ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Friday, March 22, 2019

राजकारण...

राजकारण...
(मंदार शिंदे ९८२२४०१२४६)

निवडणुका जाहीर झाल्या. भाऊसाहेबांच्या ऑफीसमध्ये गर्दी वाढली. चाळीस वर्षं पक्षाशी एकनिष्ठ राहिलेला नेता. नगरसेवक ते महापौर असा स्थानिक राजकारणाचा अनुभव. यंदा डायरेक्ट लोकसभेच्या तिकीटाची आशा. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह…

मागच्या दोन टर्म खासदार राहिलेले रावसाहेब भाऊंच्याच पक्षाचे. तेसुद्धा चाळीस वर्षांपासून एकनिष्ठ होते… पण कालपर्यंतच ! कालच त्यांनी विरुद्ध पक्षात जाहीर प्रवेश केला. गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. मंत्री महोदयांनी तिथंच जाहीर केलं - रावसाहेब आपल्या पक्षाचे खासदारकीचे उमेदवार…

दुसऱ्या दिवशी मुंबईला दोन्ही पक्षांचे बडे नेते भेटले. यंदा स्वतंत्र लढणं मुश्कील आहे, युती करु म्हणाले. संध्याकाळपर्यंत मतदारसंघ वाटून घेतले. पत्रकार परिषद घेतली. दोन दिवसांत उमेदवार जाहीर करू म्हणाले.

जागावाटप करताना सीट भाऊसाहेबांच्या पक्षाकडं आली.

रावसाहेबांनी भाऊसाहेबांना फोन लावला. तुमची स्थानिक राजकारणात गरज आहे म्हणाले. मला लोकसभेचा अनुभव आहे म्हणाले. मी तिसऱ्यांदा खासदार होतो, मग तुम्हाला आमदार करतो असं म्हणाले. जुन्या आठवणी, आंदोलनं आणि मोर्चांची साक्ष काढली. आपण जुने आणि चांगले सहकारी आहोत म्हणाले. विरुद्ध पक्षात जाणं माझी चूक होती म्हणाले. अजूनसुद्धा मनानं मी जुन्याच पक्षाशी एकनिष्ठ आहे असं म्हणाले. लवकरच पुन्हा मूळच्या पक्षात प्रवेश करणार म्हणाले.

भाऊसाहेब फक्त ‘बरं’ म्हणाले.

दोन दिवसांनी मुंबईला मोठा मेळावा झाला, भाऊंच्या पक्षाचा. रावसाहेबांनी पक्षात पुनर्प्रवेश केला. भाऊसाहेब मेळाव्याला गेलेच नाहीत.

रावसाहेबांना जुन्या पक्षाकडून तिकीट मिळालं. विरुद्ध पक्षात त्यांना घेऊन येणारे गृहमंत्री चिडले. युती असूनसुद्धा त्यांनी बंडखोर उमेदवार जाहीर केला. रावसाहेबांना पाडायचं असा मंत्री महोदयांनी निश्चय केला.

रावसाहेबांनी कंबर कसून प्रचार केला. मतदारसंघ पिंजून काढला. चाळीस वर्षं राजकारणाचा आणि दहा वर्षं खासदारकीचा अनुभव पणाला लावला. पण मतदार राजाची पसंती फिरली. विरुद्ध पक्षाचा बंडखोर उमेदवार निवडून आला.

गुलाल उधळला, फटाके वाजले, होर्डींग लागले. तरुण तडफदार खासदार दादासाहेब मिरवणूक संपवून घरी आले. दिवाणखान्यात सोफ्यावर भाऊसाहेब बसले होते. दादासाहेबांनी वाकून नमस्कार केला. तुमचं राजकारण आज कळालं म्हणाले. दहा वर्षांपूर्वी मला 'विनाकारण' विरुद्ध पक्षात पाठवलं, त्याचं फळ आज मिळालं. दहा वर्षं मी तुमच्यावर राग धरला, पण आज तुम्हाला मानलं बाबा ! तुमचा नातू आता वीस वर्षांचा झाला, त्याला कुठल्या पक्षात ‘पेरायचा’ ते आता तुम्हीच ठरवा.

भाऊसाहेब मिशीतल्या मिशीत हसले. मुलाला उठवून शेजारी बसवत बोलले. दादासाहेब, तुम्ही सध्या एकनिष्ठ रहा. दोन-चार टर्ममध्ये तुम्हालाच कळंल, पेरायचं कुठं आणि खुडायचं कुठं… जिथं काहीच नसतं विनाकारण, त्यालाच म्हणतात राजकारण !!

२२/०३/२०१९


Share/Bookmark

Sunday, February 3, 2019

झाले मोकळे शिक्षण...

झाले मोकळे शिक्षण…

देै. सामना - उत्सव । ३ फेब्रुवारी २०१९
> मंदार शिंदे
शाळेच्या पारंपरिक मार्गाला पर्याय म्हणून होमस्कूलिंग पद्धतीने मुलांना शिक्षण देण्याकडे पालकांचा कल वाढत आहे. याचबरोबर केंद्राने सर्व राज्यांना मुक्त शिक्षण शाळा चालवण्याची परवानगी दिली आहे. यामुळे चाकोरीबद्ध शिक्षणातून सुटत आनंदी शिक्षणाचा पर्याय मुलांना आणि पालकांना स्वीकारता येत आहे. बिनभिंतीच्या शाळेतलं हे शिक्षण नक्कीच जगाशी आणि वास्तवाशी जोडणारं असेल. याबाबत अनुभवी पालक आणि शिक्षण अभ्यासक या दोन्ही भूमिकांच्या अनुषंगाने मांडण्यात आलेला लेख.
स्वत-च्या जागेत घर बांधण्यापेक्षा मोठय़ा सोसायटीत फ्लॅट विकत घेणं जास्त चांगलं असं एक मित्र मला पटवून देत होता. स्वत-ची जागा घ्या, त्यावर स्वतंत्र वीज-पाणी कनेक्शन घ्या, कॉन्ट्रक्टर शोधा, सरकारी परवानग्या मिळवा, स्वच्छतेपासून सुरक्षेपर्यंत सगळ्या गोष्टींची सोय स्वत-च बघा आणि एवढे उपद्व्याप करून शंभर टक्के मनासारखं घर बांधून होईलच असं नाही असे त्याचे काही मुद्दे होते. याउलट मोठय़ा सोसायटीत फ्लॅट घेतला की, या सगळ्या सोयी एका दमात मिळून जातात. बिल्डरला पैसे दिले की, आपली जबाबदारी संपली. मग वीज-पाणी-रस्ता, पार्किंग, सिक्युरिटी, परमिशन वगैरे सर्व गोष्टी बिल्डरच मिळवून देतो.
मला काही स्वत-च्या जागेत घर बांधायचं नव्हतं किंवा फ्लॅटही विकत घ्यायचा नव्हता. त्यामुळे चहा संपेपर्यंत त्याचे मुद्दे मी शांतपणे ऐकून घेतले आणि घरी निघून आलो. नेमकी त्याच दिवशी महाराष्ट्र राज्य सरकारनं ओपन एस.एस.सी. बोर्ड अर्थात ‘मुक्तशाळा’ सुरू करण्याची घोषणा केली आणि ‘होम स्कूलिंग’ या विषयावर अचानक मोठी चर्चा सुरू झाली. आम्ही स्वत-च्या मुलाला सात-आठ वर्षांपासून होम स्कूलिंग (खरं तर अनस्कूलिंग) पद्धतीनं शिकवत असल्यानं आम्हाला या चर्चेची सवय होतीच, पण सर्वसामान्यपणे लोकांच्या मनात या विषयाबद्दल इतकं कुतूहल आणि आस्था असल्याचं नव्यानंच समजलं. अशाच काही चर्चांमधून आलेल्या मुद्द्यांवर इथं विचार केलेला आहे. याला ‘होम स्कूलिंग’बद्दलच्या प्रश्नांना उत्तरं न म्हणता विचारमंथन म्हणणं जास्त योग्य ठरेल असं मला वाटतं.
तर अगदी सोपं उदाहरण देऊन ‘होम स्कूलिंग’वर बोलायचं ठरवलं आणि चटकन घराच्या बाबतीत माझ्या मित्रानं मांडलेले मुद्दे आठवले. वास्तविक, स्वत-ची जागा घेऊन घर बांधायचं की मोठय़ा सोसायटीत फ्लॅट घेऊन राहायचं हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण तुलनाच करायची झाली तर शिकण्यासाठी औपचारिक शाळेत मुलाला दाखल करणं (फॉर्मल स्कूलिंग) म्हणजे तयार सोसायटीत फ्लॅट विकत घेणं आणि स्वत- वेळ देऊन निरनिराळे स्रोत शोधून मुलाचं शिक्षण घडवून आणणं (होम स्कूलिंग) म्हणजे स्वत-च्या जागेत स्वतंत्र घर बांधणं असं म्हणता येईल. आता या दोन्हीपैकी कुठला पर्याय निवडायचा हे प्रत्येकानं आपापली क्षमता, शक्यता आणि आवड बघून ठरवावं, पण ‘‘शाळेत गेल्याशिवाय मूल शिकूच शकत नाही’’ असं आजच्या काळात म्हणणं म्हणजे ‘‘कुणी स्वत-चं स्वतंत्र घर बांधूच शकत नाही’’ असं म्हटल्यासारखं होईल, पण मुळात होम स्कूलिंगचा पर्याय निवडावासा (काही) पालकांना का वाटत असेल यावर थोडा विचार करू.
प्रस्थापित औपचारिक शिक्षण पद्धती अर्थात फॉर्मल स्कूलिंगबद्दल शिकलेल्या पालकांच्या मनात काही तक्रारी निर्माण झाल्या आहेत. उदाहरणार्थ – मुलांचा कल लक्षात न घेता साचेबद्ध शिकवण्याची पद्धत, सर्वांना समान वागवण्यामुळं काही अंशी दडपली जाणारी मुलांची अंगभूत कौशल्यं, परीक्षा आणि गुणमापन पद्धतींचा (मार्ंकग सिस्टमचा) अतिरेक, व्यक्तिगत मार्गदर्शनाचा अभाव, शालेय शिक्षणासाठी मोजावी लागणारी प्रचंड किंमत इत्यादी. या गोष्टींवर कुणाकडंही रामबाण उपाय तयार नसले तरी या समस्या टाळण्याच्या दृष्टीनं लोकांनी पर्यायी शिक्षण पद्धतींचा विचार करायला सुरुवात केली असावी असं वाटतं.
होम स्कूलिंगबद्दल सर्वसामान्य लोकांच्या मनात एक गमतीशीर गैरसमज असतो. होम स्कूलिंग करणारी मुलं शाळेत न जाता सकाळी आंघोळ करून, 12 सूर्यनमस्कार घालून, डोळे मिटून बोधीवृक्षाखाली समाधी लावून बसतात आणि अशा प्रकारे त्यांना ‘आपल्या आपण’ ज्ञानप्राप्ती होते असा काहीतरी स्वयं-अध्ययनाचा (सेल्फ लर्निंगचा) मजेदार अर्थ अनेकांनी लावलेला दिसतो. स्वत- शिकण्यावर भर असला तरी होम स्कूलिंगमध्ये शाळेइतकेच (किंबहुना जास्तच) रिसोर्सेस वापरावे लागतात, मोठय़ा माणसांची किंवा तज्ञांची मदत आणि मार्गदर्शन घ्यावं लागतंच. फक्त हे रिसोर्सेस शाळेत एका ठिकाणी मिळाले असते, त्याऐवजी आई-वडिलांनी वेगवेगळ्या ठिकाणी शोधून असे मार्गदर्शक आणि साधनं मुलांना उपलब्ध करून द्यायची असतात. अशा प्रकारे समाजातल्या विविध स्तरांतील, विविध क्षेत्रांतील, विविध वयोगटांतील व्यक्तींशी संवाद साधण्यातून मुलांचं सामाजिकीकरण (सोशलायझेशन) उत्तम प्रकारे होऊ शकतं (फक्त शाळेत गेल्यानंच मुलांचं सामाजिकीकरण होतं या कल्पनेला छेद देणारा हा विचार आहे).
माहितीचे स्रोत मर्यादित होते तेव्हा शाळेत गेल्याशिवाय शिक्षण शक्य(च) नाही असं वाटणं साहजिक होतं. आज माहितीचे स्रोत घरात, खिशात, हातात येऊन पोहोचले आहेत. फक्त ही माहिती ‘प्रोसेस’ कशी करायची आणि ‘अप्लाय’ कशी करायची याचं मार्गदर्शन करण्याची गरज आहे. पुन्हा याबद्दल बहुतेकांचा आक्षेप असा असतो की, होम स्कूलिंगसाठी आई-वडिलांना पूर्ण वेळ देणं शक्य आहे का किंवा आई-वडील स्वत-च्या मुलांना शिकवण्याइतके सक्षम, प्रशिक्षित, क्वॉलिफाईड असतील का किंवा शाळेबाहेर हे सर्व रिसोर्सेस उपलब्ध करून देण्यासाठी आई-वडील श्रीमंतच असले पाहिजेत वगैरे वगैरे.
खरं तर होम स्कूलिंग करण्यासाठी आई-वडिलांनी शिक्षकाचीच भूमिका घेणं गरजेचं नसतं. मुलांना नवनवीन ठिकाणी घेऊन जाणं, निरनिराळ्या क्षेत्रात काम करणाऱया माणसांशी ओळख करून देणं, अनेक कार्यशाळा आणि प्रशिक्षणांमध्ये सहभागी करून देणं अशी कामं त्यांना करावी लागतात. मूल स्वत- एकटं घराबाहेर पडण्याच्या किंवा प्रवास करण्याच्या वयाचं होईपर्यंत आई-वडिलांपैकी कुणीतरी एकानं किंवा दोघांनीही त्याच्या सोबत जास्तीत जास्त वेळ घालवणं अपेक्षित आहेच. त्या अर्थानं होम स्कूलिंग करणाऱ्या मुलांचं संपूर्ण कुटुंबच नव्यानं ‘शिकण्याच्या’ प्रक्रियेतून जात असतं असं म्हणायला हरकत नाही. होम स्कूलिंग करण्यासाठी आई-वडिलांनी श्रीमंत असणं गरजेचं नाही, पण ‘रिसोर्सफुल’ असणं फायद्याचं आहे. म्हणजेच मुलाच्या शिक्षणासाठी आवश्यक स्रोत कुठं उपलब्ध होतील याची माहिती आई-वडिलांना असणं, नसेल तर ती शोधून काढणं आणि मुलांना त्या स्रोतांशी जोडून देणं असं ‘फॅसिलिटेटर’चं काम त्यांना करावं लागतं. मग ते ‘बेस्ट टीचर’ नसले तरी चालतं, फक्त ‘गुड फॅसिलिटेटर’ असणं महत्त्वाचं !
एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, होम स्कूलिंग हा औपचारिक शाळेला पर्याय नव्हे. आजही लाखो मुलं अशी आहेत, ज्यांना घरातून, समाजातून शिकण्याचे स्रोत आणि साधनं उपलब्ध होणं शक्य नाही. आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक समस्यांमुळं शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांनी आजही (आणि उद्या-परवादेखील) औपचारिक शाळेत गेल्याशिवाय पुरेसं शिक्षण शक्य नाही. त्यामुळं होम स्कूलिंग सुरू झाल्यावर औपचारिक शाळा बंद कराव्या लागतील हे विधान निराधार आहे. उलट वर उल्लेख केल्यानुसार, होम स्कूलिंग करणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठीचा एक स्रोत औपचारिक शाळादेखील असू शकतेच की ! फक्त त्यासाठी शाळांनी मोकळेपणानं ‘शिकण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठी’ आपले दरवाजे उघडे ठेवले पाहिजेत. कारण शाळा हा आता शिक्षणाचा ‘एकमेव स्रोत’ उरला नसून ‘अनेक स्रोतांपैकी एक’ स्रोत बनला आहे. महाराष्ट्र शासनानं मुक्त शिक्षणासाठी अधिकृत बोर्डाच्या समकक्ष पर्याय उपलब्ध करून देऊन त्या दिशेनंच महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे.

shindemandar@yahoo.com
(लेखक शिक्षण अभ्यासक आहेत)




Share/Bookmark

Monday, January 7, 2019

खरंच आनंद हरवलाय का ?


प्रतिक्रिया :


“आपण आपल्या सीमा शिथील केल्या आणि अपेक्षांचा विस्तार वाढवला. त्यावेळी आपला आवाका आपण जाणून घेतलाच नाही. प्रत्येकाची प्रत्येक गोष्ट करण्याची क्षमता, आवड, बळ वेगवेगळेच असणार. आणि हे लक्षात न घेता मी मला आनंदी करणाऱ्या गोष्टी बाजूला सारून दुसऱ्याला आनंद वाटणाऱ्या गोष्टीत रस दाखवायला लागले तर मी आणि आम्ही आनंदी होणार कधी आणि कसे ? याचा मला अभिप्रेत असलेला अर्थ फार वेगळा आहे. दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आधी दुसऱ्यासाठी आनंद निर्माण करतांना स्वतःला त्रासदायक तर वाटत नाही ना हे ओळखता यायला हवं. त्यानंतर दुसराही त्या आनंदात सहभागी होऊ इच्छितोय ना हा विचार व्हायला हवा. आणि त्यासाठी मन निर्मळ हवं. निरागस मन दुसऱ्यांनाही आनंदित करू शकतं.”
- गीतांजली राव, निवृत्त शिक्षिका, पुणे


“प्रत्येक जण काल्पनिक जगात जगत आहे, प्रत्येकाला शॉर्टकट हवा आहे आणि या सर्वामधे स्व-पण हरवत चालले आहे, त्यामुळे आनंद नाहीच, तात्पुरते हसणे आणि पुन्हा गंभीर बनणे यामुळे हे सगळे भयानक आहे.”
- अनिल चाचर, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, ता. पुरंदर, जि. पुणे


“माझ्या मते ज्या निकषांद्वारे हे मानांकन ठरवले आहे, त्यांची चिकीत्सा होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे देशाची भौगोलिक स्थिती, परंपरा आणि आध्यात्मिक रीतीरिवाज यांचाही अभ्यास करणे गरजेचे आहे. भारतीय लोक कोणत्या गोष्टीत आपला आनंद शोधतात आणि कोणत्या गोष्टीत नाही याचाही विचार होणे गरजेचे आहे. विकसनशील देशात स्थित्यंतरे आणि बदल अधिक गतीने होत असतात आणि मोठ्या लोकसंख्येवर त्याचा परिणाम होत असतो. मग त्यात द्विधा मनस्थितीत असणारे बहुसंख्य असतात, याचाही विचार होणे गरजेचे आहे. अजून बऱ्याच बाबी आहेत ज्यांना समजून घेऊन मानांकन ठरवणे गरजेचे आहे. सामाजिक स्वास्थ्य, साक्षरता, बाहेर जाणे, पर्यटन, कु्टुंब पध्दती, संशोधन, कलासक्त समाज, माध्यमांचा प्रभाव, प्रतिक्रियावादी समाज, सामाजिक सलोखा, व्यसनी लोकसंख्या, वगैरे.”
- विशाल अडसूळ, अभिनेता, कलाकार, पुणे


“नक्कीच हल्ली आनंद हरवत चाललाय. आभासी जगात न वावरता वर्तमानातील प्रत्येक क्षणाचा आनंद आपण घेऊ शकतो. पण तो आनंद शोधणे आपल्याला जमले पाहिजे.”
- रसिका, सामाजिक कार्यकर्त्या, पुणे


“आनंद या संकल्पनेचा चुकीचा अर्थ घेतला आहे. बालकवींची कविता आठवा... त्यांनी आनंदाला मोद असा शब्द वापरून तो दिशांत फिरून नभात भरुन चोहीकडे ओसंडून वाहात आहे. स्वार्थाच्या बाजारात किती पामरे रडतात. त्यांना मोद कसा मिळतो. याचं उत्तरही त्यांनीच दिलं आहे. सोडुनि स्वार्था जो जातो... स्वार्थातून आनंद मिळत नसतो. जसे, ‘सुखार्थिनां कुतो विद्या आणि विद्यर्थिनां कुतो सुखम्’ हे सुभाषित सांगते तसेच स्वार्थ्याला आनंद मिळणारच नाही. कारण स्वार्थ्याला एक मिळालं म्हणजे दुसऱ्याचा ध्यास लागतो. स्वार्थाने भरलेला समाज खऱ्या आनंदाला-मोदाला मुकतो आहे हेच खरे.”
- विद्या प्रभुदेसाई, प्राध्यापिका, लेखिका, गोवा


“सर्वेक्षण कसं केलंय हे बघायला पाहिजे. मी तर एका ठिकाणी असं वाचलं की पाकिस्तानही आपल्यापेक्षा आनंदी आहे.”
- संभाजी पाटील, शिक्षक, चाळीसगांव


“आनंद हरवलाय हे बरोबरच आहे. इथं सुरक्षितताच नाही तर आनंद कुठून? याचं उत्तर संस्कृती, भेद, परंपरामधे आणि भांडवलवादी लोकशाहीतही शोधावं लागेल.”
- संतोष शेंडकर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, पुणे


“मोबाईलच्या वापरावर बंधन आणि कोणताही छंद जोपासला तर नक्कीच फरक पडेल.”
- महेंद्र धावडे, सामाजिक कार्यकर्ते, पुणे


“आनंद हरवत चाललाय हे खरंय. पण प्रत्येकाच्या आनंदाच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत. आपल्याला दुसऱ्याचा आनंद सहन होत नाही हेही एक कारण भारतीयांचा आनंद हरवल्याचं आहे.”
- अनिल दिक्षित, कवी, पुणे


“आनंद कशात मोजायचा? हा एक मोठा प्रश्न आहे. कारण आनंद ही भावनाच मूळातच व्यक्तीपरत्वे बदलत असते. तेव्हा ती मोजता येत नाही. एकाच गोष्टीत प्रत्येक व्यक्ती वेगळा आनंद शोधत असते. प्रश्नावली हे अत्यंत कृत्रिम साधन आहे असं मला व्यक्तिश: वाटतं.”
- फारुक काझी, शिक्षक, बालसाहित्यिक, सांगोला, सोलापूर


“आनंद मिळवण्याचा विचार इथे मटेरियलिस्टिक जगण्याच्या पाश्चात्य पद्धतीतून तयार केलेला दिसतो. आपल्याकडे अत्यंत गरिबीत जगणारा माणूस देखील आनंदी असू शकतो, त्याच्या चेहऱ्यावर हास्य हमखास दिसते. अगदी हमालदेखील एकमेकांत हास्य-विनोद करताना दिसतात. आपल्या आनंद मिळवण्याच्या कल्पना फार वेगळ्या आहेत. आकडेवारीत आपला नंबर १३३ दाखवलाय, पण पैसे नसताना अजूनही आपले लोक आनंदी समाधानी राहू शकतात.”
- श्रीकांत कुलकर्णी, लेखक, पुणे


“माझ्या मते काही अंशी आनंद हरवलाय/त्याची व्याख्या बदललीये असं म्हणू शकता.. मटेरीअलीस्टीक गोष्टींचं महत्त्व आणि त्यामुळे मिळणारं समाधान याचं प्रमाण वाढलंय. पण हल्ली हे तितकंच महत्त्वाचंही आहे. पूर्वी पेक्षा ट्रॅव्हलींग, एन्टरटेनमेन्ट, शॉपींग हे नित्याचं झालंय, त्यामुळे तुम्हाला रोजच आनंदाचे स्रोत खुले होताहेत, आपण एक्स्प्रेसिव्ह झालोय, परिस्थितीचा ऐक्सेप्टन्स वाढलाय. त्यामुळे हातावर हात धरून बसणं आणि रडत बसणंही क्वचितच दिसतं, लेट इट गो (भाड में जा / तू नहीं और सही..) अशी वृत्ती वाढतीये… आजकालचं युथ खूप घाईत आहे, हावरट आहे.. निवांत लाईफस्टाईल, शांतपणा.. एक ठेहराव नाहीये त्यांच्याकडे.. सतत बेटरमेन्टकडे धावत असतात, त्यामानानं आपली पिढी मला जास्त संतुलित वाटते. टेक्नोसॅव्ही व्हायच्या आधीचा आनंदही लुटलाय…”
- जयश्री खराडे, कलाकार, लंडन


“प्रत्येकाने मी आणि माझे यातून बाहेर निघायला पाहिजे.”
- माया चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्या, पुणे


“आनंद हरवलाय तर मुळीच नाही... आपण आनंद कशात मानतो त्यावर बरंच अवलंबून आहे. मानवाची जसजशी सुखाची व्याप्ती वाढली तसतसे आनंद हरवला नाही तर माणसापासून हिरावला. आपण ठरविले तर प्रत्येक गोष्टीत आनंद मानू शकतो.”
- राहुल गरड, पत्रकार, पुणे


“प्रत्येकाचे आनंदाचे निकष वेगवेगळे असू शकतात पण काही निकष कॉमन असू शकतात. सगळ्याचा पाया बदलत्या परिस्थितीनुसार मानसिकतेत होणारे बदल, हा असावा, असं मला वाटतंय.”
- गौरी कुलकर्णी, गायिका, पुणे


Share/Bookmark

Saturday, December 29, 2018

ही हॅज अराईव्ह्ड !!

शाहरुख आणि सलमाननंतर एन्ट्रीला टाळ्या घेणारा हिरो कोण?

अजय देवगण आणि अक्षय कुमारनंतर "माईन्ड इज ब्लोईंग जी" म्हणायला लावणारे ऐक्शन सीन्स देणारा हिरो कोण?

रजनीकांतपासून सलमानपर्यंत प्रत्येकानं आपापली स्टाईल बनवली, पण स्टाईल आणि एनर्जी दोन्ही एकसाथ पेश करणारा 'आजचा' हिरो कोण?

सलमानच्या 'युनिक' डान्स स्टेप्स आणि शाहरुखचं 'फॅमिली अपील' एकाच पॅकेजमध्ये देणारा हन्ड्रेड पर्सेन्ट एन्टरटेनर कोण?

ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं रोहीत शेट्टीनं एकाच पिक्चरमध्ये दिलीत...

येस्स, सिम्बा !!

रणवीर सिंगचा 'संग्राम भालेराव' एकाच वेळी इन्स्पेक्टर विजय, चुलबुल पांडे, आणि बाजीराव सिंघम या सगळ्यांची आठवण करुन देतो आणि तरीसुद्धा फ्रेश, नवाकोरा आणि हवाहवासा वाटतो. एक हळवा भाऊ, एक आदर्श मुलगा, एक समजदार बॉयफ्रेन्ड आणि शेवटी एक डॅशिंग पोलिस ऑफिसर... बॉलीवूडचा सुपरस्टार होण्यासाठी पर्फेक्ट रेसिपी !

आपल्या लक्ष्याचं (लक्ष्मीकांत बेर्डेचं) एक फेमस गाणं आहे,

"मी आलो, मी पाहिलं, मी जिंकून घेतलं सारं..."

सिम्बा इज दॅट विनिंग मोमेंट फॉर रणवीर !!

#Simmba

- मंदार शिंदे ९८२२४०१२४६





Share/Bookmark

Tuesday, December 25, 2018

साने गुरुजींबद्दल पु. ल. देशपांडे




Share/Bookmark

Sunday, December 2, 2018

'वजन'दार शिक्षणाची गोष्ट

'वजन'दार शिक्षणाची गोष्ट
दै. सामना । उत्सव
रविवार, २ डिसेंबर २०१८
>> मंदार शिंदे

सध्या इनपुट-आऊटपुटचा जमाना आहे. त्यासाठी प्रत्येक गोष्टीचे मोजमाप करणे आवश्यक झाले आहे. किती इनपुटमध्ये किती आऊटपुट मिळाले यावरून संबंधित प्रक्रियेची कार्यक्षमता आणि नफा-तोटय़ाचा हिशेब घालणे सोपे जाते; परंतु शिक्षण क्षेत्रात मात्र अजून तरी असा हिशेब शक्य झालेला दिसत नाही. एका शैक्षणिक वर्षात एका विद्यार्थ्याने किती ज्ञान आत्मसात केले याचे मोजमाप नक्की कोणत्या युनिटमध्ये करावे हेच अजून ठरत नाही आहे. शिक्षणाचा (तात्त्विक) उद्देश ‘शिकणाऱयाच्या आयुष्यात गुणवत्तापूर्ण सुधारणा घडवून आणणे’ असा आहे. परंतु, स्थळ, काळ, व्यक्ती आणि परिस्थितीनुसार गुणवत्ता आणि सुधारणा या दोन्ही संकल्पनांचे संदर्भ बदलत जातात हेही खरंच. मग शिक्षण घेणाऱया व्यक्तीच्या आयुष्यात कोणता बदल झाला म्हणजे गुणवत्तापूर्ण सुधारणा झाली असे म्हणता येईल ? प्रश्न कठीण आहे, म्हणूनच बहुतेकांनी आपल्यापुरती सोप्या उत्तरांची सोयदेखील करून घेतलेली आहे.

उदाहरणार्थ, जास्तीत जास्त पगाराची नोकरी मिळवून देणारे शिक्षण जास्त चांगले असे कित्येकांना वाटते. शिक्षण घेणाऱया व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत करणे अशा मर्यादित हेतुने दिले-घेतले जाणारे शिक्षण ही आजची वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत, मुलांना शाळेचे वातावरण आवडते का, त्यांच्यातील कला-कौशल्यांना तिथे पुरेसा वाव मिळतो का, त्यांना पडणाऱया सर्व प्रश्नांना तिथे उत्तरे मिळतात का, त्यांना आपल्या भावना आणि कल्पना मुक्तपणे मांडता येतात का, या प्रश्नांवर सहसा चर्चा होताना दिसत नाही. मग पालक, शिक्षक, संस्था, माध्यमे, लोकप्रतिनिधी हे सर्व घटक नक्की कशावर विचार आणि चर्चा करताना दिसतात? अगदी ताजेच उदाहरण घ्यायचे झाले तर, ‘दप्तराचे ओझे’ हा सध्या राष्ट्रीय चर्चेचा विषय झालेला आहे.

इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शाळेत जाणाऱया मुलांच्या दप्तराचे वजन किती असावे हा मुद्दा याआधीही बऱयाचदा माध्यमांमध्ये चर्चिला गेला आहे. काही राज्यांच्या उच्च न्यायालयांकडून संबंधित यंत्रणेला ‘दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत’ सूचनाही दिल्या गेल्या आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून सोशल मीडियावर लक्षद्वीप प्रशासनाच्या सचिवांचे एक परिपत्रक फिरते आहे. या परिपत्रकात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या एका आदेशाचा संदर्भ दिला आहे, ज्यानुसार सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना विषय अध्यापन आणि दप्तराच्या वजनाबाबत नियमावली बनविण्यास सांगितले आहे. तसेच, इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना गृहपाठ देऊ नये आणि भाषा व गणित याव्यतिरिक्त इतर विषय शिकवू नयेत, अशा स्वरूपाच्या सूचनाही केलेल्या दिसत आहेत. प्रत्यक्षात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून याबद्दलची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. केवळ सोशल मीडियावर फिरणाऱया एका परिपत्रकाभोवती ‘शिक्षण’विषयक चर्चा घुमते आहे.

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दि. 21 जुलै 2015 रोजी शासन निर्णय क्रमांक ‘दओझे-1814/प्र.क्र.165/एस.डी.4’ अन्वये विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याबाबतच्या उपाययोजना प्रसिद्ध केल्या आहेत. यामध्ये, दप्तराचे वजन विद्यार्थ्याच्या वजनाच्या 10 टक्केपेक्षा अधिक असू नये, असे स्पष्ट नमूद केले आहे. कमी जाडीच्या वह्या वापरणे, पाठय़पुस्तकांव्यतिरिक्त अनावश्यक लेखन साहित्य व पुस्तके टाळणे, कमी वजनाचे कंपास बॉक्स आणि बॅग विकत घेणे, असे उपाय पालकांसाठी सुचवले आहेत. त्याचबरोबर, दप्तराचे वजन नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने वेळापत्रकाची आखणी करणे, कार्यानुभव, चित्रकला, संगणक इत्यादी विषयांचे साहित्य शाळेतच ठेवणे या गोष्टींची काळजी शाळेने घ्यावी असे म्हटले आहे. शिवाय, शालेय पोषण आहार आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय शाळेतच करुन विद्यार्थ्यांच्या दप्तरातून डबा आणि पाण्याच्या बाटलीचे वजन पूर्णपणे टाळण्यासही सांगितले आहे. शक्य असेल तिथे ई-पुस्तकांवर भर देण्याची सूचनाही दिसून येते.

2015 साली राज्य शासनातर्फे सुचवण्यात आलेल्या या उपाययोजनांची अंमलबजावणी 2018 साल संपत आले तरी झालेली दिसत नाही. या परिस्थितीत, केंद्रीय मंत्रालयाकडून आणखी एक परिपत्रक आले म्हणून खरेच काही फरक पडणार आहे काय ? महाराष्ट्र राज्याचाच विचार करता, शालाबाह्य मुलांचा प्रश्न शिक्षण हक्क कायद्याला दहा वर्षे होत आली तरी सुटलेला नाही. स्थलांतरित मुलांच्या शाळाप्रवेशात व शिक्षणात अजूनही अडचणी येत आहेत. शिक्षण हमी पत्रकाबाबत शाळांची उदासीनता चिंताजनक आहे. पुण्यासारख्या स्मार्ट आणि मेट्रो सिटीतील शाळांमध्ये मुला-मुलींच्या स्वच्छतागृहांची आणि पिण्याच्या पाण्याची पुरेशी सोय उपलब्ध नाही. एका बाजूला वेगाने विस्तारत चाललेल्या शहराच्या विविध भागांतून होणाऱया विद्यार्थ्यांच्या असुरक्षित वाहतुकीकडे पालक, शाळा आणि प्रशासन या सर्वांनी जाणीवपूर्वक डोळेझाक केलेली आहे, तर दुसऱया बाजूला स्थलांतरित समूहातील मुलांना शिक्षण हक्क कायद्यानुसार परिसरातील शाळाही उपलब्ध नाहीत आणि शालेय वाहतुकीची व्यवस्थाही परवडणारी नाही. अशा मूलभूत सुविधांचीच कमतरता असताना विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन केंद्र शासन अथवा राज्य शासन कसे नियंत्रित करणार आहे कोण जाणे!

एका शैक्षणिक वर्षात एका विद्यार्थ्याने किती किलो वह्या-पुस्तकांची ने-आण केली. यावरून त्याने/तिने किती किलो ज्ञान आत्मसात केले याचे मोजमाप करता आले तर कदाचित ‘दप्तराचे वजन’ हा शिक्षण व्यवस्थेतील महत्त्वपूर्ण घटक म्हणता येईल असेच यानिमित्ताने वाटते.

– shindemandar@yahoo.com 
(लेखक शिक्षण अभ्यासक आहेत.)
(Click on image to read)



Share/Bookmark

Thursday, November 15, 2018

आठवण सुहास शिरवळकरांची...

नातं शब्दांपलीकडचं...
(मंदार शिंदे ९८२२४०१२४६)

साधारण १९९८-९९ च्या दरम्यानची गोष्ट आहे. वाचनाची आवड वाढत चालली होती.  पंचतंत्र, अकबर-बिरबल, इसापनीती, रामायण-महाभारत वाचता-वाचता पुस्तकांचा आकार वाढत चालला होता. फास्टर फेणे आणि चंपक-चांदोबा मागं पडू लागले होते. मराठी साहित्याच्या पंगतीमध्ये ‘मृत्यंजय’ आणि ‘स्वामी’सारख्या पुरणपोळ्यांचा आस्वाद घेत होतो. त्याचवेळी वपुंच्या कथा सात्विक पोळीभाजीपासून चखण्यातल्या शेव-चकलीपर्यंतचे अनुभव देत होत्या. पुलंच्या पुस्तकांतून कधी साखर-फुटाणे तर कधी शिरा-भाताची तृप्ती लाभत होती. आणि अगदी त्याच काळात कडक तंदुरी चिकनचा अनुभव देणारं एक पुस्तक हाती लागलं. अर्पण पत्रिकेनंच निम्मा गड सर केला होता...

"त्या सर्व वाचकांना, ज्यांनी 'दुनियादारी' विकत घेतली, वाचनालयातून वाचली, मित्राची ढापली, वाचनालयाची पळवली... पण 'दुनियादारी'वर मनापासून प्रेमच केलं ! त्यांनाही, ज्यांनी 'दुनियादारी'च्या लोकप्रियतेचा मनापासून द्वेष केला ! आणि... खेडं, गाव, शहर, नगर, व महानगरातील तमाम 'कट्टा-गँग्ज'ना, ज्या 'दुनियादारी' जगल्या... जगतात… जगतील !"

येस्स ! ते पुस्तक होतं, सुहास शिरवळकर लिखित 'दुनियादारी'. हे पुस्तक पहिल्यांदाच वाचणाऱ्या सगळ्यांचं होतं, तसंच माझंही झालं. 'दुनियादारी'नं अक्षरशः गारूड केलं. दिग्या, श्रेयस, सुरेखा, शिरीन, श्रोत्री... अख्खी कट्टा गँग ओळखीची झाली. कित्येक प्रसंग अगदी आपल्याच आजूबाजूला घडलेत, घडत आहेत असं वाटू लागलं. मैत्री, प्रेम, धाडस, थ्रिल... यांभोवतीच विचार फिरु लागले. पुढं पुण्याला आल्यावर पहिलं काम काय केलं असेल तर, एस. पी. कॉलेजवर जाऊन 'दुनियादारी'तले प्रसंग री-लिव्ह करणं. दिग्याचा कट्टा, अलका टॉकीज, रीगलपासून ते शिरीनच्या बंगल्यापर्यंत सगळी ठिकाणं पायी फिरुन शोधली होती. शनिवार पेठेतल्या सुशिंच्या घरापर्यंतही पोहोचलो होतो, पण थेट घरात जाऊन त्यांना भेटायचं धाडस तेव्हा झालं नाही. सिनेमात किंवा सर्कशीत सिंहाचे खेळ बघायला आवडतात म्हणून कुणी 'चला, गुहेत जाऊन सिंहाची आयाळ खाजवून येऊ' असं म्हणेल का ? पण आता वाटतं, त्यावेळी धाडस करायला हवं होतं... असो.

तसं अगदीच वाईट वाटून घ्यायचं कारण नाही, कारण सुहास शिरवळकरांशी माझी आधीच दोनदा भेट झाली होती. साधारण १९९९ साली काही महिन्यांच्या अंतरानं ते भेटले होते. निमित्त होतं त्यांच्या प्रकट मुलाखतीचं. पहिली भेट झाली सांगलीतल्या वि. स. खांडेकर वाचनालयात. सुशिंचा लेखन प्रवास, त्यांच्या पुस्तकांमागील प्रेरणा, रहस्यकथांपासून सामाजिक कादंबऱ्यांपर्यंत त्यांची अफाट साहित्य निर्मिती, अशा अनेक गोष्टींवर सुशि दिलखुलासपणे व्यक्त झाले. विशेष लक्षात राहिलेल्या दोन गोष्टी म्हणजे सुशिंचं प्रवास-प्रेम आणि लेखन-शिस्त.

आपल्या कथा-कादंबऱ्यांमध्ये गावांची, स्थळांची, हॉटेल्स आणि कॉलेजेसची, निसर्गाची एवढी हुबेहूब वर्णनं सुशि कशी करतात, हे मला पडलेलं कोडं होतं. तोपर्यंत कोवळीक, सालम, दास्तान वगैरे काही पुस्तकं वाचून काढली होती. पुणे-मुंबई हाय-वे वरची हॉटेल्स आणि ढाबे, पुण्या-मुंबईतलेच नाही तर राजस्थानातल्या गावांतल्या गल्ली-बोळांची डिटेल वर्णनं त्यांच्या कथांचा अविभाज्य भाग आहेत. सुशिंनी आपल्या लाडक्या 'बॉबी'वरून लांबलांबचा प्रवास कसा केला आणि आपल्या लेखनात त्याचा उपयोग कसा केला, हे त्यांनी मुलाखतीत मोकळेपणानं सांगून टाकलं.

दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली, एकावेळी अनेक विषयांवर लेखन करण्याच्या पद्धतीची. तेव्हा आत्तासारखे कॉम्प्युटर किंवा मोबाईलमधले स्टोअरेज आणि सॉर्टींगचे पर्याय उपलब्ध नव्हते. आज गुगल ड्राईव्हवर सेव्ह केलेले डॉक्युमेंट्स आपण लॅपटॉप, मोबाईल, डेस्कटॉप अशा कुठल्याही माध्यमातून ऐक्सेस करू शकतो, कॉपी-पेस्ट, एडीट करू शकतो. पण या गोष्टी अस्तित्वात नसताना सुशिंनी एका शिस्तबद्ध पध्दतीनं अक्षरशः शेकडो पुस्तकं लिहिली. त्यांनी मुलाखतीत सांगितलं की, एका कथेवर काम सुरु असताना अचानक दुसराच प्रसंग किंवा कल्पना सुचली की ते वेगळ्या पानावर लिहून त्यांच्या शेल्फच्या वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये ठेऊन द्यायचे. पुढं त्या थीमवर लिहायला घेतलं की पाच-दहा प्रसंग आधीच लिहून झालेले असायचे. यामुळं कथा लिहून पूर्ण व्हायचा स्पीड वाढायचा आणि अचानक सुचलेली कल्पना हरवायची भीतीही नसायची. वाचकांसाठी आणि खास करून होतकरु लेखकांसाठी सुशिंच्या या टिप्स खूपच मोलाच्या होत्या.

सुशिंच्या मुलाखतीचा एक सेक्शन हमखास 'डेडीकेटेड टू दुनियादारी' असायचा. मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीनं 'दुनियादारी'वर एकही प्रश्न विचारला नसल्यास श्रोत्यांमधून नक्की यावर प्रश्न यायचे. 'दुनियादारी सत्य घटनेवर आधारित आहे काय' अशा निरुपद्रवी चौकशांपासून ते 'दुनियादारीचा शेवट गोड नसता का करता आला' अशा तक्रारींपर्यंत सगळ्या प्रश्नांना सुशि हसतमुखानं सामोरे जायचे, प्रामाणिक आणि पटणारी उत्तरं द्यायचे. कसलाही साहित्यिक अभिनिवेश त्यांच्या बोलण्यात नसायचा. वि. स. खांडेकर वाचनालयातल्या त्या मुलाखतीदरम्यान तर ते 'दुनियादारी'बद्दल जास्तच खूष होऊन बोलले. अर्थात त्याला कारणही तसंच विशेष होतं. त्या मुलाखतीआधी काही दिवस मुंबईची एक तरुण कलाकारांची टीम त्यांना भेटून गेली होती. 'दुनियादारी'वर सिनेमा बनवायचं प्रपोजल घेऊन ते आले होते आणि नुसत्या प्रपोजलमुळं सुशिंना झालेला आनंद त्या मुलाखतीत प्रत्येकाला जाणवत होता.

मुलाखतीचा कार्यक्रम संपल्यानंतर अनौपचारिक गप्पा झाल्या. सुदैवानं तेव्हा कुणाकडंच मोबाईल फोन नव्हते. त्यामुळं सेल्फीच्या चक्रव्यूहात न अडकता, ऑटोग्राफ करत असताना सुशिंसोबत खूप लोकांना बोलता आलं. मी मला आवडलेली पुस्तकं, प्रसंग, पात्रं याबद्दल थोडंसं बोललो. त्यांनी शांतपणे, लक्षपूर्वक ऐकून घेतलं. एक-दोन किस्से ऐकवले, न छापलेल्या काही 'बिहाईन्ड द सीन्स' गोष्टी सांगितल्या.

त्यानंतर काही महिन्यांतच पुन्हा गणेश वाचनालयाच्या वर्धापन दिनानिमित्त सुशिंच्या प्रकट मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं होतं. मुलाखत नेहमीप्रमाणं झकास झाली. औपचारिक कार्यक्रम संपल्यावर इतर उपस्थितांसोबत मीही त्यांना भेटायला गेलो. मला बघितल्याबरोबर सुशि म्हणाले, "अरे, वि. स. खांडेकरमध्ये आपण भेटलो होतो ना ? सॉरी, मी तुझं नाव विसरलो." नाव विसरायला मी त्यांना माझं नाव सांगितलंच कुठं होतं ? तरी त्यांनी नुसता चेहरा लक्षात ठेऊन आपणहून ओळख दिली होती... अगदी अनपेक्षित ! त्यानंतर काही वर्षांनी सुशि गेल्याची बातमी कळाली तेव्हा थेट काळजात कळ उठली होती, ती मात्र अनपेक्षित नक्कीच नव्हती. छापलेल्या शब्दांच्या पलीकडं जाऊन त्यांनी आपल्या वाचकांशी नातं कसं प्रस्थापित केलं होतं, ते मी प्रत्यक्ष अनुभवू शकलो हे माझं भाग्यच !



Share/Bookmark