ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Monday, February 9, 2026

One More Favour on Industry by the Government - Rise in Tax on Sale of Electricity (Marathi)

 


महाराष्ट्र राज्यातल्या वीज ग्राहकांच्या आयुष्यात सहा महिन्यांपूर्वी एक महत्त्वाची घटना घडली. जून 2025 या महिन्यात वीज ग्राहकांना कुठलीही पूर्वकल्पना न देता मीटर बदलण्यात आले, आणि 1 जुलै 2025 पासून वीज बिलामधला ‘स्थिर आकार’ दोन रुपयांनी आणि शंभर युनिटच्या पुढचा वीजदर प्रति युनिट साधारण एक रुपयानं वाढवण्यात आला. म्हणजे आधी वापरत होतो तेवढीच वीज वापरण्यासाठी दर महिन्याला जास्त पैसे भरायचे.

आता महाराष्ट्र शासन अधिसूचना दि. 19 डिसेंबर 2025 अनुसार, औद्योगिक आणि व्यावसायिक वीज ग्राहकांच्या बिलातल्या ‘वीज विक्री करा’त (ToSE) प्रति युनिट 9.90 पैसे वाढ करण्यात आली आहे. ‘प्रधानमंत्री कुसुम योजने’द्वारे शेतकऱ्यांना दिवसा पंप चालवण्यासाठी पुरेशी वीज मिळवून देण्यासाठी पैसे गोळा करायचे आहेत, म्हणून औद्योगिक आणि व्यावसायिक वीज ग्राहकांच्या बिलामधला वीज विक्री कर वाढवण्यात आल्याचं शासनाचं म्हणणं आहे. 

‘प्रधानमंत्री कुसुम योजना’ या नावातलं ‘कुसुम’ हे ‘किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान’ या नावाचं संक्षिप्त रूप आहे. शेतीच्या कामात पाण्याचा उपसा करण्यासाठी डिझेलचा वापर कमी करून सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणं, हे या योजनेचं मुख्य उद्दीष्ट सांगितलं जात आहे.

‘प्रधानमंत्री कुसुम योजने’चे तीन घटक आहेत - जमिनीवर सोलार पॉवर प्लॅन्ट उभे करणे हा पहिला घटक. देशभर शेतांमधे सोलार पंप बसवणे हा दुसरा घटक. ग्रिडमधे जोडणी केलेल्या शेतीकामाच्या पंपांना सौर ऊर्जा पुरवणे हा तिसरा घटक. केंद्र सरकारच्या या योजनेतल्या दुसऱ्या घटकाच्या अंमलबजावणीसाठी पैसे गोळा करण्याच्या नावाखाली महाराष्ट्र शासनानं ही करवाढ लादलेली आहे.

वीजेच्या दरात चुकीच्या पद्धतीनं वाढ केल्यामुळं वीज ग्राहकांवर अन्याय होऊ नये, यासाठी ‘वीज नियामक मंडळ’ काम करतं. वीजदरात वाढ करण्यासाठी या मंडळाकडं जायला लागलं असतं, पण वीजेच्या वापरावर कर लावण्यासाठी या मंडळाला टाळून निर्णय घेणं राज्य शासनाला शक्य होतं. वीज नियामक मंडळाकडं हा प्रस्ताव गेला तर कदाचित त्याला मान्यता मिळणार नाही असं शासनाला वाटलं असेल का? किंवा मान्यता मिळणार नाही हे पक्कं माहिती असल्यामुळंच ही चलाखी केली असेल का?

यामधून निर्माण होणारे काही महत्त्वाचे प्रश्न -

शेतकऱ्यांना सोलार पंप बसवण्यासाठी सबसिडी द्यायला करवाढीतून पैसे गोळा करायची वेळ राज्य शासनावर का आली? इतर राज्यांप्रमाणे अर्थसंकल्पात ‘अपारंपारिक ऊर्जा वापर’ या अंतर्गत वेगळी तरतूद करता आली नसती का?

औद्योगिक आणि व्यावसायिक वीज ग्राहकांच्या दर महिन्याच्या वीजबिलामधे वाढ झाल्यामुळं त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर काय परिणाम होऊ शकतो याचा अभ्यास ही वाढ करण्याआधी केला का?

औद्योगिक आणि व्यावसायिक वीज ग्राहकांच्या किती आणि कोणत्या प्रतिनिधींसोबत शासनानं चर्चा केली? राज्यातले सगळे उद्योग-व्यवसाय उत्तम नफा कमवत आहेत, त्यातून हळूच युनिटमागे दहा पैसे काढून घेऊ, ही भुरट्या चोरांसारखी मानसिकता वाटत नाही का?

करवाढीतून मिळालेला पैसा वर सांगितलेल्या योजनेसाठीच वापरला जाणार आहे का? ‘योजने’साठी म्हणजे ‘शेतकऱ्यांना वीज किंवा सबसिडी मिळवून देण्यासाठी’ असं अपेक्षित आहे. आम्ही शेतकऱ्यांना वीज मिळवून दिली याच्या जाहिरातीवरच जास्त पैसा खर्च होण्याची शक्यता (आणि अनुभव) आहे.

नोटबंदी आणि कोविड लॉकडाऊन या दोन (महा)मानवनिर्मित संकटांमधे असंख्य उद्योग-व्यवसाय बंद झाले. जे टिकले, त्यातले बहुसंख्य कर्जबाजारी आहेत किंवा काम सुरु ठेवण्यापुरते उत्पन्न कमवू शकत आहेत. शासनाकडून उद्योग-व्यवसायांच्या आर्थिक, तांत्रिक, व्यावसायिक अडचणी सोडवण्यासाठी विशेष सहाय्य, योजना, धोरण अस्तित्वात नाही. उलट जीएसटी, डिजिटल इंडीया, स्वच्छ भारत, बेटी बचाओ, केवायसी, असे अनेक अडथळे आणि छिद्रे बनवली आहेत, बनवत आहेत. 

‘बॉडीगार्ड’ सिनेमात सलमान खानचा एक प्रसिद्ध डायलॉग आहे - “मुझपर एक एहसान करना.. कि मुझपे कोई एहसान मत करना…” कर्ज काढून उद्योग-व्यवसाय उभा करणाऱ्या आणि रात्रीचा दिवस, रक्ताचं पाणी करून तो चालू ठेवणाऱ्या उद्योजक आणि व्यावसायिकांच्या वतीनं शासनाला हीच विनंती करावीशी वाटते - “मुझपर एक एहसान करना.. कि मुझपे कोई एहसान मत करना… आमच्या फायद्यासाठी काही करू शकत नसाल तरी ठीक आहे, पण आमच्या फाटक्या खिशाला अजून भोकं कशासाठी पाडता?”

बाय द वे, मंत्रीमंडळातल्या सगळ्या मंत्र्यांचे घोटाळे मोजले आणि वसूल केले, तर राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना आणि उद्यो-व्यवसायांना पुढची किमान दहा वर्षं तरी वीज फुकट मिळू शकेल, अशी काहीतरी योजना का बरं सुचत नसेल आपल्या कल्पक आणि बुद्धीमान लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना?

~ मंदार शिंदे
09/02/2026



Share/Bookmark

No comments:

Post a Comment