते आणि मुंबईच्या संघात खरे मुंबईकर खेळाडू किती होते, हा संशोधनाचाच विषय आहे. मग, चेन्नईचे फॅन्स आणि सपोर्टर्स प्रत्यक्षात खरे मुंबईकर असू शकतील आणि मुंबईचे फॅन्स आणि सपोर्टर्स मूळचे चेन्नईकर असू शकतील. पण तरी भांडणं, वाद-विवाद, आणि वेळेचा खर्च कमी झाला असेल असं अजिबात नाही. असा हा सगळा जांगडगुत्ता माझ्या मेंदूच्या कुवतीपलीकडचा आहे, हे मी मान्य करतो.
अशा या ‘राष्ट्रीय सोहळ्या’त काडीचाही रस नसल्यानं, टिंबाएवढाही सहभाग मी घेतला नाही. आणि तरीही, मी आनंदानं, सुखानं, समाधानानं, शांततेनं वगैरे जगतो आहे. म्हणजे, माझ्या सहभागामुळं कुठली तरी टीम जिंकता जिंकता हरली असती, किंवा हरता हरता जिंकली असती का ? किंवा मी एखाद्या चेन्नई फॅनचं मन वळवून त्याला मुंबईचा फॅन बनवू शकलो असतो का ? किंवा चेन्नई आणि मुंबई यांपैकी फायनल कुणी जिंकली यावर माझं पुढचं आयुष्य अवलंबून होतं का ? या सर्व प्रश्नांची उत्तरं अर्थातच ‘नाही’ अशी आहेत. बरोबर ना ?
याचाच अर्थ, देशातल्या एक टक्क्याहून कमी लोकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या आणि जास्तीत जास्त पंचवीस - तीस टक्के लोकांपर्यंत पोहोचलेल्या या ‘राष्ट्रीय’ सोहळ्यात भाग न घेऊन काही गमावलंय, असं मला तरी वाटत नाही. हां, पण क्रिकेट हा माझा सर्वांत प्रिय खेळ असता, दिवसातून दहा वेळा स्कोअर चेक करण्यापेक्षा जास्त महत्त्वाची कामं माझ्याकडं नसती, किंवा ही स्पर्धा बघण्यातून मला काहीतरी वैयक्तिक फायदा मिळणार असता, तर मात्र मी नक्कीच दिवसभर आय.पी.एल. बघत बसलो असतो, हेसुद्धा प्रामाणिकपणे कबूल केलं पाहिजे.
तर, आय.पी.एल.चं फक्त उदाहरण आहे आणि मला वेगळ्याच विषयावर इथं लिहायचं आहे, हे चाणाक्ष वाचकांच्या आतापर्यंत लक्षात आलं असेलच ! तर मुद्दा असा आहे की, लोकसभेच्या निवडणुका आता संपल्या असून, लागायची ती… सॉरी, लागायचा तो निकाल लागलेला आहे. देशातल्या एक टक्क्यापेक्षा कमी लोकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या आणि जास्तीत जास्त पंचवीस - तीस टक्के (एकूण लोकसंख्येपैकी) लोकांनी मत नोंदवून साजरा केलेल्या या ‘राष्ट्रीय सोहळ्या’त विशेष भाग घेऊन आपण काय कमावलं आणि न घेऊन खरंच किती गमावलं, यावर चिंतन करण्याची ही योग्य वेळ आहे, असं मला वाटतं.
या आधीच्या म्हणजे, २०१४ सालच्या लोकसभेच्या निवडणुका बहुतेक पहिल्यांदाच प्रत्यक्ष मैदानापेक्षा सोशल मिडीयावर जास्त ‘लढल्या’ गेल्या असाव्यात. पूर्वी निवडणुका जाहीर झाल्या की, सगळे ‘बिनपगारी फुल अधिकारी’ कार्यकर्ते हातातला काम-धंदा सोडून आपापल्या आवडीच्या उमेदवाराच्या संपर्क कार्यालयात ‘ड्युटी’वर स्वतःहून हजर व्हायचे. आपली आणि आपल्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांच्या उद्याच्या जेवणाची सोय झालेली नसली तरी चालेल, पण पुढच्या पाच वर्षांसाठी देशाच्या कारभाराची घडी नीट बसवण्याची नैतिक आणि राजकीय जबाबदारी स्वेच्छेनं अंगावर घेऊन हे कार्यकर्ते ‘मैदानात’ उतरायचे. नोकरीच्या ठिकाणी कामचुकारपणा करणारी माणसं प्रचाराच्या कामात मात्र आश्चर्यकारकरीत्या चोख असायची. स्वतःच्या बहिणीच्या लग्नाच्या पत्रिका पाहुण्यांना द्यायला जात नसतील, पण आपल्या उमेदवाराची पत्रकं मात्र दारोदारी फिरुन वाटली जायची. उमेदवारांकडून ‘श्रमपरिहारा’ची सोय केली जात असली तरी, फक्त तेवढ्यासाठी ही एवढी सगळी माणसं झपाटल्यागत काम करायची, असं म्हणणं चुकीचंच नाही तर अन्यायकारकही ठरेल.
२०१४ च्या निवडणुकीवेळी ‘प्रचार’ करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या कित्येक पटीनं वाढलेली दिसली. पण हे कार्यकर्ते आपापला कामधंदा सुरु ठेवून, फावल्या वेळात फॉरवर्ड… सॉरी, प्रचार करणारे कार्यकर्ते होते. प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची टंचाई मात्र तीव्रतेनं जाणवू लागली. मग उमेदवारांनीसुद्धा आपल्या मतदारसंघाच्या नकाशात सोशल मिडीयालाही सामावून घेतलं. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सऐपवर लाईक, शेअर, कमेंट, फॉरवर्ड, कॉपी-पेस्ट, टॅग, रिप्लाय, लव्ह, हा-हा, ब्लॉक आणि ट्रोल करुन-करुन हे शिंगरु कार्यकर्ते हेलपाट्यानंच दमू लागले. यांच्यासाठी तर ‘श्रमपरिहारा’ची सोयसुद्धा नव्हती. त्याबाबतीत त्यांना खरेखुरे स्वयंसेवक - स्वतःची सेवा स्वतःच करणारे - बनावे लागले.
२०१४ पूर्वी प्रत्यक्ष प्रचाराचा अनुभव असूनही, २०१४ मध्ये मी ह्या सोशल मिडीयावरच्या ‘सोहळ्या’त सहभागी झालो. आपल्याला पटणाऱ्या पक्षाचा, उमेदवाराचा प्रचार करताना इथं प्रत्यक्ष जबाबदारी घ्यावीच लागत नाही, हे लक्षात आलं. (प्रत्यक्ष दारोदारी जाऊन प्रचार केला की, तेच लोक उद्या तुम्हाला तुमच्या उमेदवाराबद्दल प्रश्न विचारु शकतात. तसं काही ऑनलाईन प्रचारात घडत नाही. ऑनलाईन पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर डिलीट करुन टाकली, असा सोयीस्कर प्रकार !) आपल्या पक्षाच्या चांगल्या गोष्टी मांडणं आणि विरोधकांच्या चुका शोधून काढणं, हासुद्धा आता अभ्यासाचा विषय न राहता, हमाली काम बनून गेलं. म्हणजे, जुने संदर्भ, बातम्या, कात्रणं, डायरीतल्या नोंदी, जुन्या लोकांशी चर्चा, मतदारसंघाचा दौरा, पाहणी, आकडेवारी, हे सगळं कटकटीचं, गुंतागुंतीचं आणि वेळखाऊ काम वाटू लागलं. त्यापेक्षा ‘की-वर्ड’ टाकून गुगल आणि विकीपेडीयावर ‘अधिकृत’ संदर्भ बसल्या जागी मिळू लागले. तिकडून उचलायचे आणि इकडं चिकटवायचे की झालं काम ! त्याहीपुढं जाऊन मग पगारी आय.टी. सेलकडून रोजच्या रोज लेख, फोटो, आलेख, आणि आकडेवारीचा रतीबच सुरु झाला. आकडेवारी, अनुभव, आणि अभ्यासातून मतं बनवण्याचा काळ मागं पडला आणि तयार मतंच थेट आपल्या घरात, हातात, आणि मेंदूत फीड केली जाऊ लागली.
तर, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीचा ‘ऑनलाईन’ प्रचार जोरात सुरु होता. आपल्याच आजूबाजूच्या, आपल्याच माहितीतल्या ‘आपल्या’ माणसांशी वारंवार ऑनलाईन खटके उडू लागले. आपल्याला पटणाऱ्या विचारसरणीपेक्षा कुणाचे वेगळे विचार असू शकतील हे पटेनासं झालं. आपल्या विचारांपेक्षा वेगळा (विरुद्धच असेल असं नाही, फक्त वेगळा) विचार मांडणारा प्रत्येकजण आपला विरोधकच वाटू लागला. अशा विरोधकांचीसुद्धा मतं आपल्याइतकीच ठाम आहेत हे माहिती असूनही, त्यांची ‘चुकीची’ मतं बदलण्याचा अट्टाहास सुरु झाला. प्रचार मागं पडून ‘प्रचारकी’ बोलणंच वाढलं. गंमत म्हणजे, समोरासमोर प्रत्यक्ष भेटल्यावर हसत-खेळत चर्चा करणारेच ऑनलाईन चर्चेत मात्र भयंकर उग्र बनून हमरी-तुमरीवर येत होते. मग कुणाला ब्लॉक करणं, कुठल्या ग्रुपमधून बाहेर पडणं, कुणाच्या इनबॉक्समध्ये घुसून ‘ग्यान’ पाजळणं, असले प्रकार घडू लागले. सोशल मिडीयावरील प्रचाराच्या उदयाचा साक्षीदार आणि प्रतिनिधी म्हणून मीसुद्धा यातल्या काही गोष्टी केल्या, खोटं कशाला बोला ?
२०१४ च्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि मग ‘खरा’ प्रचार कुणी, कसा, कधी केला ते हळू-हळू लक्षात येऊ लागलं. आपण आपल्याच माणसांशी वाद घातले, स्वतःचा वेळ घालवला, संबंध बिघडवून घेतले, प्रसंगी वैयक्तिक आणि व्यावसायिक नुकसानही सोसलं. पण एवढं करुन आपण ‘खरा प्रचार’ केला का, याचं उत्तर ‘नाही’ असंच द्यावं लागेल. दोन मित्र सोशल मिडीयावर भांडत राहिले आणि तिसऱ्याच माणसानं दोघांचा उपयोग करुन चौथ्या माणसाला निवडून आणलं, असा काहीतरी घनचक्कर प्रकार घडलेला दिसला. फक्त आपला उमेदवार किंवा पक्ष निवडून आला म्हणजेच प्रचार यशस्वी झाला, असं मला अजिबात म्हणायचं नाही. निवडून कुणीही येऊ दे, पण प्रचाराच्या प्रक्रियेत कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय मिळालं, हे जास्त महत्त्वाचं नाही का ? इथं, ‘काय मिळालं’ म्हणजे पगार, पैसा, जेवण, पार्टी, पद या अर्थानं विचारलेलं नसून, व्यक्तिशः तुम्हाला काय अनुभव आले, किती लोकांना भेटता आलं, कितीजणांच्या ओळखी वाढल्या, किती महत्त्वाचे मुद्दे समजले, माहितीत किती भर पडली, वगैरे दृष्टीनं मोजणी अपेक्षित आहे. ही कमाई झाली नसेल तर, तुमचा उमेदवार निवडून येऊ दे अगर न येऊ दे, तुम्ही स्वतः मात्र हरलात हे मान्य करावंच लागेल.
२०१९ च्या लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि मागच्या अनुभवावरुन तातडीनं काही गोष्टी अंमलात आणल्या. कामाव्यतिरिक्त जवळपास सगळ्या व्हॉट्सऐप आणि फेसबुक ग्रुपमधून बाहेर पडलो. ट्विटरवर आणि फेसबुकवर शक्य तितक्या अनोळखी प्रोफाईल्सना अनफॉलो किंवा अनफ्रेन्ड केलं. उरलेले लोक ‘आपलेच’ आहेत - त्यांची मतं आपल्यापेक्षा वेगळी असली तरी - हे स्वतःला समजावलं. गुगल आणि इतर वेबसाईट्सवरुन ‘फीड’ केल्या जाणाऱ्या बातम्या अनसबस्क्राईब केल्या. घरात टी.व्ही. कधीच नव्हता, पण पेपरसुद्धा बंद करुन टाकला. फेसबुक आणि व्हॉट्सऐपवर शक्यतो राजकीय पोस्टला उत्तर द्यायचंच नाही किंवा ‘आत्ता नको, नंतर बघू’ असं स्वतःला सांगायला सुरुवात केली. ‘नंतर बघू’ म्हटलं की चांगल्या-चांगल्या गोष्टी करायच्या राहून जातात, मग या अशा गोष्टी राहून गेल्या तर काय बिघडलं ? प्रत्यक्ष मैदानात उतरुन प्रचार करायला वेळ नाही ना, मग ऑनलाईन ताकावर तहान भागवायचा प्रयत्नसुद्धा नको, असं ठरवलं. कितीही पथ्य पाळायचं ठरवलं तरी कधी-कधी सवयीनं आणि भावनेच्या भरात घसरायला होतंच. पण ‘नंतर बघू’ आणि ‘अभ्यास करुनच बोलू’ या दोन युक्त्या खरंच खूप कामाला आल्या.
मतदान मात्र न चुकता केलं. ‘कुणाला मत देऊ’ हा प्रश्न आपल्याला कुणी विचारावा एवढे आपण (अजून) मोठे झालेलो नाही, याची स्वतःला जाणीव करुन दिली. त्यामुळं, फुकटचे सल्ले - तेसुद्धा ‘ऑनलाईन’ - देण्यापासून स्वतःला रोखलं. प्रत्येकाची आपापली मतं असतात, स्वतःच्या अनुभवांवर आणि अपेक्षांवर ती बनवली जातात, काळ आणि परिस्थितीनुसार ती बदलतही जातात. त्यामुळं, आपण कुणाचं तरी ‘मत’परिवर्तन घडवून आणू शकतो, हा आपलंच नुकसान करणारा भ्रम आहे, एवढं लक्षात आलं तरी खूप झालं.
पण, विशिष्ट विचारांचा, पक्षाचा आणि उमेदवाराचा प्रचार केला नसला म्हणजे कसलाच प्रचार केला नाही, असं म्हणणं मात्र चुकीचं ठरेल. आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवर व्यक्त होणं, समस्यांचा अभ्यास करुन उपायांवर चर्चा करणं, आपण मिळवलेली माहिती - ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवणं, आपल्या कामातून कुणाला तरी मदत - फायदा - समाधान मिळवून देणं, हा सगळा प्रचाराचाच भाग आहे की ! माणूसपणाचा प्रचार, परस्पर संबंधांचा प्रचार, आनंदाचा प्रचार, विश्वासाचा आणि प्रेमाचा प्रचार…
खरंच की… आधी प्रेमानं माणसं तर जिंकू या, मग निवडणुका जिंकणं फार अवघड नाही. तुम्हाला काय वाटतं ?

© मंदार शिंदे ९८२२४०१२४६
२५/०५/२०१९


Share/Bookmark

Sunday, May 19, 2019

रंपाट...

रंपाट लय रंपाट..

प्रवाहाच्या विरोधात भावा पव्हलोय मी
आणली ती स्थिती आधी माझी कधी नव्हती
येऊदेत कितीपण अडचणी माझ्या म्होरं
हसून मी बोलेन त्यांना काय चालतंय की
रंपाट लय रंपाट..
बिंधास मराठी पोरं ही रंपाट…

अभिनय आणि कश्मिरासारख्या रियल लाईफ स्ट्रगलर्सचा 'रंपाट'... अस्सल मराठी मातीतल्या मराठी माणसांच्या गोष्टी जगासमोर मांडणाऱ्या रवी जाधवचा 'रंपाट'... प्रिया बेर्डेच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातल्या खऱ्याखुऱ्या स्वप्नांचा 'रंपाट'... अंगावर येणाऱ्या ग्लॅमर इंडस्ट्रीला शिंगावर घेणाऱ्या कुशल बद्रिकेसारख्या लढवय्यांचा 'रंपाट'... ग्लॅमर, पैसा, प्रसिद्धी, यापासून सुरु होणारा पण शेवटी आपल्या मातीशी नाळ जोडणारा 'रंपाट'...!!

"इंजिनियर बनायला पैसे लागतात, डॉक्टर बनायला पैसे लागतात, फक्त 'स्टार' बनायला पैसे लागत नाहीत.. त्यासाठी लागतं लक.. नशीब !!"

"जे काही करायचंय ते आज, आत्ता, ताबडतोब.. फटाफट !! वेळ निघून गेल्यावर काहीही करुन उपयोग नाही..."

"पन्नास वर्षं झाली मी माझं स्वप्न पूर्ण व्हायची वाट बघतोय.. पण म्हणून तुझी स्वप्नंसुद्धा तू पन्नाशीत पोचल्यावर पूर्ण व्हावीत हे मला चालणार नाही..."

"सोळा वर्षांचे होईपर्यंत तुम्ही जे काही असता त्यासाठी तुमचे आईवडील जबाबदार असतात.. पण त्यानंतर फक्त तुम्ही स्वतः...!"

ॲक्टींगचा किडा वेगळा... आणि चंदेरी दुनियेच्या झगमगाटाला भुलून, एजंट लोकांना बळी पडून, 'कॉम्प्रमाईज' करुन, पैसा ओतून 'स्टार' बनायचा हट्ट वेगळा... हे अभिनयला स्वतःला एवढ्या लहान वयातच कळलंय, याबद्दल त्याचं अभिनंदन. आणि रवी जाधवनं मोठ्या पडद्यामागचं सत्य मोठ्या पडद्यावरच दाखवलंय, याबद्दल त्याचे आभार. हा सिनेमा महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यांमध्ये पोहोचावा आणि हजारो स्वप्नाळू भावी स्टार्सचे डोळे उघडावेत, हीच अपेक्षा !

मोठ्ठी स्वप्नं जरूर बघावीत, पण ती खरी करण्यासाठी लागतील तेवढे कष्ट करायची आणि सतत शिकत रहायची तयारी पाहिजे, हा मेसेज देणारा 'रंपाट' सुपरहीट होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा !!

- मंदार शिंदे 9822401246




Share/Bookmark

Friday, May 10, 2019

चोर - पोलिस (नाट्य)

चोर - पोलिस
(लेखकः मंदार शिंदे ९८२२४०१२४६)
(एक मोठा पण निर्जन रस्ता. फूटपाथवर दोन बेंच दिसत आहेत. रात्रीचे साडेनऊ वाजलेत. दोन माणसांचे आवाज ऐकू येतात.)
पहिलाः चल, चल म्हणतो ना…
दुसराः नाही साहेब, जाऊ द्या मला.
पहिलाः आता जाऊ द्या काय? मगाशी त्या एकट्या माणसाला कशी दमदाटी करत होतास? नशीब, त्यानं मला बघितलं आणि आवाज दिला. चल, तुला दाखवतोच माझा हिसका…
दुसराः चुकी झाली साहेब, जाऊ द्या मला…
(एक इन्स्पेक्टर एका माणसाला ओढत आणतोय. इन्स्पेक्टर युनिफॉर्ममधे आहे. दुसऱ्या माणसाचे कपडे चुरगळलेले आहेत. तो इन्स्पेक्टरच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपड करतोय.)
इन्स्पेक्टरः चल बस इथं. (त्या माणसाला बेंचवर बसवतो. तो मान खाली घालून बसतो.)
माणूसः साहेब, जाऊ द्या ना मला…
इन्स्पेक्टरः गप रे! काय लावलंय, जाऊ द्या ना.. जाऊ द्या ना.. (इन्स्पेक्टरचा फोन वाजतो. तो फोन बाहेर काढतो. थोडा दूर जाऊन फोनवर बोलतो.) हां हॅलो… कधी पोचनार?... का? आत्ता कसलं ट्रॅफीक?... पण आपलं नऊचं ठरलं होतं ना?... सॉरीला काय अर्थ आहे? दुसऱ्याच्या वेळेची काही किंमत आहे की नाही?... आता अजून अर्धा तास थांबून राहू?... (बेंचवर बसलेल्या माणसाकडं बघतो.) ठीकाय, मी पण एक काम उरकून घेतो तोवर… शक्य तितक्या लवकर या. (फोन ठेवतो आणि परत येतो.) हां, तर कोण, आहेस तरी कोण तू?
माणूसः (मान वर न करता) साहेब, चुकी झाली. माफ करा.
इन्स्पेक्टरः (फोनवरचा राग त्याच्यावर काढतो. आवाज चढवून) जेवढं विचारलंय तेवढंच सांगायचं. नाव काय तुझं? कधीपासून आलास ह्या एरियात?
माणूसः (मान खालीच) मी… मी इथंच राहतो साहेब.
इन्स्पेक्टरः एऽऽ मला शिकवतो काय रे? गेली पाच वर्षं ह्याच एरियात आहे आपण. इथल्या गोट्या खेळणाऱ्या पोरांनासुद्धा नावानं ओळखतो हां. तू याआधी कधी दिसला नाहीस इकडं…
माणूसः मी… खरं सांगतो साहेब… मला… मला जाऊ द्या… (उठून पळून जायचा प्रयत्न करतो. इन्स्पेक्टर झडप घालून त्याला पकडतो आणि पुन्हा बेंचवर बसवतो.)
इन्स्पेक्टरः हे बघ, तुझ्यासारखे छप्पन भुरटे चोर आत टाकलेत मी. माणसाचा चेहरा बघून ओळखतो आपण, त्याच्या मनात काय चाललंय ते… (त्याच्या जवळ जातो आणि त्याचा चेहरा वर करतो. काही क्षण निरखून पाहतो.) तुला बघितल्यासारखं वाटतंय कुठंतरी…
माणूसः (पुन्हा मान खाली घालतो) सांगितलं ना साहेब, मी इथलाच आहे…
इन्स्पेक्टरः गप रे! इथं नाही पाहिलेलं तुला. आणि गेल्या चार-पाच वर्षांत सुद्धा नाही. कुठंतरी पूर्वी भेटल्यासारखं वाटतंय. खरं सांग, कोण आहेस तू? कुठून आलास?
माणूसः जाऊ द्या ना साहेब, कशाला विषय वाढवताय. छोट्या-मोठ्या चोऱ्या करतो मी. ह्या रस्त्याला सामसूम असते संध्याकाळपास्नं. पोलिस-बिलिस कुणी फिरकत नाही आठनंतर…
इन्स्पेक्टरः (पटकन बोलून जातो) ते माहितीये मला…
माणूसः (मान वर करुन) आँ?
इन्स्पेक्टरः नाही… म्हणजे माझाच एरिया आहे ना, त्यामुळं माहिती आहेच मला - कुठं सामसूम असते, कुठं वर्दळ असते.
माणूसः (पुन्हा मान खाली घालतो) पण आजच कसं काय ह्या वेळेला आलात तुम्ही साहेब?
इन्स्पेक्टरः (आवाज चढवून) एऽऽ भुरट्या, आता माझी ड्युटी मी कुठं आणि कधी करायची हे तू सांगणार का रे मला?
माणूसः (मान वर करुन) तसं नाही साहेब, पण माझा हिशोब चुकला ना त्यामुळं.
इन्स्पेक्टरः तुझा हिशोब तर मीच जुळवणार आज… (बोलत बोलत त्याच्याकडं जाऊ लागतो. त्याचा चेहरा बघून पुन्हा थांबतो. बसलेला माणूस पटकन चेहरा फिरवतो.) तू खरं सांग कोण आहेस… तू…? (त्याला ओळख पटते पण विश्वास बसत नाही.)
माणूसः (मानेनेच होकार देतो.) होय, मीच आहे. मला माहिती होतं तू ओळखशील मला…
इन्स्पेक्टरः तू… तू खरंच राजूदादा आहेस? (त्याच्या शेजारी जाऊन त्याच्या चेहऱ्याकडं बघत बसतो.)
राजेशः (उठून उभा राहतो.) होय, मीच आहे राजेश घोडके. राजेश बळीराम घोडके. तुझा राजूदादा.
इन्स्पेक्टरः म्हणजे तू ओळखलं होतंस मला?
राजेशः होय, मगाशी त्या माणसानं पकडून दिलं ना मला तेव्हाच…
इन्स्पेक्टरः मग तोंड का लपवत होतास एवढा वेळ? ओळख का नाही सांगितलीस?
राजेशः (खिन्न हसतो) कुठल्या तोंडानं सांगणार? धाकट्या भावानं मोठ्या भावाला चोरी करताना पकडलं ही काय अभिमानाची गोष्ट आहे?
इन्स्पेक्टरः (उठून त्याच्या जवळ येतो. खांद्यावर हात ठेवतो.) दादा, अरे काय बोलतोयस तू? किती वर्षांनी भेटतोय अरे आपण… आठ? दहा?
राजेशः नऊ वर्षं झाली मला घर सोडून, बंटी. सॉरी… साहेब!
इन्स्पेक्टरः नाही नाही, बंटीच म्हण ना! किती वर्षांनी तुझ्या तोंडून माझं नाव ऐकतोय. आता कुणीच बंटी नाही म्हणत रे, सगळे बाळासाहेब म्हणतात. बाळासाहेब घोडके. (हसतो.) फक्त आई बाळ म्हणते…
राजेशः आई… कशी आहे रे आई? तुझ्यासोबतच राहते? की गावाकडंच आहे? आणि बाबा? आपले बाकीचे नातेवाईक? आपले मित्र? कसे आहेत सगळे?
बंटीः (शांतपणे चालत जाऊन बेंचवर बसतो.) तुला आठवतात का अजून… सगळे?
राजेशः म्हणजे काय! सगळ्यांची खूप आठवण येते. आईची, तुझी, मित्रांची, काका-काकू, मामा, आजी… सगळ्यांची… (बेंचवर जाऊन बसतो.)
बंटीः (कुत्सितपणे हसतो.) एवढीच आठवण येते तर आला नाहीस कधी भेटायला… एखादं पत्र नाही की फोन नाही… तू घर सोडून गेल्यावर आईची काय अवस्था झाली असेल, याची कल्पना तरी आहे का तुला?
राजेशः मान्य आहे मला… मान्य आहे मी तुम्हा सगळ्यांना त्रास होईल असा वागलो. पण… पण मला घर सोडणं भाग होतं बंटी. मला असह्य झालं होतं त्या वातावरणात राहणं… बाबांचे काळे धंदे, पोलिसांच्या धाडी, टोळ्यांमधली भांडणं, घरी दारु आणि पत्त्यांचे अड्डे… मला लवकरात लवकर त्यातून बाहेर पडायचं होतं बंटी… मला बाबांच्या छायेत राहून त्यांच्यासारखा गुंड नव्हतं व्हायचं…
बंटीः मग काय व्हायचं होतं तुला? हा असा भुरटा चोर? निर्जन रस्त्याला एकट्या-दुकट्याला अडवून घड्याळं-मोबाईल चोरणारा भामटा बनायचं होतं तुला?
राजेशः (शरमेनं मान खाली घालतो.) मान्य आहे मला… माझे निर्णय चुकले असतील. जे ठरवलं ते करता आलं नसेल. पण… पण मगाशी तुझ्याकडं बघून मी ते सगळं विसरलो. तू तरी त्या चक्रातून सुटलास. तू पोलिस झालास बंटी… माझंदेखील स्वप्न होतं पोलिस इन्स्पेक्टर व्हायचं. लहानपणी आपल्याला, आईला मारहाण करणारे आपले बाबा फक्त पोलिसांच्या वर्दीला घाबरायचे. तेव्हापासून वाटायचं, आपण मोठं झाल्यावर पोलिस व्हायचं. आणि… आणि बळीराम घोडकेच्या टोळीचा नायनाट करायचा!
बंटीः दादा… काय बोलतोयस तू हे?
राजेशः होय बंटी, हे स्वप्न घेऊनच मी घराबाहेर पडलो. पण… (निराशेनं मान हलवतो.) बरं, ते जाऊ दे. आई… आई खूप खूष असेल ना रे? तिनं बिचारीनं सगळीच आशा सोडून दिली होती. मला… मला भेटवशील तिला? मी घरी येऊ तुझ्या?
बंटीः (डोळे पुसतो.) अरे, म्हणजे काय… घरी ना… हो हो… (फोन वाजतो. बंटी फोन बाहेर काढतो. थोडा दूर जाऊन फोनवर बोलतो.) हॅलो… हो हो, तिथंच थांबलोय मी… या तुम्ही लवकर… किती वाजले काही कळतंय की नाही? (राजेशकडं बघतो.) आणि हो, जवळ आल्यावर मला फोन करा. डायरेक्ट येऊ नका, माझ्यासोबत आणखी कुणीतरी असेल… नाही नाही, काळजी नको… अहो, भाऊच आहे माझा… हो, सख्खा मोठा भाऊ आहे. खूप दिवसांनी भेटलाय ना, म्हणून जरा गप्पा चालल्यात… या तुम्ही. (फोन ठेवतो आणि परत येतो.)
राजेशः तुझं महत्त्वाचं काम आहे का काही?
बंटीः नाही… म्हणजे हो… एक्चुअली काहीजण भेटायला येणार आहेत.
राजेशः (संशयाने विचारतो) इथं?
बंटीः हो… म्हणजे जरा कॉन्फिडेन्शियल काम आहे. चौकीवर सगळी कामं नाही करता येत, म्हणून इथं… पण जास्त वेळ नाही लागणार. तू थांब इथंच. ते आले की मी जाऊन बोलतो आणि मग एकत्रच जाऊ घरी. ए मी आईला फोन करुन सांगू का, तू येणारेस म्हणून? (मोबाईल काढण्यासाठी खिशात हात घालतो.) ती खूष होईल खूप.
राजेशः (बंटीचा हात धरतो.) नको नको, तिला सरप्राईज देऊ आपण. मी थांबतो. तू तुझं काम करुन घे.
बंटीः एक काम कर ना नाहीतर… मी तुला पत्ता सांगतो, तू डायरेक्ट घरीच जा. आईला भेट, गप्पा मार. मी येतो माझी ड्युटी संपवून.
राजेशः अरे नको, मला एकट्याला नको पाठवूस. माझी अजून मनाची तयारी नाही झाली तेवढी. मी भेटल्याचा आनंद होईल म्हणा आईला, पण मी कोण आहे हे कळाल्यावर तिला काय वाटेल सांगता येत नाही. ती कशी रिऐक्ट होईल माहिती नाही. त्यापेक्षा आपण सोबतच जाऊ.
बंटीः असं म्हणतोस? बरं, ठीकाय. मी आपलं तुला ताटकळत ठेवायला नको म्हणून म्हटलं… (अस्वस्थपणे येरझाऱ्या घालतो.) ही समोरची पार्टी पण एवढा वेळ लावतीय ना… आत्तापर्यंत ड्युटी संपवून घरी गेलो पण असतो… (फोन वाजतो. बंटी फोन बाहेर काढतो. थोडा दूर जाऊन फोनवर बोलतो.) हां हॅलो… पोचले का तुम्ही?... हो हो, थांबा तिथंच… आलोच मी रोड क्रॉस करुन… (फोन ठेवतो. राजेशकडं वळतो.) दादा, तू थांब इथंच. मी आलो काम उरकून. (गडबडीनं दुसऱ्या बाजूला निघून जातो.)
(बंटी गेल्याची खात्री करुन राजेश उठतो. कपडे झटकतो, शरीर ताणतो. त्याची चाल बदललेली असते. बंटी गेला त्या दिशेला बघत उभा राहतो. काही सेकंदातच पोलिस गाडीचा सायरन वाजतो. अचानक घाबरलेला बंटी धडपडत येतो आणि राजेशच्या अंगावर आदळतो.)
बंटीः दादा… दादा, पोलिस… पळ इथून, दादा… मेलो…
राजेशः (बंटीला घट्ट धरुन ठेवतो.) बंटी… अरे काय झालं तुला? तू स्वतः पोलिस आहेस, विसरलास काय?
बंटीः नाही दादा… मी… खोटं बोललो. मी पोलिस नाही… मी बाबांचाच धंदा चालवतोय… आपण दोघंही सारखेच आहोत, दादा. आपल्या रक्तातच हा धंदा आहे… तू चल, मी तुला सांगतो सगळं… आत्ता इथून निघ आधी… ते येतील… ते बघ आले… इकडंच आले ते…
राजेशः अरे पण त्यांच्याकडं गाडी आहे. तू किती लांब पळणार? त्यापेक्षा… तुझ्याकडं रिव्हॉल्व्हर आहे ना? चालव ना त्यांच्या गाडीवर… पंक्चर तरी कर…
बंटीः (राजेशच्या पकडीतून सुटण्यासाठी धडपडतो, ओरडतो.) तुला समजत कसं नाही रे… मी खरा पोलिस नाही. ही वर्दी खोटी आहे, ही पिस्तूलपण खोटी आहे. तू… तू चल ना इथून…
राजेशः (शांतपणे पँटच्या मागे खोचलेलं रिव्हॉल्व्हर काढतो.) मग ही ट्राय करतोस?
बंटीः (राजेशच्या हातात पिस्तूल बघून अवाक्‌ होतो. मागं मागं सरकत बेंचवर कोसळतो.) कोण… कोण आहेस तू?
राजेशः तू जसा खोटा पोलिस होतास ना, तसाच मी पण खोटा चोर होतो. (पिस्तूल बंटीवर रोखतो. खिशातून फोन काढतो. नंबर डायल करतो.) गुड इव्हिनिंग सर, एसीपी राजेश घोडके हिअर… येस्स सर, मिशन सक्सेसफुल! बळीराम घोडके टोळीचा म्होरक्या बाळासाहेब घोडके माझ्या ताब्यात आलाय… होय सर, मी त्यासाठीच थांबलो होतो. समोरच्या पार्टीच्या चारही जणांना आपली माणसं घेऊन गेलीत… होय सर, मी स्वतः बाळा घोडकेला घेऊन येतोय… थँक्यू सर, तुम्ही माझ्यावर विश्वास टाकलात म्हणूनच हे शक्य झालं… आता बळीराम घोडकेच्या टोळीचा नायनाट झालाच म्हणून समजा… ओक्के सर… गुड नाईट! (फोन ठेवतो. बंटीकडं बघतो आणि चालायला लागतो. बंटी मान खाली घालून त्याच्यामागे चालत जातो.)

© मंदार शिंदे 9822401246 (प्रयोगासाठी पूर्वपरवानगी आवश्यक)


Share/Bookmark