ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Monday, December 30, 2019

जेशूची गोष्ट

चला गोष्ट सांगूया…

👶🌉⛽🛣🔩🏭👶

"जेशूची गोष्ट"
(लेखकः मंदार शिंदे 9822401246)

एकदा एका जेसीबीला आठवण आली आईची;
मान खाली घालून त्यानं मागणी केली सुट्टीची.
म्हणाला, “मालक, जाऊ द्या मला.. आठवण येते खूप.
आठवण काढण्यात विसरली बघा माझी तहान-भूक.”
पोट धरून मालक त्याचा खो-खो हसत सुटला,
“यंत्राला कुठं अस्त्या आई, खुळाच हैस की दोस्ता!
गप-गुमान कामावर चल, खड्डा खनायचा हाई.
काम करून पोट भरु, बोलायला येळ न्हाई…”

नाराज होऊन जेशूनं मग उलट प्रश्न केला,
“मालक, तुम्हाला नाही का आई? सांगा बघू मला.”
मालक म्हणाला, “जेशू बाळा, सगळ्यांना अस्त्या आई.”
जेशू म्हणाला, “मग का म्हणता, मलाच आई नाही?”

मालकानं मग विचाऽऽर केला, ढेरीवर फिरवत हात.
म्हणाला, “तुझा मुद्दा आत्ता आलाय माझ्या लक्षात.
आसंल बाबा तुझी बी आई, न्हाई कशाला म्हनू?
येवढा खड्डा खनल्यानंतर दोगं मिळून शोदू.”

जोरजोरात सोंड हलवत ‘नाही, नाही’ बोलला;
“खड्डा खणतो, मालक… पण मग सुट्टी द्या मला.
माझ्या आईला शोधण्यासाठी मीच एकटा जाईन;
काळजी नका करू मालक, लवकर परत येईन.”

मालकाचा पण जीव होता लाडक्या जेशू यंत्रावर;
सोंड त्याची थोपटत बोलला, “जा… मनासारखं कर!”

सुट्टी मिळणार म्हणून त्याचे हेडलाईट चमकू लागले;
दहा फुटांच्या खड्ड्याला आज दहाच मिनिट लागले.
काम संपवून जेशू निघाला आईचा घ्यायला शोध.
मालकानंपण केला नाही त्याला आता विरोध.
मोबाईलमधल्या गुगल बाईंशी केली त्यानं चर्चा,
आणि म्हणाला, “जेशू लेका, तू तर पुन्याकडचा!!
सांगलीपासून पुन्यापतुर अंतर लई न्हाई.
दोन-चार दिवसात पोचून जाशील, काळजी करायची न्हाई.”

जेशू म्हणाला, “काय मालक, चेष्टा माझी करता?
वाऱ्यासारखा जाईन मी, पोहोचेन बघता-बघता…”

पुढची गोष्ट वाचा अमेझॉन किंडलवर -

जेशूची गोष्ट व इतर: Stories in Verse 
(Marathi Edition) by Mandar Shinde

 https://www.amazon.in/dp/B089VKFWJ9



👶🌉⛽🛣🔩🏭👶

- मंदार शिंदे ९८२२४०१२४६


Share/Bookmark

Saturday, November 30, 2019

पडक्या घरातलं भूत...

चला गोष्ट सांगूया...

👻🏚😱👻🏚😱

"पडक्या घरातलं भूत..."
'बालक-पालक संवाद' विशेषांक २०१९ मध्ये प्रकाशित

👻🏚😱👻🏚😱






Share/Bookmark

Wednesday, November 27, 2019

धोकादायक शिवशाही बस बंद करा!!

खालील ई-मेलमध्ये ८ जून २०१९ रोजी दिलेल्या तक्रारीवर कारवाई केली असती तर २५ नोव्हेंबर रोजी पुणे-सांगली शिवशाही बसचा अपघात टाळता आला असता. परंतु ही तक्रार ई-मेलद्वारे प्राप्त होऊनही तिकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष अथवा टाळाटाळ करणाऱ्या MSRTC च्या सर्व अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच शिवशाही बस ताबडतोब सेवेतून काढून टाकण्यात याव्यात!!


**८ जून २०१९ रोजी महामंडळाचे चेअरमन, जनरल मॅनेजर, डेपो मॅनेजर, आणि इतर अधिकाऱ्यांना पाठवलेली ई-मेल...**

शिवशाही बसने प्रवास करतेवेळी नेहमी अडचणी येतात. बसचे ड्रायव्हर नीट बस चालवत नाहीत. बस चांगल्या कंडीशनमध्ये नसतात. एसीचे आऊटलेट तुटलेले असतात. बस बाहेरुन चेपलेल्या, घासलेल्या असतात. खूप प्रवाशांचा हाच अनुभव वेळोवेळी ऐकलेला आहे.

२२/०४/२०१९ रोजी रात्री १२ः०० वाजता मी पुणे - सांगली शिवशाहीने स्वारगेटवरुन निघालो. कात्रजला वर्कशॉपमध्ये ड्रायव्हरने बस थांबवली. टायर पंक्चर आहे हे माहिती असून बस स्वारगेटला आणली होती आणि प्रवासी भरुन आणले होते. तिथून पुढचे दोन तास बस कात्रजच्या घाटाजवळ वर्कशॉपच्या बाहेर मुख्य रस्त्यावर थांबवून ठेवली. जवळ स्वच्छतागृह, उपाहारगृह, पिण्याचे पाणी, काहीही सोय नव्हती. बस हायवेला लावल्याने उतरुन जाणे शक्य नव्हते. रात्री दोन वाजता दुसऱ्या बसमध्ये बसायला सांगितले, मग बस निघाली. ड्रायव्हर चुकीच्या पद्धतीने बस चालवत होते. समोरच्या गाडीच्या अगदी जवळ जात होते. पूर्ण अंतर ब्रेकचा अंदाज येत नसल्यासारखी बस चालवली.

०८/०६/२०१९ रोजी सकाळी ६ः०० वाजता पुणे-मिरज शिवशाहीने स्वारगेटवरुन निघालो. साडेआठच्या सुमारास आणेवाडी टोलनाक्यावर शिवशाहीला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. त्या ट्रकला त्यामागील दुसऱ्या ट्रकने जोरात धडक दिली होती. शिवशाहीचे फार नुकसान झाले नव्हते, पण ड्रायव्हरने बस तिथेच उभी करुन ठेवली. मिरज डेपोला फोन लावत होते, पण कुणी फोन उचलत नव्हते. मी स्वतः पुणे डेपोला फोन लावला. ते म्हणाले, आणेवाडी आमच्या हद्दीत येत नाही, तुम्ही सातारा डेपोला फोन लावा, ते दुसरी गाडी पाठवतील. मी सातारा डेपोला फोन लावला. ते म्हणाले, ड्रायव्हरशी बोलून व्यवस्था करतो. पण शिवशाहीचा ड्रायव्हर फोनवर बोलायला तयार होईना. प्रवाशांची आधी व्यवस्था लावून द्या, मग तुमची प्रक्रिया करा, असे मी त्यांना सांगितले. पण प्रवाशांकडे दुर्लक्ष करुन ते फोनवर नुकसान भरपाईबद्दल बोलत राहिले. मग सातारा ट्रॅफीक पोलिस, ग्रामीण पोलिस, यांना येतील तसे माहिती देत राहिले. दरम्यान मागून दुसरी पुणे - सांगली शिवशाही आली. त्यामध्ये सहा-सात जागा होत्या, पण त्या ड्रायव्हरने गाडी लॉक केली व या ड्रायव्हरसोबत सीटांचा हिशोब करु लागले. शिवशाही बसवर लिहिलेल्या टोल फ्री नंबरवर सतत फोन लावला, पण फोनवर काहीच प्रतिसाद मिळाला नाही. मागून महामंडळाच्या दुसऱ्या गाड्या जात होत्या, पण शिवशाहीच्या ड्रायव्हरने प्रवाशांची सोय करुन देण्यास किंवा दुसरी गाडी मागवण्यास नकार दिला. सातारा डेपोला फोन का करत नाही, दुसऱ्या बसमध्ये व्यवस्था करुन का देत नाही, असे विचारल्यावर उर्मटपणे उत्तरे दिली. शेवटी सातारा पोलिसांनी फोटो वगैरे काढून घेतल्यावर ड्रायव्हरने बस काढली.

१. अपघात झाल्यावर डेपोतून तातडीने सहकार्य करण्याऐवजी हद्दींचे हिशोब का सांगत बसतात ? पुणे डेपोतून सातारा डेपोला फोन करुन गाडीची व्यवस्था का करु शकले नाहीत ?

२. शिवशाहीवर लिहिलेला टोल फ्री नंबर बंद का आहे ? बंद असलेला नंबर बसवर का लिहिला आहे ?

३. हायवेला बस थांबलेली असताना मागून येईल त्या महामंडळाच्या बसमध्ये तातडीने व्यवस्था का होत नाही ? पूर्वी अशी व्यवस्था लगेच व्हायची, तिकीटावर सही करुन लगेच दुसऱ्या गाडीत बसवून द्यायचे. शिवशाहीच्या बाबतीत मात्र अतिशय खराब अनुभव आहेत. शिवशाहीसाठी महामंडळाचे वेगळे नियम आहेत काय ?

४. शिवशाहीचे ड्रायव्हर अतिशय वाईट पद्धतीने बस चालवतात. हायवेला या बसेसच्या रॅश ड्रायव्हींगचा आणि लेन कटींगचा वाईट अनुभव मला स्वतःला अनेक वेळा आलेला आहे. महामंडळाच्या इतर बसचे ड्रायव्हर आणि शिवशाहीचे ड्रायव्हर यांच्यामध्ये एवढा फरक का आहे ? शिवशाहीचे ड्रायव्हर महामंडळाचे कर्मचारी नाहीत काय ?

५. शिवशाहीचा अपघात झाला आहे असे डेपोला कळवल्यावर त्यांनी 'बस मंडळाची आहे की खाजगी' अशी विचारणा का केली ? शिवशाही बस महांमंडळाच्या नाहीत काय ?

**ही ई-मेल मिळाल्याची पोच महामंडळाचे चेअरमन, जनरल मॅनेजर आणि डेपो मॅनेजरकडून मिळाली, पण त्यापुढं कसली चौकशी किंवा कारवाई झाली याबद्दल आजतागायत माहिती मिळालेली नाही...**

मी स्वतः 'शिवशाही'वर व्यक्तिगत बहिष्कार टाकलेला आहे. वेळ लागला तरी चालेल, थोडी गैरसोय झाली तरी चालेल, पण महामंडळाच्या एशियाड किंवा परिवर्तन (लाल डबा) किंवा साध्या गाडीनेच प्रवास करतो. शक्य तितक्या लोकांना 'शिवशाही'मधून प्रवास न करण्याचा सल्ला देतो. विशेष म्हणजे, 'शिवशाही'बद्दल सगळ्याच लोकांच्या तक्रारी आहेत, पण महामंडळ मात्र साध्या गाड्या बंदच करुन 'शिवशाही' वाढवायच्या मागं लागलेलं आहे. 

टाईम्स ऑफ इंडीयाच्या बातमीनुसार, जुलै २०१७ ते ऑक्टोबर २०१९ दरम्यान 'शिवशाही'चे १,०७५ अपघात झाले असून, त्यामधे ५० लोक ठार तर ३६७ लोक जखमी झाले आहेत. एस.टी.चं हे खाजगीकरण प्रवाशांच्या जीवाशी खेळतंय, असं तुम्हाला वाटत नाही का?

तुम्हीसुद्धा 'शिवशाही'बद्दल तुमचे अनुभव आणि तक्रारी नक्की महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडं पाठवा. त्यांचे ई-मेल ऐड्रेस खाली दिले आहेत...

chairmanmsrtc@gmail.com, stcsvo@gmail.com, gmtraffic.msrtc@nic.in, gmplanning@rediffmail.com, msrtcedp@gmail.com, clolegal@rediffmail.com, clo.msrtc@rediffmail.com

======================

ताजा कलम -

नोव्हेंबर २०१९ मध्ये शिवशाही बसला झालेल्या अपघाताबद्दल वरील पोस्ट लिहिली होती. जून २०१९ मध्ये मला आलेल्या अनुभवाबद्दल तक्रारीचा उल्लेख त्यामध्ये केला होता. जून ते नोव्हेंबर एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत फॉलोअप घेतला. जानेवारी २०२० मध्ये संबंधित शिवशाही पुरवठादार कंपनीवर दंडात्मक कारवाई केल्याचे पत्र मिळाले आहे.

सर्वांच्या माहितीसाठी मुद्दाम पत्र इथे शेअर करतोय. पुन्हा सांगतो - लेखी तक्रारीची दखल घ्यावीच लागते. फक्त सोशल मिडीयावर निषेध व्यक्त करुन उपयोग नाही. आपली (लेखी) तक्रार नक्की योग्य अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा.

एस. टी. महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांचे आभार व अभिनंदन!




Share/Bookmark

Saturday, November 23, 2019

अनपेक्षित की बेसावध?

अनपेक्षित की बेसावध - एक थरारक सत्यकथा

लेखकः मंदार शिंदे ९८२२४०१२४६
वाचन वेळः ७ मिनिटे

कॉलेज संपवून नोकरी लागण्याचा काळ. एक-दोन वर्षांचा प्रत्येकाचा अनुभव. वेगवेगळ्या कंपन्या आणि वेगवेगळ्या शिक्ट. पण एका-एका फ्लॅटवर पाच-सात जण एकत्र रहायचो. कुणाची सुट्टी गुरुवारी, तर कुणाची रविवारी. त्यामुळं १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, २ ऑक्टोबर हे राष्ट्रीय सुट्टीचे दिवस सोडून क्वचितच सगळे एकत्र भेटायचो. एखाद्याच्या वाढदिवसाचं आणि ३१ डिसेंबरला न्यू इयरचं निमित्त मात्र अगदीच न चुकवण्यासारखं. सगळेच गाव सोडून आलेले. आपापल्या फॅमिलीपासून लांब राहणारे आणि 'आपली' नवीन फॅमिली वसवण्याच्या प्रयत्नातले…

काही नशीबवान मुलांनी नोकरी मिळाल्यावर वर्षभरातच छोकरी गटवलेली, तर काही जणांनी गावाकडंच शाळा-कॉलेजातली जुनी सेटींग टिकवलेली. काही अगदीच आत्मविश्वास-शून्य मुलांनी मामाची मुलगी वगैरे हेरून ठेवलेली. ग्रुपमध्ये एकमेकांना एकमेकांची ही सगळी सेटींग माहिती असायची. एटीएम कार्डच्या मागं पिन लिहून 'माझेपण पैसे काढून आण' आणि ई-मेल अकाउंटचा पासवर्ड लिहून देऊन 'माझापण बायोडेटा फॉरवर्ड कर' असं विश्वासानं एकमेकांना सांगण्याचा जमाना होता तो. इंटरव्ह्यूला जायचंय म्हणून दहा किलोमीटर जायला आपली बाईक न देणारे मित्र, शंभर किलोमीटरवरुन 'मुलीला' घेऊन यायचंच म्हटल्यावर स्वतः पेट्रोल टाकून गाडीची किल्ली ताब्यात द्यायचे. वरुन काळजीनं विचारायचे सुद्धा - 'एकटाच जाशील का येऊ सोबत?' राष्ट्र निर्मितीच्या कार्यात सहभागी व्हायची संधी सहसा सोडायचे नाहीत असे सच्चे मित्र... मग किल्ली बाईकची असो किंवा फ्लॅटची... असो!!

तर अशाच एका मित्राची एक सेटींग 'जवळ-जवळ' फिक्स झाली होती. आता जवळ-जवळ म्हणजे किती? तर त्याच्या म्हणण्यानुसार ऐंशी टक्के वगैरे फिक्सच... म्हणजे आता कोणत्याही क्षणी शपथविधी, सॉरी सप्तपदी उरकावी लागेल अशी परिस्थिती त्यानं वर्णन केलेली. पण मुलीच्या बाजूनं तशी काही चिन्हं दिसत नव्हती. म्हणजे 'होय' पण म्हणत नव्हती आणि 'नाही' पण म्हणत नव्हती. नुसतीच चर्चा आणि सल्ला-मसलत सुरु होती. वाढदिवसाला केक घेऊन भेटायला यायची, व्हॅलेंटाईन डे साठी ग्रीटींग देऊन जायची. (व्हॉट्सऐप आणि फेसबुक अजून जन्माला यायचे होते.) अशी जवळ-जवळ तयारच होती, पण ऑफिशियली युती जाहीर करायची काही लक्षणं दिसत नव्हती.

ग्रुपमधल्या अनुभवी मित्रांनी या मजनूला साईडला घेऊन समजावला. अनुभवी म्हणजे कसे, तर स्वत: कधीच सरकार स्थापन केलं नसलं तरी, इच्छुक उमेदवारांना स्वखर्चानं आळंदीला नेऊन त्यांचा शपथविधी पार पाडणं, आणि वेळप्रसंगी अशा अल्पमतातल्या सरकारमधला अविश्वास ठराव हाताळून सरकार पडण्यापासून वाचवणं, अशा बाबतीतला दांडगा अनुभव या मित्रमंडळींना होता. तर हे अनुभवी मित्र म्हणाले, गड्या हे काय खरं न्हाई.. तू काम-धंदा, अभ्यास-पाणी सगळं विसरून, आईबापाचा पैसा उडवून आणि कमावत्या मित्रांच्या कमाईचं पेट्रोल जाळून खंगत चाललायस. तुझी स्व-बळावर संसार करायची ताकद न्हाई आन पोरगी लई दिवस हे बघत बसंल असं वाटत न्हाई. तू म्हणतुस तसं जे काय जवळ-जवळ ऐंशी टक्के ठरलंय, त्याच्या फुडचं वीस टक्के तिच्याशी डायरेक बोलून कन्फर्म करुन घे गड्या…

अनुभवी मित्रांचा सल्ला आमच्या कुमार गौरव ऊर्फ तुषार कपूर ऊर्फ स्वप्निल जोशीला पटला. (आमच्या मित्रासाठी हीच तीन नावं 'नमुन्या'दाखल वापरण्याचं विशेष कारण आहे. समजलं तर ठीक, नाहीतर सोडून द्या.) आमच्या हिरोनं हिरोईनकडं डायरेक्ट विषय काढला. समोरून उत्तर आलं, अजून माझं काय ठरलंच नाही. तू आधी शिक्षण पूर्ण कर, मग नोकरी कर, स्व-बळावर उभा रहा, मग मी आमच्या घरच्या आघाडीवर विषय चर्चेला घेते. बहुमताचा कौल बघून ठरवू काय करायचं ते…

मुलगी 'नाही' म्हटली नाही, या आनंदात हिरोनं आम्हाला पार्टी दिली. मुलीनं 'होय' तरी कुठं म्हटलंय, अशी शंका ग्रुपमधल्या राज्यपालांनी बटर पनीरमध्ये बटर रोटी बुडवून खाताना बोलून दाखवली. 'आमचा एकमेकांवर विश्वास आहे' असं म्हणून हिरोनं वेळ मारुन नेली. पनीर आणि रोटी पचायच्या आतच नको ती बातमी आली आणि जवळ-जवळ ऐंशी टक्के फिक्स असलेली आमच्या हिरोची शीट प्रचंड बहुमतानं आपटली.

बातमी अशी होती की, हिरोईनच्या हिरोबरोबर सुरु असलेल्या वाटाघाटी तिच्या घरच्या घटक पक्षांना समजल्या आणि सत्ता हातातून जायच्या आधीच तातडीनं 'राष्ट्रपती राजवट' लागू करत हिरोईनला तिच्या मामाच्या गावी हलवण्यात आलं. इकडं हिरोईनला परत मिळवण्याच्या लढाईची मोर्चेबांधणी करण्यासाठी हिरोनं मित्रपक्षांशी मिटींगा आयोजित केल्या. चहा, मसाला दूध, लिंबू सरबत, देशी-विदेशी थंड-गरम ग्लासांच्या साक्षीनं आणाभाका घेतल्या गेल्या. गनिमी कावा करु, जिंकू किंवा मरू, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, वगैरे प्रेरणादायी घोषणा आणि सुभाषितांची देवाण-घेवाण झाली. पण…

हे सगळं होईपर्यंत शत्रूपक्ष वाट बघत बसणार होता काय? आर्मीनं 'सर्जिकल स्ट्राईक' केल्यागत घाईगडबडीनं मुलीचं लग्नच लावून टाकल्याची बातमी आली. म्हणजे मुलगा शोधला कधी? मुलगी दाखवली कधी? बोलणी केली कधी? देण्या-घेण्याच्या याद्या लिहिल्या कधी? बस्ता आणि टॉवेल-टोपी आणि साड्या-बांगड्या आणि मेंदी-हळदी हे सगळं उरकलं कधी?? का डायरेक्ट शपथविधीच उरकून घेतला राज-भवनावर जाऊन…?

इकडं आमच्या दोस्ताची दाढी झपाट्यानं वाढू लागली. विश्वासघात झाला, दगाफटका झाला, असं तो भेटेल त्याला सांगू लागला. हे लग्न टिकूच शकत नाही, तिला फसवून तिकडं नेलंय, जबरदस्ती लग्न लावलंय, असं ओरडू लागला. आईबापानं केलेली अर्थसंकल्पीय तरतूद सिगारेटवर आणि मित्रांकडून मिळालेला आपत्कालीन रिलीफ फंड पेट्रोलवर जाळू लागला. जे झालं ते अनपेक्षित नव्हतंच, फक्त तू बेसावध राहिलास असं अनुभव मित्रांनी समजावलं... पण 'ती' परत येईल यावर त्याचा पूर्ण विश्वास होता.

आणि झालंही तसंच... पाच दिवस नांदून माहेरी परत आल्यावर तिनं रिक्षा पकडली आणि थेट भेटायलाच आली. अंगावर हिरवी साडी, हातात हिरवा चुडा, गळ्यात मंगळसूत्र. मेंदीचा आणि हळदीचा रंग अजून उतरलासुद्धा नव्हता. नशिबात हेच लिहिलं होतं म्हणाली. सगळं आपल्या मनासारखं होत नसतंय म्हणाली. तुझं भविष्य उज्वल आहे (म्हणजे वर्तमानकाळ अंधकारमय आहे), तुला माझ्यापेक्षा चांगली मुलगी मिळेल (म्हणजे माझा नाद आता सोड), पुढच्या वेळी असा बेसावध राहू नकोस (म्हणजे आधी शपथविधी उरकून घे, नंतर बहुमत सिद्ध करता येतं), असा आयुष्यभर उपयोगी पडणारा धडा शिकवून निघून गेली.

आमचा मित्र ह्यातनं काय शिकला किंवा नाहीच शिकला, हे महत्त्वाचं नाही. आपल्यावर अशी वेळ येऊ नये, म्हणून आपण सावध रहावं यासाठी ही गोष्ट जशी आठवली तशी सांगितली. गोष्ट उलगडून सांगताना राजकीय संदर्भ आणि राजकीय शब्द वापरले असले तरी ही गोष्ट अजिबात राजकीय नाही, ह्याची कृपया नोंद घ्यावी ही विनंती…

- मंदार शिंदे ९८२२४०१२४६
२३/११/२०१९


Share/Bookmark

गझल... - सुधीर इनामदार

(Click on image to read)



Share/Bookmark

चोरीमागची प्रेरणा...

गाण्यांच्या चाली किंवा शब्द चोरण्याबाबत एक किस्सा आहे, आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीतला...

सचिनच्या एका सिनेमासाठी अरुण पौडवाल संगीत दिग्दर्शन करत होते. खूप कष्टानं त्यांनी एक चाल बनवली आणि सचिनला ऐकवली.

ऐकल्याबरोबर सचिन लगेच म्हणाला, ही तर सरळ-सरळ कॉपी आहे.

अरुणजी बुचकळ्यात पडले. त्यांनी तर खूप विचार करुन, प्रयत्न करुन चाल लावली होती. त्यांना सचिनच्या बोलण्याचं वाईट वाटलं.

पण सचिनच्या म्हणण्यानुसार, या नवीन गाण्याच्या ट्युनवरुन कुणीही जुनं ओरिजिनल गाणं लगेच ओळखून दाखवेल... अरुणजींना मात्र सचिन कुठल्या गाण्याबद्दल बोलतोय, काहीच कळेना.

शेवटी जेव्हा सचिननं अरुणजींना ते ओरिजिनल गाणं गाऊन दाखवलं, तेव्हा अरुणजींना प्रचंड आश्चर्य वाटलं. आपल्याला एवढं लोकप्रिय गाणं कसं काय आठवलं नाही आणि एवढ्या प्रसिद्ध गाण्यासारखीच चाल आपल्याला कशी काय सुचली?

यावर अरुणजींचं म्हणणं असं होतं की, आपल्या कानांवर लहानपणापासून काही गीतांचे, सुरांचे, चालींचे, शब्दांचे संस्कार झालेले असतात. त्यांचं प्रतिबिंब कळत-नकळत आपल्या निर्मितीवर पडतच असतं. ते आपण टाळू शकत नाही. मग कुणी त्याला प्रेरणा म्हणेल, कुणी चोरी...

अरुण पौडवालांनी रचलेलं नवीन गाणं होतं - "उधळीत ये रे गुलाल सजणा, तू शाम मी राधिका..."

आणि या गाण्याची चाल ऐकून सचिनला आठवलेलं 'ओरिजिनल' गाणं होतं - "भोली सूरत दिल के खोटे, नाम बडे और दर्शन खोटे..."

(हा किस्सा अरुण पौडवालांनी स्वतः दूरदर्शनवर एका मुलाखतीत सांगितला होता.)


Share/Bookmark

Friday, November 22, 2019

"जो जीता वही सिकंदर…"


२००६ मध्ये आलेला 'रंग दे बसंती' बघितला तेव्हा असं वाटलं की, १९९२ च्या 'जो जीता वही सिकंदर' मधला आमिर एकटाच कॉलेजमध्ये मागं राहिलाय.

त्याच्या सोबतची गँग पुढं निघून गेलीय आणि नवीन कॉलेज स्टुडंटच्या गँगसोबत आमिर तीच दंगा, मस्ती, धुडगूस घालायची परंपरा जपत राहिलाय.

'रंग दे बसंती' मध्ये कॉलेजच्या कॅन्टीनवर आणि आईच्या ढाब्यावर घातलेला धुमाकूळ तर 'जो जीता वही सिकंदर' मधल्या कॅफेतल्या धिंगाण्याची लेटेस्ट आवृत्ती वाटतो.

'जो जीता…' च्या गॅदरिंगमधली टशन ते 'रंग दे…' मधली बियर पिण्याची कॉम्पिटीशन, असं एक आवर्तन पूर्ण झालंय जणू…

वाढलेल्या वयानुसार आणि बदललेल्या परिस्थितीनुसार, पूर्वी सायकल स्पर्धेला जीवन-मरणाचा प्रश्न मानणारी मुलं आता देश बदलायच्या गप्पा मारु लागलेली दिसतात; पण दोन्ही कामांमध्ये तीच दोस्ती, तीच पॅशन, तेच धाडस, तीच जिगर आपल्याला दिसते.

'रंग दे बसंती' मध्ये, देश बदलायची आपली पध्दत चुकली हे मान्य करताना, ही गँग पुन्हा तोच संदेश आपल्याला देऊन जाते, "आम्ही हरलो.. जो जीता वही सिकंदर!"

- मंदार शिंदे ९८२२४०१२४६


Share/Bookmark

Thursday, November 21, 2019

बालहक्क अहवाल प्रकाशन

दि. १९/११/२०१९

बालहक्क कृती समिती अहवालाचे प्रकाशन

    २० नोव्हेंबर १९८९ या दिवशी जगातील निरनिराळ्या देशांच्या अधिकृत प्रतिनिधींनी एकत्र येऊन, लहान मुलांच्या संरक्षण आणि हक्कांच्या पूर्ततेसाठी एका आंतरराष्ट्रीय कायदेशीर आराखड्यास मंजुरी दिली. युनाइटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन दी राइट्स ऑफ दी चाईल्ड अर्थात 'यूएनसीआरसी' या नावाने प्रसिद्ध असलेल्या या करारास २० तारखेला तीस वर्षे पूर्ण होत आहेत. या जागतिक कराराच्या स्थानिक अंमलबजावणीसाठी जगभरात अनेक संस्था आणि संघटना स्थापन करण्यात आल्या. त्यापैकी पुणे आणि महाराष्ट्र पातळीवर कार्यरत असलेली बालहक्क कृती समिती (आर्क) ही एक महत्त्वपूर्ण संघटना आहे.

    १४ नोव्हेंबर बालदिन आणि २० नोव्हेंबर बालहक्क दिनाचे औचित्य साधून, गेल्या ३० वर्षांतील बालहक्क संबंधी घडामोडींचा व सद्यस्थितीचा आढावा घेणारा अहवाल बालहक्क कृती समितीतर्फे प्रसिद्ध करण्यात आला. 'युएनसीआरसी'ची कलमे व भारतातील बालकांचे संरक्षण, शिक्षण, सहभाग, तसेच बालमजुरीसंबंधी कायदे, यांच्या अनुषंगाने प्रबोधन, संशोधन आणि मदत कार्य बालहक्क कृती समितीद्वारे केले जाते. यातील ठळक उपक्रमांचा, तसेच बालकांना त्यांचे हक्क मिळवून देण्याच्या मार्गातील आव्हानांचा आढावा या अहवालात घेण्यात आलेला आहे.

    बाल हक्कांसंबंधी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, शासन, पालक, तसेच समाजातील सर्व घटकांना उपयुक्त माहिती या अहवालातून मिळू शकेल, असे बाल हक्क कृती समितीच्या प्रतिनिधींनी सांगितले. वाढते शहरीकरण व औद्योगिकीकरण, राज्य व देशातील रोजगाराच्या असमान संधी, त्यामुळे वाढत चाललेल्या स्थलांतराशी निगडीत समस्या, तसेच तंत्रज्ञान व पर्यावरण बदलामुळे मुलांच्या विकासामध्ये उभी राहिलेली नवी आव्हाने, यांचा विचार मुलांसोबत काम करताना महत्त्वाचा आहे. बालहक्क कृती समितीच्या सदस्य संस्था या दृष्टीने पुणे आणि परीसरात काम करत करीत आहेत.

    या अहवालाच्या माध्यमातून बालहक्क आणि त्यांच्या अंमलबजावणीतील आव्हाने व उपाययोजना याबाबत माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न बाल हक्क कृती समिती (आर्क) तर्फे करण्यात येत आहे.





Share/Bookmark

Tuesday, November 19, 2019

चला, बालहक्क समजून घेऊया...

संयुक्त राष्ट्र बालहक्क करार - UNCRC ची ३० वर्षे

दि. २०/११/२०१९ ।। मंदार शिंदे ९८२२४०१२४६


    बालहक्कांच्या संरक्षणासाठी वचनबद्ध देशांनी एकत्र येऊन 'युनाइटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन राईट्स ऑफ दी चाईल्ड' अर्थात UNCRC किंवा CRC हा महत्वपूर्ण करार मान्य केला. मूल कुणाला म्हणावे, त्यांना नेमके कोणते हक्क असतात, आणि सहभागी देशांमधील संबंधित सरकारांनी नेमक्या कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात, याबाबत स्पष्टीकरण UNCRC मध्ये देण्यात आलेले आहे. हे सर्व हक्क एकमेकांशी संबंधित असून, यापैकी प्रत्येक हक्काचे समान महत्व आहे आणि मुलांना या हक्कांपासून कुणीही वंचित ठेऊ शकत नाही, अशी या कराराची संकल्पना आहे.

    बरोबर ३० वर्षांपूर्वी, २० नोव्हेंबर १९८९ या दिवशी जागतिक स्तरावरील नेत्यांनी एकत्र येऊन जगभरातील मुलांना एक ऐतिहासिक वचन दिले - एका आंतरराष्ट्रीय कायदेशीर आराखड्याच्या, म्हणजेच UNCRC च्या माध्यमातून प्रत्येक बालकाच्या हक्कांचे संरक्षण आणि पूर्तता करण्याचे वचन.

    या UNCRC चे नेमके म्हणणे काय आहे? तर मुले ही आपल्या पालकांच्या मालकीच्या वस्तू नव्हेत की ज्यांच्यासाठी सर्व निर्णय मोठ्यांनीच घ्यावेत. तसेच, मुले म्हणजे फक्त मोठे होण्याची वाट बघणाऱ्या आणि मोठेपणी कसे वागावे याची तयारी करणाऱ्या व्यक्ती नव्हेत. त्यांनाही आपले स्वतंत्र अस्तित्व आणि हक्क असतात. वयाच्या १८व्या वर्षापर्यंतच्या बालपणाला प्रौढ अवस्थेपेक्षा पूर्णपणे वेगळे समजले जावे, असे या करारात म्हटले आहे. बालपणीचा काळ विशेष आणि सुरक्षित असावा, ज्यामध्ये मुलांना सन्मानाने वाढू द्यावे, शिकू द्यावे, खेळू द्यावे, खुलू द्यावे आणि फुलू द्यावे.


UNCRC मधील कलमेः

१. मूल म्हणजे नक्की कोण: १८ वर्षांपेक्षा कमी वयाची कोणतीही व्यक्ती.

२. भेदभावास मनाई: ओळख, ठिकाण, भाषा, धर्म, विचार, रंगरूप, अपंगत्व, आर्थिक स्थिती, कौटुंबिक पार्श्वभूमी, कुटुंबाच्या श्रद्धा आणि कौटुंबिक व्यवसाय यावरून भेदभावास मनाई. कोणत्याही कारणाने कोणत्याही बालकास अन्यायकारक पद्धतीने वागविले जाऊ नये.

३. मुलांच्या सर्वोच्च हिताचा विचार: प्रौढांनी आणि शासनाने आपण घेत असलेल्या निर्णयांचा मुलांवर काय परिणाम होईल याचा विचार कोणताही निर्णय घेताना करावा.

४. बालहक्कांची प्रत्यक्ष अंमलबजावणीः आपल्या देशातील प्रत्येक बालकास या करारातील सर्व हक्कांचा लाभ घेता यावा याची काळजी संबंधित शासनाने घ्यावी.

५. मुलांच्या विकासात कुटुंबाचे मार्गदर्शन: आपले हक्क उत्तम रीतीने कसे वापरावे याबाबत आपल्या मुलांना मार्गदर्शन करण्याचे काम शासनाने मुलांच्या कुटुंबांना व लोकसमूहांना करु द्यावे.

६. जिवंत राहणे आणि विकसित होणे: प्रत्येक बालकास जिवंत राहण्याचा हक्क आहे. उत्तम रीतीने मुलांचे अस्तित्व टिकवण्याची व त्यांचा विकास घडवण्याची काळजी शासनाने घ्यावी.

७. नाव आणि राष्ट्रीयत्वः मुलांची जन्मानंतर नोंदणी करण्यात यावी व शासनाची अधिकृत मान्यता असणारे एक नाव ठेवण्यात यावे. मुलांना स्वतःचे राष्ट्रीयत्व  असावे (म्हणजेच कोणत्यातरी देशाचे नागरिक म्हणून त्यांना ओळख मिळावी). 

८. ओळख: मुलांना स्वतःची स्वतंत्र ओळख प्राप्त करण्याचा हक्क आहे, म्हणजेच त्यांचे नाव, राष्ट्रीयत्व आणि  कौटुंबिक नातेसंबंधांची अधिकृत नोंद केलेली असावी.

९. कुटुंब एकत्र राखणे: मुलांची व्यवस्थित काळजी घेतली जात नसेल अशा परिस्थितीव्यतिरिक्त केव्हाही मुलांना त्यांच्या पालकांपासून दूर करू नये.

१०. भिन्न देशांमधील पालकांशी संपर्क: वेगवेगळ्या देशांमध्ये  राहत असलेल्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी व एकमेकांसोबत राहण्यासाठी प्रवास करण्याची परवानगी संबंधित देशांच्या  शासनांकडून देण्यात यावी.

११. अपहरणापासून संरक्षणः कायद्याचे उल्लंघन करून मुलांना देशाबाहेर घेऊन जाण्याचे प्रकार संबंधित देशांच्या शासनांनी घडू देऊ नयेत.

१२. मुलांच्या मतांचा आदर: मुलांवर परिणाम करणाऱ्या मुद्यांवर मोकळेपणाने मत प्रदर्शित करण्याचा हक्क प्रत्येक बालकास आहे. मोठ्या माणसांनी मुलांचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि मुलांच्या मतांचा गांभीर्याने विचार करावा.

१३. मोकळेपणाने विचार मांडणे: आपण शिकलेल्या गोष्टी, आपले विचार आणि आपल्या भावना इतरांजवळ मोकळेपणाने व्यक्त करण्याचा हक्क मुलांना आहे.

१४. वैचारिक आणि धार्मिक स्वातंत्र्य: मुले आपले स्वतःचे विचार, मते आणि धर्म निवडू शकतात.

१५. समूह निर्मिती अथवा सहभागः मुले कोणत्याही समूहात अथवा संस्थेत सहभागी होऊ शकतात किंवा नवीन संस्था अथवा समूह निर्माण करून इतरांशी भेटीगाठी करू शकतात.

१६. खाजगीपणाचे संरक्षण: प्रत्येक बालकास आपले खाजगीपण जपण्याचा हक्क आहे.

१७. माहिती प्राप्त करणे: इंटरनेट, रेडीयो, टेलिव्हिजन, वर्तमानपत्रे, पुस्तके आणि इतर स्रोतांद्वारे माहिती मिळवण्याचा हक्क मुलांना आहे.

१८. पालकांची जबाबदारी: पालकांनी आणि सांभाळ करणाऱ्यांनी नेहमी मुलांसाठी काय सर्वोत्तम राहील याचा विचार करावा. यासाठी संबंधित शासनाने त्यांना मदत करावी.

१९. हिंसेपासून संरक्षणः संबंधित शासनाने मुलांचे हिंसेपासून व अत्याचारापासून रक्षण करावे, तसेच मुलांची काळजी घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून मुले दुर्लक्षित राहणार नाहीत याची काळजी घ्यावी.

२०. कुटुंबाचा आधार नसलेली मुले: आपल्या स्वतःच्या कुटुंबाकडून ज्यांची काळजी घेतली जाऊ शकत नाही अशा  मुलांना इतर लोकांनी व्यवस्थित आणि आदराने सांभाळावे, अशा प्रत्येक बालकाचा तो हक्क आहे.

२१. दत्तक गेलेली मुलेः दत्तक गेलेल्या मुलांसाठी जे काही सर्वोत्तम असेल ते केले जाणे महत्त्वाचे आहे.

२२. निर्वासित मुले: निर्वासित म्हणून दुसऱ्या देशात आश्रयाला आलेल्या मुलांना मदत आणि संरक्षण दिले जावे. त्या देशात जन्माला आलेल्या मुलांप्रमाणेच सर्व हक्क या मुलांनाही मिळावेत.

२३. दिव्यांग मुलेः अशा मुलांना स्वावलंबी बनता यावे आणि समाजात सक्रिय सहभाग घेता यावा, यासाठी कोणतेही अडथळे राहू नयेत याची काळजी संबंधित शासनाने घ्यावी.

२४. आरोग्य, पाणी, अन्न, पर्यावरण: सर्वोत्तम आरोग्य सेवा, स्वच्छ पाणी, पौष्टिक अन्न आणि स्वच्छ व सुरक्षित पर्यावरण मिळवण्याचा प्रत्येक बालकास हक्क आहे.

२५. मुलांना ठेवलेल्या ठिकाणाची तपासणीः संगोपन, संरक्षण किंवा आरोग्याच्या कारणावरून घरापासून दूर कुठेतरी ठेवण्यात आलेल्या मुलांच्या परिस्थितीची नियमितपणे तपासणी केली जावी आणि संबंधित मुलास ठेवण्यासाठी अजूनही तीच सर्वोत्तम जागा आहे का, याची खात्री केली जावी.

२६. सामाजिक व आर्थिक मदतः संबंधित शासनाने गरीब कुटुंबातील मुलांना पैसे किंवा इतर मदत पुरवावी.

२७. अन्न, वस्त्र, सुरक्षित निवाराः अन्न, वस्त्र आणि राहण्यासाठी सुरक्षित जागा मिळवण्याचा प्रत्येक बालकास हक्क आहे.

२८. शिक्षण प्राप्त करणे: प्रत्येक बालकास शिक्षण घेण्याचा हक्क आहे. प्राथमिक शिक्षण मोफत दिले जावे. माध्यमिक आणि उच्च शिक्षण प्रत्येक बालकास उपलब्ध करून दिले जावे.

२९. शिक्षणाची उद्दीष्टे: मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या व्यक्तिमत्व, कौशल्य आणि क्षमतांचा पूर्ण विकास घडवण्यासाठी मदत मिळावी.

३०. अल्पसंख्य संस्कृती, भाषा आणि धर्म: अल्पसंख्य असूनही आपली स्वतःची भाषा, संस्कृती आणि धर्माचे आचरण करण्याचा सर्व मुलांना हक्क आहे.

३१. आराम, खेळ, संस्कृती, कला: प्रत्येक बालकास विश्रांती घेण्याचा, आराम करण्याचा, खेळण्याचा, तसेच सांस्कृतिक आणि सृजनात्मक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचा हक्क आहे.

३२. धोकादायक कामापासून संरक्षण: मुलांच्या शिक्षण, आरोग्य किंवा विकासासाठी धोकादायक किंवा वाईट असलेले काम करण्याविरुद्ध संरक्षण मिळवण्याचा सर्व मुलांना हक्क आहे.

३३. धोकादायक औषधांपासून संरक्षणः शासनाने धोकादायक औषधांचे सेवन, निर्मिती, वाहतूक किंवा विक्री करण्यापासून मुलांचे संरक्षण करावे.

३४. लैंगिक अत्याचारापासून संरक्षण: शासनाने लैंगिक पिळवणूक व लैंगिक अत्याचारापासून मुलांचे संरक्षण करावे.

३५. मानवी विक्री आणि तस्करीस प्रतिबंध: मुलांचे अपहरण आणि विक्री होऊ नये याची काळजी शासनाने घ्यावी.

३६. पिळवणुकीपासून संरक्षणः सर्व प्रकारच्या पिळवणुकीपासून संरक्षण मिळवण्याचा प्रत्येक बालकास हक्क आहे.

३७. ताब्यात घेतलेली मुलेः कायदा तोडल्याच्या आरोपाखालील मुलांना ठार मारले जाऊ नये, त्यांचा छळ केला जाऊ नये, त्यांना कायमचे तुरूंगात डांबू नये, किंवा प्रौढ व्यक्तींसोबत तुरुंगात ठेवू नये.

३८. युध्दकाळातील संरक्षण: युध्दकाळामध्ये संरक्षण मिळवण्याचा सर्व मुलांना हक्क आहे.

३९. बरे होऊन पूर्वस्थितीला येणे: जखमी झालेल्या, दुर्लक्षित केल्या गेलेल्या, वाईट पद्धतीने वागवल्या गेलेल्या किंवा युध्दग्रस्त मुलांना आपले आरोग्य आणि आत्मसन्मान पूर्वस्थितीला आणण्यासाठी मदत मिळवण्याचा हक्क आहे.

४०. कायदा तोडणारी मुले: कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखालील मुलांना कायदेशीर सहाय्य आणि न्यायपूर्ण वागणूक मिळवण्याचा हक्क आहे.

४१. मुलांसाठी सर्वोत्तम कायद्यांची अंमलबजावणीः जर एखाद्या देशातील कायदे या करारापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने बाल हक्कांचे संरक्षण करत असतील, तर त्याच कायद्यांची अंमलबजावणी करण्यात यावी.

४२. प्रत्येक व्यक्तीस बालहक्क माहिती व्हावेत: या कराराबद्दल आणि बालहक्कांबद्दल माहिती प्रत्येक शासनाने मुले आणि मोठ्या माणसांपर्यंत स्वतःहून पोहोचवावी.

४३. या कराराची कार्यपद्धती (४३ ते ५४): सर्व मुलांना आपल्या सर्व हक्कांचा लाभ घेता यावा यासाठी संबंधित शासनव्यवस्था, बालहक्क समिती आणि युनिसेफ यांच्यासहीत संयुक्त राष्ट्रसंघ, तसेच इतर संस्था कशाप्रकारे काम करतात याची माहिती या कलमामध्ये देण्यात आलेली आहे.


मागील ३० वर्षांमधील वाटचालः

    UNCRC हा आतापर्यंत सर्वात जास्त मान्यता प्राप्त झालेला मानवी हक्क संबंधी करार आहे. या कराराने संबंधित शासनव्यवस्थेला कायदे आणि धोरणे बदलण्यासाठी, तसेच प्रत्येक बालकास सर्वोत्तम आरोग्य सेवा आणि पोषण पुरविण्यावर गुंतवणूक करण्यासाठी प्रेरणा दिली आहे. या करारामुळे मुलांचे हिंसेपासून व पिळवणुकीपासून संरक्षण करण्यासाठी अधिक कडक उपाययोजना करणे भाग पडले आहे. तसेच या करारामुळे मोठ्या प्रमाणावर मुलांना आपले म्हणणे मांडता आले असून, आपल्या समाजातील त्यांचा सहभाग वाढला आहे.

    काही बाबतीत अशी प्रगती झालेली असली तरी, अजूनही UNCRC ची संपूर्ण अंमलबजावणी अथवा सर्वत्र प्रचार आणि प्रसार झालेला नाही. पुरेशा आरोग्य सेवा, पोषण, शिक्षण आणि संरक्षण न मिळाल्याने लाखो मुलांच्या हक्कांचे उल्लंघन होतच आहे. शाळा सोडणे, धोकादायक काम करणे, लग्न करणे, युद्धामध्ये लढणे भाग पाडले गेल्याने, तसेच प्रौढांसाठीच्या तुरुंगांमध्ये डांबून टाकल्याने मुलांचे बालपण अर्ध्यातूनच कुजून जात आहे.

    यासोबतच, डिजिटल तंत्रज्ञानाचा उदय, पर्यावरणीय बदल, दीर्घकाळ चालणारे संघर्ष आणि समूह स्थलांतर, अशा जागतिक बदलांमुळे बालपणाचे संदर्भ पूर्णपणे बदलून जात आहेत. आजच्या मुलांसमोर त्यांच्या हक्कांच्या आड येणारे नवे धोके उभे ठाकले आहेत, परंतु त्याचवेळी आपले हक्क प्रत्यक्षात उतरवण्याच्या नवीन संधीदेखील त्यांच्या समोर आहेत.

गेल्या ३० वर्षांच्या कालावधीत, जागतिक स्तरावर मुलांच्या आयुष्यामध्ये पुढीलप्रमाणे परिवर्तन घडून आले आहे:

- १९९० पासून ५ वर्षांखालील मुलांच्या मृत्युंमध्ये ५०% पेक्षा जास्त घट;
- १९९० पासून कुपोषित मुलांच्या प्रमाणात जवळजवळ ५०% घट;
- १९९० च्या तुलनेत कितीतरी जास्त लोकांना आज शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध.

परंतु असे असले तरी, जगभरातील बालकांवर पुढील धोक्यांचे सावट अजूनही दिसत आहेः

- २६.२ कोटी मुले आणि युवक शालेय शिक्षणापासून वंचित;
- ६५ कोटी मुली आणि महिलांचे वयाची १८ वर्षे पूर्ण होण्याआधीच लग्न;
- २०४० सालापर्यंत, जवळपास २५% मुले अत्यंत मर्यादित पाणीसाठा असलेल्या क्षेत्रामध्ये राहत असतील.


UNCRC आणि भारत:

    भारताने ११ डिसेंबर १९९२ रोजी UNCRC चा स्वीकार केला, ज्यामध्ये बालमजुरीसंदर्भातील काही मुद्यांवरील विशिष्ट मतभेद वगळता सर्व कलमांना तत्वत: मंजुरी देण्यात आली.

    भारतामध्ये १८ वर्षे वयाखालील मुलांना काम करण्यास प्रतिबंध करणारा कायदा आहे, परंतु बालमजुरीवर सरसकट बंदी मात्र नाही. 'धोकादायक' मानल्या गेलेल्या उद्योगांव्यतिरिक्त इतर जवळपास सर्व उद्योगांमध्ये १८ वर्षांखालील मुलांना कामावर ठेवण्यास सर्वसाधारणपणे मान्यता आहे. ऑक्टोबर २००६ मध्ये आलेल्या एका कायद्यानुसार, हॉटेल, उपहारगृहे, आणि घरगुती कामासाठी नोकर म्हणून बालमजूर ठेवण्यास बंदी घालण्यात आली असली तरी, घरकामात मदत करण्यासाठी मुलांना अजूनही मोठया प्रमाणावर मागणी असल्याचे दिसून येते. अगदी शासकीय आकडेवारीवर विश्वास ठेवला तरीदेखील, देशातील सध्याच्या १४ वर्षांखालील बालमजुरांची संख्या ४० लाखांपर्यंत असल्याचे समजते.

    २०१६ सालच्या बालमजुरी प्रतिबंधक कायद्यामध्ये १४ वर्षे वयाखालील मुलांना नोकरीवर ठेवण्यास मनाई करण्यात आली, तसेच किशोरवयीन (१४ ते १७ वयोगटातील) मुलांच्या धोकादायक व्यवसायातील कामावर बंदी घालण्यात आली. १४ वर्षांखालील मुलांनी काम करण्याच्या बाबतीत काही अपवाद नोंदवण्यात आले, जसे की कुटुंबाच्या व्यवसायात मदत करणे, आणि त्यांच्या शालेय शिक्षणामध्ये अडथळा न आणता व संध्याकाळी ७ ते सकाळी ८ ही वेळ सोडून इतर वेळेत मनोरंजनाच्या उद्योगात काम करणे.

    बालमजुरीच्या मुद्यावर भारताचे UNCRC सोबत मतभेद आहेतच, परंतु याशिवाय भेदभावास प्रतिबंध, जीवनावश्यक वातावरणाची निश्चिती, विकासाच्या समान व पुरेशा संधी, मुलांच्या मतांचा आदर, वैचारिक आणि धार्मिक स्वातंत्र्य, खाजगी आयुष्याची जपणूक, शिक्षण व माहिती मिळवण्याचा अधिकार, हिंसा, धोकादायक काम, लैंगिक छळ आणि पिळवणुकीपासून संरक्षण अशा हक्कांचा लाभ देशातील सर्व मुलांना मिळवून देण्यातही गेल्या ३० वर्षांत शासनाला यश आलेले नाही.

    UNCRC ने जागतिक स्तरावर मान्य केलेले हक्क आपल्या देशातील मुलांना मिळत नसल्याच्या मुद्यावर पालक, मुलांचे सांभाळकर्ते, तसेच समाजातील सजग नागरिकांनी मुलांच्या वतीने शासनाला जाब विचारण्याची जबाबदारी स्विकारली पाहिजे. तसेच, या बालहक्कांबद्दल मुलांना आणि एकूणच समाजाला माहिती मिळावी यासाठी शासनाने आणि माध्यमांनी स्वतःहून विशेष प्रयत्न करायची गरज आहे.


- मंदार शिंदे
९८२२४०१२४६
shindemandar@yahoo.com

(Click on the image to read)



Share/Bookmark

Wednesday, November 13, 2019

वारुची गोष्ट

चला गोष्ट सांगूया…

✈🛩👩‍✈👨‍👧👩‍✈🛩✈

वारुची गोष्ट
(लेखकः मंदार शिंदे 9822401246)

एक होतं विमान, नाव त्याचं वारु;
उडण्याचं काम अजून व्हायचं होतं सुरु.
चकचकीत पोलादाची होती त्याची बॉडी;
वयाच्या मानानं मात्र बरीच होती जाडी.
जाडजूड लांब-रुंद वारु सुखात होता;
उडण्याची वेळ येऊच नये, विचार करत होता.
बसवलेले होते त्याला जरी मोठ्ठे पंख;
हवेत उडायच्या विचारानं डोकंच व्हायचं बंद.
खरंच सांगतो वारुचं हे वागणं होतं विचित्र;
हवेत उडायला घाबरणारं हे विमान होतं भित्रं.

पुढची गोष्ट वाचा अमेझॉन किंडलवर -

जेशूची गोष्ट व इतर: Stories in Verse 
(Marathi Edition) by Mandar Shinde

 https://www.amazon.in/dp/B089VKFWJ9


✈🛩👩‍✈👨‍👧👩‍✈🛩✈

- मंदार शिंदे 9822401246


Share/Bookmark

Monday, November 4, 2019

गाडी बुला रही है...


"गाडी बुला रही है…"
🚂🚂🇿🇦🇮🇳📚📚🚂🚂
- मंदार शिंदे ९८२२४०१२४६

या फोटोमध्ये दिसणारी ट्रेन साधीसुधी ट्रेन नाही. एका माणसाचं आणि दोन देशांचं आयुष्य बदलून टाकणारी ट्रेन आहे ही. याच ट्रेनमधून, मोहनदास करमचंद गांधी नावाच्या माणसाला प्रस्थापित व्यवस्थेनं प्लॅटफॉर्मवर ढकलून दिलं आणि त्याच प्लॅटफॉर्मवर आयुष्यातलं खूप मोठं सत्य त्याला भेटलं. 'मोहनचा महात्मा' होण्याची खरी प्रक्रिया इथूनच सुरू झाली, असं मानलं जातं.

नाही, या फोटोमधे दिसणारी ट्रेन खरीखुरी ट्रेन नाही आणि हा प्लॅटफॉर्मसुद्धा दक्षिण आफ्रिकेतला नाही. नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरच्या 'इस्पॅलियर हेरिटेज स्कूल' या शाळेच्या आवारात ही रचना केली आहे शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांनी!

दगडाच्या मूर्तीला देवाची प्रतिकृती न मानता देवच समजून तिला मनोभावे पूजणारी आपली संस्कृती. अशा संस्कृतीमध्ये, मोहनचा महात्मा करणाऱ्या ट्रेनची ही 'प्रतिकृती' आहे, असं मला म्हणावंसं वाटत नाही. या ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर उतरलं की समोरच्या विस्तीर्ण पटांगणात महात्मा गांधींचं जगातील पहिलं भव्य धातू स्तंभ शिल्प, सचिन जोशी आणि श्याम लोंढे या मित्रांनी उभं केलेलं दिसतं.

महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रभावित होऊन, शिक्षण क्षेत्रात अनेक व्यावहारिक प्रयोग करीत, 'इस्पॅलियर' नावाची ही प्रयोगशील शाळा सचिन जोशी चालवतात. झाडा-झुडपांना स्वतःच्या कलानं वाढू देण्यासाठी फक्त आधाराला उभी केलेली भिंत किंवा रचना असा 'इस्पॅलियर' या मूळ फ्रेंच शब्दाचा अर्थ. शाळेच्या नावावरून इथल्या शिक्षणपद्धतीचा अंदाज आला असेल तुम्हाला. 'इस्पॅलियर हेरिटेज स्कूल'च्या संपूर्ण परिसरात शिक्षणाबद्दलच्या इतक्या अभिनव संकल्पना प्रत्यक्षात आणलेल्या आहेत की, या परिसरात एखाद्या मुलाला कुठल्याही सूचनांशिवाय फक्त फिरू दिलं तरी ते खूप काही शिकून जाईल. मुलंच कशाला, मोठ्या माणसांनीसुद्धा शिकण्यासारख्या असंख्य गोष्टी या वास्तूच्या काना-कोपऱ्यात पेरून ठेवलेल्या आहेत.

शाळेच्या भिंतीवर रंगवलेली पुस्तकांची कव्हर्स, गोथिक शैलीतल्या बांधकामात बसवलेले रविंद्रनाथ टागोरांचे ग्रीक तत्वज्ञांसारखे शिल्प, लपाछपी खेळण्यासाठी आणि गोष्टी सांगण्या-ऐकण्यासाठी खास सीतागुंफेसारख्या बनवलेल्या छोट्या-छोट्या जागा, झाडाखालचा वर्ग, वरच्या मजल्यावरून खाली यायला घसरगुंडी, भिंतीमध्ये कोरलेली महत्त्वाची ऐतिहासिक सामाजिक घटना-चित्रं, अशी अनेक उदाहरणं देता येतील. पण त्याबद्दल वाचून किंवा फोटो बघून या गोष्टी समजणार नाहीत. त्या प्रत्यक्ष जाऊन अनुभवल्याच पाहिजेत.

तशीच ही मोहनचा महात्मा बनवणारी ट्रेन आणि त्या ट्रेनच्या बोगीत रचलेली शाळेची लायब्ररी! अशी ट्रेन आणि असा प्लॅटफॉर्म प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी अनुभवायला मिळतो, पण त्या प्रत्येक मोहनचा महात्मा नाही होत. मग 'त्या' मोहनचा महात्मा करणारी ही ट्रेन प्रत्येकानं किमान बघून तरी यावी, मनात साठवावी. त्या प्लॅटफॉर्मवरच्या बाकड्यावर एकट्यानं बसून आपल्या आयुष्यातला 'ट्रेन प्रसंग' आठवावा आणि आपल्या आत्म्याला त्या महात्म्याशी जोडण्याचा प्रयत्न करावा…

- मंदार शिंदे ९८२२४०१२४६
०१/११/२०१९


Share/Bookmark

Tuesday, October 29, 2019

गोष्ट बायकांच्या बस प्रवासाची...

गोष्ट बायकांच्या बस प्रवासाची

- मंदार शिंदे ९८२२४०१२४६
(वाचन वेळः ६ मिनिटे)

संगीताचा नवरा एका कंपनीत नोकरी करतो. घरापासून कंपनी दहा-बारा किलोमीटर अंतरावर आहे. रोज कंपनीत जाऊन परत यायला साधारण अर्धा लीटर पेट्रोल बाईकमधे टाकावं लागतं. म्हणजे जवळपास रोजचे चाळीस रुपये खर्च होतात. महिन्याचे साधारण एक हजार रुपये.

दहा-बारा हजार रुपये पगारावर काम करणाऱ्या संगीताच्या नवऱ्याला हे प्रवासाचे हजार रुपये परवडत नाहीत, पण त्याशिवाय तो कामावर जाऊच शकणार नाही. नाईलाज आहे.

संगीतासुद्धा कामाला जाते, पण ती कुठल्या कंपनीत नोकरीला नाही.

सकाळी लवकर तीन-चार ऑफीसेसमधे साफसफाईचं काम असतं. डॉक्टरांचं क्लिनिक, सीए साहेबांचं ऑफीस, कोचिंग क्लासेस, अशा ठिकाणी तिला सकाळी दहा वाजेपर्यंत काम संपवावं लागतं. कालचा दिवसभर साठलेला कचरा टाकणं, झाडून-पुसून ऑफीस स्वच्छ करणं, टेबलं आणि खिडक्यांच्या काचा रोज साफ करणं, असं साधारणपणे काम असतं.

दुपारच्या वेळेत एका पाळणाघराची सफाई आणि संध्याकाळी एक-दोन कामं उरकून संगीता घरी येते.

संगीता काम करत असलेलं पाळणाघर तिच्या घरापासून सगळ्यात लांब म्हणजे पाच किलोमीटर अंतरावर आहे. पण वेगवेगळ्या ऑफिसच्या वेगवेगळ्या बिल्डींग एकमेकांपासून लांब-लांब आहेत. हिशोबच केला तर दिवसभरात संगीताला सुद्धा पंधरा-वीस किलोमीटरचा प्रवास पडतो.

पण संगीताकडं स्वतःची गाडी नाही आणि बसमधे एकदा बसलं की दहा रुपयांचं तिकीट काढायला लागतं. दिवसातून पाच-सहा वेळा चढ-उतार करून पन्नास-साठ रूपये खर्च करणं तिला शक्य नाही. सगळीकडची कामं धरून तिचं महिन्याचं उत्पन्न सहा-सात हजारांच्या आतच आहे.

कधीतरी खूपच दमायला झालं तर संगीता बस स्टॉपवर जाऊन थांबते. पण मग स्टॉपच्या समोर लावलेलं मोठ्ठं होर्डींग तिला दिसतं. एक आई आपल्या मुलाला हॉर्लिक्स घालून दुधाचा ग्लास देताना दिसते. किंवा किंडरजॉय चॉकलेटसाठी हट्ट करणारा मुलगा आणि कौतुकानं त्याला किंडरजॉय घेऊन देणारी आई दिसते. मग संगीता पुन्हा चालत-चालत घरी जायला निघते. बस तिकीटाच्या वाचवलेल्या दहा रुपयांची इवलीशी कॅडबरी मुलासाठी आठवणीनं घेऊन जाते.

नेहा एका सॉफ्टवेअर कंपनीत जॉब करते. नेहाचा नवरा एका बँकेत जॉब करतो. नेहाची कंपनी आणि तिच्या नवऱ्याची बँक घरापासून पंधरा-वीस किलोमीटर अंतरावर आहेत. नेहाकडं स्वतःची स्कूटी आहे आणि तिच्या नवऱ्याकडं बाईक आहे.

नेहाचा नवरा रोज बँकेत बाईक घेऊन जातो. त्याच्या बाईकचं ऐव्हरेज चांगलं आहे. नेहाची कंपनी छोटी आहे, त्यामुळं कॅब वगैरे न्यायला येत नाही. स्कूटीचं ऐव्हरेज कमी असल्यामुळं ती परवडत नाही. नेहाला दोनदा बस बदलून ऑफीसला जावं लागतं.

येताना कधी-कधी नेहाचा नवरा तिला पिक-अप करतो, पण त्याच्या सोयीनुसार! बहुतेक वेळेला त्याला बँक बंद झाल्यावर मित्रांसोबत पार्टीला 'जावं लागतं'. नेहाला आवडत नसताना बसचा प्रवास करावा लागतो. दोन बस बदलल्यामुळं तिकीटाचे पैसेसुद्धा जास्तच खर्च होतात.

महिन्याच्या जमा-खर्चाचा हिशोब मांडला की नेहा आणि तिच्या नवऱ्याची नेहमी भांडणं होतात. नेहाचा पगार तिच्या नवऱ्याच्या पगारापेक्षा कमी असूनसुद्धा तिचा रोजचा बस तिकीटांचा खर्च त्याच्या बाईकच्या पेट्रोल खर्चापेक्षा जास्त होतो. यावरून तिचा नवरा कधी चेष्टेत तर कधी रागानं तिला बोलतो. होम-लोनचे हप्ते सुरु असल्यानं नेहाला जॉब सोडणंसुद्धा शक्य होत नाही.

यावर नेहानंच एक उपाय शोधून काढलाय. ऑफीसपासून घराच्या उलट्या दिशेनं अर्धा-एक किलोमीटर चालत गेलं की मोठा चौक लागतो. तिथून तिच्या घराच्या दिशेनं जाणारी बस मिळू शकते.

आता ऑफिसच्या दारातून बस पकडून नंतर दुसरी बस पकडण्याऐवजी, नेहा रोज सकाळ-संध्याकाळ एक-एक किलोमीटर चालत जाते. चालण्याचा आणि स्टॉपवर बसची वाट बघण्याचा तासभर वेळ जास्त जातो खरा, पण दोनऐवजी एकाच बसचं तिकीट काढायला लागतं. असं करून महिन्याचा प्रवासखर्च एकाच महिन्यात तिनं निम्म्यावर आणून ठेवलाय. आयताच व्यायाम होतोय याचं समाधानही आहेच.

दोघांचा मिळून महिन्याचा प्रवासखर्च कमी झाला म्हणून नेहाचा नवरा खूष आहे. याच महिन्यात त्याचं प्रमोशनसुद्धा ड्यू आहे. आपण वरची पोस्ट घ्यायला लायक आहोत हे इम्प्रेशन मॅनेजमेंटवर पाडण्यासाठी त्यानं कार घ्यायचं ठरवलंय. कार लोनसाठी अप्लायसुद्धा केलंय. नेहा तसाही बसच्या तिकिटांवर खर्च करत असते, म्हणून तिची 'पडून राहिलेली' स्कूटी विकून कारच्या डाऊन पेमेंटची तयारी तिचा नवरा करतोय.

रचनाच्या कॉलेजचा ग्रुप नाट्यस्पर्धेत उतरतोय. तालमीला कॉलेजजवळ जागा मिळत नाही, म्हणून एका ग्रुप मेम्बरच्या सोसायटीत गच्चीवर तालमी करायचं ठरलंय. पण ती सोसायटी शहरापासून थोडी लांब आहे. रचनाच्या घरापासून तर कॉलेज दहा किलोमीटर आणि तालमीचं ठिकाण तिथून पुढं दहा किलोमीटर.

घरून नाटकात काम करायला विरोध नाही, पण बसनं प्रवास करायचा म्हणजे अजून पैसे खर्च होणार. कॉलेज संपल्यावर कुणाच्या तरी गाडीवर बसून जायचा विचार केला. पण बाकीचे सगळे तिकडच्याच भागात राहणारे. त्यामुळं तालमीनंतर एकटीलाच बसनं परत येणं भाग पडणार!

कॉलेजचं अजून एक वर्ष बाकी आहे. शेवटच्या वर्षी प्रोजेक्ट वगैरेसाठी जास्त पैसे खर्च होणारच आहेत. शिवाय वर्षभर वह्या-पुस्तकं, सहली, गॅदरिंग, काही ना काही खर्च असतातच. धाकटा भाऊसुद्धा दहावीत आहे. त्याच्या कॉलेजसाठी पुन्हा खर्च वाढणारच. आत्ता महिना-दीड महिन्यासाठी फक्त बसभाड्याचे जादा हजार रुपये आपल्याला कसे परवडतील?

रचनानं नाटकात काम करायला नकार दिलाय. त्या ऐवजी कॉलेजच्या जवळच एका कॉम्प्युटर इन्स्टीट्यूटमधे पार्ट-टाईम जॉबसाठी इंटरव्ह्यू देऊन आलीय. पुढच्या वर्षी नाटकात भाग घ्यायचा असेल तर बस भाड्यापुरते तरी पैसे आपल्या स्वत:च्या पर्समधे असावेत असा विचार तिनं केलाय.

बसच्या तिकीटांचा खर्च परवडत नाही म्हणून बायका काही किलोमीटर रोज चालत जातात, किंवा बसच्या प्रवासासाठी पैसे खर्च होतील म्हणून त्यांना काही संधी सोडाव्या लागतात, यावर संगीताच्या नवऱ्याचा, नेहाच्या नवऱ्याचा, रचनाच्या मित्रांचा विश्वास बसत नाही. संगीता, नेहा, आणि रचना त्यांना ही गोष्ट समजावण्याच्या किंवा पटवून देण्याच्या भानगडीत पडत नाहीत. 

बसच्या रोजच्या प्रवासाला पैसे पडणार नसतील तर आपले किती कष्ट वाचतील किंवा आपल्याला कुठल्या संधी मिळू शकतील, यावर संगीता, नेहा, आणि रचना विचार करतायत. बायकांचा रोजचा बसचा प्रवास हा मुद्दा पुढच्या निवडणुकीत राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर येऊ शकेल का, हा विचार मात्र अजून त्या तिघींपैकी कुणाच्याही डोक्यात आलेला दिसत नाही…

- मंदार शिंदे ९८२२४०१२४६
२९/१०/२०१९


Share/Bookmark

Monday, October 28, 2019

National Education Policy Update News

नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षण हक्क कायद्याची व्याप्ती बारावीपर्यंत वाढवण्याच्या भूमिकेवर घूमजाव

- रितिका चोप्रा । दि इंडियन एक्सप्रेस - २८ ऑक्टोबर २०१९

शिक्षण हक्क कायद्याची व्याप्ती बारावीपर्यंत वाढवण्याच्या, तसंच तीन वर्षांच्या बालशिक्षणाचा त्यामध्ये समावेश करण्याबद्दलच्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यातील तरतुदींवर मानव संसाधन विकास मंत्रालयानं घूमजाव केलं आहे.

"शिक्षण हक्क कायद्याची व्याप्ती वाढवण्यावर विचार केला जाईल" असं अंतिम धोरणात म्हटलं आहे, ज्याबद्दल धोरणाच्या मसुद्यात खात्रीने व्याप्ती वाढवण्याचा उल्लेख केला होता.

माजी इस्रोप्रमुख के कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञांच्या समितीनं जून महिन्यात मानव संसाधन विकास मंत्रालयाकडं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा सादर केला होता, आणि जनतेच्या सूचनांसाठी मंत्रालयाच्या वेबसाईटवर तो अपलोड करण्यात आला होता. सरकारकडं यावर दोन लाख सूचना प्राप्त झाल्या असून, पन्नास पानांच्या अंतिम धोरणावर आता कॅबिनेटची मंजुरी मिळणं बाकी आहे.

धोरणाच्या मसुद्यातील नॅशनल ट्युटर्स प्रोग्रॅम आणि रेमेडीयल इंस्ट्रक्शनल एड्स प्रोग्रॅम सुरू करण्याची सूचनादेखील अंतिम धोरणात बाजूला ठेवण्यात आली आहे. मूलभूत वाचन आणि गणितीय क्षमता विकासासाठी हे दोन उपक्रम सुचवण्यात आले होते.

नॅशनल ट्युटर्स प्रोग्रॅम अंतर्गत, प्रत्येक शाळेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेमध्ये आठवड्यातून पाच तासांपर्यंत, मदतीची गरज असलेल्या इतर विद्यार्थ्यांसोबत जोडून देण्याचं नियोजन होतं. रेमेडीयल इंस्ट्रक्शनल एड्स प्रोग्रॅम हा दहा वर्षांचा प्रकल्प सांगितला होता, ज्यामध्ये अभ्यासात मागं पडलेल्या विद्यार्थ्यांना मदत करून त्यांना इतर विद्यार्थ्यांच्या पातळीवर घेऊन येण्यासाठी स्थानिक समुदायांमधून मार्गदर्शक - विशेषतः महिला - प्रशिक्षित करण्याचं नियोजन होतं.

अंतिम शैक्षणिक धोरणामध्ये फक्त एकास एक सह-अध्ययन (वन-टू-वन पीयर ट्यूटरिंग) संकल्पनेची शिफारस करण्यात आली आहे. "प्रशिक्षित शिक्षकांच्या देखरेखीखाली आणि सुरक्षाविषयक बाबींची पुरेशी काळजी घेऊन, सहअध्ययनाचा उपक्रम स्वयंसेवी पध्दतीने इतर विद्यार्थ्यांसाठी आनंददायी स्वरूपात राबविता येईल… शालेय शिक्षण व्यवस्थेच्या या मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या कार्यात सहभाग घेणे स्थानिक समुदायातील व इतर प्रशिक्षित स्वयंसेवकांसाठी आणखी सोयीचे बनविले जाईल," असं अंतिम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात म्हटलं आहे.

https://indianexpress.com/article/education/education-policy-dilutes-assurance-on-rte-cover-up-to-class-12-6090605/




Share/Bookmark