ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Thursday, October 18, 2018

जिमला जाणारी स्त्री...

…लग्नाआधी, लग्न झाल्यावर काही काळ स्त्री स्वतःकडं दुर्लक्षच करते. तिचं मन तिच्या पुरुषावर या काळात सर्वस्वी केंद्रित झालेलं असतं. तिचं वेगळं अस्तित्व ती विसरलेलीच असते. आपण दिसतो कशा, बारीक होत आहोत की जाड होत आहोत, आपल्याला पाहून लोक काय म्हणतात याकडे तिचं लक्ष या काळात असत नाही. तिला स्वतःला ती जगातील सर्वांत सुंदर आणि भाग्यवान स्त्री वाटत असते, मग लोक काही म्हणोत. तिच्या दृष्टीनं तिच्या पुरुषाला ती आवडली की तिला पुरे असतं आणि कोणीही शहाणा पुरुष या काळात आपल्या स्त्रीविषयी तिच्याकडं खरं बोलत नसतो. ती जगातील सुंदर स्त्री असल्याचंच तो तिला अगदी शपथपूर्वक आणि प्रतिज्ञापूर्वक सांगतो आणि स्त्री हे खरं मानीत असते.

एकदा हा पहिला भर ओसरला की आधी पुरुषाला आणि मग स्त्रीला जाग येते. एक दिवशी जरा लक्षपूर्वक ती स्वतःकडं आरशात बघते आणि दचकते.

म्हणते, शीः, आपण अगदीच बऱ्या दिसत नाही. कशा आपल्या पुरुषाला आपण इतक्या आवडतो ? त्या अर्थी आंधळाच असला पाहिजे असं मनाशी गंमतीनं म्हणून ती बरं दिसण्याचा निश्चय करते. यासाठी स्त्रियांना सुचणारा पहिला उपाय : ब्युटी पार्लर. दुसरा : डाएटिंग आणि तिसरा : जिम जॉइन करणं.

जिममध्ये येणाऱ्या याहून वेगळ्या स्त्रिया, प्रसूत होऊन स्थूल झालेल्या. वजन तसं फार वाढलेलं नसलं तरी अशा स्त्रीला ते वाढलेलं दिसतं. पूर्वीच्या काळात अशी स्त्री अंगानं भरल्यानं अधिक आकर्षक मानली जात असे आणि कवी तिच्या उठून दिसणाऱ्या अवयवांवर उपमा अलंकारांची बरसात करीत. तिच्यावर शृंगारिक कविता रचीत. विशेषतः संस्कृत कवी. तो काळ फार जुना झाला. आता खुद्द स्त्रीलाच तिचं हे भरलेलं रूप कसं तरीच वाटतं. ते परत सडसडीत करण्याच्या निर्धारानं ती जिममध्ये पोचते.

काही स्त्रिया मूळच्याच वाढत्या अंगाच्या असतात. त्यांनी स्वतःच्या लठ्ठपणावर कितीही विनोद केले तरी त्यांचं लठ्ठ असणं त्यांना एकटेपणी त्रास देतं. आपण अशा का घडलो असं एकीकडं नशिबाला पुसत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यात स्वतःला लपवण्याच्या खटपटीत असतात. हे जमत नाही, वयाबरोबर आणि एखाद्या बाळंतपणानंतर अंग आणखीच सुटतं आणि डेस्परेट होऊन त्या जिमकडं धाव घेतात. एक खरं की, जिममध्ये येणारी स्त्री घाटदार होण्याच्या घाईत असते. तिला वाट पहाण्याला वेळ नसतो आणि झटपट रिझल्ट मिळावेत अशी तिची अपेक्षा असते. यासाठी वेगवेगळ्या अन्नाचा आणि सवयींचा त्याग करण्याला आणि जास्त फीदेखील देण्याला तिची ना नसते.

प्रश्न असा आहे की, असं झटपट घाटदार होता येतं का ? समजा, आलं. तरी तसं रहाता येतं का ?

नाही. तुमच्या दैनंदिन जगण्याचा आणि काळज्या चिंतांचा भाग यात तितकाच महत्त्वाचा असतो. त्या कमी होत नाहीत तोवर तुमचं वजनही फारसं कमी होणार नाही आणि हे या भगिनींना कळत नाही. त्यांना वाटतं, जिमचा सुपरव्हायजर आपल्याकडं द्यावं तसं लक्ष देत नाही म्हणून असं होतं.



- ‘मसाज’ (लेखकः विजय तेंडुलकर)


Share/Bookmark

Monday, October 15, 2018

वाचनध्यास २०१८




दि. १३ व १४ ऑक्टोबर, २०१८ रोजी पुस्तकांच्या गावात वाचन प्रेरणा दिनाच्या औचित्याने वाचनध्यास या उपक्रमाचे व पाऊसवेळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाचनध्यास या सलग वाचनाच्या उपक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातून ५० वाचकांनी सहभाग घेतला. भिलार गावातील ग्रामस्थांच्या आदरतिथ्याने व प्रकल्पातील विपुल ग्रंथसंपदेने मंत्रमुग्ध झाल्याची भावना वाचक सहभागींनी आपल्या अभिप्रायातून व्यक्त केली.
दि १४, ऑक्टोबर २०१८ च्या संध्येला वाचनध्यास उपक्रमाच्या समारोपाच्यावेळी ‘पाऊसवेळा’ हा कार्यक्रम पार पडला.
पाऊसाविषयीच्या अनेक कविता, गाणी, ललित रचना यांचे सादरीकरण या मैफीलीत डॉ. वंदना बोकील, अनुराधा जोशी, अपर्णा केळकर, अक्षय वाटवे, आशुतोष मुंगळे, मयुरेश जोशी व पिनाक आगटे या सहभागी कलाकारांनी केले. मराठीतल्या अनेक नामवंत साहित्यिकांच्या लेखणीतून झरलेल्या शब्दसरींमध्ये जमलेले प्रेक्षक न्हाऊन निघाले. या कार्यक्रमाला भिलार व आजूबाजूच्या गावातील अनेक रसिक प्रेक्षकांनी आवर्जून हजेरी लावली होती.


Share/Bookmark

Thursday, October 11, 2018

चिंगूस मुंगूसची गोष्ट

चला गोष्ट सांगूया...
😀😀😀😀😀😀

चिंगूस मुंगूसची गोष्ट
(लेखकः मंदार शिंदे ९८२२४०१२४६)

समुद्राच्या किनारी होतं एक गाव, गावामध्ये रहात होते एक तिकडमराव. तिकडमराव माणूस होता भलताच कंजूस, सगळे त्याला म्हणायचे ‘चिंगूस मुंगूस’. चिंगूस मुंगूसची बायको फारच बिचारी, कंजूषपणाला त्याच्या कंटाळली भारी. विकत आणलं नाही धान्य कणभर जरी, तिकडमराव म्हणायचे आज बनव श्रीखंड-पुरी. बायको म्हणायची, “ऑर्डर देत राहू नका उभे, किचनमध्ये येऊन बघा रिकामे सगळे डबे !” पैसे होतील खर्च जर गेलो दुकानात, तिकडमराव म्हणायचे मग “चालेल डाळभात !”

असे आपले चिंगूस मुंगूस लग्नात एकदा गेले, श्रीखंड-पुरी गुलाबजाम पोट भरून खाल्ले. पण लक्षात राहिली एकच गोष्ट पहिल्यांदाच खाल्ली, गोड-गोड मऊसूत खोबर्‍याची एक वडी. वडीची ती चव त्यांच्या तोंडामध्येच राहिली, आनंदानं नाचत त्यांनी घरची वाट धरली.

घरामध्ये शिरल्या-शिरल्या ऑर्डर त्यांनी सोडली, “बनवा बघू किलोभर मस्त खोबर्‍याची वडी.” बायको आली तरातरा किचनमधून चालत, कापडाची पिशवी मोठी हातात होती झुलत. पिशवी फेकून अंगावरती बायको ओरडली, “नारळ नाही घरामध्ये, साखरसुद्धा संपली.” पैसे होतील खर्च जर गेलो बाजारात, पण खोबर्‍याची वडीसुद्धा बसली होती मनात.

नाराजीनंच तिकडमराव बाजारात गेले, ‘नारळ-नारळ’ पुटपुटत रस्त्याने निघाले. घरापासून जवळच दिसला एक नारळवाला, लांबूनच विचारलं “एक नारळ केवढ्याला ?” नारळवाल्याला ठाऊक होती चिंगूस मुंगूसची कटकट, ‘पाच रुपये’ सांगून टाकले डिस्काउंटमध्ये झटपट.

“बापरे ! पाच रुपये ? नारळ एवढा महाग ?” नारळवाल्याने ऐकून लावला डोक्यालाच हात. म्हणाला “तिकडमराव, एक काम करा. इथून दहा किलोमीटर प्रवास तुम्ही करा. तिकडं मिळेल तुम्हाला नारळाची मोठ्ठी बाग, तिथले नारळ नक्कीच नाहीत इथल्याएवढे महाग !”

नारळ स्वस्त मिळवण्याची आयडीया त्यांना आवडली, दहा किलोमीटर चालत चालत कंजूष स्वारी निघाली. खूप वेळ चालल्यावर दिसली नारळाची मोठ्ठी बाग, “एक नारळ मिळेल काय ?” बाहेरून त्यांनी दिली हाक. बागेचा मालक चढला झाडावरती झटपट, त्यालासुद्धा ठाऊक होती चिंगूस मुंगूसची कटकट. ‘तीन रुपये’ नारळाचे झाडावरूनच सांगितले, याच्यापेक्षा स्वस्त नसते त्यालासुद्धा परवडले.

“बापरे ! तीन रुपये ? नारळ एवढा महाग ?” बागमालकाने ऐकून लावला डोक्यालाच हात. म्हणाला “तिकडमराव, एक काम करा. अजून दहा किलोमीटर प्रवास तुम्ही करा. तिकडं मिळेल तुम्हाला याहून मोठ्ठी बाग, तिथले नारळ नक्कीच नाहीत माझ्याएवढे महाग !”

नारळ अजून स्वस्त मिळणार - केवढी भारी गोष्ट, त्यासाठी करु म्हणाले चालायचे थोडे कष्ट. दहा किलोमीटर चालून चालून तिकडमराव थकले, खोबर्‍याची वडी आठवून पुन्हा पळत सुटले. शेवटी एकदा दिसली त्यांना नारळाची ती मोठ्ठी बाग, “एक नारळ केवढ्याला ?” बाहेरूनच दिली हाक. त्या बागेचा मालक बसला झाडामागं लपून, चिंगूस मुंगूसची कटकट आली माझ्याकडं कुठून ? ‘एक रुपया’ नारळाचा भाव सांगून टाकला, मालक कुठं दिसेना, आवाज फक्त ऐकला.

“बापरे ! एक रुपया ? नारळ एवढा महाग ?” बागेचा मालक खालीच बसला डोक्याला लावून हात. म्हणाला, “तिकडमराव, एक काम करा. अजून दहा किलोमीटर प्रवास तुम्ही करा. इथून दहा किलोमीटरवर भेट होईल समुद्राशी, समुद्राच्या किनारी दिसतील झाडंच झाडं नारळाची. किनार्‍यावरच्या झाडांचा कुणीच नाही मालक, वाट्टेल तेवढे नारळ तिथं मिळतील तुम्हाला फुकट !”

फुकट ! फुकट !! फुकट !!!

‘फुकट’ हा तर चिंगूस मुंगूसचा शब्द होता आवडता, हजार किलोमीटर चालून जाईल फुक्कट काही मिळवायला. चालून चालून दमले तरी पाय निघाले पुन्हा पुढे, नारळ-नारळ जप करत तिकडमराव समुद्राकडे. दहा किलोमीटर चालून जायला झाली त्यांना संध्याकाळ, पण किनार्‍यावर दिसली शेवटी नारळाच्या झाडांची माळ. वाकडे तिकडे आडवे सरळ, एका-एका झाडाला शंभर नारळ. या नारळांचा मालक कोण, किती नेले मोजणार कोण !

फुकट नारळ काढण्यासाठी, सरसर झाडावर चढली स्वारी. नारळ शोधून चांगला मोठ्ठा, चिंगूस मुंगूसनं मारला डल्ला. दोन्ही हातांनी नारळ धरून, खेचला सगळी शक्ती लावून.

पण तेवढ्यात काय झालं माहितीय ?

तिकडून आली वार्‍याची झुळुक, नारळाची झाडं हलली सुळुक-सुळुक. वारा वाहू लागला मग गोल-गोल, तिकडमरावांचा सुटला की तोल. पायांची पकड सुटली रे सुटली, नारळ पकडून स्वारी लटकली. हातांनी ठेवला नारळ धरून, झटकले पाय नि ओरडले खच्चून. “वाचवा ! वाचवा !! मेलो रे मेलो !!! कुठून बुद्धी सुचली अन् झाडावर चढलो !” आरडाओरडा त्यांचा तिथं ऐकणार होतं कोण, समुद्राच्या किनारी राहतंय तरी कोण !

पण काम संपवून तेवढ्यात कुठून तरी, हत्तीवाला माहूत एक चालला होता घरी. किनार्‍यावरुन आला त्याला आवाज ऐकू, माहूत म्हणाला ‘चला, जवळ जाऊन बघू’. जवळ जाऊन दिसलं त्याला झाड झुलणारं, झाडावर होतं एक माणूस लटकणारं. कोण लटकलंय बघून तो पळत सुटला झटपट, त्यालासुद्धा ठाऊक होती चिंगूस मुंगूसची कटकट.

“माहूत दादा, वाचवा मला, उपकार होतील फार… वाचलो तर मी घरी येऊन तुमचा करील सत्कार !”

माहूत बोलला हत्तीवरुन, “सत्काराचं करू काय ? पाचशे रुपये घेईन मी, सांगा तुम्ही देणार काय ?”

चिंगूस मुंगूस कित्ती कंजूष, पैसे कुठून द्यायला; जीव झाडावर टांगून घेतला पाच रुपये वाचवायला. पण आता काही खरं नाही, त्यांना कळून चुकलं; जिवंत राहण्यासाठी त्यांनी माहुताचं ऐकलं.

माहूत झाला खूष पाचशे रुपयांसाठी, मदतीसाठी झाडाजवळ त्यानं नेला हत्ती. हत्तीच्या पाठीवर राहिला माहूत उभा, म्हणाला “मी पाय धरतो, मग तुम्ही हात सोडा !” तिकडमरावांचे त्यानं घट्ट धरले पाय, हत्तीला कळेना नक्की चाललंय तरी काय ? घाबरून बिचारा सुटला पळत, माहुताला सोडला वरतीच लटकत.

माहुतानं ठेवले त्यांचे पाय घट्ट धरून, घाबराघुबरा होऊन तो ओरडला खच्चून. “वाचवा ! वाचवा !! मेलो रे मेलो !!! कुठून बुद्धी सुचली अन् मदतीला धावलो !” आरडाओरडा त्याचा तिथं ऐकणार होतं कोण, समुद्राच्या किनारी राहतंय तरी कोण !

पण काम संपवून तेवढ्यात कुठून तरी, घोडेस्वार मजेत एक चालला होता घरी. किनार्‍यावरुन आला त्याला आवाज ऐकू, घोडेस्वार म्हणाला ‘चला, जवळ जाऊन बघू’. जवळ जाऊन दिसलं त्याला झाड झुलणारं, झाडावर होतं डब्बल माणूस लटकणारं. कोण लटकलंय बघून तो पळत सुटला झटपट, नको म्हणाला आपल्यामागं चिंगूस मुंगूसची कटकट.

“घोडेवाले दादा, वाचवा आम्हाला, उपकार होतील फार… वाचलो तर मी घरी येऊन तुमचा करील सत्कार !”

घोडेस्वार बोलला, “मी सत्काराचं करू काय ? हजार रुपये घेईन मी, सांगा तुम्ही देणार काय ?”

चिंगूस मुंगूस कित्ती कंजूष, पैसे कुठून द्यायला; जीव झाडावर टांगून घेतला पाच रुपये वाचवायला. पण आता काही खरं नाही, त्यांना कळून चुकलं; जिवंत राहण्यासाठी त्यांनी घोडेस्वाराचं ऐकलं.

घोडेस्वार झाला खूष हजार रुपयांसाठी, झाडाजवळ घोडा घेऊन गेला मदतीसाठी. घोड्याच्या पाठीवर राहिला घोडेस्वार उभा, म्हणाला “मी पाय धरतो, मग तुम्ही हात सोडा !” लटकणार्‍या माहुताचे घट्ट धरले पाय, घोड्याला पण कळेना नक्की चाललंय तरी काय ? घाबरून बिचारा सुटला पळत, घोडेस्वाराला सोडला वरतीच लटकत.

कोणालाच कळेना असे कसे झाले, एक नाही दोन नाही लटकले तिघे. नारळाच्या शेंडीला झाला तिघांचा भार, घोडेस्वार आणि माहुतावर पडले तिकडमराव. जमिनीवर पडून त्यांची मोडली हाडं आधी, वरून नारळ पडून फुटली तिघांची पण डोकी.

खोबर्‍याच्या त्या वडीसाठी रामायण हे घडलं, चिंगूस मुंगूसचं कंजूषपण फारच महागात पडलं. शेवटी एका नारळाचे पाच रुपये वाचले, दवाखान्यात लाखो मात्र खर्च की हो झाले !!

(सुधा मूर्ती यांच्या मूळ इंग्रजी कथेवर आधारित…)


Share/Bookmark

Saturday, October 6, 2018

Storytelling 06102018


Everyone loves a story, because everyone lives a story !
#storytelling


Share/Bookmark

Tuesday, October 2, 2018

पाणी कसं अस्तं...

पाणी कसं अस्तं
- दिनकर मनवर
(दृश्य नसलेल्या दृश्यात)
पाणी हा शब्द
मला कसाही उच्चारण्याची मुभा नाहीये
मी ऐकू शकत नाही पाण्याचा आवाज
की चालून जाऊ शकत नाही पाण्याच्या पायरीवरून

पाणी कसं अस्तं आकाशासारखं निळंशार
किंवा अंगठा छाटल्यावर उडालेल्या
रक्ताच्या चिळकांडीसारखं लालसर
पाणी कसं अस्तं स्वच्छ पातळ की निर्मळ ?

काळं असावं पाणी कदाचित
पाथरवटानं फोडलेल्या फाडीसारखं राकट काळं
किंवा आदिवासी पोरीच्या स्तनांसारखं जांभळं
किंवा पाणी हिरवं नसेल कशावरून ?
(पाणी कसं अस्तं हे मला अजूनही कळू दिलेलं नाहीये)

जे तुंबवून ठेवलेलं अस्तं तळ्यात ते पाणी अस्तं ?
पोह-यानं पाणी उपसून घेतलं तर विहिरीतलं पाणी विटतं ?
पाणी धारदार वाहतं झुळझुळतं मंजुळ गाणं गातं ते पाणी अस्तं ?
गढूळ, सडकं, दूषित, शेवाळलेलं, गटारीतलं, मोरीतलं
या पाण्यावरचे निर्बंध अजूनही उठविले गेले नाहीत काय ?
पाणी ढगातून बरसतं तेच फक्त पाणी अस्तं ?
नि दंगली घडवतं ते पाणी नस्तं ?

पाणी पावसातून गळतं जमिनीवर
बर्फ वितळल्यावर पसरतं पठारांवर
नदीला पूर आल्यावर वेढून घेतं गावं
धरण फुटल्यावर पांगापांग करतं माणसांची
ते पण पाणी पाणीच अस्तं ?

पाणी स्पृश्य अस्तं की अस्पृश्य ?
पाणी अगोदर जन्माला आलं की ब्रह्म ?
पाणी ब्राह्मण अस्तं की क्षत्रिय की वैश्य
पाणी शूद्र अस्तं की अतिशूद्र
पाणी निव्वळ पाणीच असू शकत नाही का
या वर्तमानात ?

आणि पाणी वरचं खालचं झालं केव्हापास्नं
की कुणाच्या हात लावण्यानं ते कसं काय बाटतं ?
पाणी नदीतलं, नाल्यातलं, ओढ्यातलं, विहिरीतलं
पाणी तळ्यातलं, धरणातलं, सरोवरातलं, समुद्रातलं
पाणी ढगातलं, माठातलं, पेल्यातलं, डोळ्यांतलं
हे पाणी कुणाच्या मालकीचं अस्तं ?

पाणी नारळात येतं
छातीच्या बरगड्यात साचतं
फुफ्फुसातून पू होऊन स्रवतं
पोटात पाण्याचा गोळा होऊन राहतं
ईश्वराचा कोणता देवदूत हे पाणी न चुकता सोडत अस्तो ?

पाणी पारा अस्तं की कापूर ?
जे चिमटीत पकडता येत नाही
नि घरंगळून जात राहतं सारखं
किंवा कापरासारखं जळून जातं झर्कऽऽन

पाणी हा शब्द फक्त एकदाच मला उच्चारू द्या
निव्वळ पाण्यासारखाच 


Share/Bookmark

अंधार...

अंधार...
(लेखकः मंदार शिंदे ९८२२४०१२४६)

====०====
थंड होत चाललेल्या कॉफीच्या कपात
साखरेची तिसरी पुडी फोडून ओतताना
मी पुन्हा हसलो…

तू पुन्हा विचारलंस, ‘का हसलास ?’

कसं सांगू तुला ? आणि काय सांगू ?

एअर कन्डीशन्ड कॉफी शॉपच्या
काचेच्या भिंती आणि दारातून
जाणवत होतं भगभगतं ऊन.

मी क्षणभर पाहिलं बाहेर अन्‌
गपकन्‌ घेतले डोळे मिटून.

तू निघालीस चटकन्‌ उठून
तुझी गर्द निळी-जांभळी ओढणी सांभाळीत.

मी थांबवायच्या आत तू गेली होतीस
उन्हाच्या झळांच्या पायर्‍या करून
भगभगत्या सूर्यप्रकाशाच्या दिशेनं.

डोळ्यांना खुपणारा तो सूर्यप्रकाश सहन करीत
मी बघत राहिलो तुझी लगबग.

वर वर, अगदी ढगात, सूर्याच्या जवळ
तू जात राहिलीस तुझी ठाम पावलं टाकीत.

एकदाच मागं वळून पाहिलंस माझ्याकडं,
एक क्षणभरच थांबलीस, हसलीस…

आणि मग उलगडत गेलीस
तुझी ती गर्द निळी-जांभळी ओढणी,
आणि अंथरलीस त्या भगभगत्या आकाशावर.

तुझ्या केसांमधल्या त्रिकोणी-चौकोनी क्लिप्सनी
डकवून टाकलास तो निळा-जांभळा पडदा.

मी सुखावल्या डोळ्यांनी बघत राहिलो
एका रुक्ष दिवसाची मनोहर रात्र होताना.

परत येण्याआधी तू पुन्हा एकदा
हात फिरवलास त्या पडद्यावर,
आणि मी माझ्या या डोळ्यांनी पाहिली
त्या त्रिकोणी-चौकोनी चांदण्यांची थरथर.

तू येऊन बसलीस समोरच्या खुर्चीत,
जणू काही घडलंच नाही अशा थाटात.

मी मात्र बघत राहिलो आकाशात
लुकलुकणार्‍या तुझ्या टिकलीच्या चंद्राकडे…

पुडीतली साखर कपात ओतताना
मी पुन्हा हसलो…

तू पुन्हा विचारलंस, ‘का हसलास ?’

कसं सांगू तुला ? आणि काय सांगू ?

शेवटी तूच म्हणालीस मोकळ्या केसांतून हात फिरवीत,
‘आज अंधार फार लवकर झाला, नाही का?’

- अक्षर्मन


Share/Bookmark