ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Saturday, June 17, 2017

युनिफॉर्म कम्पल्सरी...

शाळेला युनिफॉर्म असण्याची सुरुवात का आणि कधीपासून झाली याबद्दल कुणाला माहिती आहे का? माझ्या माहितीनुसार, शाळेत येणार्‍या मुलांनी चित्रविचित्र कपडे घालून इतर विद्यार्थ्यांचं लक्ष विचलित करु नये म्हणून, किंवा अंगावरच्या कपड्यांवरुन मुलांची आर्थिक पातळी कळून भेदभावाला वाव मिळेल म्हणून, सरसकट एकाच रंगाचे / पॅटर्नचे गणवेश घालायची पद्धत सुरु झाली असावी.

शाळेत दिवसभर बसण्यासाठी, खेळण्यासाठी सुटसुटीत कपडे घालावेत, हे पटण्यासारखं आहे. पण मग विशिष्ट रंग / पॅटर्नची गरज काय? काहीजणांच्या मते शाळेतल्या मुलांना गणवेशसक्ती करणं म्हणजे मुलांचं सैनिकीकरण करणं आहे. मुलांना सैन्यासारखी शिस्त, आदेशपालन शिकवण्यासाठी युनिफॉर्मची सक्ती केली जाते म्हणे. असेलही कदाचित...

मुद्दा असा आहे की, युनिफॉर्म घातल्या - न घातल्यानं मुलांच्या शिकण्यात काय फरक पडतो? म्हणजे विशिष्ट प्रकारचे/रंगांचे कपडे घातल्यानं मुलांना शिकवलेलं लवकर कळतं किंवा कळत नाही, असा काही प्रकार आहे का? मुलांच्या कपड्यांवर शाळेचा लोगो छापणं हा शाळेच्या मार्केटींगचा भाग झाला, पण त्यामुळं मुलांना काय फायदा होतो? (मी अमूक एका प्रतिष्ठीत शाळेचा विद्यार्थी आहे, हे दाखवण्यासाठी होतही असेल कदाचित...)

सरकारी शाळांमधून दिले जाणारे युनिफॉर्म, बूट यांवर खूप चर्चा चालते. गणवेश खरेदीत भ्रष्टाचार झाला, बूट कमी दर्जाचे आणले, मुलांना गणवेश उशिरा मिळाले, वगैरे गोष्टी सतत चर्चेत असतात. मग युनिफॉर्मची, बुटांची खरेदी कुणी करायची, शासनानं खरेदी करुन शाळेत वाटप करायचं की खरेदीसाठी थेट पालकांनाच अनुदान द्यायचं, असे अनेक प्रश्न दरवर्षी समोर येतात. आधीच शिक्षकांना शिक्षणेतर कामं जास्त, त्यातून गावाकडच्या शाळा तर एकशिक्षकी, दोनशिक्षकी. मग गणवेशसक्ती राबवण्यासाठी शिक्षकांचा अजून वेळ आणि कष्ट खर्ची पाडून नक्की काय साध्य केलं जातं, हाही प्रश्न आहेच.

शाळा खाजगी असोत की सरकारी, एक गोष्ट दोन्हीकडं कॉमन आहे. ती म्हणजे, युनिफॉर्म आणि शूज वगैरे गोष्टींची सक्ती! जर विशिष्ट प्रकारचे बूट, कपडे शाळेला अपेक्षित असतील तर ते त्यांनीच पुरवावेत ना? नाहीतर मूल कसलेही कपडे, चपला घालून आलं तरी त्याला शिकवण्यावर जास्त लक्ष द्यावं. नाहीतरी दहावीच्या निकालानंतर मुलं आणि पालक जास्त श्रेय ज्या खाजगी क्लासेसना देतात, त्यांच्याकडं कुठं गणवेश सक्ती असते? स्व-प्रेरणेनं स्वयंसेवी संस्था वर्षानुवर्षं प्रतिकूल परिस्थितीतल्या मुलांना शिकवून पुढं आणायचं काम करतात, त्यांना कधी मुलांनी विशिष्ट प्रकारचे / रंगाचे कपडे, बूट घालावेत असं वाटतं का? मग औपचारिक शाळांमधेच हा हट्ट इतका मोठ्या प्रमाणावर का? कुणी काय कपडे घालावेत ह्यामधे आपल्याला एकंदरीतच खूप इंटरेस्ट असतो, त्याचं कारण काय?

शाळा सुरु झाल्या, चित्रविचित्र कॉम्बिनेशनचे युनिफॉर्म घालून, गळ्यात टाय बांधून, छोटी-छोटी मुलं स्कूल व्हॅनमधून दाटीवाटीनं शाळेला निघालेली बघितली आणि दरवर्षीप्रमाणं हे सगळे प्रश्न पुन्हा डोक्यात आले. तुम्हालाही पडतात का हे प्रश्न? कुणाला त्यांची उत्तरं सापडली असतील तर जरुर कळवा.

- मंदार शिंदे
९८२२४०१२४६


Share/Bookmark

Tuesday, June 13, 2017

वयानुरुप शिक्षणाच्या प्रवाहात...

हनुमान वस्ती, वाल्हे ता. पुरंदर, जि. पुणे इथल्या जि.प. शाळेमधे मुख्याध्यापक म्हणून काम करताना श्री. अनिल चाचर सरांनी अनेक शालाबाह्य मुलं शाळेत दाखल केली. यामधे आजूबाजूच्या वस्त्या आणि पाड्यांवर राहणार्‍या पारधी, डोंबारी समाजाच्या मुलांचा समावेश होता. चौथीपर्यंत ह्या हनुमान वस्ती, वाल्हेच्या शाळेत वर्गशिक्षिका वैशाली पवार आणि मुख्याध्यापक अनिल चाचर यांच्याकडं शिकलेल्या पारधी कुटुंबातल्या दोन विद्यार्थिनी, तेजस्वी सुनिल शिंदे आणि सोनाली लखन शिंदे आज दहावीची परीक्षा पास झाल्या. तेजस्वीला ४२.६०% आणि सोनालीला ४४.००% मार्क्स मिळाले. घरातून आणि समाजातून कुठलीही शैक्षणिक पार्श्वभूमी नव्हतीच, पण दोघीही जिद्दीनं शिकत राहिल्या.

वय जास्त असल्यानं चौथीनंतर या मुली शाळेत जात नव्हत्या. नंतर वयानुरूप त्यांना आठव्या इयत्तेत प्रवेश मिळवून दिला आणि मुली शाळेत जाऊ लागल्या. मुलींच्या शैक्षणिक गरजा पूर्ण केल्या. आठवी, नववी, दहावीपर्यंत मुली शाळेत जात राहिल्या. आज दहावीचा निकाल लागला. खरं तर टक्केवारीची अपेक्षा नव्हतीच. सरांनी मुलींचं अभिनंदन केलं. पुढच्या शिक्षणासाठी आई वडिलांना समजावून सांगितलं, होणाऱ्या पतिराजांनाही समजावून सांगितलं. (होय, या मुलींची आधीच लग्नं ठरली आहेत.) या बालविवाह जमलेल्या मुलींचं शिक्षण कसं होणार, हा खरा चिंतेचा विषय होता. पण मुली आता दहावीतून अकरावीत गेल्या. बारावीनंतर दोघीही पोलिस व्हायचं म्हणतायत. शाळेच्या फीपासून सामाजिक विरोधापर्यंत असंख्य अडचणी आहेत, पण मुली शिकल्या पाहिजेत, हीच चाचर सरांची प्रामाणिक इच्छा आहे.

शिक्षण हक्क कायद्यानुसार शालाबाह्य मुलांना त्यांच्या वयानुसार योग्य इयत्तेत दाखल करण्यात यावं, असा नियम आहे. म्हणजे दहा वर्षांच्या मुलाला थेट चौथीत किंवा चौदा वर्षांच्या मुलाला थेट आठवीत प्रवेश दिला जातो. अशी वयानुरूप दाखल केलेली मुलं कशी शिकतील याबद्दल बर्‍याच लोकांच्या मनात शंका असते. तेजस्वी आणि सोनालीनं चौथीनंतर वयानुरुप थेट आठवीत शिक्षण सुरु केलं आणि आज दहावी पास होऊन दाखवलंय. मुलांना एकदा शिक्षणाची गोडी लागली की ती शिकत जातात, आपण फक्त त्यांना योग्य वातावरण आणि साधनं पुरवत रहायचं, हेच खरं.

- मंदार शिंदे
९८२२४०१२४६


Share/Bookmark

Saturday, June 10, 2017

श्रीमंत होण्याचा खात्रीशीर मार्ग

नुकताच 'लोकसत्ता लोकरंग'मधे मंदार भारदे यांचा 'मल्टिलेव्हल मर्कटलीला!' हा चेन मार्केटींग / 'एमएलएम'बद्दलचा लेख वाचला आणि गेल्या काही वर्षांतले माझे स्वतःचे अनुभव आठवले.

माझ्या माहितीत अनेक लोकांनी ह्या वेडापायी लाखाचे बारा हजार करुन घेतले आहेत. माझा एक मित्र तर 'एमएलएम चॅम्पियन'च होता. त्याच्याकडं तीन हजारांच्या डिजिटल डायरीपासून दीड लाखाच्या जपानी गादीपर्यंत काय वाट्टेल ती वस्तू विकायला असायची. हे सगळे उद्योग टिकून करत राहिला असता तर सध्याच्या 'डी-मार्ट'ला त्यानं नक्कीच टफ कॉम्पिटीशन दिली असती.

माझे पूर्वीचे काही रुम पार्टनर अशा एका स्कीमचे प्रणेते होते. ते रस्त्यानं जाणार्‍या कुणालाही पकडून रुमवर घेऊन यायचे. अशा 'लाईफ चेन्जिंग' स्कीम्स रस्त्यात उभ्या-उभ्या सांगितल्यानं त्यांची किंमत कमी होते, असं त्यांचं म्हणणं होतं. रुमवरसुद्धा नुसतं तोंडी स्कीम सांगत नसत. एक पिवळा कार्डशीट पेपर पसरायचा आणि त्यावर निळ्या आणि तांबड्या मार्करनं खूप सारे चौकोन, गोल, आणि रेषा काढून स्कीम सांगायची, असा काहीतरी सायकोलॉजिकल फंडा होता त्यांचा.

काही ओळखीच्या मित्रांकडं गेलं की ते दीडशे रुपयांची टूथपेस्ट आणि पाचशे रुपयांचं टॉयलेट क्लीनर घ्यायचा आग्रह करायचे. गॅस गीझरपासून गॅस लायटरपर्यंत आणि ट्यूबलाईटपासून लिपस्टिकपर्यंत कुठलीही गोष्ट हे लोक विकत असतात. मागे एक मित्र तर सोन्याच्या नाण्यांवर चालणारी एमएलएम स्कीम घेऊन आला होता. त्याची माहिती घेण्यासाठी ज्या बाईंकडं गेलो होतो, त्यांनी एक अतिशय सीक्रेट माहिती उघड करुन माझ्या ज्ञानात भर घातली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, 'क्रिकेट-बिकेट खेळून पैसे मिळतात, हा सर्वसामान्य लोकांच्या मनातला खूप मोठा भ्रम आहे. खुद्द सचिन तेंडुलकर ह्या सोन्याच्या नाण्याच्या स्कीमचा पायोनियर मेम्बर असल्यानं, पैशाची चिंता न करता तो क्रिकेटचा छंद जोपासू शकतो. पैसे मात्र त्याला ह्या स्कीममधूनच मिळतात.' ह्या बाईंचा कॉन्फीडन्स इतका जबरदस्त होता की मला अजूनही सचिन तेंडुलकरला बघितलं की त्याच्या खिशात 'ती' सोन्याची नाणी खुळखुळत असल्याचा आणि आपला सचिन परदेशी खेळाडूंना स्कीमचे फायदे समजावून सांगत असल्याचा भास होतो. ह्याच स्कीममुळं धीरुभाईंच्या निधनानंतर तोट्यात गेलेली रिलायन्स कंपनी पुन्हा वर आणण्यात मुकेश अंबानीला यश मिळालं, असंही बाईंनी ठासून सांगितलं होतं. यथावकाश ही 'सोन्याची नाणी' बनवणार्‍या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकली आणि स्कीम आपोआपच बंद पडली.

ही स्कीम मला विकायचा प्रयत्न करणारा माझा मित्र कुठली-कुठली इंग्लीश पुस्तकं आणून द्यायचा. बिझनेस कसा करावा, श्रीमंत कसं बनावं, नेटवर्कींगशिवाय पैसे कमावणं भविष्यात अशक्य असणार, वगैरे विषयांवरची नामवंत लेखकांची ही पुस्तकं असायची. ही पुस्तकं आणखी इतर मित्रांना देऊन त्यानं त्यांनाही ह्या जाळ्यात ओढू नये, म्हणून मी त्याच्याकडून आलेली पुस्तकं परतच द्यायची नाहीत, असा गनिमी कावा करुन बघितला. अजून वाचून व्हायचंय, दुसर्‍याला वाचायला दिलंय, सापडतच नाही, वगैरे काहीही कारणं देऊन मी अप्रत्यक्षपणे अनेकांचं संभाव्य नुकसान वाचवू शकलो ह्याचा मला आनंद वाटतो. पण त्यामुळं माझा मित्र मात्र दुरावला गेला हीदेखील वस्तुस्थितीच आहे.

बिझनेस मिटींगच्या नावाखाली सेमिनारला बोलवायचं किंवा आरोग्याविषयी लेक्चरला बोलवून हेल्थ चेक-अपची स्कीम विकायची, असल्या प्रकारात लोक स्वतःची किंमत कमी करुन घेतात. माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीनं तर पोलिस आणि मिडीयाचा शेअर आधीच ठरवून स्कीम लाँच करायची असा प्लॅनच मला सांगितला होता. कितव्या टप्प्यातल्या लोकांपर्यंत पे-बॅक द्यायचा आणि चेन कुठं तोडायची हेदेखील त्याच्या प्लॅनिंगमधे ठरलं होतं.

असो. वर सांगितलेल्या लेखामुळं ह्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या आणि पुन्हा अंगावर काटा आला. सध्या असं कुणी स्कीम वगैरे घेऊन आलं तर त्याला हेच काटे फेकून मारावेत, असं खरोखर मनापासून वाटतं.

- मंदार शिंदे
९८२२४०१२४६


Share/Bookmark