ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Thursday, July 30, 2020

New National Education Policy 2020


नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि आपण


    'येणार, येणार' म्हणून गाजत असलेलं नवीन ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ (NEP2020) शेवटी आलं. म्हणजे प्रत्यक्ष अंमलबजावणीला अजून वेळ आहे, पण निदान धोरणाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी तरी मिळाली. २९ जुलै २०१९ रोजी तशी अधिकृत घोषणा ‘मानव संसाधन विकास मंत्रालया’कडून करण्यात आली. (या मंत्रालयाचं नावसुद्धा या नवीन धोरणाद्वारे बदलून 'शिक्षण मंत्रालय' असं ठेवण्यात येणार आहे.) या धोरणाला संसदेची मंजुरी मिळणं अजून बाकी आहे, पण त्यासाठी ते संसदेत मांडलं जाईल की नाही, याबद्दल आत्ताच्या परिस्थितीत काहीच सांगता येणार नाही. असो. (संसदेच्या मुद्यावरून विषयांतर नको!)

    तर गेल्या वर्षी, म्हणजे मे २०१९ मध्ये या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा (ज्याला मराठीत 'ड्राफ्ट' असं म्हणतात तोच) जनतेसमोर ठेवून त्यावर सूचना मागवण्यात आल्या. हा ड्राफ्ट म्हणजे ४८४ पानांचं एक भलं मोठं डॉक्युमेंट होतं, तेसुद्धा इंग्रजीत. अनेक संस्था-संघटनांनी आणि शिक्षण क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी या ड्राफ्टचं वाचन, चर्चा आणि अभ्यास बैठका घडवून आणल्या. हा संपूर्ण ड्राफ्ट हिंदीमध्येही देण्यात आला असला तरी, प्रादेशिक भाषांमध्ये याचं भाषांतर उपलब्ध करण्याबद्दल ड्राफ्टींग कमिटीकडं विनंती करण्यात आली. मग संपूर्ण ड्राफ्ट नाही, पण ५२ पानांचा सारांश मराठीमध्ये (आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये) उपलब्ध करण्यात आला. या ‘समरी डॉक्युमेंट’मध्ये मूळ ड्राफ्टमधले सगळे मुद्दे समाविष्ट करण्यात आले नव्हते. शिवाय शासकीय मराठीमध्ये भाषांतर केलेलं असल्यामुळं सर्वसामान्य मराठी जनतेला त्यातून फारसा काही अर्थबोध होण्याची शक्यताही नव्हती. त्यामुळं मूळ ४८४ पानांच्या इंग्रजी ड्राफ्टवरच चर्चेचा भर राहिला.

    मे २०१९ ते ऑगस्ट २०१९ या काळात देशभरातून या ड्राफ्टबद्दल सूचना पाठवण्यात आल्या. मंत्रालयाच्या अधिकृत घोषणेनुसार, ड्राफ्टींग कमिटीकडं सुमारे दोन लाखांपेक्षा जास्त सूचना प्राप्त झाल्या. त्यानुसार मूळ ड्राफ्टमध्ये (बरेच) काही बदल करून हे धोरण मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आलं. आज-उद्या करता करता शेवटी ‘करोना लॉकडाऊन’चा मुहूर्त साधत मंत्रिमंडळानं हे धोरण मंजूर केल्याचं मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून (म्हणजेच नवीन शिक्षण मंत्रालयाकडून) जाहीर करण्यात आलं. प्रत्यक्ष मंजूर केलेलं ‘पॉलिसी डॉक्युमेंट’ अजूनपर्यंत मंत्रालयाच्या वेबसाईटवर अपलोड केलेलं दिसत नाही; परंतु पत्रकार परिषद आणि अधिकृत प्रेस रिलीजद्वारे नवीन धोरणाची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यं जाहीर करण्यात आली.

आता खरी मजा केली या प्रेस रिलीजचा अर्थ लावणाऱ्या पत्रकारांनी आणि सोशल मिडीयावरच्या उत्साही ‘पोस्ट’बहाद्दरांनी. बऱ्याच दिवसांनी ‘करोना’व्यतिरिक्त काहीतरी वेगळी ‘ब्रेकिंग न्यूज’ मिळाल्यानं टीव्ही आणि पेपरमध्ये खरोखर ‘काहीतरी’च बातम्या देण्याची चढाओढ सुरु झाली. कुणीतरी 'दहावी-बारावीची बोर्ड परीक्षा रद्द होणार' अशी अफवा जन्माला घातली आणि सर्व प्रकारच्या मिडीयामध्ये ती इमाने-इतबारे पसरवली गेली. तोपर्यंत दुसरीकडं कुणीतरी 'पाचवीपर्यंत मातृभाषेतून शिक्षण सक्तीचं होणार’ अशी काहीतरी विनोदी ‘ब्रेकिंग न्यूज’ झळकवली आणि पुन्हा सर्वसामान्य नेटकऱ्यांनी तीसुद्धा भक्तीभावानं शेअर केली. सारासार विचार करण्याचं आणि खरं-खोटं पडताळून बघण्याचं शिक्षण आपल्याला मिळालेलंच नाही, हे या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या निमित्तानं अधिकच जाणवलं.

२०१० मध्ये ‘बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९’ अर्थात 'शिक्षण हक्क कायदा' अस्तित्वात आला. त्यावेळी संपूर्ण मिडीयामध्ये 'गरीबांच्या मुलांना नामांकित शाळेत २५% मोफत प्रवेश मिळवून देणारा कायदा'शी त्याची चुकीची प्रतिमा पसरवण्यात आली. आजही बहुसंख्य लोक (आणि काही अपवाद वगळता अनेक पत्रकार) या कायद्याला २५% मोफत प्रवेशाचा आणि परीक्षा रद्द करणारा कायदा समजतात, हे दुर्दैवच! दहा वर्षांत अनेक प्रयत्न करूनदेखील ही समजूत बदलू न शकल्यानं, या नवीन धोरणाच्या प्रतिमेबद्दल आधीच काळजी वाटू लागली आहे. असो.

तर, मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळालेलं अधिकृत डॉक्युमेंट हातात येईपर्यंत आपल्याला मंत्रालयाच्या प्रेस रिलीज आणि ‘फायनल ड्राफ्ट’ या डॉक्युमेंटपुरतीच आपली चर्चा मर्यादित ठेवावी लागेल असं दिसतंय. राष्ट्रीय धोरणामध्ये प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी तपशीलवार सूचना असाव्यात अशी अपेक्षा नाही; परंतु संकल्पना पातळीवरच खूप संदिग्धता ठेवलेली दिसून येते. यासंदर्भात उदाहरणादाखल काही मुद्दे खाली मांडले आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा संपूर्ण अभ्यास करून मांडलेलं हे विश्लेषण नाही, याची कृपया नोंद घ्यावी. नवीन धोरणामध्ये हायलाईट केल्या जाणाऱ्या काही मुद्यांबाबत पडणारे प्रश्न सर्वांसोबत शेअर करण्याचा हा प्रयत्न आहे.

औपचारिक शिक्षण आणि अनौपचारिक शिक्षण -

२०१० मध्ये 'शिक्षण हक्क कायदा' अंमलात आणताना, ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक मुला-मुलीस 'औपचारिक शिक्षण' प्राप्त करण्याचा अधिकार आहे, असं सांगण्यात आलं. त्याचा विपरित अर्थ काढून 'अनौपचारिक शिक्षण' देणारे वर्ग आणि पद्धती बंद पाडण्याचा (बहुतांशी यशस्वी) प्रयत्न करण्यात आला. उदाहरणार्थ, ऊसतोडणी मजुरांच्या मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या साखरशाळा. सगळी मुलं शाळेत दाखल केली पाहिजेत, शाळेत दिलं जाणारं शिक्षण म्हणजेच औपचारिक शिक्षण, आणि मोफत औपचारिक शिक्षण उपलब्ध झाल्यानं आता अनौपचारिक शिक्षण वर्गांची गरज नाही, अशी काही (बहुतांश चुकीची) गृहीतकं मांडली गेली आणि त्यानुसार अंमलबजावणी केली गेली. याचा परिणाम काय झाला? सगळी मुलं शाळेत गेलीच नाहीत, वरून अनौपचारिक शिक्षणाचा पर्याय बंद झाल्यामुळं हजारो मुलांचं शिक्षण अचानक थांबलं.

आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (फायनल ड्राफ्टमधील) प्रकरण ३ मुद्दा क्रमांक यानुसार, "सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित गटातील (SEDG) मुलांच्या शिक्षणामध्ये येणारे अडथळे पार करण्यासाठी औपचारिक व अनौपचारिक अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षण पद्धतींचा वापर करण्यावर भर दिला जाईल" असं म्हटलं. म्हणजे औपचारिक शाळेतच अनौपचारिक शिक्षण देणं अपेक्षित आहे का? की नव्या संस्था / समांतर व्यवस्था फॅसिलिटेट करण्यासाठी ही तरतूद केलेली असावी? याबद्दल निश्चित मार्गदर्शन या धोरणाच्या मसुद्यात तरी केलेलं दिसत नाही. पूर्वी शाळेबाहेर किंवा शाळेला पूरक शिक्षण देणाऱ्या संस्थांना या तरतुदीचा काही फायदा होऊ शकतो असं आत्ता तरी वाटतंय. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित गट (SEDG) या संकल्पनेत, शहरांमध्ये राहणारी गरीब कुटुंबं आणि स्थलांतरित मजुरांची कुटुंबं यांचादेखील समावेश करण्यात आलेला आहे, ही एक सकारात्मक बाब म्हणावी लागेल.

शाळाबाह्य मुलांचा विचार -

शाळाबाह्य मुलांचा नक्की आकडा शासनाकडं कधीही उपलब्ध नसतो. शाळाबाह्य मुलांचा सर्व्हे एकतर नियमितपणे केला जात नाही, केलाच तर सदोष पद्धतीनं केला जातो. त्यामुळं प्रत्येक विभाग, अधिकारी, संस्थेनुसार शाळाबाह्य मुलांचे आकडे बदलत जातात. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या ‘फायनल ड्राफ्ट’मध्ये तिसऱ्या प्रकरणात, "As per the UNESCO Institute of Statistics (UIS) an estimated 6.2 crores children of school age (between 6 and 18 years) were out of school in 2013." असा उल्लेख केलेला आहे. या UIS संस्थेनं हे सर्वेक्षण कुठं केलं, कधी केलं, कशा पद्धतीने केलं, त्याआधी किंवा नंतर केलं का, नसेल तर का केलं नाही, असे काही मूलभूत प्रश्न हे विधान वाचून पडले आहेत. शिवाय, मंत्रालयाच्या अधिकृत प्रेस रिलीजमध्ये, ‘या नवीन पॉलिसीमुळं देशातली २ कोटी शाळाबाह्य मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येतील’ असं म्हटलंय. आता ६.२ कोटींवरून हा आकडा २ कोटींवर कसा आला, त्यासाठी कुठल्या सर्व्हेचा आधार घेतला, मधली ४.२ कोटी मुलं नक्की शाळेत गेली का, या गोष्टी अंधारातच राहतील असं दिसतंय.

अंगणवाडी सेविकांचं प्रशिक्षण -

सध्याच्या अंगणवाडी सेविका / शिक्षिकांसाठी 'बाल संगोपन व शिक्षण' यासंबंधी दोन प्रकारचे कोर्सेस नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या ‘फायनल ड्राफ्ट’मध्ये नमूद केले आहेत. १०+२ किंवा त्याहून अधिक शैक्षणिक पात्रताधारकांसाठी सहा महिन्यांचा सर्टीफिकेट कोर्स आणि त्याहून कमी शैक्षणिक पात्रताधारकांसाठी एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स देण्याचा उल्लेख केला. त्यांच्या सध्याच्या कामामध्ये फारसा अडथळा न येऊ देता, डिजिटल किंवा दूरस्थ पद्धतीनं हे कोर्स चालवता येतील असंही यामध्ये म्हटलं. अंगणवाड्यांची सद्यस्थिती, त्यांच्याकडील साधनांची उपलब्धता, आणि अंगणवाडी सेविकांना/शिक्षिकांना मिळणारं (किंवा न मिळणारं) वेतन, या बाबींकडं दुर्लक्ष करून पुन्हा त्यांच्यावरच अतिरिक्त प्रशिक्षणाचा भार टाकण्याचं धोरण का बनवलं असावं? हे नवीन कोर्सेस कोण घेणार, कसे घेणार, त्यासाठी खर्च किती आणि कशातून केला जाणार, आणि त्यातून नक्की काय बदल/सुधारणा अपेक्षित आहे, याबद्दल मात्र कुठलीही स्पष्टता दिसत नाही. 'अंगणवाड्यांचं सक्षमीकरण' हा शब्दप्रयोग मात्र पुनःपुन्हा केलेला दिसतो.

शिक्षकांचं शिक्षण आणि पात्रता -

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (फायनल ड्राफ्टमध्ये) प्रकरण ५ मुद्दा क्रमांक २३ नुसार, २०३० पर्यंत शिक्षकांची किमान पात्रता ४ वर्षांची इंटिग्रेटेड बी.एड. डिग्री ही असणार आहे. याचा अर्थ, त्याआधी तसे बदल कॉलेज आणि अभ्यासक्रम पातळीवर पूर्ण करावे लागणार आहेत. सध्याच्या बी.एड. कोर्सला डमिशन घेणं २०२६ पर्यंत (किंवा त्याआधीच) थांबवावं लागेल. त्यानंतरही जुने बी.एड. आणि नवे बी.एड. यांच्या नेमणुका, बढत्या आणि पगारवाढ याबाबतीत गोंधळ आणि संघर्षाला जागा उरेलच.

याच मुद्दा क्र. २३ नुसार, इतर विषयांमध्ये विशेष पदवी मिळवलेल्यांसाठी २ वर्षांचा बी.एड. कोर्स चालवला जाईल. 'विषय शिक्षक' होण्यासाठी इच्छुक व्यक्ती मास्टर्स डिग्रीप्राप्त असल्यास त्यांच्यासाठी १ वर्षाचा बी.एड. कोर्स चालवला जाईल, असंदेखील यात म्हटलंय. म्हणजे नक्की सिस्टीममध्ये काही बदल करायचाय की नुसतीच नव्या बाटलीत जुनी दारू भरायचीय हे समजत नाही. जुन्या कॉलेजेसना पुनर्मान्यता आणि नवीन कॉलेजेसना नव्यानं मान्यता देण्याचं मोठं मार्केट मात्र नक्कीच तयार होताना दिसतंय. बाकी शिक्षकांच्या नोकरीची आणि पगाराची हमी मात्र ना कॉलेज देणार ना सरकार. मग नक्की हा बदल करण्यामागचं प्रयोजन काय असावं?

शिक्षणाचा नवीन आकृतीबंध -

    या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या बाबतीत सगळ्यात जास्त गाजणारी गोष्ट म्हणजे “दहावी-बारावी बोर्ड परीक्षा रद्द होणार” ही समजूत. प्रत्यक्षात काय होणार आहे? ६ ते १४ वयोगटासाठी, म्हणजे पहिली ते आठवीपर्यंत, मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार देणारा कायदा २०१० पासून अस्तित्वात आहेच. आता नवीन धोरणामध्ये पूर्व प्राथमिक (म्हणजे वय वर्षे ३ ते ५) आणि उच्च माध्यमिक (वय वर्षे १५ ते १८) यांचादेखील एकत्र विचार करून नवीन रचना करण्यात आलीय. पूर्व प्राथमिकची ३ वर्षे आणि पहिली-दुसरीची २ वर्षे अशी एकूण ५ वर्षे म्हणजे पहिला टप्पा असेल. त्यानंतर तिसरी ते पाचवीची ३ वर्षे आणि सहावी ते आठवीची ३ वर्षे असे दोन टप्पे असतील. मग नववी ते बारावी असा एकूण ४ वर्षांचा शेवटचा टप्पा असेल.

    या टप्प्यांमुळं सध्याच्या शाळांच्या रचनेमध्ये काय बदल होईल? एक तर सगळ्या शाळांना या नवीन रचनेनुसार आपल्या मागं किंवा पुढं वर्ग जोडून घ्यावे लागतील. उदाहरणार्थ, पहिलीपासून ज्या शाळेत वर्ग सुरु होतात, त्यांना मागच्या तीन वर्षांच्या (पूर्व प्राथमिक) वर्गांचीसुद्धा सोय करावी लागेल. दहावीपर्यंत ज्यांच्याकडे वर्ग आहेत, त्यांना अकरावी-बारावीचे दोन वर्ग वाढवावे लागतील. काही शाळांमध्ये ‘ज्युनिअर कॉलेज’ या नावानं असे वर्ग आधीपासून असतीलही. पण महत्त्वाचा बदल म्हणजे, दहावीची परीक्षा दिल्यानंतर त्याच शाळेत अकरावीला प्रवेश मिळणार असेल, तर दहावी बोर्ड परीक्षेचं महत्त्व (किंवा भीती) कमी होण्याची शक्यता आहे. अर्थात याची अंमलबजावणी नक्की कशी आणि कधी होणार याबद्दल सध्यातरी काहीच सांगता येणार नाही, पण ‘बोर्ड परीक्षा रद्द होणार’ अशी आवई उठण्यामागं हे एक कारण असू शकतं असं वाटतंय.

या संदर्भात शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीचं उदाहरण आपल्यासमोर आहेच. हा कायदा २०१० साली येण्याआधी, पहिली ते चौथी ‘प्राथमिक’, पाचवी ते सातवी ‘उच्च प्राथमिक’ आणि आठवी ते दहावी ‘माध्यमिक’ अशी रचना होती. शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते आठवीला ‘मुलभूत (एलिमेंटरी) शिक्षण’ मानण्यात आलं आणि त्यानुसार शाळांची पुनर्रचना करायचे आदेश निघाले. आज दहा वर्षांनंतर काय परिस्थिती आहे? चौथीपर्यंतच्या किती शाळांनी आठवीपर्यंत वर्ग वाढवले? सातवीपर्यंतच्या शाळांनी आठवीत जाणाऱ्या मुलांची सोय कशी करून दिली? अजून कित्येक शाळांना अशी काही रचना २०१० मध्ये बदलली याचाच पत्ता नाही. सगळा सावळागोंधळ आहे. आणि आता त्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सांगितलेल्या नवीन आकृतीबंधाची भर!

शिक्षण हक्क कायदा गडद होणार की पातळ?

शिक्षण हक्क कायद्याच्या कक्षा रुंदावण्याचे संकेत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रकरण ८ मुद्दा क्रमांक ८ मध्ये दिलेले दिसतात. ६ ते १४ वयोगटासाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करणाऱ्या शिक्षण हक्क कायद्यात ३ ते १८ वयोगटाचा समावेश करता येईल का याचा विचार केला जाईल, असं या मुद्यामध्ये म्हटलंय. पण त्याच्याच पुढं असंही म्हटलंय की, शाळांमधील भौतिक सुविधांबाबतच्या अपेक्षांमध्ये तडजोड केली जाईल व त्यासंबंधीचे नियम शिथिल केले जातील. (‘डजस्ट’ आणि ‘लूजन’ असे शब्द त्यासाठी वापरले आहेत.) प्रत्येक शाळेला आपल्या स्थानिक गरजा आणि मर्यादांनुसार निर्णय घेण्याचे अधिकार दिले जाणार आहेत, असंही पुढं म्हटलंय. सर्व शाळांमध्ये समान आणि किमान पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर) उपलब्ध करून देण्याच्या शिक्षण हक्क कायद्यातल्या मूळ उद्दीष्टांशी हे विसंगत वाटत नाही का? मला तरी वाटतंय. (शहरी भागात शाळा सुरु करायची असेल तर जागेची अडचण लक्षात घेऊन मैदानाची अट शिथिल करावी, असं काहीसं उदाहरण याच्या स्पष्टीकरणासाठी दिलेलं आहे.)

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (फायनल ड्राफ्टच्या) प्रस्तावनेतच असं म्हटलं की, यापूर्वीच्या धोरणांची अंमलबजावणी करताना शिक्षणाच्या उपलब्धता आणि समानता (क्सेस आणि इक्विटी) या घटकांवर 'जास्त' भर देऊन गुणवत्तेकडं (क्वालिटीकडं) 'कमी' लक्ष देण्यात आलं. तसं असेल तर एवढ्या वर्षांमध्ये ‘क्वालिटी एज्युकेशन’ राहू द्या, पण १००% मुलं शाळेत तरी गेली असती. पण आजही शिक्षण मंत्रालयाला अधिकृतपणे २ कोटी मुलं शाळाबाह्य असल्याचं मान्य करायला लागावं, याचा अर्थ काय? शिक्षणाची उपलब्धता (ऐक्सेस) आणि शिक्षणाली समानता (इक्विटी) यांच्याबाबत खरोखर समाधानकारक परिस्थिती आहे असं आपल्याला वाटतं का? (प्रत्येक शाळेतून हुशार मुलं बाजूला काढून त्यांना आठवड्याला पाच तास विशेष कोचिंग देण्याची शिफारससुद्धा या नवीन पॉलिसीमध्ये केलेली आहे.) हे मुद्दे लक्षात घेतल्यास शासनाला खरोखर शिक्षण हक्क कायद्याच्या कक्षा रुंदावण्यात रूची आहे की त्याचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा प्रश्न पडतो. अर्थात हे माझं वैयक्तिक इंटरप्रिटेशन आहे. प्रत्यक्ष अंमलबजावणी बघूनच आपल्याला अंतिम मत बनवता येईल.

फक्त उदाहरणादाखल काही मुद्यांचा वर उल्लेख केला आहे, त्यांच्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. अधिकृत डॉक्युमेंट हातात आल्यावर अजून तपशीलवार अभ्यास करता येईल. शाळा संकुल (स्कूल कॉम्प्लेक्स), मातृभाषेतून शिक्षण, शाळा व्यवस्थापन समित्यांचा सहभाग, खाजगी संस्था आणि कंपन्यांची भूमिका, असे अनेक मुद्दे बघून, समजून घ्यावे लागतील. आता या धोरणामध्ये काही बदल सुचवता येणार नाहीत, हे खरं असलं तरी त्याच्या अंमलबजावणीचा आपल्या सगळ्यांवर होणारा परिणाम समजून घेणं आणि त्याच्या अंमलबजावणीमध्ये सहभागी होणंदेखील महत्त्वाचं आहे, असं मला वाटतं.



- मंदार शिंदे

३०/०७/२०२०


Mobile: 9822401246

E-mail: shindemandar@yahoo.com

Blog: http://aisiakshare.blogspot.com

Books on Amazon: http://amazon.com/author/aksharmann




Share/Bookmark

Thursday, July 23, 2020

Scheme (Script)


स्कीम
(लेखकः मंदार शिंदे)

प्रवेश १
(स्टेजवर दोन घरांच्या बाल्कन्या दिसत आहेत. दोन्ही घरांत अंधार आहे. उजवीकडच्या घरात लाईट चालू होतो आणि पुष्पा बडबड करत विंगेतून आत येते.)
पुष्पाः …बाई गं… बरं झालं घरी निघून आले. कसला बोर मेनू होता आजच्या भिशीचा… इडली-चटणी म्हणे. आणि ती स्वाती… एक-एक इडली मोजून वाढत होती मेली… तरी बरं, स्वतः खाऊन-खाऊन इडलीसारखी झालीय… आणि काय तर म्हणे डाएटचा नवीन कोर्स करतीय… त्यासाठी बरे पैसे असतात ह्यांच्याकडं... मोठेपणा सांगायला मिळतो ना तेवढाच. आमच्याकडच्या भिशीला मस्त मेनू असणारे, असं स्वतःच ग्रुपवर टाकत होती. हिचा मस्त मेनू म्हणजे काय, तर इडली आणि चटणी. ती पण एक-एक मोजून… मरु दे, मस्त चहा घ्यावासा वाटतोय आता उतारा म्हणून… हो, पण आयता चहा कुठं आपल्या नशिबात… चला पुष्पा मॅडम, आपला आपण चहा करु, छान आलं टाकून… (गाणं गुणगुणत आत जाते) चहा पाज रे, हाय चहा पाज रे… एक गर्मागरम चहा पाज रे…
(डावीकडच्या घरात लाईट चालू होतो. स्वप्ना हातात मोबाईल घेऊन बाल्कनीत येते. फोनला रेन्ज मिळत नसल्यानं ती वैतागली आहे. फोन ट्राय करता करता बडबड करते आहे.)
स्वप्नाः या घरात ना अजिबातच रेन्ज मिळत नाही… कित्ती वेळा सांगितलं निशिकांतला, आपण घर बदलू, दुसरीकडं रहायला जाऊ. पण त्याला इथंच रहायचंय. (वेगळ्या टोनमधे) माझ्या ऑफीसमधले कलीग्ज इथेच राहतात, आमचा छान ग्रुप आहे, आम्ही ऑफीसला जाताना कार पूलिंग पण करु शकतो… (तुच्छतेने) सो मिडल-क्लास! आली.. आली.. रेन्ज आली. लागला फोन… (फोनवर) हां सुनिता, बोल… हो अगं, मधेच कट झाला ना फोन…. बघ ना, रेन्जच नाही मिळत इथं… हो, मी तर केव्हाचीच तयार आहे गं, पण निशिकांतला इथंच रहायचंय… हो ना, त्याला काय फरक पडतो म्हणा… तो जातो ऑफीसला निघून, दिवसभर मलाच रहावं लागतं इथे… हो ना, आणि वर्क फ्रॉम होम म्हणजे काय झोपा काढतो काय आपण? इथंसुद्धा ऑफीसइतकंच काम असतं, हे कळतच नाही त्याला… काय सांगतेस, तुझ्याकडंही तेच रामायण का? अगं या नवऱ्यांना आपण काम पण करावं आणि घर पण सांभाळावं, असंच वाटत असतं… अगं, इतका प्रॉब्लेम होतो ना घरुन काम करताना… आता हेच बघ ना, रेन्ज नसली की… हॅलो… हॅलो… सुनिता… श्शी… गेली परत रेन्ज… इथेच बसते आता काम करत, म्हणजे परत फोन आला तर रेन्ज मिळेल… (आत निघून जाते.)
(उजवीकडून पुष्पा हातात चहाचा कप घेऊन बाल्कनीत येते. गाणं गुणगुणत स्टूलवर बसते. डावीकडून स्वप्ना लॅपटॉप घेऊन येते आणि स्टूलवर बसते.)
पुष्पाः (स्वप्नाला बघून जोरात ओरडते.) अय्या! स्वप्ना तू?
स्वप्नाः (दचकून) हो, मीच आहे. एवढ्या जोरात ओरडायला काय झालं? दचकले ना मी…
पुष्पाः सॉरी सॉरी सॉरी… तू आत्ता घरी असशील असं वाटलं नव्हतं, म्हणून…
स्वप्नाः का गं? मी घरी कधी थांबायचं आणि बाहेर कधी जायचं, हे आता तू ठरवणार का?
पुष्पाः तसं नाही गं, स्वाती म्हणाली मला. स्वप्नाला कुठंतरी जायचं होतं.. म्हणून नाही आली.. भिश्शीला!
स्वप्नाः (सारवासारव करत) अच्छा अच्छा… ते होय… म्हणजे मला निरोप मिळाला होता ग्रुपवर.. पण माझं काम होतं जरा महत्त्वाचं, म्हणून मीच कळवलं तिला.. येणार नाही म्हणून.. भिश्शीला!
पुष्पाः तुझं बरंय बाई, तुला जमतं असं डायरेक्ट नाही म्हणायला… आमचं आयुष्य चाललंय लोकांची मनं राखण्यात… रांधा, वाढा, उष्टी काढा…
स्वप्नाः अय्या! म्हणजे स्वातीनं तुला स्वैपाकाला बोलवलं होतं तर…
पुष्पाः (जोरात ओरडते) एऽऽ मी काय स्वैंपाकीण वाटले का गं तुला?
स्वप्नाः (घाबरुन) अगं तसं नाही… तूच म्हणालीस ना, रांधा - वाढा आणि काहीतरी काहीतरी…
पुष्पाः अगं म्हण असते ती… बाईच्या जातीला हमखास करावी लागणारी कामं सगळी…
स्वप्नाः शी शी शी! बाईची जात काय, रांधा-वाढा काय… हाऊ ओल्ड-फॅशन्ड्‌!
पुष्पाः ओ स्वप्ना मॅडम. माहितीये तुमची फॅसण. रोज-रोज हॉटेलमधे जाण्याइतके पैसे असते, तर आम्ही तरी कशाला बसलो असतो घरी चपात्या लाटत! 
स्वप्नाः (लॅपटॉप ठेवून उभी राहते) मी काय म्हणते पुष्पा…
पुष्पाः (उठून उभी राहते) काय गं, काय?
स्वप्नाः आपण ना सोसायटीच्या चेअरमनला भेटायला जाऊ…
पुष्पाः (उत्सुकतेनं) कशाला गं कशाला?
स्वप्नाः आपला महिन्याचा मेन्टेनन्स खूपच वाढलाय नै का इतक्यात…
पुष्पाः ए हो ना, खरंच. पण आपण चेअरमनला कशासाठी भेटायचं ते सांग की.
स्वप्नाः अगं, आपल्या सोसायटीचा खर्च वाचवायची आयडीया आहे माझ्याकडं…
पुष्पाः (उत्सुकतेनं) काय आयडीया आहे? सांग की मला पण…
स्वप्नाः (हळू आवाजात गुपित सांगितल्यासारखं बोलते) आपण सोसायटीच्या चेअरमनला भेटायला जाऊ… (पुष्पा मधेमधे ‘हां हां’ करते.) आणि त्यांना सांगू… आपल्या सोसायटीच्या वॉचमनला… काढून टाका… त्याच्या पगाराचे पैसे वाचतील… आपल्याला वॉचमनची गरजच नाय… विचार का?
पुष्पाः ए का गं, का?
स्वप्नाः कारण… आपल्याकडं पुष्पा मॅडम आहेत. (नॉर्मल टोनमधे) सगळी खबर असते इकडं… कोण घरी बसलंय, कोण बाहेर गेलंय, कोण स्वैपाक बनवतंय, कोण हॉटेलात जेवतंय, कोण… (बोलत-बोलत लॅपटॉप उचलून पुन्हा बसते.)
पुष्पाः (रागानं) एऽऽ जास्त बोलू नकोस हं तू…
स्वप्नाः जास्त नै काही, खरं तेच बोलले. खरं बोललं की राग येणारच माणसाला.
पुष्पाः एहेहे हेहेहे… मी पण खरं तेच बोलले हो. निशिकांत भाऊजींनीच सांगितलं परवा चहाला आले तेव्हा… (खाली बसते) आणि मी काही दुर्बिण नाही लावून बसले तुझ्या घरात काय चाललंय बघायला. 
स्वप्नाः दुर्बिण कशाला लावायला पाहिजे? काय मस्त घरं बांधलीत आपल्या बिल्डरनं. दोन बिल्डींगच्या बाल्कन्या इतक्या जवळ… (उठून उभी राहते) इतक्या जवळ की, मधे टीपॉय ठेऊन पत्ते खेळू शकतो आपण! तरी मी निशिकांतला म्हणत होते, डोळे झाकून फ्लॅट खरेदी करु नकोस… पण त्याचं काहीतरी वेगळंच… (बडबडत राहते.)
पुष्पाः (काहीतरी आठवून उठते) ए पत्त्यावरनं आठवलं… परवाच्या मिटींगचा पत्ताच नाही घेतला मी. अशी कशी वेंधळी गं तू पुष्पा… (स्वतःशीच बडबडत खोलीत जाते. फोन शोधताना गाणं गुणगुणते. चालः दुक्की पे दुक्की हो, या सत्ते पे सत्ता…) चहाही राहू दे, राहू दे फालतू गप्पा.. चहाही राहू दे, राहू दे फालतू गप्पा.. विचारुन घेऊ दे आधी मला, परवाच्या मिटींगचा पत्ता.. फोन कुठं झाला बेपत्ता! फोन कुठं झाला बेपत्ता?
(ब्लॅक-आऊट)

प्रवेश २
(पुष्पा खोलीत बसून फोनवर बोलत आहे. स्वप्ना बाल्कनीत बसून लॅपटॉपवर काम करत आहे.)
पुष्पाः (फोनवर) हॅलो… संध्या? अगं फोन करणार होतीस ना मला?... मला फायनल लिस्ट बनवायची आहे परवाच्या मिटींगसाठी… तुला स्कीम कळालीय नीट की परत सांगू?... नाही नाही नाही, अगं काही फसवाफसवी नाही… मी बोललीये ना त्यांच्याशी… खूप सोप्पं आहे अगं… ते सगळं ट्रेनिंग देणारेत… आपण फक्त त्यांची मेम्बरशिप घ्यायची आणि त्यांचे प्रॉडक्ट विकायचे… अगं काय मस्त-मस्त प्रॉडक्ट आहेत… एकदा बघाल तर प्रेमात पडाल!... नाही नाही, मी नाही बघितले अजून, पण त्यांनी फोनवर सांगितलं ना मला… मीपण भेटले नाही अजून त्यांना… पण मला तरी स्कीम आवडली बाई… घरी बसून चार पैसे कमवायची संधी मिळतीय तर सोडा कशाला?... येतीयेस ना मग?... पैसे भरावे लागतील परवा थोडे… हॅलो… संध्या?... हॅलो… (फोन कट होतो.) ह्या फोनची पण काय कटकट आहे. (उठून बाल्कनीत जाते. पुन्हा फोन लावते. रिंग होते, पण फोन उचलला जात नाही.) फोन का नाही उचलत ही संध्या?... अच्छा अच्छा, पैशाचं नाव काढल्यावर लगेच कट झाला नाही का फोन? चिंगूस मेली! 
स्वप्नाः मला काही म्हणालीस का गं?
पुष्पाः छे छे! तुला कशाला काय म्हणेल? तुझं चालू दे… (पुन्हा फोन लावत खोलीत जाते.) हॅलो… अंजूकाकी? कशी आहेस तू?... मी मजेत… नाही अगं सहजच केला फोन… प्रेरणा कशी आहे?... आणि पिल्लू?... त्याच्या बारशाचे फोटो आले का गं?... नाही नाही, काही विशेष काम नव्हतं… म्हणजे एक छोटंसं काम होतं खरं तर… अगं एक बिझनेस सुरु करतेय मी… हो, मी म्हणजे मी एकटीच… घरुनच काम करायचं आहे… खूप सोप्पं आहे अगं… ते सगळं ट्रेनिंग देणारेत… आपण फक्त त्यांची मेम्बरशिप घ्यायची आणि त्यांचे प्रॉडक्ट विकायचे… हॅलो… हॅलो… काकी… (बोलत-बोलत बाल्कनीत जाऊन बसते.) आता येतंय का ऐकू?... हां, तर काय सांगत होते मी… अगं काय मस्त-मस्त प्रॉडक्ट आहेत… एकदा बघाल तर प्रेमात पडाल!... नाही नाही, मी नाही बघितले अजून, पण त्यांनी फोनवर सांगितलं ना मला… मीपण भेटले नाही अजून त्यांना… पण मला तरी स्कीम आवडली बाई… घरी बसून चार पैसे कमवायची संधी मिळतीय तर सोडा कशाला?... त्याचीच मिटींग आहे परवा. आणि मला काही मेम्बर गोळा करुन न्यायचे आहेत… येशील का मग तू?... पैसे ना? हो, भरावे लागतील परवा थोडे… हॅलो… हॅलो… (फोन कट होतो.) श्शी!! कट झालाच शेवटी. (पुन्हा नंबर डायल करायला जाते, पण थांबते) नाही पुष्पा, कट ‘झाला’ नाही.. कट ‘केला’ फोन.
स्वप्नाः मला काही म्हणालीस का गं?
पुष्पाः (स्वप्नावर राग काढते) तुझं काय गं मधे-मधे? तुझं-तुझं काम कर की. माझ्या बाल्कनीकडं कशाला कान लावून बसलीयेस?
स्वप्नाः मी माझंच काम करतीये हो. तूच माझ्या कानाजवळ येऊन आरडाओरडा करतीयेस म्हणून विचारलं…
पुष्पाः मी काही आरडाओरडा नाही केला. आता ह्या फोनला इथंच रेन्ज येते त्याला मी काय करणार? (बडबड करत पुन्हा खोलीत येते.) वैताग आहे नुसता… आपल्याच घरात आपल्यालाच बोलायची चोरी. मरु दे, मला कुठं वेळ आहे हिच्याशी भांडायला… (फोनवर नंबर डायल करते.) हॅलो… शिल्पा वहिनी? पुष्पा बोलतीये… काय? कृष्णा नाही हो, पुष्पा.. पुष्पा बोलतीये… हॅलो… ऐकू येतंय का?... थांबा एक मिनिट… (पुन्हा बाल्कनीत जाऊन बसते.) हॅलो, आता येतंय का ऐकू?... हो ना, अहो इतका प्रॉब्लेम आहे ना इथं रेन्जचा… चेन्ज नाही हो, रेन्ज रेन्ज, फोनची रेन्ज… हां, रेन्जचा प्रॉब्लेम आहे इथं… ते जाऊ दे, एका बिझनेसबद्दल बोलायचं होतं तुमच्याशी… ह्यांच्या नाही हो, माझ्या… अहो खरंच! एवढ्यातच केलाय सुरु… गुरु? गुरु नाही हो, सुरु सुरु… तेच तर सांगायचं होतं तुम्हाला… नाही, बाहेर नाही.. घरुनच काम करायचं आहे… खूप सोप्पं आहे हो… ते सगळं ट्रेनिंग देणारेत… आपण फक्त त्यांची मेम्बरशिप घ्यायची आणि त्यांचे प्रॉडक्ट विकायचे… अहो, काय मस्त-मस्त प्रॉडक्ट आहेत… एकदा बघाल तर प्रेमात पडाल!... नाही नाही, मी नाही बघितले अजून, पण त्यांनी फोनवर सांगितलं ना मला… मीपण भेटले नाही अजून त्यांना… पण मला तरी स्कीम आवडली… क्रीम नाही हो, स्कीम स्कीम… ही बिझनेस स्कीम हो… त्याचीच मिटींग आहे परवा. आणि मला काही मेम्बर गोळा करुन न्यायचे आहेत… याल का मग तुम्ही?... पैसे ना? हो, भरावे लागतील परवा थोडे… हॅलो… हॅलो… (फोन कट होतो. ती रागानं फोनकडं बघत बसते. काही सेकंदांतच तिला हुंदका अनावर होतो आणि ती रडू लागते.)
स्वप्नाः (दचकून पुष्पाकडं बघत) ओ पुष्पाताई, टीव्ही सिरीयलमधे रोल मिळाला की काय? नाही, रडायची प्रॅक्टीस सुरु केलीत म्हणून विचारलं. (पुष्पाकडून उत्तर येत नाही. स्वप्ना काळजीनं उठून उभी राहते.) ए पुष्पा… अगं काय झालं? बरी आहेस ना? (पुष्पा स्वप्नाकडं बघते आणि अजूनच जोरात रडू लागते.) अगं अशी रडतेस काय? काय झालं बोल तरी. (पुष्पा नुसतीच स्वप्नाकडं बघते आणि रडते. स्वप्ना काहीतरी विचार करुन बोलते.) थांब, मी तुझ्याकडंच येते. दार उघड.
(स्वप्ना डावीकडं आत निघून जाते. पुष्पा काही वेळ त्या दिशेनं बघत राहते. पुन्हा हुंदका देते आणि उजवीकडच्या विंगेत निघून जाते. थोड्या वेळानं दोघी पुष्पाच्या घरात येतात. पुष्पाचं हुंदके देणं सुरुच आहे.)
स्वप्नाः हां बोल आता… काय झालं रडायला? कुणी काही बोललं का? बरं वाटत नाहीये का? (पुष्पाच्या कपाळाला हात लावून) ताप आलाय का? (पुष्पाचे हात दाबत) काही दुखतंय का? डॉक्टरकडं जायचंय का? अरुण भाऊजींना फोन लावू का? (फोन शोधू लागते. पुष्पा अजूनच हुंदके देऊ लागते. स्वप्ना तिच्या जवळ येऊन बसते.) हे बघ पुष्पा, तू सांगितलंच नाहीस तर मला कळणार कसं, काय झालंय?
पुष्पाः (हळू आवाजात पुटपुटते) काही नाही झालेलं… माझंच चुकलं… कधी नव्हे ते अपेक्षा केली ना… मला अपेक्षा करायचा हक्कच कुठाय पण?... मी फक्त सगळ्यांची मनं राखायची…
स्वप्नाः (मधेच बोलते) हो, रांधायचं, वाढायचं आणि उष्टी काढायची! (पुष्पा दचकून स्वप्नाकडं बघते आणि पुन्हा हुंदके देऊ लागते. स्वप्ना गडबडून जाते.) सॉरी सॉरी सॉरी… चुकून बोलून गेले. तू नीट सांग ना काय झालंय…
पुष्पाः (हुंदके देत देत बोलते) काही नाही गं… लग्नाआधी मी पण जॉब करायचे. तुझ्यासारखा कॉर्पोरेट नसला तरी ठीकठाक होता. थोडेफार पैसे यायचे हातात… मला हव्या त्या गोष्टींवर खर्च करु शकायचे… म्हणजे मी पैशाच्या बाबतीत उधळी नव्हतेच कधी, तरी खर्च करायला आवडायचं… पण लग्न झालं आणि अरुण म्हणाले की, ‘तुला पैसे कमवायची गरजच नाही. आपलं भागेल माझ्या पगारात…’
स्वप्नाः अगं पण भागायचा काय संबंध यात? जॉब काय फक्त पैसे कमवण्यासाठी करतात का? तुझं करीयर, तुझा अनुभव, तुझं स्वातंत्र्य…
पुष्पाः (पुन्हा हुंदके देऊ लागते) जाऊ दे गं स्वप्ना… ह्या सगळ्या नशीबाच्या गोष्टी असतात. मला जॉब नाही करता येणार हे मी मान्य केलं. मग माझा सगळा वेळ मी दिला फॅमिलीसाठी - सण-बिण, लग्न-बिग्न, बारसं-बिरसं, वाढदिवस, डोहाळेजेवण, हळदीकुंकू…
स्वप्नाः (मधेच बोलते आणि जीभ चावते) भिश्शी-बिश्शी… सॉरी सॉरी सॉरी, तू बोल…
पुष्पाः बघ ना… सगळ्यांच्या घरी सगळ्या कार्यक्रमांना पुष्पा आधी हजर पाहिजे. कुणाची मुलं सांभाळायचीत, पुष्पा आहेच. कुणाला स्वैंपाकात मदत करायचीय, पुष्पा आहेच. कुणाला दवाखान्यात डबा द्यायचाय, पुष्पा आहेच… कुणाच्या…
स्वप्नाः … घरावर लक्ष ठेवायचंय, पुष्पा आहेच. (पुन्हा जीभ चावते) सॉरी सॉरी. चुकून बोलून गेले.
पुष्पाः असू दे गं, तूच एकटी आहेस जिनं माझ्याकडून कध्धीच कसलंच काम नाही करुन घेतलं… मी खूप भांडले असेल तुझ्याशी, टोमणे मारले असतील. पण खरं सांगू का स्वप्ना? तू एखाद्या दिवशी भेटली नाहीस तर करमत नाही आता मला…
स्वप्नाः (आश्चर्याने) काय सांगतेस काय, पुष्पा… अगं पण…
पुष्पाः (स्वप्नाच्या बोलण्याकडं दुर्लक्ष करत) मी कधी बोलले नाही, पण आज तुला सांगते. माझ्याकडून सगळ्यांच्या अपेक्षा आहेत. सगळ्यांच्या सगळ्या अपेक्षा मी पूर्ण करते. आणि आज कधी नव्हे ते मी अपेक्षा केली तर…
स्वप्नाः पण असली कसली अपेक्षा केलीस तू?
पुष्पाः (डोळे पुसत उत्साहानं सांगते) अगं तुला सांगायची राहिलीच की… एक मस्त बिझनेस स्कीम आहे… म्हणजे मला फारसं घराबाहेर पडायचीसुद्धा गरज नाही, आणि पैसेसुद्धा चांगले मिळणार आहेत…
स्वप्नाः (संशयानं) असली कसली स्कीम गं?
पुष्पाः अगं खूप सोप्पं काम आहे. ती कंपनी सगळं ट्रेनिंग देणारे. आपण फक्त त्यांची मेम्बरशिप घ्यायची आणि त्यांचे प्रॉडक्ट विकायचे. अगं, काय मस्त-मस्त प्रॉडक्ट आहेत…
स्वप्नाः (मधेच बोलते) हो ना, ‘एकदा बघाल तर प्रेमात पडाल!’
पुष्पाः अय्या, तुला कसं गं माहीत?
स्वप्नाः का माहिती नसणार? गेल्या तीन दिवसांत तीनशे फोन लावले असतील तू. आणि प्रत्येक वेळी फोनवर हे धृवपद आहेच… (पुष्पाची नक्कल करत) “एकदा बघाल तर प्रेमात पडाल! नाही नाही, मी नाही बघितले अजून, पण त्यांनी फोनवर सांगितलं ना मला… मीपण भेटले नाही अजून त्यांना… पण मला तरी स्कीम आवडली…”
पुष्पाः (रागानं) कर कर, तू पण चेष्टा कर माझी…
स्वप्नाः (पुष्पाला समजावते) तसं नाही गं… मी आधीच बोलणार होते तुझ्याशी, पण म्हटलं जाऊ दे. तुझा उगाच गैरसमज व्हायचा. म्हणजे मला अगदी मान्य आहे, तू सगळं सांभाळून काहीतरी काम करायची धडपड करतीयेस, पण…
पुष्पाः पण काय?
स्वप्नाः अगं अशा शेकडो स्कीम्स रोज येत असतात मार्केटमधे. पण त्यातल्या खरंच आपल्या उपयोगाच्या कोणत्या ते तपासून नको का बघायला? अशी गडबड करुन, त्यांच्या मार्केटींगला भुलून आपण आपला वेळ, आपले पैसे, आणि आपले कष्ट वाया नाही घालवायचे.
पुष्पाः (विचार करत) बरोबर आहे तुझं, पण…
स्वप्नाः हो हो, कळतंय मला. तू आत्ता आणलेली स्कीम खोटीच असेल कशावरुन? असंच म्हणायचंय ना तुला?
पुष्पाः हो ना… म्हणजे आपण ट्राय तर करुन बघू शकतो की. आणि तू पण चल ना माझ्यासोबत मिटींगला. तुला पण कळेल खरी स्कीम काय आहे ते…
स्वप्नाः नको नको नको. मला नाही यायचंय अशा कुठल्या मिटींगला. मी फक्त तुला दुसरी बाजू दाखवायचा प्रयत्न करतीये… (विचार करत) आणि मी काय म्हणते पुष्पा…
पुष्पाः काय गं काय?
स्वप्नाः तुला खरंच असं काहीतरी काम करायचं असेल ना, तर मी मदत करेन शोधायला. म्हणजे माझ्या कॉन्टॅक्ट्समधे विचारुन किंवा ऑनलाईन शोधून पण काहीतरी काम मिळू शकेल.
पुष्पाः ए खरंच तू मदत करशील मला?
स्वप्नाः नक्की करेन. ऐक्चुअली निशिकांतला सुद्धा सांगेन मी तुझ्यासाठी काम शोधायला. आणि अरुण भाऊजींशी सुद्धा बोलेल तो… कदाचित त्यांनी असा कधी विचारच केला नसेल. एकदा बोलून बघायला काय हरकत आहे?
पुष्पाः थँक्यू… थँक्यू सो मच, स्वप्ना… तू माझ्याबद्दल केवढा विचार केलास. आणि मी तुझ्याशी सारखी भांडत राहिले.
स्वप्नाः असू दे गं… मला पण आवडतं असं भांडायला. मी तरी आणि कुणाशी भांडणार आहे? (दोघी हसतात.) ए, पण तसली स्कीम-बिम नको हं परत शोधू दुसरी… “एकदा बघाल तर…”
दोघीः “…प्रेमात पडाल!”

(समाप्त)

प्रयोगासाठी पूर्वपरवानगी आवश्यक
© मंदार शिंदे
१९/०१/२०१८

Mobile: 9822401246



Share/Bookmark