ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Friday, April 26, 2019

ल्युसी

ल्युसी
- मंदार शिंदे 9822401246

माणूस आपल्या मेंदूचा किती वापर करतो याबद्दल खूप संशोधन झालंय, अजूनही, होतंय. असं म्हणतात की, मानवी मेंदूच्या जास्तीत जास्त दहा टक्क्यांपेक्षा जास्त क्षमतेचा अजूनपर्यंत वापरच झालेला नाही. जर दहा टक्के क्षमता वापरुन माणसानं कॉम्प्युटर, रोबो, विमानं, सॅटेलाईट, अणुबॉम्ब, आणि काय काय बनवलं असेल, तर पन्नास-साठ-सत्तर टक्के क्षमतेनं अजून काय-काय करु शकेल ?!?
याच विषयावर २०१४ साली आलेला एक सिनेमा म्हणजे ‘ल्युसी’.
तैवान देशातल्या तैपेई शहरात शिक्षणासाठी येऊन राहिलेल्या, पंचवीस वर्षांच्या एका अमेरिकन तरुणीची, ल्युसीची ही गोष्ट. ल्युसीचा नवीन बॉयफ्रेन्ड आहे रिचर्ड. रिचर्ड काम करतो जॅन्ग नावाच्या एका कोरियन डॉन आणि ड्रग माफियासाठी. या रिचर्डमुळं ल्युसीला काहीही कल्पना नसताना एक ‘ड्रग म्यूल’ बनावं लागतं. (ड्रग म्यूल म्हणजे अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी आपल्या शरीराचा वापर करणारे / करु देणारे लोक.)
होतं असं की, रिचर्ड ल्युसीला एक छोटंसं काम सांगतो. काम एवढंच की, काही कागदपत्रांची एक ब्रीफकेस जॅन्गकडं नेऊन द्यायची असते. अर्थातच, रिचर्ड ल्युसीशी खोटं बोलतो. प्रत्यक्षात त्या ब्रीफकेसमध्ये असतात अतिशय किंमती सिन्थेटीक ड्रग ‘सीपीएच-फोर’ची चार पाकिटं. ब्रीफकेस पोहोचवताना झालेल्या गडबडीत जॅन्गचे लोक रिचर्डचा गोळ्या घालून खून करतात आणि ल्युसीला पकडून नेतात.
ल्युसीनं जॅन्गला देण्यासाठी आणलेली सीपीएच-फोरची चारही पाकिटं युरोपात पोहोचवायची असतात. त्यासाठी तीन माणसांचं पोट फाडून, प्रत्येकी एक पाकीट त्यांच्या पोटातल्या पोकळीत लपवलं जातं. ल्युसी आयतीच त्यांच्या तावडीत सापडलेली असते. एक तर अमेरिकन, त्यातून स्टुडंट. युरोपात ड्रग्ज वाहून न्यायला परफेक्ट ‘कॅरीयर’ !! तिच्याकडं बघून कुणाला शंकासुद्धा येणार नाही. मग तिचं पोट फाडून चौथं पाकीट तिच्या पोटात लपवलं जातं.
माफियांच्या कैदेत असताना झालेल्या झटापटीत, एक गुंड ल्युसीच्या पोटात लाथ घालतो. तिच्या पोटात लपवलेलं ड्रग्जचं पाकीट त्यामुळं फुटतं आणि मोठ्या प्रमाणावर ते ड्रग तिच्या शरीरात पसरु लागतं.
ल्युसीच्या शरीरात पसरणाऱ्या सीपीएच-फोरचा तिच्यावर काय परिणाम होतो माहितीये ? तिच्या शरीरात काही बिघाड होण्याऐवजी तिला विलक्षण शारीरिक आणि मानसिक शक्ती प्राप्त होतात. (आपल्या हिंदी-मराठी सिनेमात एखादा बॉम्बस्फोट होऊन हिरोचा सुपरहिरो होतो, आणि फक्त लाल रंगाचं फूल किंवा रुमाल त्याची शक्ती नाहीशी करु शकतो, वगैरे, असंच काहीतरी असावं बहुतेक…)
तिला प्राप्त झालेल्या शक्ती म्हणजे - टेलिपॅथी (म्हणजे कुठल्याही भौतिक साधनांशिवाय थेट दुसऱ्या व्यक्तीच्या मनाशी संवाद साधणं - मन की मन से बात!); टेलिकिनेसिस (म्हणजे हात न लावता नुसत्या इच्छाशक्तीनं प्रत्यक्ष वस्तू हलवणं); मनातल्या मनात भूतकाळ किंवा भविष्यकाळात प्रवास करणं (म्हणजे ज्याला मराठीत ‘टाईम ट्रॅव्हल’ म्हणतात तेच); आणि कुठल्याही प्रकारच्या वेदनेची जाणीवच न होणं (म्हणजे, ल्युसी को दर्द नही होता, हाईंग !!).
या शक्ती प्राप्त होत असताना ल्युसीचं व्यक्तिमत्त्वसुद्धा अंतर्बाह्य बदलून जातं. आता ती एक निर्दयी आणि भावनारहीत व्यक्ती (?) बनलेली असते. तिला मिळालेल्या अचाट शक्तींचा वापर करुन ती, तिला डांबून ठेवणाऱ्या गुंडांना मारुन टाकते आणि त्यांच्या कैदेतून पळून जाते.
सगळ्यात आधी ल्युसी जवळचं हॉस्पिटल शोधून काढते आणि तिच्या पोटात लपवलेलं ड्रग्जचं पाकीट काढून टाकण्यासाठी ऑपरेशन करुन घेते. तिथल्या डॉक्टरांना तिच्या पोटातून ते पाकीट काढून टाकण्यात यश येतं. ऑपरेशन करणारे डॉक्टर ल्युसीला सीपीएच-फोर बद्दल आणखी माहिती देतात.
प्रत्येक गरोदर स्त्री नैसर्गिकरीत्या गरोदरपणाच्या सहाव्या आठवड्यात सीपीएच-फोर नावाचा पदार्थ निर्माण करते, पण अगदीच सूक्ष्म प्रमाणात. पोटातल्या गर्भाच्या वाढीसाठी आवश्यक ऊर्जा पुरवण्याचं काम हा पदार्थ करतो. मोठ्या प्रमाणावर हा पदार्थ शरीरात पसरला तर ती व्यक्ती वाचणं शक्य नसतं. त्यामुळं ल्युसीचं जिवंत राहणं डॉक्टरांच्या मते चमत्काराहून कमी नसतं.
आपल्या वाढत चाललेल्या शारीरिक आणि मानसिक क्षमतांचा उपयोग लोककल्याणासाठी करण्याची इच्छा ल्युसीमध्ये जागृत होते. तिच्यासोबत ज्यांची पोटं फाडून सीपीएच-फोरची पाकीटं लपवण्यात आली होती, त्या इतर तिघांचा शोध लावायचं ती ठरवते. त्यासाठी ती पुन्हा जॅन्गच्या हॉटेलमध्ये जाते. यावेळी जॅन्गच्या बॉडीगार्डना धडाधड मारुन टाकत, ती थेट जॅन्गपुढं जाऊन पोहोचते आणि टेलिपॅथीच्या माध्यमातून जॅन्गऐवजी त्याच्या मनाशी संवाद साधते. त्याच्या मनातून त्या तीन ड्रग म्यूल्सची ठिकाणं ती माहिती करुन घेते. (मला काय वाटतं, पोलिसांकडं अशी ताकद आली तर गुन्ह्यांचा तपास केवढा सोपा होईल ना ? लपवलेली शस्त्रं, लपवून ठेवलेला चोरीचा माल, फरार सहकारी, अशा सगळ्यांची माहिती डायरेक्ट आरोपीच्या मनातून पोलिसांच्या मनात. मग पोलिस कस्टडी नको की थर्ड डिग्री नको. टायरमध्ये घालणं नको की बर्फाच्या लादीवर झोपवणं नको. अहिंसा परमो धर्मः !!)
आता पुढची योजना आखण्यासाठी ल्युसी एका मैत्रिणीच्या घरी येते. आपल्याला नक्की काय झालंय आणि आपलं यापुढं नक्की काय होणार आहे, हे समजून घेण्याचा ती प्रयत्न करते. इंटरनेटवर याबद्दल खूप सारी माहिती शोधते आणि वाचून टाकते. त्या माहितीमध्ये तिला जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि प्रोफेसर सॅम्युएल नॉर्मन यांच्याबद्दल कळतं. प्रोफेसर नॉर्मन याच विषयाचा अनेक वर्षं अभ्यास करतायत, असं समजल्यावर ती त्यांची सगळी भाषणं, लेख, रिसर्च पेपर, वगैरे वाचून टाकते. (जगात केवढं ज्ञान आहे आणि आपल्याकडं किती थोडासाच वेळ आहे, असं वाटणाऱ्या माझ्यासारख्या लोकांना ही शक्ती मिळवायला फारच आवडेल…)
तर, प्रोफेसर नॉर्मन यांच्या आयुष्यभराच्या मेहनतीचा काही मिनिटांत फडशा पाडून, ल्युसी त्यांना डायरेक्ट फोन लावते. तिच्या वाढत जाणाऱ्या क्षमतांबद्दल, मेंदूच्या वाढत्या वापराबद्दल ती त्यांना सांगते. आधी प्रोफेसर नॉर्मनचा तिच्यावर विश्वास बसत नाही, त्यांना वाटतं कुणीतरी त्यांची चेष्टा करतंय. पण ल्युसी आपल्या अचाट शक्तींचा वापर करुन, त्यांना काही जादूचे प्रयोग करुन दाखवते, ज्यामुळं ते अचंबित होतात आणि ल्युसीच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात.
एकूण क्षमतेच्या दहा टक्के मेंदूचा वापर करुन माणूस काय करु शकतो, वीस टक्के वापरता आली तर काय करु शकेल, तीस टक्क्याला तो कुठं पोहोचेल, आणि चाळीस-पन्नास-सत्तर टक्के क्षमता वापरता आली तर काय-काय घडू शकेल, या सगळ्याचे अंदाज बांधणारं प्रेझेंटेशन प्रोफेसर नॉर्मननी जगासमोर केलेलं असतं. पण ही केवळ कल्पना आहे, असं घडू शकणार नाही, असंही त्यांचं मत असतं. ल्युसी त्यांना फोनवर सांगते की, त्यांचे अंदाज बरोबर आहेत, कारण ती मेंदूच्या क्षमतेचे हे टप्पे पार करत चाललेली आहे आणि नॉर्मनच्या भाकीतानुसार शक्ती तिला प्राप्त होत चाललेल्या आहेत. नॉर्मनसाठी हे एकाच वेळी समाधानकारक आणि भीतीदायकसुद्धा असतं. (आपले अंदाज खरे ठरले याचं समाधान, पण ते खरे ठरल्यावर काय भयानक परिस्थिती ओढवेल याचं ज्ञान असल्यानं भीतीसुद्धा !)
प्रोफेसर नॉर्मनशी बोलून झाल्यावर ल्युसीच्या मनात बऱ्याच गोष्टींबाबत स्पष्टता येते. ती आता जॅन्गच्या मनातून काढलेल्या माहितीनुसार सीपीएच-फोरची बाकी तीन पाकिटं मिळवायला पॅरीसला जाते. पॅरीसच्या वाटेवर असताना ती पेरी देल रिओ नावाच्या एका फ्रेंच पोलिस अधिकाऱ्याशी संपर्क साधते आणि ड्रग्जची पाकिटं शोधण्यात मदत करायची विनंती करते.
विमान प्रवासादरम्यान ल्युसी शॅम्पेनचा एक घोट घेते, ज्यामुळं तिच्या पेशींची रचना अस्थिर होऊन, तिच्या शरीराचं विघटन व्हायला लागतं. तिचं शरीर आता पेशींचं पुनर्निमाण करु शकणार नाही आणि शरीराचं विघटन थांबवण्यासाठी तिला आणखी सीपीएच-फोरचा डोस घ्यायला लागणार, हे तिच्या लक्षात येतं.
पॅरीसमध्ये पोहोचल्यावर ल्युसी पोलिस ऑफीसर देल रिओच्या मदतीनं ड्रग्जची पाकिटं शोधून काढते. सशस्त्र पोलिसांना आणि कोरियन ड्रग टोळीतल्या गुंडांना ती आपल्या शक्ती वापरुन निष्प्रभ करुन टाकते. सीपीएच-फोर हातात आल्यावर ती गडबडीनं प्रोफेसर नॉर्मन यांना भेटायला धावते.
ल्युसीच्या बाबतीत घडत असलेल्या गोष्टी, आधी कुणाच्याही बाबतीत घडलेल्या नसतात. त्यामुळं, तिचं पुढं काय होणार किंवा तिनं आता काय करावं, याबद्दल ठोस काहीच सांगता येणार नाही, फक्त अंदाज व्यक्त करता येईल, असं प्रोफेसर नॉर्मन सांगतात. ते ल्युसीला म्हणतात, “हे बघ… तू आयुष्याचा अगदी मुळापासून विचार केलास तर - म्हणजे, अगदी सुरुवातीला, एका पेशीचं विभाजन होऊन दोन पेशी तयार होण्याची प्रक्रिया, तिथपासून बघितलं तर - आयुष्याचा एकमेव उद्देश म्हणजे आपल्याला मिळालेलं ज्ञान पुढे देत राहणं. यापेक्षा उच्च उदात्त असा दुसरा कुठलाही उद्देश नव्हता, नसेल. त्यामुळं, तुला प्राप्त होत असलेल्या ह्या एवढ्या सगळ्या ज्ञानाचं काय करायचं, असं जर तू मला विचारत असशील, तर मी म्हणेन… पुढे देत रहा.” (जे जे आपणांसि ठावे । ते ते इतरांसि सांगावे । शहाणे करोनि सोडावे । सकळजन ॥ असं समर्थ रामदासांनी उगीच म्हटलंय का ?)
आपल्याला जे काही ज्ञान प्राप्त होईल ते सगळं, प्रोफेसर नॉर्मन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीनं जगाला देऊन टाकण्यासाठी ल्युसी तयार होते.
इकडं प्रोफेसर नॉर्मन आणि ल्युसी जगाच्या उद्धारासाठी मोठमोठ्या योजना बनवत असताना, ह्याच जगातला एक करंटा डॉन जॅन्ग ते ड्रग्ज मिळवण्यासाठी आपली टोळी घेऊन येतो आणि फ्रेंच पोलिसांसोबत गोळीबार-गोळीबार खेळतो. (जॅन्ग्या लेका, कुठं फेडशील ही पापं ??)
आता प्रोफेसर नॉर्मनच्या प्रयोगशाळेत ल्युसी काळ आणि आयुष्य या विषयांवर शास्त्रज्ञांना मार्गदर्शन करत असते. तिच्या सांगण्यानुसार, मानवी जीवनाचं आणि मानवाच्या अस्तित्त्वाचं खरं मोजमाप फक्त वेळेच्या स्वरुपातच होऊ शकतं. वेळेचा संदर्भ काढून टाकला, तर आपलं अस्तित्त्वच नष्ट होतं. सर्व गोष्टी विशिष्ट काळापुरत्याच अस्तित्त्वात असतात, आणि त्या विशिष्ट काळाच्या आधी किंवा नंतर त्या आपल्याला दिसू शकत नाहीत, कारण तेव्हा त्या अस्तित्त्वात नसतात. त्यामुळं, आपल्या अस्तित्त्वाचं खरं मोजमाप वेळेव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही परिमाणात होऊ शकत नाही. (हे परत परत तेच लिहिलंय की काय, असं वाटू शकेल. पण इलाज नाही… कारण, ते समजायला जेवढं अवघड आहे, त्यापेक्षा समजावून सांगायला जास्त अवघड आहे. असो.)
ल्युसीच्या सांगण्यावरुन, त्या शिल्लक राहिलेल्या तीन पाकिटांमधलं सीपीएच-फोर तिच्या शरीरात भसाभस घुसवलं जातं. तिच्या शरीराचा आकार आता बदलायला लागतो आणि तिचं शरीर एका विचित्र काळ्या रंगाच्या वायरचं रुप घेते. अशा अनेक वायर्स, सापांसारख्या सळसळत सुटतात आणि त्या प्रयोगशाळेतल्या कॉम्प्युटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर आपोआप गुंडाळल्या जातात. या सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं एकत्रित दळण घालून, ल्युसी एक नवीनच वस्तू तयार करते - सध्याच्या कॉम्प्युटर्सपेक्षा अगदी वेगळा असा पुढच्या पिढीतला एक ‘सुपर कॉम्प्युटर’ ! एक असा सुपर कॉम्प्युटर, ज्यामध्ये ल्युसीला प्राप्त झालेलं विश्वभरातलं ज्ञान साठवलेलं असेल.
पूर्वी आयुष्यभर कष्ट करुन, घरं, व्यवसाय, इमारती, वगैरे बांधून झाल्यावर लोक म्हातारपणी तीर्थयात्रेला जायचे. आपला सुपर कॉम्प्युटर बांधून झाल्यावर ल्युसी काळ-यात्रेला जायला निघते… स्पेस-टाईम जर्नी ! मानवजातीची आत्तापर्यंत माहिती असलेली सर्वांत जुनी पूर्वज, जिचं नावसुद्धा ल्युसीच ठेवलेलं आहे, तिच्यापर्यंत (म्हणजे काही हजार कोटी वर्षं) भूतकाळात जाऊन पोहोचते. मग काळाच्या सुरुवातीला, म्हणजे बिग-बॅन्गपर्यंत जाते, डायनासोर आणि उत्क्रांतीच्या वाटेवरच्या बाकीच्या सगळ्या प्राण्यांची भेट घेत येते.
हे असलं ब्रह्मांडाला कवेत घेणारं काहीतरी ‘न भूतो न भविष्यति’ प्रकरण सुरु असताना, तो करंटा कोरियन जॅन्ग नेमका मधेच कडमडतो. प्रोफेसर नॉर्मनच्या प्रयोगशाळेचं दार तोडून उघडण्यासाठी त्याला चक्क रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र वापरायला लागलेलं असतं. (बहुतेक असं बजेट वाढत गेल्यामुळंच तो जास्त वैतागला असावा…) जॅन्ग थेट ल्युसीच्या डोक्याला बंदूक लावतो. ती बिचारी काळ-प्रवासात कुठल्या कुठं जाऊन पोहोचलेली असते आणि हा तिच्या मर्त्य शरीरावर बंदूक रोखून उभा असतो. मानवी जीवनाचा उद्देश ‘देण्या’वरुन ‘घेण्या’कडं सरकला, की ही अशी विध्वंसक माणसं तयार होत असावीत. आपण दुसऱ्यांसोबत स्वतःचासुद्धा नाश करतोय, हेसुद्धा त्यांना कळत नसतं.
सीपीएच-फोरच्या भरमसाठ डोसामुळं ल्युसीच्या मेंदू वापराची क्षमता झपाट्यानं वाढत असते. जॅन्ग बंदुकीतून गोळी झाडतो खरी, पण ती गोळी ल्युसीपर्यंत पोहोचण्याआधीच, ल्युसी शंभर टक्के क्षमता साध्य करते आणि बुम्‌… क्षणात तिथून अदृश्य होते. एकदम गायब !! तिचे कपडे आणि तो काळा सुपर कॉम्प्युटर फक्त शिल्लक राहतात.
पोलिस भारतातले असोत की फ्रान्सचे, सगळं महत्त्वाचं घडून गेल्यावरच पोहोचतात. देल रिओ असाच (नियमानुसार) उशीरा पोहोचतो. बाहेर गोळीबार-गोळीबार खेळ अर्धवट सोडून आत घुसलेला जॅन्ग त्याला दिसतो. अखिल मानवजातीच्या वतीनं तो जॅन्गवर गोळ्यांचा वर्षाव करुन त्याच्या दुष्कृत्यांचा बदला घेतो. तिकडं आपला काळा सुपर कॉम्प्युटर आपलं सगळं ज्ञान एका अद्ययावत काळ्याच रंगाच्या पेन ड्राईव्हमध्ये ट्रान्सफर करतो. तो ब्रह्मांडाचं ज्ञान साठवलेला पेन ड्राईव्ह विश्वकल्याणासाठी प्रोफेसर नॉर्मनच्या हवाली करतो आणि आपलं अल्प मुदतीचं अवतार कार्य संपवून, आहे त्या जागेवर विसर्जित होतो.
उशीरा पोहोचलेला पोलिस ऑफीसर देल रिओ प्रोफेसर नॉर्मनकडं चौकशी करतो - “ल्युसी कुठं आहे?” त्याच वेळी त्याच्या फोनवर टेक्स्ट मेसेज येतोः “मी सगळीकडे आहे.”
ल्युसी शेवटी सगळ्यांना सांगते, “आपल्याला करोडो वर्षांपूर्वी हे आयुष्य मिळालं. त्याचं करायचं काय हे आता तुम्हाला माहिती झालंय…”
मानवी मेंदूच्या क्षमतेपैकी दहा टक्क्यांच्या आत वापर करुन माणसानं जे काही साध्य केलंय, ते बघता, दहा टक्क्यांच्या पुढं गेल्यास तो काय करु शकेल, याबद्दल कुतूहल आणि भीती दोन्ही वाटते. प्रोफेसर नॉर्मन म्हणतात तसं, “माणसाला आपल्या स्वतःच्या असण्यापेक्षा (अस्तित्वापेक्षा) आपल्याकडं काय आहे (मालकीच्या वस्तू) याचीच जास्त काळजी लागून राहिलेली असते.” (मूळ वाक्यः We humans are more concerned with having than with being.) या देण्या-घेण्याच्या प्रवृत्तीवरच माणसाचं ‘असणं’ ठरणार आहे, हे मात्र नक्की !

‘ल्युसी’ (२०१४)
लेखक-दिग्दर्शकः ल्युक बेसाँ
ल्युसीः स्कार्लेट जोहॅन्सन
प्रोफेसर नॉर्मनः मॉर्गन फ्रीमन
(संदर्भः विकीपीडिया आणि आयएमडीबी)


Share/Bookmark

Tuesday, April 23, 2019

"नोटा" - लोकशाहीचा फायदा की तोटा ?

"नोटा" - लोकशाहीचा फायदा की तोटा ?

भारतीय लोकशाही परिपक्व होत असल्याचं लक्षण म्हणजे 'नोटा' (नन्‌ ऑफ द अबोव्ह / यांपैकी एकही उमेदवार पसंत नाही हा पर्याय). याबद्दल एक मतप्रवाह असा आहे की, 'नोटा' ह्या पर्यायाला सर्वाधिक मतं मिळाली तरी, दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवणाऱ्या उमेदवाराला विजयी घोषित केलं जातं, जे 'नोटा'च्या उद्देश आणि फायद्यांच्या विपरित आहे. त्यामुळं, 'नोटा' हे एक सकारात्मक पाऊल असलं तरी त्याला पुरेसं बळ अजून मिळालेलं नाही.

"'नोटा'ला मत देणं म्हणजे आपलं बहुमोल मत वाया घालवणं"; "'नोटा' हा फक्त देखावा आहे"; "नापसंती व्यक्त करण्याचं ते फक्त एक प्रतिकात्मक साधन आहे"; "सध्याच्या राजकीय व्यवस्थेबद्दल मतदारांच्या मनात खदखदणाऱ्या असंतोषाचं प्रदर्शन आहे"; असं 'नोटा'बद्दल सहसा बोललं जातं.

भारताचे तत्कालीन सरन्यायाधीश पी. सत्यशिवम यांनी 'नोटा' लागू करण्याचा ऐतिहासिक निकाल जाहीर करताना म्हटलं होतं की, "गुप्त मतदान पद्धतीत कोणत्याही उमेदवाराला मत न देण्याचा अधिकार मतदाराला देणं, ही लोकशाहीतली अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. यामुळं, राजकीय पक्षांनी दिलेल्या उमेदवारांबद्दल निषेध व्यक्त करण्याचा अधिकार मतदारांना प्राप्त होतो. हळू हळू व्यवस्थेमधे बदल होत जाईल आणि जनतेच्या इच्छेचा मान राखत, 'चांगले' उमेदवार उभे करणं राजकीय पक्षांना भाग पडेल."

'नोटा' पर्यायाच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणारे सर्वोच्च न्यायालयातले वकील संजय पारीख म्हणतात, "काही लोकांच्या मते, 'नोटा'मुळं निवडणुकीच्या खर्चात वाढ होईल. पण भ्रष्टाचार आणि वाईट कृत्यांमधे सहभागी उमेदवार निवडून देणं हे देशासाठी जास्त नुकसानकारक आहे. काहीही करुन सत्तेत राहण्याची इच्छा आणि पैशाची हाव या गोष्टी मूल्यांवर मात करतात."

२०१८ साली महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगानं पाठीमागच्या दोन वर्षांत झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा अभ्यास केला, आणि विजयी उमेदवारापेक्षा 'नोटा'ला जास्त मतं मिळाल्याची अनेक उदाहरणं त्यांना दिसून आली. उदाहरणार्थ, पुणे जिल्ह्यातल्या बोरी ग्रामपंचायत निवडणुकीत ८५.५७% मतदारांनी उमेदवार यादीतला 'नोटा' पर्याय निवडला होता; तर मानकरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत ३३० वैध मतांपैकी २०४ मतं 'नोटा'ला मिळाली होती. नांदेड जिल्ह्यातल्या खुगांव खुर्द गावचा सरपंच फक्त १२० मतं मिळवून निवडून आला, पण 'नोटा'ला एकूण ८४९ पैकी ६२७ मतं मिळाली होती. लांजा तालुक्यातल्या खावडी गावात विजयी उमेदवाराला ४४१ वैध मतांपैकी १३० मतं मिळाली होती, तर 'नोटा'ला २१० मतं मिळाली होती.

ही उदाहरणं लक्षात घेऊन, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगानं 'नोटा'च्या सध्याच्या कायद्यात दुरुस्ती करायचा विचार केला. नोव्हेंबर २०१८ मधे राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलं की, "जर एखाद्या निवडणुकीत 'नोटा'ला सर्वाधिक मतं मिळाली, तर त्या ठिकाणी पुन्हा एकदा निवडणूक घेण्यात येईल !" सर्व महानगरपालिका, नगर परिषदा, आणि नगर पंचायतींच्या निवडणुका आणि पोट-निवडणुकांसाठी ही तरतूद ताबडतोब लागू करण्यात आली. (द इंडियन एक्स्प्रेस, ७ नोव्हेंबर २०१८)

नोव्हेंबर २०१८ मधे हरियाणा राज्य निवडणूक आयोगानं महाराष्ट्राचं अनुकरण करत जाहीर केलं की, 'नोटा'ला एक काल्पनिक उमेदवार समजलं जाईल आणि नगरपालिका निवडणुकांमधे 'नोटा'ला बहुमत मिळाल्यास पुन्हा एकदा निवडणुका घेतल्या जातील. (एनडीटीव्ही, २२ नोव्हेंबर २०१८)

('विकीपेडीया'वरून साभार, जनहितार्थ प्रसारित)


Share/Bookmark

Saturday, April 20, 2019

जीटीच्या गुजगोष्टी


जीटीच्या गुजगोष्टी


- मंदार शिंदे 9822401246

📐📌📎✏📏🖇💡😀

इंजिनियरींगच्या विद्यार्थ्यांना जीटी म्हणजे काय हे वेगळं सांगायची गरज नाही…

इंजिनियरींग किंवा मशीन ड्रॉईंग विषयात सगळ्यांनाच बिनचूक आणि रेखीव ड्रॉईंग करता यायचं नाही. त्यातून, ड्रॉईंग शीटचा 'स्नो व्हाईट' म्हणजे बर्फाएवढा स्वच्छ पांढरा प्रकार वापरणं सक्तीचं होतं. त्यावर काही चूक झाली म्हणून खोडरबर वापरला तर, लहान मुलांच्या डोळ्यातलं काजळ फिसकटतं तसा सगळा राडा व्हायचा. मग गुरुजींकडून ड्रॉईंगच्या पिरीयडला जाहीर सत्कार व्हायचा. शिवाय, सबमिशनसाठी वेळेची मर्यादा असायची. ड्रॉईंग नक्की कशाचं आहे आणि कसं काढायचं आहे, हे समजलं नाही तरी चालेल, पण वेळेत पूर्ण करुन सबमिट करणं सगळ्यांनाच सक्तीचं असायचं...

अशा वेळी, होतकरु इंजिनियर्सच्या मदतीला धावून यायची ग्लास ट्रेसींग (जीटी) टेक्नॉलॉजी. याची रेसिपी अशीः

एका मोठ्या बादलीत चाळीस किंवा साठ वॅटचा पिवळा बल्ब ठेवायचा. बादलीवर मोठी काच ठेवायची. ज्याच्यावरुन कॉपी करायची ती ‘ओरिजिनल’ शीट खाली आणि त्यावर आपली कोरी शीट क्लॅम्प करायची. बल्ब ऑन केला की खालचं ड्रॉईंग दिसू लागतं, त्याबरहुकूम वरच्या कोऱ्या कागदावर पेन्सिलीनं हलक्या हातानं आऊटलाईन बनवायच्या. नंतर ती शीट स्वतंत्र बोर्डवर घेऊन फिनिशिंग करायचं.

बादली उपलब्ध नसेल तर दोन बाजूंना पुस्तकांची चळत रचून त्यावर काच ठेवली जायची.

जीटी 'मारताना' वेळेचं भान महत्त्वाचं असायचं. सलग खूप वेळ बल्ब ऑन राहिला, तर काच तापून तडकण्याचा धोका असायचा. शिवाय, काच तापल्यामुळं खालची 'ओरिजिनल' शीट पिवळी पडायची. अनेक जणांच्या 'जीट्या' मारण्यासाठी एकच ओरिजिनल शीट वापरली, तर ती काचेवर घासून काळी आणि बल्बच्या उष्णतेमुळं पिवळी पडायची शक्यता असायची. त्यामुळं पहिल्या शीटवरुन दुसरी बनवायची, मग दुसरीवरुन तिसरी, तिसरीवरुन चौथी... असं 'ज्योत से ज्योत जलाते चलो' हे तत्त्व पाळलं जायचं.

ही ओरिजिनल शीट शक्यतो वर्गातल्या सर्वात हुशार आणि तत्पर विद्यार्थ्याची असायची. पण सगळ्यात आधी ड्रॉईंग पूर्ण होऊनसुद्धा जनकल्याणार्थ तिचं सबमिशन लांबणीवर पडायचं. शिवाय अनेकांकडून हाताळली गेलेली ही मूळची ‘स्नो व्हाईट’ गंगा बऱ्यापैकी ‘मैली’ होऊनच मूळ मालकाकडं परतायची. आधीच सबमिशनला लेट झालेला असल्यानं आणि पुन्हा त्या निर्मितीकळा सोसण्याचं त्राण नसल्यानं, आहे तशीच शीट गुरुजींसमोर सादर केली जायची. संपूर्ण बॅचसमोर त्या ‘कळकट मळकट, कामाला बळकट’ शीटचा सरांकडून उद्धार केला जायचा. त्याच शीटवरुन जन्मलेल्या पण आपला ‘स्नो व्हाईट’ शुभ्रपणा टिकवलेल्या बाकीच्या शीट्स मूक सहानुभूती व्यक्त करायच्या...

एकदा मात्र उलटाच प्रकार घडला. झालं असं की, फ्लुईड मेकॅनिक्स विषयातलं एक अवघड हायड्रॉलिक सर्कीट अख्ख्या बॅचनं जीटी मारुन काढलं. जीटी मारण्यासाठी मार्गदर्शक शीट मागच्या वर्षीच्या सबमिशन झालेल्या जर्नलमधून घेतली होती. पूर्ण केलेलं जर्नल तपासून घेण्यासाठी सरांच्या केबिनबाहेर रांग लावून सगळे थांबले होते. रोल नंबरनुसार एकेकाला आत बोलावलं जात होतं. पहिल्या एक-दोन मुलांचं जर्नल सरांनी थोडं चाळून बघितलं, पण त्यानंतर ते फक्त 'त्या' हायड्रॉलिक सर्कीटचं पान दाखवायला सांगू लागले. मुलांनी ते पान उघडलं की त्यावर एका सेकंदात लाल पेनानं फुली मारुन 'रिपीट' असा शेरा मारु लागले.

सगळ्यांच्या जर्नलचं एकच पान बघून जर्नल रिजेक्ट केलं जात होतं. कुणालाच काहीच कळेना. सगळ्यांच्या फाईल तपासून झाल्यावर सरांनी सगळ्यांना एकदम केबिनमध्ये यायला सांगितलं. मग पुढचा अर्धा तास संपूर्ण बॅचचं, कामचुकारपणा, कॅज्युअल ॲप्रोच, टाईमपास, अभ्यासात लक्ष नसणं, आई-वडीलांच्या अपेक्षा, वेळेची आणि कॉलेजची किंमत नसणं, इंजिनियर होण्याची एकाचीही लायकी नसणं, वगैरे विषयांवर सभ्य आणि सौम्य भाषेत प्रबोधन करण्यात आलं.

सगळं ऐकून घेतल्यावर एकानं धाडस करुन विचारलंच, "पण सर, एकच ड्रॉईंग बघून तुम्ही सगळ्या बॅचचे जर्नल रिजेक्ट का केले ?"

यावर गालातल्या गालात हसत सर म्हणाले, "बेट्यांनो, मीसुद्धा इंजिनियरींग कॉलेजमध्ये शिकूनच इथं आलोय. तुमच्या वयापेक्षा जास्त वर्षं मी इथं शिकवायचं काम करतोय. मला सांगा, हायड्रॉलिक सर्कीटची जीटी मारायला तुम्ही कुठली शीट वापरलीत ?"

सगळे इकडं-तिकडं बघू लागले. काहीजण पुटपुटले, "सर, आम्ही जीटी नाही मारली, रात्रभर जागून ड्रॉईंग काढलंय."

सरांनी टेबलवरचं एक जर्नल उचललं. हायड्रॉलिक सर्कीटचं ते विवादास्पद ड्रॉईंग काढून बॅचसमोर धरलं आणि एका विशिष्ट जागेवर बोट ठेवून विचारलं, "सर्कीटमध्ये हा पार्ट कुठला आहे कुणी सांगू शकेल का ?"

सगळ्यांनी ड्रॉईंगकडं बघितलं आणि एका सुरात उत्तर दिलं, "हो सर, ती कॉईल स्प्रिंग आहे!"

यावर मोठ्यानं हसत सर म्हणाले, "गाढवांनो, जीटी मारताना थोडं तरी लॉजिक वापरावं. हायड्रॉलिक सर्कीटमध्ये स्प्रिंग कुठून येणार ? ती कॉईल स्प्रिंग नाही... माझी सही आहे, सही !!"

आत्ता सगळ्या बॅचच्या डोक्यात प्रकाश पडला. गेल्या वर्षी सरांनी तपासून सही केलेलं ड्रॉईंग जीटी मारायला वापरलं होतं. पहिली जीटी मारणाऱ्यानं स्प्रिंगसारखी दिसणारी सरांची सही हुबेहूब कॉपी करुन फिनिशिंगमध्ये तिची टोकंसुद्धा (त्याला योग्य वाटेल तिथं) जुळवून टाकली होती. पुढच्या सगळ्या 'जीट्या' सेम टू सेम सरांच्या सहीसह अवतरल्या होत्या...

॥ इति श्री इंजिनियरींगमोचनं नाम जीटीस्तोत्रम् सम्पूर्णम् ॥

📐📌📎✏📏🖇💡😀

© मंदार शिंदे १२/०४/२०१९


Share/Bookmark

Monday, April 8, 2019

दिंडी स्वच्छतेची…

दिंडी स्वच्छतेची…

- मंदार शिंदे ९८२२४०१२४६

(लेख थोडा मोठा आहे; पण विषय महत्त्वाचा आणि अनुभव खरे आहेत. वाचा, विचार करा आणि तुमची मतं कळवा. लेख उपयुक्त वाटल्यास जरुर शेअर करा.)

या जगातली प्रत्येक गोष्ट एकमेकांशी कुठल्या ना कुठल्या प्रकारे जोडलेली आहे, असं मला आता वाटायला लागलंय. खास करून सामाजिक प्रश्नांवर काम करताना, एकच एक मुद्दा पकडून चालत नाही. त्याच्या आजूबाजूचे हजार मुद्दे त्यावर अनुकूल अथवा प्रतिकूल परिणाम करत असतात, ज्यांना तुम्ही टाळू शकत नाही. स्वच्छता आणि स्वच्छतेच्या सवयी यावर काम करताना, एकातून दुसऱ्याच क्षेत्रात घुसत, अरेबियन नाईट्सप्रमाणे आलेले काही सुरस आणि चमत्कारिक अनुभव तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करतोय.

आपल्या देशाची ‘अस्वच्छ’ ओळख होण्यामागं, देशातल्या नागरिकांच्या अस्वच्छ सवयींचा सिंहाचा वाटा आहे. थोडा विचार केला असता असं लक्षात येतं की, स्वच्छतेच्या सवयी हा आपल्या शालेय शिक्षणाचा भाग झाल्याशिवाय मोठेपणी त्या सवयींचं पालन शक्य नाही.

पुण्यामध्ये महानगरपालिकेच्या शाळांमधील मुलांच्या शिक्षणासाठी काम करत असताना, त्यांच्या स्वच्छतेच्या सवयींवर काम करायचं काही वर्षांपूर्वी ठरवलं. जेवणापूर्वी हात धुणं, टॉयलेटचा वापर झाल्यावर पाणी टाकणं, जेवताना अन्नाची नासाडी न करणं, अशा अगदी मूलभूत सवयींपासून सुरुवात करायचं ठरवलं. यासाठी मुलांना वर्षातून किंवा महिन्यातून एखादं व्याख्यान ऐकवणं पुरेसं नाही, किंवा ‘स्वच्छतेचे महत्त्व’ या विषयावर निबंध लिहून घेणं हाही उपाय नाही, हे सुरुवातीलाच लक्षात आलं. मुलांना स्वच्छतेच्या चांगल्या सवयी आहेत किंवा नाहीत, आणि नसतील तर त्यांची खरी कारणं काय, यासाठी त्यांचं निरीक्षण करणं फार गरजेचं होतं. मुलांशी संवाद साधणंसुद्धा महत्त्वाचं होतं.

सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरसुद्धा मुद्दाम कायदे-नियम न पाळणं, ही मला तरी नैसर्गिक प्रवृत्ती वाटत नाही. काहीतरी कमी पडतं, यंत्रणेतच काहीतरी त्रुटी असतात, कुठेतरी पळवाटा असतात, आणि “चालतंय की” म्हणून नियमबाह्य वागलं जातं. आपण ज्या शाळेमध्ये पाच-सहा तास थांबणार आहोत, तिथं टॉयलेटचा घाणेरडा वास येत राहिलेला कुणाला आवडेल ? किंवा आपण वारंवार आजारी पडू नये म्हणून जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावेत, एवढी साधी गोष्ट कुणाला का टाळावीशी वाटेल ?

मुलांच्या वागण्याचं आणि शाळेतल्या सुविधांचं निरीक्षण केल्यानंतर असं लक्षात आलं की, मुळात हात धुवायला आणि टॉयलेटमध्ये टाकायला पाणी तरी पाहिजे. म्हणजे अगदी मुळाच्या मुळाशी जायचं म्हटलं तर, शाळेत पाण्याची टाकी असली पाहिजे, त्या टाकीत पाणी भरण्याची सोय असली पाहिजे, त्या टाकीपासून टॉयलेटपर्यंत पाईपलाईन असली पाहिजे, टॉयलेटच्या आतमध्ये नळ असला पाहिजे, तो नळ चालू स्थितीत असला पाहिजे, नळाखाली ठेवायला फुटकी का होईना एखादी बादली असली पाहिजे… आणि हे सगळं असल्यानंतर जर एखाद्या मुलानं टॉयलेटमध्ये पाणी टाकलं नाही, तर त्याच्या सवयींवर टीका करण्याचा आपल्याला अधिकार आहे !! पण टाकी आहे तर पाणी नाही, पाणी आहे तर पाईप नाही, पाईप आहे तर नळ नाही, नळ आहे तर तो मुलांच्या उंचीला पुरणार नाही इतक्या वर किंवा बादली बसणार नाही इतक्या खाली… असा काहीतरी विचित्र प्रकार शाळा-शाळांमध्ये दिसू लागला. आणि इतकी वर्षं शाळांमध्ये जात असून, इतक्या मूलभूत गोष्टींकडं आपण दुर्लक्ष केलं याबद्दल स्वतःची लाजसुद्धा वाटली.

आता शाळेत स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून देईपर्यंत मुलांना स्वच्छतेच्या सवयी लावण्याचा आपल्याला नैतिक अधिकार नाही, हे समजून घेतलं. मग या कामाचे दोन भाग पडले. स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासकीय यंत्रणेसोबत काम करणं आणि दुसऱ्या बाजूला उपलब्ध सुविधांमध्येच मुलांना शक्य त्या सवयी लावायचा प्रयत्न करणं.

आता ‘शासकीय यंत्रणा’ म्हणजे नक्की कोण, इथून सुरुवात होती. शाळेत वापरण्याजोगे टॉयलेट उपलब्ध नाहीत किंवा पाण्याची कमतरता आहे, असं दिसल्यावर सगळ्यात आधी मुख्याध्यापकांची भेट घेतली. मुख्याध्यापकांनी सांगितलं की, ते स्वतःच या गोष्टींमुळं त्रस्त आहेत. त्यांनी सुरुवातीला शाळेच्या निधीतून आणि नंतर-नंतर स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून शाळेसाठी टँकरमधून पाणी मागवलेलं आहे ! शिक्षण विभागाकडं वारंवार पत्रव्यवहारही केलेला आहे; परंतु “निधी उपलब्ध झाल्यावर संबंधित कामे करण्यात येतील,” असं शासकीय उत्तर त्यांना तोंडीच मिळालेलं आहे.

‘शिक्षण हक्क कायदा’ म्हणतो की, ६ ते १४ वर्षे वयोगटातल्या सर्व भारतीय मुला-मुलींना त्यांच्या परिसरात शाळा, शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सुरक्षित पिण्याचे पाणी, स्वतंत्र स्वच्छतागृहे, वगैरे गोष्टी मिळणं हा त्यांचा हक्क आहे. मग या मूलभूत हक्कासाठी निधी उपलब्ध नसावा, ये बात कुछ हजम नहीं हुई ! मुळात शहरी आणि ग्रामीण भागातल्या शाळा आणि एकंदर शिक्षण यंत्रणेचा एक परस्पर-संबंध नकाशाच बनवण्याची गरज यानिमित्तानं समोर आली. त्यातून आणखीच मजेदार माहिती मिळाली…

शहरी भागामध्ये महानगरपालिकेच्या (किंवा नगरपालिकेच्या) शाळा असतात, तर ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या. म्हणजे या शाळांचे मालक महानगरपालिका किंवा जिल्हा परिषद असतात. मनपा किंवा जि.प.च्या बजेटमध्ये भौतिक सुविधा आणि शैक्षणिक खर्च वेगवेगळे दाखवले जातात. शैक्षणिक खर्चामध्ये शिक्षकांचे पगार, वह्या-पुस्तकं, वगैरे गोष्टींचा समावेश होतो, तर भौतिक सुविधांमध्ये सर्व प्रकारच्या इमारतींचे बांधकाम व दुरुस्ती वगैरे गोष्टी येतात. शिक्षण विभागाकडं टॉयलेट बांधण्यासाठी किंवा पाण्याची टाकी बसवण्यासाठी निधी उपलब्ध नसण्यामागचं खरं कारण आता लक्षात आलं. म्हणजे आतापर्यंत घरमालकाला सोडून भाडेकरूकडंच घर दुरुस्तीची मागणी केल्यासारखं होत होतं.

कुठली गोष्ट कुणाला मागायची, हे समजण्यातच भरपूर वेळ आणि कष्ट खर्ची पडले. मग पुढचा टप्पा म्हणजे, सक्षम अधिकाऱ्यांकडं जाऊन या गोष्टींची मागणी करणं. त्यासाठी मनपा आयुक्तांकडं लेखी निवेदन सादर केलं. शाळांमधली प्रत्यक्ष परिस्थिती आणि अपेक्षित भौतिक सुविधा याबद्दल आयुक्तांना प्रत्यक्ष भेटून चर्चा केली. आयुक्त म्हणाले, “दोनशे शाळा आहेत; सगळीकडं एकावेळी लक्ष ठेवणं शक्य नाही. पण तुम्ही दाखवाल तेवढ्या शाळांमध्ये नक्कीच काम करू.” नुसतं ‘काम करू’ म्हणाले नाहीत, तर इतर विभागांकडं अर्ज आमच्यासमोरच पाठवून दिला. मग एका-एका वॉर्ड ऑफिसला जाऊन तिथल्या भवन विभागासोबत आणि सहाय्यक आयुक्तांसोबत मिटींगा करायला सुरुवात केली.

त्यापैकी एका वॉर्ड ऑफिसमध्ये, त्यांच्या क्षेत्रातल्या शाळांमधली परिस्थिती मांडत बसलो होतो. त्यांचे ज्युनिअर इंजिनिअर वगैरे साहेब लोक मिटींगला होते. शाळांमध्ये जाऊन काढलेले अस्वच्छ टॉयलेटचे, तुटलेल्या दारांचे आणि नळांचे फोटोच अर्जासोबत जोडले होते. “हेच फोटो पेपरवाल्यांना दिले तर पहिल्या पानावर छापतील, पण प्रश्न सुटणार नाहीत; म्हणून थेट अधिकाऱ्यांसमोर ठेवलेत,” असं सुरुवातीलाच सांगितलं. मिटींगला बसलेल्या अधिकाऱ्यांनी खूपच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला. मीटिंग करून बाहेर पडताना असं वाटत होतं की, एका आठवड्यात किमान या वॉर्डातल्या तरी सगळ्या शाळांचा कायापालट होणार. या लोकांपर्यंत शाळेतला प्रॉब्लेम पोहोचलाच नव्हता, आता तो पोहोचला आणि त्यांनी तत्परतेनं कामाची तयारी दाखवली, याचं फार कौतुक वाटलं.

आठवडा उलटला, पण शाळेत काय परिस्थिती आहे ते बघायलासुद्धा कुणी आलं नाही. शाळेचे मुख्याध्यापक आम्हालाच विचारायला लागले,

“काय सर, वॉर्ड ऑफिसला मिटींग झाली होती ना ? मग कधी येणार पाणी ? कधी बांधणार टॉयलेट ?”

आता आली का पंचाईत ! शाळेतल्या शिक्षकांनी तर मुलांनासुद्धा सांगून ठेवलं होतं,

“हे सर शाळेत पाणी आणणार आहेत, तुमच्यासाठी टॉयलेट बांधून देणार आहेत, मग तुम्ही स्वच्छ-स्वच्छ राहणार ना?”

शाळेत गेल्यावर मुलंसुद्धा विचारायची, “कधी येतंय पाणी आणि टॉयलेट !?!”

तिकडं लाल किल्ल्यावरून माननीय पंतप्रधान ओरडून-ओरडून सांगत होते, “जहाँ सोच, वहाँ शौचालय !!”. इकडं सोचून-सोचून शौचाला यायचं बंद व्हायची वेळ आली होती…

मग क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांबरोबर पुन्हा मीटिंग घेतली. यावेळी निम्मे इंजिनीयर सुट्टीवर होते आणि उरलेले ‘फिल्ड’वर गेले होते. (सैन्यातले जवान जसे ‘फ्रंट’वर जातात, तसे मनपाचे अधिकारी ‘फिल्ड’वर जातात ! ) त्यामुळं सगळ्या इंजिनिअर साहेबांच्या वतीनं सहाय्यक आयुक्तांनीच पंधराएक दिवसात काम होईल, असं वचन देऊन टाकलं. ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ हे लहानपणापासून ऐकत आल्यानं, दहा-पंधरा दिवसांचं काही विशेष वाटलं नाही… पण दहा-पंधरा दिवसांनीसुद्धा काहीच हालचाल दिसेना, तेव्हा लक्षात आलं की वाटत होतं तितकं हे सोपं काम नव्हे.

साधारण एप्रिल-मे महिन्यांच्या दरम्यान हा सर्व प्रकार सुरू होता. शाळांना सुट्ट्या असतानाच बांधकाम आणि दुरुस्तीची कामं करून घेतली, तर जून महिन्यापासून मुलांना सर्व सुविधा उपलब्ध होतील आणि मग त्यांना स्वच्छतेच्या सवयी लावण्यावर काम सुरू करता येईल, असा प्रामाणिक हेतू होता. पण मिटींगलाच ‘तारीख पे तारीख’ सुरू असल्यानं, आता शाळा सुरू झाल्यानंतरच ही कामं सुरू होतील, असं वाटू लागलं. सतत सहाय्यक आयुक्तांकडं पाठपुरावा सुरू होता. एकदा तर ते वैतागून म्हणाले,

“काय सर, तुम्ही ह्या मुलांसाठी शाळेत चांगल्या स्वच्छ टॉयलेटची आणि पाण्याची मागणी करताय !! यांच्या घरी तर टॉयलेटसुद्धा नाहीत आणि पाणीसुद्धा नाही. त्यांना सवय असते. उलट शाळेत मोडके-तोडके का होईना टॉयलेट तरी आहेत… अजून काय पाहिजे ??”

आता यावर काय बोलणार, कप्पाळ !?!

शेवटी एकदा स्वच्छता आणि भवन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत मिटिंगचा योग जुळून आलाच. “शाळा सुरू व्हायला थोडेच दिवस राहिलेत, लवकरात लवकर काम सुरू केली तर बरं होईल,” असा मुद्दा मांडला. दोन खतरनाक रिस्पॉन्स मिळाले…

पहिला म्हणजे, “मार्च महिन्यात बजेट ठरलंय, कॉन्ट्रॅक्ट देऊन झालेत, आता पुढच्या मार्चपर्यंत वाट बघायला लागेल !!”

दुसरा रिस्पॉन्स तर अगदीच अनपेक्षित होता. एक अधिकारी म्हणाले,

“आपण जुलै-ऑगस्ट महिन्यात दुरुस्ती वगैरेची कामं करू. आत्ता काम करून काहीच उपयोग नाही; ते सगळं खराबच होणार आहे !!”

मी म्हतलं, “एका महिन्यात खराबच होणार आहे, एवढा कॉन्फिडन्स ??”

ते म्हणाले, “अहो, जून महिन्यात वारी येणार ना !?!”

हे खरंच अरेबियन नाईट्ससारखं चालू होतं. एका गोष्टीतून दुसरी गोष्ट, दुसऱ्या गोष्टीतून तिसरी गोष्ट… रात्र संपली पण सोंगं, सॉरी गोष्टी, संपेनात. मी म्हटलं,

“वारीचा आणि शाळांमधल्या स्वच्छतेच्या सुविधांचा काय संबंध ?”

सगळे माझ्या अडाणीपणावर हसले. म्हणाले,

“अहो, वारीमध्ये ते आळंदी, देहू, सातारा, नांदेड, कुठून-कुठून पालख्या आणि दिंड्या येतात. शहरातून जाताना दोन-तीन दिवस त्यांच्या मुक्कामाची सोय शाळांमध्येच तर केली जाते. ह्या दोन-तीन दिवसांत सगळ्या सुविधांची वाट लागते बघा… टॉयलेट चोकप होतात, पाणी पुरत नाही, नळ चोरीला जातात, आणि बरंच काही… तेव्हा वारी होऊन जाऊ दे, मग आपण कामाचं बघू,” असा सबुरीचा सल्ला त्यांनी दिला.

साधं मुलांना “जेवायच्या आधी हात धुवा आणि टॉयलेटला जाऊन आल्यावर पाणी टाका” एवढ्या दोन गोष्टी सांगायला गेलो, तर ही भलतीच लांबड लागली होती !! बजेटचा विषय तर आपल्या हातात नव्हताच, पण हा वारीचा विषय तर डोक्यातपण नव्हता. पण आता मागे हटून चालणार नव्हतं. “हे कंकण करी बांधियले । जनसेवे जीवन दिधले ॥“ या शाळेत असताना पाठ केलेल्या कवितेच्या ओळी आठवल्या. जीवन-बिवन फार मोठी गोष्ट आहे, पण आपण थोडा वेळ तरी देऊ शकतो, असं वाटलं. ही वारीची काय भानगड आहे ते शोधूनच काढू, असं ठरवलं.

तसं बघितलं तर, हा विषय शिक्षणाशी संबंधित नव्हताच. पण सुरुवातीला म्हटल्यानुसार, एक प्रश्न स्वतंत्र बाजूला काढून बघता येतच नाही हो ! सगळ्यांच्या तंगड्या एकमेकांत गुंतलेल्या…

साधारण कुठल्या दिवशी शाळांमध्ये वारकरी येणार, कितीजण येणार, किती दिवस राहणार, त्यांच्यासाठी काय सुविधा आहेत, याची चाचपणी सुरू झाली. वॉर्ड ऑफिस आणि शिक्षण विभागाकडून शाळेनुसार अपेक्षित वारकरी मंडळांची यादी मिळवली. दिंडी प्रमुखांना फोन करून, त्यांच्यासोबत किती माणसं असतील, कुठल्या दिवशी येणार, कुठल्या दिवशी निघणार, वगैरे चौकशी केली. मागच्या काही वर्षांचे अनुभवसुद्धा विचारले. बहुतेक सगळ्यांकडून एकसारखंच उत्तर मिळत होतं - “शाळांमध्ये एवढ्या सगळ्या माणसांची सोय नीट होत नाही.” गैरसोय टाळण्यासाठी काही दिंड्या आपल्यासोबत पाण्याचे टँकरसुद्धा घेऊन येतात, असं समजलं.

साधारण किती वारकरी एका शाळेत उतरणार, याची थोडीफार कल्पना आल्यावर त्या माहितीची थोडी आकडेमोड करून पुन्हा वॉर्ड ऑफिसला सहाय्यक आयुक्तांसमोर जाऊन बसलो. समजा, शाळेमध्ये टॉयलेट ब्लॉक आहेत सहा. एका माणसाला सकाळचा कार्यक्रम उरकायला कमीत कमी पाच मिनिटं लागतील असं धरलं तर, एका तासात फक्त बारा माणसं एक टॉयलेट वापरू शकतात. मग ६ टॉयलेट मिळून ७२ माणसांची सोय झाली असं समजू. सकाळी साधारण ३ तासांच्या कालावधीत सगळ्यांना आवराआवर करायची असते. त्या वेळेत साधारण २०० ते २५० लोकांसाठी पुरेसे टॉयलेट आहेत, असा अंदाज बांधला. मग त्या शाळेत उतरणाऱ्या वारकऱ्यांची संख्या बघितली. बापरे !! दीड ते दोन हजाराच्या जवळपास वारकरी त्या शाळेत मुक्कामी राहणं अपेक्षित होतं. म्हणजे सलग पाच-पाच मिनिटं टॉयलेट वापरायचं ठरवलं तरी, दिवसभर स्वच्छतेचा कार्यक्रम सुरूच राहणार होता… मग सकाळच्या दोन-तीन तासांमध्ये सगळ्यांची सोय कशी शक्य होती ? शिवाय प्रत्येकी फक्त पाचच मिनिटं हिशोबात धरली होती. एखाद्याला आत लागली डुलकी… किंवा दोनदा जावं लागलं… किंवा जास्त वेळ लागला… तर सगळंच गणित बिघडत होतं.

वर्षानुवर्षे ठराविक महिन्यात येणाऱ्या एवढ्या लोकांसाठी कायमस्वरूपी स्वच्छतेची आणि पाण्याची पुरेशी व्यवस्था करावीशी राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनाला कधीच वाटली नसावी ? एवढ्या मूलभूत गोष्टीचा एवढा साधा हिशोब कुठल्याच अधिकाऱ्याच्या लक्षात आला नसावा ? आणि “डिझाईन्ड टू फेल” म्हणतात तसं शाळेतच यांची व्यवस्था करण्याची कल्पना कुणाच्या सुपीक डोक्यातून आली असावी ? असो. जगाची निर्मिती कोणी केली आणि जगाचा अंत कधी होणार, या प्रश्नांची उत्तर कुणाकडंच नाहीत. अशा प्रश्नांवर डोक पिकवण्यापेक्षा आत्ता काय करू शकतो यावर विचार सुरु केला.

मनपा प्रशासनानं शाळांमध्ये स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा दिल्या आहेत असं क्षणभर गृहित धरून, वारकऱ्यांचं प्रबोधन आणि त्यांना मदत करायचं नियोजन सुरू केलं. ‘डोअर स्टेप स्कूल’ या पुण्यातल्या स्थलांतरित शालाबाह्य मुलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थेनं हा उपक्रम राबवायचं ठरवलं. या प्रकारच्या कामांमध्ये काहीच अनुभव नसल्यानं आणि एकंदर कामाचा आवाका लक्षात घेऊन, सुरुवातीला पाच ते दहा शाळांमध्येच काम करायचं ठरलं. वारीच्या साधारण एक महिना आधी शाळांमधल्या स्वच्छतेच्या सुविधांची पाहणी करण्यात आली. संबंधित क्षेत्रीय कार्यालयांशी समन्वय साधून, शक्य तितक्या सुविधा सुधारण्यात किंवा वाढवण्यात आल्या. नळ दुरुस्ती, टॉयलेट दुरुस्ती, दरवाजे-कड्या बदलणं, पाण्याच्या टाक्यांची गळती थांबवणं, वगैरे गोष्टी शाळेतल्या मुलांसाठी नाही, पण वारीच्या तयारीसाठी त्यांना कराव्याच लागल्या. राज्य शासनाच्या पुढाकारानं काही शाळांमध्ये पोर्टेबल टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली. अर्थात दोन हजार लोकांसाठी सहा टॉयलेट काय आणि दहा टॉयलेट काय, सारखेच !! पण फूल ना फुलाची पाकळी म्हणून प्रशासन योगदान देत होतं…

पहाटेपासून रात्रीपर्यंत शाळांमध्ये थांबून, वारकऱ्यांकडून स्वच्छतेच्या सुविधांचा व्यवस्थित वापर होतोय की नाही हे बघण्यासाठी स्वयंसेवक नेमण्यात आले. वॉर्ड ऑफिसच्या अधिकाऱ्यांची संपर्क यादी संबंधित स्वयंसेवकांकडं देण्यात आली. दिवसातून किती वेळा टॉयलेट स्वच्छतेसाठी माणसं येणार, पाणी संपलं तर टँकरसाठी कुणाला फोन करायचा, दिवसातून किती वेळा पाणीपुरवठा करणार, कचरा उचलण्यासाठी गाडी किती वाजता येणार, वगैरे गोष्टींची आधीच माहिती घेऊन ठेवली. शाळांमध्ये स्वच्छतेविषयी काही पोस्टर बनवून लावले. पोस्टरवरच्या संदेशांना मुद्दाम संतवाणीचं स्वरूप देण्यात आलं…

शाळेमध्ये येती । देवाची लेकरे ।
स्वच्छ नि साजरे । सारे ठेऊ ॥

मन माझे साफ । शरीरही साफ ।
शाळा माझी साफ । कशी ठेऊ ॥

शाळा देई ज्ञान । ज्ञान हेच धन ।
धनाचे आगार । स्वच्छ ठेऊ ॥

मनामध्ये राहतो । जनामध्ये पाहतो ।
स्वच्छतेत नांदतो । देव माझा ॥

जे जे स्वच्छ । ते ते पवित्र ।
भक्तीचे सूत्र । हेच असे ॥

थुंकू नका । सांडू नका ।
स्वच्छतेची कास । सोडू नका ॥

नाव घ्या हरीचे । मुखी बोला हो श्रीधर ।
स्वच्छतेत परमेश्वर । नांदतसे ॥

प्रत्यक्ष ठरलेल्या दिवशी पहाटेपासून शाळांमध्ये थांबण्याचं नियोजन केलं होतं; पण आदल्या रात्रीच वारकऱ्यांच्या गाड्या शाळेमध्ये येऊ लागल्या. दुसऱ्या दिवशी पहाटे-सकाळी टॉयलेटचा वापर सुरू झाला. पहिल्या एक-दोन राऊंडमध्येच पाण्याच्या टाक्या रिकाम्या झाल्या, आणि ५ मिनिटाला १ व्यक्ती तर तासाला १२ व्यक्ती, एकूण ७२ व्यक्ती गुणिले ३ तास वगैरे सगळं गणितच कोलमडलं ! सहा टॉयलेटमध्ये टाकायला पाणीच नसल्यानं पुढच्या फळीला आत शिरणं मुश्किल होऊन बसलं. मग जागा मिळेल तिकडं लोक मोकळे होऊ लागले.

वॉर्ड ऑफिसला फोनवर फोन गेले. आरोग्य विभागाची माणसं सफाईला कधी येणार कळेना. टॅंकरवाला म्हणाला, “रात्री तर पाणी भरून गेलोय.. आता दुपारी येतो.” मुक्कामी उतरलेले काही वारकरी या गोष्टींची सवय असल्याप्रमाणे ‘ठेविले अनंते तैसेचि’ राहिले होते. काही तरुण आणि उतावीळ लोकांनी आपला राग टॉयलेटच्या दारांवर, आणि पाण्याऐवजी हवा सोडणाऱ्या नळांवर काढायला सुरुवात केली. मुद्दाम नुकसान करण्याचा कुणाचा हेतू नसतो; पण परिस्थितीनुसार माणसाच्या प्रतिक्रिया बदलत जातात हे प्रत्यक्ष बघून पटलं.

ज्या वर्गखोल्यांमध्ये वारकरी राहणार होते, तिथं कचऱ्याचे डबे किंवा किमान कचऱ्याच्या पिशव्या उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न केला. डबे आणि पिशव्या ठेवलेल्या खोल्यांमध्ये इकडं-तिकडं कचरा दिसला नाही, पण कचऱ्याचे डबे आणि पिशव्या नव्हते त्या वर्गखोल्यांमध्ये मात्र कचरा पसरलेला दिसला. ‘कचरा इथे टाकू नका’ असं म्हटल्यावर ‘मग कुठे टाकायचा ?’ याचं उत्तरसुद्धा तयार ठेवावं लागत होतं.

नक्की काय घडतंय, हे समजायलाच एक दिवस निघून गेला. वॉर्ड ऑफिसच्या अधिकाऱ्यांशी, सफाई कामगारांशी, कंत्राटदारांशी चर्चा-वाद-भांडणं होत होती. रात्री एका शाळेमध्ये दोनेक हजार वारकरी उतरलेले असताना लाईटच गेली. एका शाळेत पाणी भरण्यासाठी येणारा टँकर मध्येच कुठंतरी बंद पडला. एका शाळेच्या मुख्याध्यापिका संध्याकाळी घरी जाताना सहापैकी दोन टॉयलेटला कुलूप लावून किल्ली बरोबर घेऊन गेल्या. बोला पुंडलिक वरदे हाऽऽऽरी विठ्ठल…!!!

संस्थेच्या स्वयंसेवकांना ओळखीसाठी जॅकेट दिली होती आणि त्यावर “दिंडी स्वच्छतेची” असं उपक्रमाचं नाव लिहून घेतलं होतं. बऱ्याच वारकऱ्यांना आणि तिथं येणाऱ्या इतर लोकांना असं वाटायला लागलं की, हे जॅकेट घातलेले लोक म्हणजेच सफाई कामगार आहेत. टॉयलेट तुंबलंय, वर्गात घाण झालीय, कचरा उचललेला नाहीये, वऱ्हांडे झाडलेले नाहीत, असं सगळं आमच्या स्वयंसेवकांना ऐकून घ्यावं लागलं. यापेक्षा डेंजर म्हणजे, स्थानिक नगरसेवकांनी आणि पुढाऱ्यांनी वारकऱ्यांसाठी जेवण आणल्यावर ह्या स्वयंसेवकांना वाढपीच बनवून टाकलं. विठ्ठल.. विठ्ठल…!!

शाळांमध्ये उतरलेल्या दिंड्यांचे प्रमुख मात्र आमच्यावर नीट लक्ष ठेवून होते. आम्ही वारकऱ्यांच्या सोयीसाठी, मदतीसाठी स्वतःहून काम करतोय हे लक्षात आल्यावर, स्वयंसेवकांच्या जेवणाची नि विश्रांतीची काळजी ते आवर्जून घेऊ लागले. वारकऱ्यांची जेवणं सुरू असताना माईकवरून अनाऊन्स करू लागले, “जाकीटवाले स्वयंसेवक जेवून घ्या…” रात्री भजन-कीर्तन सुरू असताना स्वच्छतेचा संदेश वारकऱ्यांना द्यायला ते विसरले नाहीत, “आपल्या सोयीसाठी दोन-तीन दिवस शाळेची इमारत वापरतोय, उद्या लेकरं शिकायला वर्गात येत्याल… त्यांच्यासाठी काय सोडून जाणार… कचरा आणि घाण ? विठ्ठल… विठ्ठल…!!” असं किर्तनातूनच सांगत होते.

ऐकीव माहितीवर अवलंबून राहिलो असतो तर, वारकरी दोन दिवस शाळेत राहून स्वच्छतेच्या सुविधांचं नुकसान करतात, नळ चोरतात, यावरच विश्वास बसला असता. पण प्रत्यक्ष अनुभव खरंच सुरस आणि चमत्कारिक होते… काम टाळणारे, फोन न उचलणारे अधिकारी आणि कर्मचारी जसे होते; तसेच रात्री उशिरा फक्त एका मेसेजवर स्वतः शाळेत येऊन टँकरची व्यवस्था करून देणारे अधिकारीसुद्धा यादरम्यान भेटले. मुख्य पाण्याच्या टाकीतून येणारी पाईप फुटल्यावर ती दुरुस्त होईपर्यंत चहासुद्धा न घेता समोर थांबून राहणारे इंजिनीयर साहेबदेखील इथंच भेटले… पण घडलेल्या गोष्टींचा आढावा घेऊन नियोजनात सुधारणा करण्याची प्रशासनाची तयारी मात्र दिसली नाही. असो.

संस्थेच्या स्वयंसेवकांना या निमित्तानं एक वेगळा अनुभव मिळाला. पुढं शाळा-शाळांमध्ये मुलांना स्वच्छतेच्या सवयी लावताना आणि स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करुन घेताना ‘स्वच्छतेच्या दिंडी’तले अनुभव उपयोगाला आले. प्रशासनाकडून किती अपेक्षा ठेवायच्या हेसुद्धा लक्षात आलं. स्वच्छतेच्या बाबतीत ग्रामीण-शहरी असा भेदभाव नसतो, मुळात स्वच्छतेबद्दल मनापासून आस्था असावी लागते, हे शिकायला मिळालं. आस्था-आवड-इच्छा नसेल, तर घोषणा हवेत आणि योजना कागदावरच राहतात. मोठ्यांना समजावणं खूप अवघड आहे, पण लहान मुलांच्या मनात तरी स्वच्छतेबद्दल आस्था-आवड-इच्छा पेरायचं काम करायची प्रेरणा मिळाली. बोला पुंडलिक वरदे हाऽऽऽरी विठ्ठल… श्री ज्ञानदेव तुकाराम… पंढरीनाथ महाराज की जय…!!


(‘नवे गाव आंदोलन’ मासिक - मार्च २०१९ अंकात प्रकाशित)


Share/Bookmark